वैष्णवी हगवणे मृत्युमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो, तर सासऱ्याची मटण पार्टी

Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना दुसरीकडे तिचे सासरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांचा मटण पार्टीचा व्हिडीओ समोर आल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांचे बंधू सुशील हगवणे यांना अखेर आज (२३ मे) पहाटे ४.३० वाजता पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलिसांचा ससेमिरा चुकवत असताना हे आरोपी नेमके कुठे लपले होते, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी तळेगाव दाभाडे येथील ‘तांबडा पांढरा रस्सा’ हॉटेलमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी मटण जेवणाचा आस्वाद घेतला होता. या घटनेनंतर काही तासांतच वैष्णवी हगवणेने गळफास घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे मटण पार्टीचा व्हिडीओ आणि तिचा मृत्यू यामध्ये फक्त दोन दिवसांचे अंतर असल्याने समाज माध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “मुलगी मृत्युमुखी पडते आणि सासरा मटणावर ताव मारतो?” असा सवाल नेटिझन्सकडून विचारला जात आहे. पोलिसांनी दोघा भावांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरु असून, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात हत्या झाली असल्याचा ठाम आरोप केला आहे. मृत्यूला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आवाज उठत आहे.

आनंदाची बातमी…! तूर खरेदीला केंद्र सरकारकडून पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या सविस्तर…

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत, केंद्र सरकारने तूर खरेदी मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. राज्यात तूर खरेदीची मुदत 13 मे 2025 पर्यंत देण्यात आली होती. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तूर खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसा प्रस्ताव पणन विभागाकडून केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. या मागणीची दखल घेत ही मुदत 28 मे 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. राज्यात 1 लाख 37 हजार 458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्या पैकी 13 मे 2025 पर्यंत 69,189 शेतकऱ्यांकडून 1,02,951 मे.टन तूर खरेदी झालेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी 90 दिवसांची मुदत 13 मे 2025 रोजी संपली होती. उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होती. केंद्र सरकारने राज्याला सन 2024-25 हंगामात पीपीएस अंतर्गत 2 लाख 97 हजार 430 मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत 764 खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 7,550 रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे. सध्या बाजारात तुरीचे दर कमी असल्याने हमीभावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यासाठी उर्वरित शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.

पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्ब्ल २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

Newsworldmarathi Mumbai: राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट सुरू आहे. राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. गृह विभागाने मागील शुक्रवारी २७ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, आता आणखी २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजतिलक रोशन, राकेश ओला, समीर शेख यांच्यावर मुंबई पोलीस उपआयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत ४९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या. मात्र, मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांना वगळता पोलीस दलात फारसा बदल केलेला नव्हता. याचे कारण पूर्वीच्या सरकारमध्येही फडणवीस हेच गृहमंत्री होते व आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही गृहमंत्रीपद त्यांच्याचकडे आहे. दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात येतात. त्यानुसार, पोलीस दलात खांदेपालट सुरु आहे. यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. तसेच उपायुक्त आणि समादेशक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांचीही नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे : राकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड ➝ पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, रायगड महेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ➝ पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर योगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड ➝ पोलीस अधीक्षक, कोल्हापूर बच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला ➝ समादेशक, रा.रा. पो.बल, गट क्र. 4, नागपूर अर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ➝ पोलीस अधीक्षक, अकोला मंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई ➝ पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर राजातिलक रोशन – सहायक पोलीस महासंचालक, मुंबई ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर ➝ पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ➝ पोलीस अधीक्षक, पालघर सौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ➝ गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे मोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे ➝ पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा ➝ समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 9, अमरावती निलेश तांबे – गुन्हे अन्वेषण, नागपूर ➝ पोलीस अधीक्षक, बुलढाणा समीर शेख – पोलीस अधीक्षक, सातारा ➝ पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई तुषार दोषी – पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, सातारा सोमय मुंडे – पोलीस अधीक्षक, लातूर ➝ पोलीस उप आयुक्त, संभाजीनगर परिमंडळ 1 जयंत मीणा – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे ➝ पोलीस अधीक्षक, लातूर नितीन बगाटे – उप आयुक्त, संभाजीनगर ➝ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी रितू खोकर – अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली ➝ पोलीस अधीक्षक, धाराशिव

Breaking news…! अखेर सात दिवसानंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक; पहाटे काय घडलं?

0
Newsworldmarathi Pune : Vaishnavi Hagawane Death : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रा हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच आता वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला पोलिसांनी सात दिवसानंतर अटक केली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (शुक्रवार) पहाटे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील फरार होते. याबाबत मिळालेाल्या माहिनुसार, याआधी वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना अटक करण्यात आली होती. वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठवला जात आहे. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला सहा दिवस उलटलेत, तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणेंना अटक का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा…! आता २०० रुपयांत होणार हिस्सेवाटप मोजणी !

