पुण्याच्या सायेशाचा आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत झेंडा
Newsworldmarathi Pune: सेंट मेरीज ज्युनिअर कॉलेज, पुणेची १७ वर्षांची विद्यार्थिनी सायेशा राजेश गोयल हिने १२ ते १६ मे दरम्यान लंडन, युनायटेड किंगडम येथे झालेल्या इंग्लिश स्पीकिंग युनियनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल पब्लिक स्पीकिंग काँटेस्ट (IPSC) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
ही स्पर्धा जगभरातील ४७ देशांतील सहभागींसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. आपल्या देशात स्पर्धा देणाऱ्या १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमधून प्रत्येक देशातील एक विजेता निवडून अंतिम फेरीसाठी पाठवला जातो.
सायेशाने स्पर्धेदरम्यान भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवत एक सर्जनशील सादरीकरण सादर केले. तिने कापड, भरतकाम आणि पारंपरिक विणकामांचा वापर करत भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक दाखवले. उपस्थित सर्वांनी तिच्या सादरीकरणाची स्तुती केली.
स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना लंडन शहराची सफर घडवण्यात आली आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून वक्तृत्वाचे प्रशिक्षण देण्यात आले. उपांत्य फेरीमध्ये उत्स्फूर्त भाषणे व महात्मा गांधींच्या “खरी एकता ही तीव्र परीक्षा सहन करूनही तुटत नाही” या विधानावर आधारित पूर्वतयारी केलेले भाषण घेण्यात आले. सायेशाने दोन्ही फेऱ्यांत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सहा स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले.
१६ मे रोजी सायेशाने लंडनमधील प्रतिष्ठित रॉयल इन्स्टिट्यूशन येथे अंतिम फेरीत विल्यम शेक्सपियरच्या “We know what we are, but not what we may be” या विषयावर प्रभावी भाषण सादर केले. तिचे भाषण डिप्लोमॅट्स, राजदूत आणि उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे गौरवले.
सायेशाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला उपविजेतेपद मिळाले, ज्यामुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उजळले.
स्पर्धेनंतर भारताच्या उच्चायुक्त कार्यालयातील निधी चौधरी यांनी सायेशाची भेट घेऊन अभिनंदन केले.
हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक
Newsworldmarathi Pune : दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी रविवारी दिली.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार (वडिलांचे नाव – दिनेश कुमार) याच्या संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला अडवण्यात आले.
सखोल पडताळणी आणि निगराणीच्या प्रक्रियेनंतर, दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने १८ मे रोजी रात्री ८:४० वाजता पुणे शहरातील खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले.
शोध मोहिमेदरम्यान, आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत. अधिक तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
BJP District Chief Fake List : भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची यादी व्हायरल; रवींद्र चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण
Newsworldmarathi Mumbai : BJP District Chief Fake List : : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर आता समाजमाध्यमांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष २०२५ या नावाने ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी फिरत आहे.
या यादीतील नावांमुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झाला होता. सोशल मीडियात बनावट ८१ जिल्हाध्यक्षांची यादी व्हायरल झाल्याने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियात जिल्हाध्यक्षांची व्हायरल झालेली यादी बनावट असून तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने १३ मे रोजी राज्यातील ७८ पैकी ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित २० जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या
पक्षांतर्गत गटबाजी आणि राजकीय रस्सीखेच यामुळे लटकल्या आहेत. संपूर्ण राज्यात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करताना पक्षाने सदस्य नोंदणी हा निकष लावला आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चुरस आणि स्पर्धा असल्याने निवडीची प्रक्रिया खोळांबली आहे.
पक्षाने २० एप्रिल रोजी जिल्हाध्यक्ष निवडीसाठी त्या त्या निरीक्षकांची नेमणूक केली होती. संबंधित ठिकाणी पक्षनिरीक्षक जाऊन स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून आठवडाभरात प्रदेश कार्याध्यक्षांना अहवाल देणार होते. त्यानंतर १ मेपर्यंत जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात येतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान, सोशल मीडियात सध्या ८१ जिल्हाध्यक्षांची व्हायरल झालेली यादी बनावट असून तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावे असून ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत आहेत. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
‘त्या’ यादीवर विश्वास ठेवू नका : विक्रांत पाटील
सोशल मीडियावर भाजप जिल्हाध्यक्ष २०२५ या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून अजून 22 जिल्हाध्यक्ष घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजप नेते विक्रांत पाटील यांनी केले आहे.
