मनीषा बागणीकर यांची चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड
Newsworldmarathi Pune: चक्रभेदी सोशल फाउंडेशन ही संस्था विधवा आणि एकल महिलांसाठी तसेच पर्यावरण विषयक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अनेक निराधार, एकल व विधवा महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधण्याचे मोलाचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.
सध्या ‘मायेचं, हक्काचं घर’ हे केंद्र स्थापन करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. शिव्या मुक्त समाज अभियान, मोफत टी-स्टॉल वाटप, शेअरिंग-केअरिंगसारखे उपक्रम संस्थेच्या नावीन्यपूर्ण कार्याची साक्ष देतात. या सर्व प्रयत्नांचा उद्देश म्हणजे विधवा व एकल महिलांना समाजात मान-सन्मान प्राप्त करून देणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
या कार्यात अधिक बळ देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी मनीषा बागणीकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या मनीषा बागणीकर यांना सामाजिक कार्याचा समृद्ध अनुभव असून, त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोन आणि कार्यशील वृत्तीमुळे त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी सारिका कांबळे, विशाखा कांबळे, मनोहर पगारे, दिग्विजय बागणीकर यांच्यासह साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे उपस्थित होत्या. महाराष्ट्रभरातून या निवडीचे कौतुक होत असून, मनीषा बागणीकर यांच्या नेतृत्वात चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या कार्यात निश्चितच अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर टस्कर’ संघ श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दर्शनाला
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हंगामातील चषकावर नाव कोरण्याच्या निर्धाराने ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापुर टस्कर’ संघ मैदानात उतरला असून या संघाने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन आणि आरती करून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘इंडीयन प्रिमीयर लीग’च्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ने (एमसीए) महाराष्ट्र प्रिमीयर लीग (एमपीएल) सुरू केली आहे. यंदाचा या लीगचा तिसरा हंगाम सुरु झाला असून या लीगमध्ये उतरलेल्या कोल्हापूर टस्कर संघाची मालकी पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी घेतली आहे. या संघाने सलग दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून पहिल्यावर्षी उपविजेते पदाचा मानही पटकवाला आहे. यावर्षीच्या स्पर्धेसाठी हा संघ पुन्हा एकदा सज्ज झाला असून नव्या जोमाने मैदानात उतरला आहे. या संघाचा लीगमधील पहिला सामना उद्या (शनिवार) होणार आहे. त्यापूर्वी या संघातील खेळाडुंनी हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ची आरती करुन दर्शन आणि आशिर्वाद घेतले. यावेळी कोल्हापुर टस्कर्स संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, श्रीकांत मुंढे यासह सर्व खेळाडू उपस्थित होते.
‘‘यंदा आमचा कोल्हापूर टस्कर संघ हा एकदम संतुलित असून आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने खेळणार आहोत. या संघातील सर्वच खेळाडूंबाबत मी अत्यंत समाधानी आहे. यावर्षी स्पर्धेचे विजेतेपद आम्ही निश्चितपणे पटकविणार असाच आमचा निर्धार आहे. त्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे आशिर्वाद घेतले.’’
राहुल त्रिपाठी, कर्णधार,
Ajit Pawar : “‘चुकीचं वागाल तर कारवाई होणार’; अजित पवारांचा पुण्यातून थेट इशारा
Newsworldmarathi Pune: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि त्याच वेळी प्रशासकीय पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अनियमितता लक्षात घेता एकच डॅशबोर्ड तयार करून नवी वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. यामुळे बिले थांबणार नाहीत, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. ते पुण्यात बोलत होते.
अफवांना फाटा, स्पष्ट इशारा
“मुख्यमंत्र्यांचं विधान अंतिम असतं. कोणीही चुकीचं वागलं तर कारवाई होणार, मग तो कोणताही जिल्हा असो,” असा स्पष्ट इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसेच संजय शिरसाट मंत्री नसून आमदार आहेत, असं स्पष्ट करून त्यांनी गैरसमज दूर केला.
महिलांवरील अत्याचार, राजकीय संवादावर भाष्य
महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यांवर पत्रकारांनी अधिकार पाळावा, असे त्यांनी नम्रतेने सांगितले. तसेच लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यातील संभाषणावर नाराजी व्यक्त करत, ‘सुसंस्कृत राजकारण’ हवे असल्याचे मत मांडले.
निवृत्ती लाभ त्वरित देण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड
अजित पवारांनी जाहीर केलं की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ मिळावेत यासाठी सेवानिवृत्ती विभागात नवीन डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सेवा व्हॉट्सॲपवर
जिल्हा परिषदेच्या विविध सेवा आता WhatsApp चॅटबॉटवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, अंगणवाडीसाठी खास ॲप तयार करण्यात आलं असून लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच ग्रामपंचायतीचा कर आता QR कोडच्या माध्यमातून घरबसल्या भरता येणार आहे. पुणे-मुंबईत बसूनही गावाकडील घराचा कर भरता येईल.
