डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 16 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात
Newsworldmarathi Pimpri: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु), पिंपरी, पुणे येथे 16 वा पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
या समारंभाला महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तेलंगणा; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे चे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पिंपरी, पुणे चे प्र-कुलपती मा. डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे च्या प्र-कुलगुरू मा. डॉ. स्मिता जाधव, आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महेश मुरलीधर भागवत यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (ऑनोरिस कौसा) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना चारित्र्य, धैर्य, विनय, बांधिलकी आणि श्रद्धा या पाच मूलभूत मूल्यांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
प्र-कुलपती डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आम्ही विद्यापीठात विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न घडवतो.”
या समारंभात 12244 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 73 पीएच.डी., 10884 पदव्युत्तर, 1276 पदवी आणि 11 पदविका धारकांचा समावेश आहे. परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या 31 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला. समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील यशोगाथांचा आढावा घेण्यात आला.
मुंडे समर्थक माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे निधन
Newsworldmarathi latur : भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं अपघाती निधन झालं आहे. तुळजापूर ते औसा महामार्गावर देशमुख यांच्या कारचा अपघात झाला. लातूरमध्ये झालेल्या अपघातात देशमुख यांचा मृत्यू झाला. आर. टी. देशमुख माजलगावचे माजी आमदार होते. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे ते खंदे समर्थक होते. पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला ते कायम उपस्थित असायचे. मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची ओळख होती.
राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गंभीर अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा गाडी अपघात झाला असून, या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना लातूर-तुळजापूर मार्गावरील बेलकुंड उड्डाणपुलावर घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल ओलांडत असताना देशमुख यांची कार स्लिप झाली. यावेळी गाडीचा तोल सुटल्यामुळे ती थेट सुरक्षा कठडा तोडून रस्त्याच्या बाहेर चार वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले, त्यांना तत्काळ उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात मात्र यात त्यांचा मृत्यू झाला.
51 वर्षात एवढा पाऊस मी बघितला नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून इंदापूरमध्ये पूर पाहणी…
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. बारामती, दौंड, जुन्नर, खेड, शिरूर, भोर, मुळशी, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, हवेली तालुक्यांत चांगलीच दैना केली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. असं असताना आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे आज भल्या पहाटे पुणे, इंदापूर, बारामती दौऱ्यावर आहेत.
यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझी आई 87 वर्षाची आहे . आईचं लग्न झालं त्याला 51 वर्ष झाली . तेव्हापासून एवढा पाऊस आईनेही पाहिला नाही. बारामती दौंड इंदापूर ची वार्षिक सरासरी 14 इंच आहे. 13 इंच पाऊस एका दिवसात पडला. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस पडला, असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये अवकाळी मुसळधार पावसाने मोठा कहर केला असून, अवघ्या एका दिवसात तब्बल १३ इंच पाऊस पडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या भागांची वार्षिक सरासरी पावसाची मर्यादा १४ इंच आहे, त्यामुळे एका दिवसात इतका पाऊस पडणं हे अतिशय धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं.
नीरा डावा कालवा आणि आणखी एका कालव्याला भगदाड पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस झाल्याचेही नोंदले गेले आहे. शेतकऱ्यांची पिके, जनावरांचा चारा आणि नागरिकांची घरं या सर्वांचे मोठे नुकसान झाल्याचे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, “माझी आई ८७ वर्षांची आहे, तिला सुद्धा एवढा पाऊस कधीच आठवत नाही. पावसामुळे अनेक घरांना भेगा पडल्या आहेत, कालवे फुटल्यामुळे गावांत पाणी घुसलं आहे. सध्या वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. जिथे धोका नाही, तिथे वीजपुरवठा लवकरच सुरू केला जाईल.”