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी महसूल विभागाने आता केवळ २०० रुपये मोजणी शुल्क भरून जमिनीच्या हिस्सेवाटपाची (नोंदणीकृत वाटणीपत्र) मोजणी व नकाशे देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी जमाबंदी आयुक्तांच्या आदेशानुसार मोजणीसाठी शुल्क आकारले जात होते. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रक्रियेत मोठा बदल करत केवळ २०० रुपयांमध्ये मोजणी करून नकाशा देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागातील जमाबंदी आयुक्त आणि भूसंपादन संचालकांच्या बैठकीत हिस्सेवाटप मोजणीसाठी २०० रुपये शुल्कचा निर्णय अंतिम करण्यात आला. ही सेवा सर्वसामान्यांसाठी खुली राहणार आहे. ७/१२ अभिलेखांमध्ये वाटणी झाल्यानंतर त्यास अनुसरून पोट विषयांची मोजणी करणे, ही प्रक्रिया पूर्वी गुंतागुंतीची होती. आता ती सुलभ, वेगवान आणि खर्चिकतेपासून मुक्त झाली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना कायदेशीर जमीन वाटपाची प्रक्रिया सोप्या पद्धतीने पर्ण करता येणार आहे. तसेच हिस्सेवाटप मोजणी प्रक्रियेतील शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करणारा हा निर्णय, राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणारा आहे, असे बावनकुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. या पूर्वी महसूल खात्याने जात प्रमाणपत्र, घरकुल बांधकामासाठी निःशुल्क वाळू, पाणंद रस्ते, ५०० रुपयाचे मुद्रांक शुल्क माफ, जमिनीचे जिओ टॅगिंग, तुकडाबंदी कायद्यात सुधारणा अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

खळबळजनक…! मुख्याध्यापक पत्नीने पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जंगलात नेऊन जाळला

0
Newsworldmarathi Yavatmal : शहरातून एक धक्क्कादायक बातमी समोर आली आहे. १५ मे रोजी यवतमाळमधील चौसाळा जंगलात एक मृतदेह आढळला होता, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, मृतदेहामागील गूढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन खून केला. तसेच, विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास जंगल परिसरात मृतदेह जाळल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू अरविंद देशमुख ( वय-३२, रा. सुयोगनगर) यांचा मृतदेह असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शंतनू १३ मे च्या सायंकाळपासून बेपत्ता होते. ते सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्याच ठिकाणी त्यांची पत्नी निधी (वय- २३) ही मुख्याध्यापिका होती. त्या दोघांचा प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. दरम्यान, जंगलामध्ये मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी त्यांच्या मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एका मित्राच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच निदर्शनास आले होते. येथूनच पोलिस तपासाची दिशा निश्चित झाली. मुख्य आरोपी पत्नी निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आधिक बळावला गेला. निधीची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. निधीला मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यात आला अन् जीव गमावला; अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खुन

Newsworldmarathi Pune : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच घरात रहात असताना अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाच्या तोंडावर फळीने मारहाण करुन त्याचा खुन केल्याची घटना घडली आहे. ही घटना बिरदवडी येथे १३ मे रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. बंटिसिंह नरेंद्रसिंह परमार (वय-३०, रा. बिरदवडी, ता. खेड) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हौसिराम पिराजी गाडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रामबाबु रामनाथ जाटव (रा. शिवराज कॉम्प्लेक्स, बिरदवडी, ता. खेड, मुळ रा़ परसोदाता, भरेट, जि़ दतिया, मध्यप्रदेश) असे खून करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटिसिंह आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा रामबाबु याला संशय होता. पतिने घेतलेल्या संशयावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. रामबाबु याने बंटिसिंह परमार हा झोपलेला होता. त्यावेळी त्याने त्याच्या तोंडावर लाकडी फळीने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी पळून गेली होती. ती परत आली़. तेव्हा बंटिसिंह याने रामबाबु जाटव याच्याशी ओळख पटवून ६ दिवसांपूर्वी तो त्यांच्याच घरी राहू लागला होता. दरम्यान, त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा राग रामबाबू याच्या मनात होता. एके दिवशी याचाच राग मनात धरुन त्याने परमारला लाकडी फळीने मारहाण केली होती. त्यानंतर त्याने घरात फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसून टाकून पुरावा नष्ट केला होता. बंटिसिंह परमार याला जखमी अवस्थेत १३ मे रोजी रात्री उशिरा वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो बेशुद्धावस्थेत होता. तेथून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १९ मे रोजी सकाळी पावणे बारा वाजता त्याचा मृत्यु झाला. ससून रुग्णालयाने अहवाल पाठविताना पहिल्या मजल्यावरुन पडल्यामुळे जखमी झाला, असे निदान दिले होते. तर, त्याला अगोदर वायसीएममध्ये दाखल करताना घरात भांडणात जखमी झाल्याचे म्हटले होते. दोन्ही रिपोर्टमधील विसंगती लक्षात घेऊन पोलिसांनी बिरदवडी येथील घरमालक तसेच आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. बंटिसिंह याचा मृत्यु झाल्यानंतर तो पळून पुण्यातून गेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशात रवाना झाले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाची प्रतिक्षा दुधाडे राज्यात प्रथम