छत्रपती साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरू
Newsworldmarathi Bhavaninagar : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मतपत्रिकांची जुळवाजुळव सुरू झाली असून, पहाटे 11 वाजता सुरुवातीचे कल समोर येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कारखान्याचे सभासद आणि हितचिंतक याकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत.
या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, प्रथम ब प्रवर्गातील उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार असून, त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची मतमोजणी होणार आहे.
काल शांततेत मतदान पार पडले. मतमोजणीची प्रक्रिया बारामतीच्या प्रशासकीय इमारतीतील यांत्रिकी भवन, जलसंपदा आणि लघु पाटबंधारे विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर पार पडत आहे. यासाठी 38 टेबलांची रचना करण्यात आली असून मतमोजणी दोन फेरींमध्ये पूर्ण होणार आहे.
मतदानादरम्यान सुरुवातीला उन्हामुळे मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 50% च्या आत होती. मात्र, दुपारी नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी आले, त्यामुळे टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. एका मतदाराकडे दहा मतपत्रिका असतानाही मतदान प्रक्रियेने वेग पकडला.
या निवडणुकीदरम्यान काही मतदारांची नावे मतदान यादीतून गायब असल्याचे आणि काहींच्या नावांची नोंद चुकीच्या मतदान केंद्रावर झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. तरीही मतदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, थोड्याच वेळात निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘तिरंगा यात्रा’
Newsworldmarathi Pune: जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज रविवार, 18 मे रोजी पुण्यात ‘तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथून ज्ञानेश्वर पादुका चौकात समारोप सभा झाली.
पावसाच्या सरींना न जुमानता, हातात तिरंगा घेऊन, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांनी पुणेकरांनी रस्ते गाजवले. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी कुटुंबासह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मोहोळ म्हणाले, “आता दहशतवाद सहन केला जाणार नाही. शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची भूमी आणि अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक सज्ज आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले त्याच प्रकारे या पुढील काळात दहशतवाद संपवला जाईल.”
घाटे म्हणाले की, “ही यात्रा केवळ एक विरोध नाही तर आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली देण्याची सामूहिक भावना आहे. समाज म्हणून एकत्र येऊन आपले कर्तव्य बजावण्याचा हा प्रयत्न आहे.”
या यात्रेत सहभागी होताना गनबोटे आणि जगदाळे कुटुंबांनी स्वतःच्या दुःखावर मात करत समाजासाठी एकत्र उभे राहण्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या देशभक्तीने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले.
एअर मार्शल बापट यांच्या प्रतिकात्मक संदेशात नमूद करण्यात आले की, “आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण प्रणालीत ब्रह्मोस, आकाश आणि आकाश तीर क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. देशाला हात लावणाऱ्यांना आता योग्य उत्तर मिळते.”
या तिरंगा यात्रेत केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे , राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी , समाज कल्याण राज्य मंत्री माधुरी मिसाळ ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे,भीमराव तापकीर ,हेमंत रासने , सुनील कांबळे , योगेश टिळेकर ,माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले,संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी ,राघवेंद्र मानकर , सुभाष जंगले, राहुल भंडारे ,प्रमोद कोंढरे, वर्षा तापकिर,गणेश कळमकर रवींद्र साळेगावकर यांच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
Newsworldmarathi Pune : राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच कडक उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 22 मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आजपासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या या अंदाजामुळे प्रशासनही सतर्क झाले असून, संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
कोरोनाची पुन्हा एन्ट्री ? मुंबईत 2 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू, नेमकं काय प्रकरण?