पुणे-सोलापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर; दहा गाड्यांचे टायर फुटले, मदतीअभावी वाहनचालक हैराण
Newsworldmarathi Pune: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस परिसरात खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी (दि. २४ मे) सायंकाळच्या सुमारास साई बेकरीजवळ खड्ड्यांमध्ये अडकून एकामागून एक नऊ ते दहा चारचाकी वाहनांचे टायर फुटले. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीत सापडावे लागले. विशेष म्हणजे, महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही तत्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप अपघातग्रस्तांनी केला आहे.
पाटस गावाजवळील उड्डाणपूल संपल्यानंतरच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, या ठिकाणी वाहनांचा वेग अधिक असल्याने गाड्यांना धक्का बसून टायर फुटण्याच्या घटना घडल्या. काही गाड्यांमध्ये महिला व लहान मुले असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला.
अपघातग्रस्त वाहनचालक गणेश आव्हाड यांनी सांगितले की, “रस्त्यावर अचानक मोठा खड्डा आला आणि आमच्या गाडीचे दोन्ही टायर फुटले. गाडीत कुटुंबासह प्रवास करत होतो. अपघात थोडक्यात टळला. आम्ही पाटस टोल नाक्यावर मदतीसाठी कॉल केला, पण कोणतीही मदत मिळाली नाही.”
घटनेनंतर टोल नाक्यावरील पेट्रोलिंग व्हॅनने घटनास्थळी येऊन खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापूर्वीच अनेक वाहनांचे नुकसान झाल्याने संतप्त प्रवाशांनी टोल प्रशासनाच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला.
दरवर्षी मान्सूनपूर्व काळातच महामार्गावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढत असून, वाहनचालकांचे प्राण धोक्यात येत आहेत. या प्रकारांमुळे महामार्ग विकास प्राधिकरण व टोल व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहनचालकांनी मागणी केली आहे की, रस्त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे आणि टोल भरूनही वेळेवर मदत न मिळणे ही गंभीर बाब असून, संबंधित प्रशासनावर कारवाई व्हावी.
30 वर्षा नंतर भरला पाचवीचा वर्ग,राष्ट्रगीत,हजेरी घेऊन भरला गणिताचा तास
Newsworldmarathi Pune : वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता पाचवी 1995 बॅचच्या वर्गातील मुला – मुलींनी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जुन्या नव्या आठवणीला उजाळा देत कार्यक्रम संपन्न झाला. स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या प्रारंभी या मुलांनी गावातून चालत शाळेत गेले.शाळेत गेल्या नंतर राष्ट्रगीत गाऊन वर्ग भरवण्यात आला, त्यावेळचे वर्गशिक्षक तुकाराम कांबळे यांनी वर्गाची हजेरी घेऊन गणितातील बेरीज,वजाबाकी शिकवून आजच्या काळात ही समाजात वावरताना कोणत्या गोष्टीची गोळा बेरीज केली जावी व कोणत्या गोष्टीची वजाबाकी करावी म्हणजे आयुष्य सुखकारक होईल यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत आखाडे यांनी केले तर अनुमोदन राहुल डोके यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बडे सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त थोरवे मॅडम,दत्तात्रय कोठावळे,धोंडीराम बटुळे,तुकाराम कांबळे,सुभाष मोटे,मधुकर इंगोले हे उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाच्या वेळी अभिजित डुंगरवाल,राहुल डोके, हनुमंत आखाडे,राजेंद्र डोके,अमोल गावडे,सुदर्शन नारटा,संजीवनी हावळे, संजीवनी कोकणे,बानू गायकवाड,संतोष शेंडगे,या सह इतरही माजी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करत शाळेच्या जुन्या नव्या आठवणीला यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमाला सेवानिवृत्त गुरुजनांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमानंतर सर्वांनी सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन,दरवर्षी एक दिवस एकत्र येण्याचा संकल्प केला.
Sanjay Raut : ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी कोणताही अडथळा नाही; संजय राऊतांचे सूचक विधान
Newsworldmarathi Mumbai: Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजूट पुन्हा चर्चेत आली असून, यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नारायणगाव येथे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील एकत्र येण्यास कोणताही अडथळा नाही.