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने आदिवासी विकास विभागातील पदभरतीसाठी सरळसेवा पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुण्याच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रतिक्षा दुधाडे हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावत या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. १७ पदनामांच्या एकूण ६११ रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर विभागांतर्गत गृहपाल (स्त्री) पदाकरीता झालेल्या लेखी परीक्षेत प्रतिक्षाने हे यश मिळविले आहे. हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयातून प्रतिक्षाने राज्यशास्त्र विषयात बी. ए. पदवी संपादन केली आहे. आपल्या या यशात महाविद्यालयीन पातळीवर प्राप्त झालेल्या आणि विशेषतः राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नीता बोकील यांच्या मार्गदर्शनाचा विशेष वाटा असल्याचे तिने नमूद केले. दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा, सचिव श्री. हेमंत मणियार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बाब असल्याचे नमूद करत प्रतिक्षाचे अभिनंदन केले आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार; बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी ‘साथी’ मदत करणार

Newsworldmarathi Mumbai: राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणि खते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही. साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात घेता येईल, याचा विचार करूनच त्‍या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगाम आढावा बैठकीसंदर्भातआयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने केंद्र शासनाच्या ‘साथी’ या पोर्टलवर बियाणे नोंदणी करण्याचा नियम केला आहे. या नोंदणीमुळे हे बियाणे ट्रेसेबल होणार आहे. बोगस बियाणांबाबत कठोर पावले उचलण्यात येत असून यावर्षीपासून सर्व बियाणांची माहिती’साथी’ या पोर्टलवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे., असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. खताच्या लिंकिंगबाबत कडक कारवाई खतांच्या बाबतीत लिंकिंगची तक्रार सातत्याने येत असल्याचे सांगून मुख्यमंत्रीश्री. फडणवीस म्हणाले की, लिंकिंग संदर्भात अतिशय कडक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर बोर्ड लावून त्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे. त्यामुळे लिंकिंगचा आग्रह झाला तर त्यासंदर्भात त्या नंबरवर फोन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.एखाद्या कृषी केंद्रांनी पुरवठादार कंपन्याच्या सूचनेवरून लिंकिंग केल्याचेनिष्पन्न झाल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र – ‘महाविस्तार’ ॲप कृषी विभागाने एआय बेस्ड ‘महाविस्तार’ हे मोबाईल ॲप लॉन्च केले असून या ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती आणि व्हिडिओज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना शेतीतील लागवड, त्याची पद्धती, कीड व्यवस्थापन, त्याची पद्धती, कोणत्या टप्प्यावर काय वापरले पाहिजे, अशी सगळी माहिती, त्याचे व्हिडिओज त्या ॲपमध्ये आहेत. या ॲपमध्ये मराठी भाषेत चॅटबॉट असून त्यावर कुठलाही प्रश्न विचारला असता त्याला योग्य उत्तर मिळते. असा हा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून शेतीसंदर्भातील सर्व माहिती मिळवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर काँग्रेसकडून भारतीय सेनेला सलाम; पुण्यात भव्य तिरंगा यात्रा

0
Newsworldmarathi Pune: भारतीय सेनेने पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेनंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय सेनेला सलाम करत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. काँग्रेस भवन ते मंडई या मार्गावर ही उत्साहपूर्ण यात्रा पार पडली. या तिरंगा यात्रेत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीतांच्या घोषात आणि तिरंग्यांच्या लाटेने संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारले होते.
Oplus_131072
या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी बी. एम. संदीप आणि पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. भारतीय सेनेच्या धाडसाचे आणि त्यागाचे कौतुक करत उपस्थितांनी “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अरविंद शिंदे यांनी यावेळी सांगितले की, भारतीय सेनेने केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे आपल्या देशाच्या सुरक्षेचे प्रतीक आहे. त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी बी. एम. संदीप यांनी देखील भारतीय सेनेचे मन:पूर्वक अभिनंदन करत, काँग्रेस पक्ष नेहमीच सैन्याच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. ही यात्रा शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली असून, नागरिकांनी ती उत्स्फूर्तपणे पाहिली व तिरंगा फडकावून अभिमान व्यक्त केला. या यात्रेमुळे देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचल्याचे काँग्रेसने सांगितले.