शिक्षण प्रवेश प्रक्रियेबाबत लक्ष
दहावीच्या निकालानंतर सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून उपाययोजना सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
शस्त्र परवाने, मिठी नदी घोटाळा, वादग्रस्त परवाने रद्द
अमिताभ गुप्ता प्रकरणात बीडमधील शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून पुणे आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मिठी नदी घोटाळ्यावर तपास सुरु असून दोषींवर कारवाई होईल.
जागावाटप आणि नुकसानभरपाई बाबत निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांतील जागावाटप महायुती एकत्र बसून ठरवणार असून, रामदास आठवले यांसारख्या मित्रपक्षांनाही सोबत घेण्याचा इशारा दिला. नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करून निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे मनपाच्या महिला अधिकाऱ्याचा छळ; भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप, वरिष्ठांसह आयुक्तांकडे तक्रार पण दाद नाहीच
Newsworldmarathi Pune: राज्यातील महिलांवर होणाऱ्या छळाच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, आता पुणे महापालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या कामगार आघाडीच्या ओमकार कदम या पदाधिकाऱ्यावर महिलेला कामाच्या ठिकाणी त्रास दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, संबंधित पदाधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हाही दाखल असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महिला अधिकाऱ्याने महापालिका आयुक्त, महिला समिती आणि सुरक्षा विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेवटी तिने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार महिन्यांपासून पदाधिकारी सातत्याने धमकी देणे, केबिनमध्ये घुसून जाब विचारणे अशा प्रकारांमधून छळ करत होता. आयोगाने याची गांभीर्याने दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेतली. मात्र, याप्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, महापालिका आयुक्त आणि यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचा छळ होत असेल, तर सामान्य महिला सुरक्षित कशा राहणार? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये विचारला जात आहे. आयोगाची चौकशी सुरू असून, आगामी काळात काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयोगाकडून दखल
भाजपचा एक पदाधिकारी आपला छळ करत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने याची दखल घेऊन, आयोगातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेत जाऊन माहिती घेतली आहे. याबाबत संबंधित महिलेने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली.
काम करताना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कार्यवाहीकरण्याची विनंती केली होती. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार दिली होती. या तक्रारीवर समितीसमोर सुनावणी झाली.
आलिशान गाड्यांचे साम्राज्य उध्वस्त; सावकार नानासाहेब गायकवाडच्या लक्झरी कार्स जप्त
Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे प्रकरणातील नवनवीन घडामोडी समोर येत असताना आता सावकार नानासाहेब गायकवाडची मायावी संपत्तीही उघड झाली आहे. पोलिसांनी गायकवाडच्या रोल्स रॉयस, रेंज रोवर, मर्सिडीज, ऑडी, पजेरो आणि इतर महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्या चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या आहेत.
नानासाहेब गायकवाडने सावकारीच्या जीवावर मोठं आर्थिक साम्राज्य उभारलं. लोकांकडून जमीनी ताब्यात घेणे आणि त्यावर व्याजाचे साम्राज्य उभे करणे, हेच त्याचं मुख्य आर्थिक चक्र होतं. याच माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती त्याने जमवली होती.
गणेश आणि नानासाहेब गायकवाड (Ganesh nanasaheb gaikwad) या पिता-पुत्रांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार वर्षांपूर्वी मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून कारागृहात पाठवले होते. मात्र मागील दीड महिन्यापासून दोघंही पोलिसांना गुंगारा देत होते.
गायकवाडवर आधीच गुन्हे दाखल असून, आता वैष्णवी हगवणे प्रकरणात आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याकडून खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्या मालमत्तेवर हात घातला.
सावधान…! मुंबईसह पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; २४ तासांत ९८ नव्या रुग्णांची नोंद
Newsworldmarathi Pune: राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतो आहे. गेल्या २४ तासांत ९८ नवे रुग्ण आढळून आले असून, त्यात मुंबई आणि पुणे महापालिका क्षेत्रात प्रत्येकी ३४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये चिंता वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १०, तर पुणे ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जानेवारी ते ५ जूनदरम्यान १४,५६५ संशयित रुग्णांची करोना चाचणी झाली असून, त्यातील १,१६२ जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यात मुंबईतील सर्वाधिक ५७५ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ५४८ रुग्ण उपचाराखाली, तर ५९७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
मृत्यूंचे प्रमाण कमी, पण सहव्याधी असणाऱ्यांना अधिक धोका
या कालावधीत राज्यात १७ मृत्यूंची नोंद झाली असून, त्यातील १६ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृतांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, फुफ्फुस विकार, ब्रेन स्ट्रोक, मधुमेह, क्षय अशा गंभीर आजारांचा समावेश होता.
आरोग्य विभागाचा संदेश
“सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी लक्षणे सौम्य असूनदेखील दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे,” अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
गृहकर्जदारांसाठी गुड न्यूज, आरबीआय 0.50 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये घट
Newsworldmarathi Mumbai : देशातील महागाईचा स्थिर कल पाहता, रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रेपो दरात 0.50 टक्के कपात केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झालेल्या MPC च्या या बैठकीत सलग तिसऱ्यांदा रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो आता 5.5 टक्क्यांवर आला आहे. आरबीआच्या या निर्णयामुळं सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल आहे.