राऊत म्हणाले, “या विषयावर चर्चा झाली तर ती फक्त राज ठाकरे यांच्याशीच होऊ शकते. परंतु, महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वाभिमानासाठी जर गट-तट विसरून सगळे एकत्र आले, तर हीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी मानवंदना ठरेल.”
बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण जीवन मराठी माणसाच्या हक्कासाठी समर्पित होते, हे सांगताना राऊत यांनी असेही नमूद केले की, “मराठी समाजाच्या हितासाठी एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तरी त्यात काही गैर नाही. आम्ही त्यासाठी सदैव तयार आहोत, आणि त्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही.”
मुंबई हे मराठी माणसाचे हृदयस्थान असल्याचे सांगून राऊत यांनी मराठी समाजात एकजुटीचे आवाहन केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठी समाजासाठी ठोस पावले उचलण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही उद्धृत करत राऊत म्हणाले की, “ठाकरे बंधू जर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्याचा भाजपला आनंदच होईल.” मुनगंटीवार हे नेहमीच शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रही होते, हे देखील राऊत यांनी नमूद केले.
या विधानामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता सर्वांचे लक्ष ठाकरे बंधूंनी पुढे काय भूमिका घेतात याकडे लागले आहे.
ममता फाउंडेशनच्या अनाथ युवक-युवती विवाह बंधनात अडकले
Newsworldmarathi Pune: जन्मताच एचआयव्ही सारखा गंभीर आजार,कुटुंबाने साथ सोडल्याने अनाथ उपेक्षितच जगणं पदरी आलं.मात्र ममता फाउंडेशन संस्थेने आधार दिला.सांभाळ केला,शिक्षण दिले आणि स्वतः च्या पायावर उभे राहिलेले तरुण तरुणी सुखी आनंदी आयुष्याची स्वप्न साकारण्यासाठी लग्नाच्या बेडीत अडकले.या सोहळ्याला अभिनेते,अभिनेत्री व समाजातील प्रतिष्ठात मंडळींनी उपस्थित राहत शुभ आशीर्वाद दिले.
एचआय व्ही बाधित अनाथ उपेक्षितांचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ममता फाउंडेशन संस्थेची स्थापना 200८ मध्ये डॉ.शिल्पा बुडूख व अमर बुडूख यांनी केली.सुरुवातीला भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या संस्थेला माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी तीन गुंठे मोफत जागा दिली.संस्थेने स्वतःची इमारत उभारली.
या संस्थेतील युवती चिरंजीवी रुपाली व चि.महेश ,ममता परिवाराचा चिरंजीव आकाश व चिरंजीवी दिव्या यांचा शुभविवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला.हळद, मेंहदी, बॉन्ड यांनी वालावरण प्रसन्न झाले होते.
माजी नगरसेवक प्रकाश कदम, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे,माजी सरपंच दीपक गुजर यांनी वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले.यावेळी शरद सोनवणे,प्रमोद ढसाळ,पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, संगीता यादव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचलन अँड दिलीप जगताप यांनी केली.
ममता फाउंडेशन संस्थेत अंगा खांद्यावर खेळवळलेली माझी लेकरं आज विवाह बंधनात अडकली. कन्यादान व सोहळा आनंदाश्रूनी सोहळा पार पाडला.आज खऱ्या अर्थाने संस्था स्थापनेचे सार्थक झाले असे वाटते.उपेक्षित म्हणून बेवारस झालेल्या लेकरांची मी माय पूर्वीच झाले आज सून आणि जावई देखील आले.-डॉ.शिल्पा बुडूख.संचालिका ममता फाउंडेशन.