Newsworldmarathi Mumbai: Mumbai Corona News : मुंबईत कोरोना संसयित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नव्हे तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
केईएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १३ वर्षीय मुलीचा आणि ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत रुग्णांवर मूत्रपिंड व कर्करोगाचे उपचार सुरू होते. तिच्या मृत्यूचे कारण मृत्यू प्रमाणपत्रात ज्या आजारावर उपचार सुरू होते. त्याच आजाराने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उपचारादरम्यान आम्ही सर्व तपासणी करतो त्यातच आम्ही कोविडची देखील तपासणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करताना कोविडचा प्रोटोकॉल पाळत त्यांना मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, १३ वर्षीय चिमुकली मूत्रपिंडाच्या आजाराने तर ५९ वर्षीय महिला कर्करोगाने त्रस्त असल्याने दाखल केले होते. दोघीच्याही मृत्यू त्यांच्या मूळ आजारांमुळे झालेले आहेत, असे केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.
घाबरण्याची गरज नाही : आरोग्य विभाग
मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यातच संसर्ग थांबवता येईल. गरज पडल्यास कठोर कारवाई करण्याची तयारीही विभागाने केली आहे. सध्या घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांना ‘संसदरत्न पुरस्कार’
Newsworldmarathi Pune : चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’च्या वतीने दिला जाणारा ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला आहे. संसदेतील सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी तसेच मतदारसंघातील प्रश्नांसाठी स्थानिक प्रशासनापासून केंद्र सरकारपर्यंत सातत्याने प्रयत्नशील राहिल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे श्रीनिवासन यांनी दिली.
खासदार सुळे यांची लोकसभेतील उपस्थिती ९९ टक्के, तर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील एकत्रित उपस्थिती ८७ टक्के इतकी आहे. त्यांनी संसदेच्या ४७ चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला असून ११३ प्रश्न पटलावर मांडले आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना याआधीही ‘संसद महारत्न’ पुरस्काराने दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय, त्यांना ‘संसद विशिष्टरत्न’ आणि आठ वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.
१५वी, १६वी आणि १७वी लोकसभा कार्यकाळात त्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सुळे यांचा हा पुरस्कार संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
“राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सेवा करण्याची संधी दिली, मतदारांनी विश्वास टाकला, हाच विश्वास काम करण्याची ऊर्जा आहे. हा पुरस्कार मतदारांना समर्पित करताना आनंद होतो.”– सुप्रिया सुळे, खासदार
ही पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज; जाणून घ्या सविस्तर माहिती
Newsworldmarathi pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर केला. यंदा निकाल मे महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छित कॉलेज निवडण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याच्या तयारीत असून, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज्सविषयी माहिती घेणे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज्स :
1. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) – आधुनिक शिक्षण सुविधा, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग भागीदारी यावर भर देणारे हे कॉलेज पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह चांगल्या नोकऱ्यांचे संधी येथे उपलब्ध आहेत.
2. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले हे कॉलेज लष्करी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण देते. शिस्तबद्ध वातावरण आणि देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्धी मिळवलेले हे कॉलेज आहे.
3. भारती विद्यापीठ – एक अभिमत विद्यापीठ असलेले हे संस्थान विविध इंजिनिअरिंग अभ्यासक्रम, व्यावहारिक शिक्षण आणि उद्योगांशी जोडलेले अनुभव देण्यासाठी ओळखले जाते.
4. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT) – आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम आणि परदेशी विद्यार्थ्यांची उपस्थिती यामुळे हे कॉलेज अग्रगण्य मानले जाते.
5. सीओईपी (College of Engineering Pune) – 1854 मध्ये स्थापन झालेलं हे कॉलेज महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील तिसरे सर्वात जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेले हे महाविद्यालय संशोधन आणि गुणवत्ता शिक्षणावर भर देते.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि गुणवत्तेनुसार योग्य कॉलेज निवडून आपले करिअर घडवण्याची संधी या प्रवेश प्रक्रियेमुळे उपलब्ध झाली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. लाखो विद्यार्थ्यांनी यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला. यंदा राज्याचा एकूण निकाल 94 टक्के लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.
दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून, त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. येत्या सोमवारपासून, म्हणजेच 19 मे 2025 पासून इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर सध्या विविध महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयांनी आपापली माहिती पोर्टलवर अपलोड करण्यास सुरुवात केली असून, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार असून, विशेषतः नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी अधिकृत पोर्टल आणि सूचना यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