स्कॉटलंड संसदेकडून जेष्ठ पत्रकार डॉ. राजेंद्र वाघमारे यांना विकसित भारत परिषदेसाठी आमंत्रण
Newsworldmarathi Pune: स्कॉटलंड संसदेकडून आयोजित विकसित भारत परिषदेसाठी पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांची निवड करण्यात आली आह. येत्या 25 जून रोजी होणाऱ्या स्कॉटलंड येथे भारतीय डायसपोरा साजरा करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी जगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी स्कॉटलंड संसदेने डॉ.राजेंद्र वाघमारे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. यापूर्वी त्यांना लंडन येथील युनायटेड किंगडम ट्रायडेंट इव्हेंट्स अँड मीडिया या संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील ग्लोबल इन्स्पिरेशनल अवॉर्ड्स देऊन गौरविण्यात आले होते .सदर सोहळा युनायटेड किंग्डमचे खासदार वीरेंद्र शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला होता.
या परिषदेत गजेंद्र सिंह शेखावत केंद्रीय मंत्री – संस्कृती आणि पर्यटन, भारत सरकार,श्रीपाद वाय नाईक, केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार,राज्यवर्धन एस राठोड कॅबिनेट मंत्री सरकार राजस्थान,लॉर्ड रामी रेंजर, सदस्य हाऊस ऑफ लॉर्ड्स, यूके,
खासदार बॉब ब्लॅकमन हाऊस ऑफ कॉमन, यूके,बॅरोनेस संदीप वर्मा सदस्य हाऊस ऑफ लॉर्ड्स, यूके
बॅरी गार्डिनर खासदार-हाऊस ऑफ कॉमन्स यूके,गॉर्डन मॅकडोनाल्ड, स्कॉटिश संसद सदस्य, स्कॉटलंड
,मार्टिन डे, माजी खासदार-हाऊस ऑफ कॉमन्स यूके,रॉबर्ट मसीह नहर माजी- स्पेनच्या सिनेटचे सदस्य ,कुलदीप सिंह शेखावत, भाजप अध्यक्ष – युके आणि युरोप
डॉ. संदीप मारवाह ,मधुर भांडारकर प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता,डॉ. मुकेश त्यागी, बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते,डॉ. कुमार राकेश संपादकीय अध्यक्ष ग्लोबल, गव्हर्नन्स न्यूज ग्रुप, समग्र भारत मीडिया ग्रुप नवी दिल्ली, भारत सुधीर चौधरी, प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार, डीडी न्यूज, भारत,मनोग्या लोईवाल वरिष्ठ संपादक आणि निवेदक एनडीटीव्ही इंडिया,डॉ. टी. अनिल कुमार सीनियर प्रख्यात कलाकार, चित्रकार. छायाचित्रकार, नवी दिल्ली, भारत,डॉ.राजेंद्र वाघमारे, मुकेश के मीणा संस्थापक-मुकेशवर आयुर्वेद जिनिव्हा, स्वित्झर्लंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
राजगडावर पर्यटनाचा शोकांत…! बालेकिल्ल्यावरून घसरून तरुणीचा मृत्यू, सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Newsworldmarathi Raigad: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. पुण्यातील २० वर्षीय तरुणी बालेकिल्ल्यावरून १५० फूट दरीत कोसळून ठार झाली. कोमल सतीश शिंदे (वय २०, रा. आळंदी) ही आपल्या पतीसोबत पर्यटनासाठी आली होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उतरताना तिचा पाय घसरून ती दरीत कोसळली.
तात्काळ मदत, पण जीव वाचला नाही
अपघातानंतर कोमलला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस जवान युवराज सोमवंशी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ यांनी मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी महत्त्वाची मदत केली.
राजगड ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, पण सुरक्षिततेचा अभाव?
राजगड किल्ला पुण्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असून, ट्रेकिंगप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. बालेकिल्ला हा गडाचा सर्वोच्च आणि देखणं भाग मानला जातो. परंतु, या ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा सुविधा नाहीत, अशी तक्रार स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर राजगडवरील पर्यटक सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
पोलिस तपास सुरू
या घटनेनंतर वेल्हे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाने गडावरील सुरक्षा उपाय पुन्हा एकदा विचारात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सॉरी, मला माफ करा, हिंजवडीत 25 वर्षीय आयटी अभियंता तरुणीनं संपवलं जीवन
Newsworldmarathi Pune : हिंजवडीतील ‘द क्राऊन ग्रीन’ सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत एका २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ३१ मेच्या पहाटे घडली.
मृत तरुणीचे नाव अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे असून, तिने जीवन संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिने लिहिले आहे
“सॉरी, मला माफ करा. मी हे स्वच्छेने करत आहे. माझी आता जगायची इच्छा संपली आहे…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा पहाटे ४.३० वाजता दुचाकीवरून सोसायटीमध्ये आली आणि लिफ्टने थेट २१ व्या मजल्यावर गेली. ४.४२ वाजता तिने इमारतीवरून उडी घेत आपले जीवन संपवले.
शवविच्छेदन अहवालात तिच्या महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, कोणताही घातपात अथवा संशयास्पद बाब आढळली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलीस तपासात नैराश्यामुळे जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