नागरिकांनी वाचला आमदारांसमोर समस्यांचा पाढा; लवकर समस्या सोडविण्याची मागणी
newsworldmarathi Pune: कात्रज-कोंढवा सुखसागरनगर, रस्ता, शिवशंभोनगर परिसरातील नागरी सुविधा आणि समस्यांबाबत विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी महापालिका, महसूल, पोलिस आणि महावितरणच्या अधिका-यांसमवेत बैठक घेतली. सुखसागरनगरमधील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात झालेल्या जनता संवाद बैठकीत नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वायन या वेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
श्रीराम कुलकर्णी म्हणाले, सुखसागरनगर, शिवशंभोनगर, साईनगर आणि कात्रज कोंढवा रस्ता परिसरात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस पडत असतानाही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही. दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गुजरवाडी रस्ता, भारतनगर, खोपडेनगर परिसरात कायदा व सुव्यवस्था दृष्टीने पोलिस मदत केंद्र सुरू करण्याची मागणी या वेळी माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांनी केली. संतोष साखरे यांनी सुखसागर गल्ली नंबर आठमध्ये रस्त्यावर पाणी साठत असल्याची तक्रार मांडली.
रोहित कोकणे यांनी शिवशंभोनगर येथे विद्युत लाइन भूमिगत करण्याची मागणी केली. अमृता चव्हाण यांनी ओढ्यालगत सुरक्षा भिंतीचा प्रश्न मांडला. यासह नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज व्यवस्था, बीजपुरवठा खंडित होणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुखसागरनगरमधील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या ठिकाणी असलेल्या चौकीत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती करणे, पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी आदी समस्या मांडल्या.
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने, नायब तहसीलदार स्वाती नरुटे, सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे, महावितरणचे शाखा अभियंता जावेद खान, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता दीपक रोमण, माजी नगरसेवक प्रकाश कदम, रंजना टिळेकर, वृषाली कामठे, मनीषा कदम, वीरसेन जगताप, राणी भोसले, तुषार कदम आदी उपस्थित होते.
पुणं हादरलं! दोन चिमुकल्यांसह महिलेचा निर्घृण खून; मृतदेहासोबत केलं भयानक कृत्य
Newsworldmarathi Pune: पुण्यात एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या दोन चिमुकल्यांसह निर्घृण पद्धतीने मारण्यात आलंय. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना खंडाळे (ता. शिरूर) गावच्या हद्दीमध्ये घडली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब भीमराव येळे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे येथील ग्रोवेल कंपनीचे कामगार कंपनीत आले असताना काही कामगारांना कंपनीच्या पाठीमागे लक्ष्मी मंदिराजवळ एका महिलेसह दोन लहान बालकांचे मृतदेह पावसामध्ये पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील सीमा पंडित यांनी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाची महिला, तसेच अंदाजे ३ ते ४ वर्षे व १ ते २ वर्षे वयाच्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला.
या वेळी तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी अंगुली पथक व श्वानपथक आले होते. मात्र, या महिला व मुलांबाबत काहीही माहिती मिळाली नाही.
बारामती-दौंडमध्ये पावसाचा कहर! अजित पवार म्हणाले, वर्षातला निम्मा पाऊस एका दिवसात पडलाय
Newsworldmarathi Pune: राज्यात दाखल झालेल्या जोरदार मान्सूनने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बारामती, दौंड, माळशिरस, इंदापूर या भागात रविवारी आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. बारामतीत तर एका दिवसात तब्बल 7 इंच पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी वर्षभराच्या निम्म्या सरासरी पावसाइतकी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीत नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी थेट पालखी महामार्गावर शिरलं. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पिंपळी परिसरात कालवा फुटल्यामुळे अनेक घरे जलमय झाली असून, नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
अजित पवारांनी पहाटेच बारामती, काटेवाडी, कान्हेरी या भागांचा दौरा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजित पवारांनी प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले.
दौंडमध्ये पूरसदृश परिस्थिती, महामार्ग जलमय
दौंडमध्ये पुणे-सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला असून, एक इनोव्हा कार वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माळशिरसमध्ये 500 नागरिकांचे स्थलांतर
माळशिरस तालुक्यात नीरा नदीला पूर आल्याने नातेपुते ते बारामती रस्ता बंद करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या पथकाने कुरभावी आणि संग्राम नगर येथून तब्बल 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.

