पहिल्या पावसात पुणे विमानतळ जलमय; युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा आंदोलनाचा इशारा
Newsworldmarathi Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या पहिल्याच पावसात पाणी साचल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या विमानतळासाठी हजारो कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. या पायाभूत सुविधांचा डंका वाजवणाऱ्या प्रशासनाची आणि केंद्रीय नागरी उड्डाण खात्याची या घटनेने अकार्यक्षमता समोर आणली आहे.
प्रवासी, नागरिक, आणि सामाजिक संस्थांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरून देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रशासनाची कोंडी केली असून, “हा विकास आहे की दिखावा?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या घटनेबाबत युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
प्रथमेश आबनावे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “पुणे विमानतळ हा केवळ प्रवाशांचा नव्हे, तर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा चेहरा आहे. त्याची ही अवस्था म्हणजे जनतेच्या कररुपी पैशाचा अपमान आहे. सदर घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”
ते पुढे म्हणाले की, “विकासाच्या नावाखाली फक्त उद्घाटनांचे फोटो काढून, सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले जाते. पण प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेचा अभाव आणि निधीच्या चुकीच्या वापराचे हे उदाहरण धक्कादायक आहे.”
हे चित्र फक्त पुणे विमानतळापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण पुणे शहरातच अशीच दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक ठप्प होणे, नाले तुंबणे – हे दरवर्षीचेच नव्हे तर दर पावसात पुणेकरांना सहन करावे लागणारे सत्य बनले आहे.
अशा परिस्थितीत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार म्हणून मुरली मोहोळ यांना जबाबदारी स्विकारून स्पष्ट उत्तर द्यावे लागेल. केवळ विकासाचे उद्घाटन पुरेसे नाही – त्या विकासाचे व्यवस्थापन, गुणवत्ता, आणि परिणाम यांच्याही जबाबदारीपासून मंत्री सुटू शकत नाहीत.
पुणे आणि पुणेकरांना आपण काय दिलं, आणि काय दिलं नाही – या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.
येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य; स्वाभिमानी ब्रिगेडचा निषेध
Newsworldmarathi Pune: शहरातील येवलेवाडी, हांडेवाडी, उंड्री आणि पिसोळी या भागांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यात काल झालेल्या अवकाळी पावसानंतर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या खड्ड्यांमुळे ट्रॅफिकमध्ये अडथळे निर्माण होत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता, स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.
सुरवसे पाटील यांनी खड्ड्यांबाबत महापालिकेचे लक्ष वेधत तीव्र निषेध व्यक्त केला. “शहराचा वेगाने विस्तार होत असताना नागरी पायाभूत सुविधांची अवस्था मात्र दिवसेंदिवस ढासळत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. महापालिकेने तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी व्हायला हवी, परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाची ढिलाई नागरिकांच्या अडचणींना कारणीभूत ठरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
नागरिकांमध्येही रस्त्यांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी असून, प्रशासनाने त्वरीत उपाययोजना न केल्यास संताप वाढण्याची शक्यता आहे.
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ८ मोठे निर्णय, वाचा सविस्तर…
Newsworldmarathi Mumbai : Cabinet Meeting : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार (गृहनिर्माण विभाग)
बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)
उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी (विधि व न्याय विभाग)
सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी 2025.64 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 6394.13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 4869.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… ‘ते खातं मला चालेल’
Newsworldmarathi Mumbai: Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं अशी इंग्रजीत एक म्हण आहे. 1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही, असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही थेट टीका केली होती. मात्र, आता भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली आहे.
कोणतं खात मिळणार?
बीडमधील प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर रिक्त झालेलं खातं कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आता हेच खाते पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Devendra Fadnavis : एक तेजस्वी तारा मावळला; देवेंद्र फडणवीसांनी नारळीकर यांना वाहिली श्रद्धांजली
Newsworldmarathi Mumbai : Dr. Jayant Narlikar : ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. झोपेत असतानाच त्यांनी शांतपणे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्याची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले.
तसेच खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला. वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती.
पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असं सेवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.
पुणे हादरले… ! शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या वाहनावर गोळीबार, बुलेट काच फोडून शिरली आत
Newsworldmarathi Pune: रेकॉर्डवरील गुन्हेगाराने शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांना धमकी देणारा फोन केला होता. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गणपती माथा येथील निलेश घारे यांच्या कार्यालयाबाहेर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घारे हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बसले होते. कार्यालयाबाहेर त्यांची गाडी पार्क केली होती.
त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारवर गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या कारच्या काचेला लागली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीमध्ये दोघे जण दुचाकीवरुन येताना दिसत आहेत. त्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडताना निदर्शनास येत आहे. फॉरेन्सिक पथकाने येऊन परिसराचा पंचनामा करुन माहिती गोळा केली आहे.
दरम्यान, वारजे माळवाडी भागातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने निलेश घारे यांना काल धमकीचा फोन केला होता. या धमकीच्या फोन बाबत घारे यांनी वारजे माळवाडी पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही वेळाने गोळीबाराची घटना घडली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने निलेश घारे यांना काल सायंकाळी धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी वारजे पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर ते रात्री कार्यालयात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्यातील एक गोळी कारच्या काचेला लागली आहे. काही वर्षांपासून निलेश घारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण मिळावे, असा अर्ज देखील केला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.
अजित पवार जातीयवाद्यांना पोसतात, त्याचे परिणाम भोगावे लागतील : मनोज जरांगे यांचा इशारा
Newsworldmarathi Beed : ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. खासदार छगन भुजबळ यांनी केलेल्या वर्णात्मक विधानांनंतर जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवारांवर जातीयवाद पोसल्याचा आरोप केला.
जरांगे म्हणाले, “छगन भुजबळ सातत्याने ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जातीयवादी विधानांवर अजित पवार काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ ते त्यांना पाठीशी घालतात.”
ते पुढे म्हणाले, “अजित पवार जर भुजबळांसारख्या नेत्यांना पोसतील, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. आम्ही मराठा समाजासाठी न्याय मागतोय, पण काही जण मुद्दाम द्वेष पसरवत आहेत.”
जरांगे यांनी ओबीसी समाजातील अनेकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. “काही मोजक्या नेत्यांमुळे संपूर्ण समाज बदनाम होतोय. आम्ही फूट पाडू इच्छित नाही, पण सतत अपमान सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
भुजबळांच्या विधानांनी समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर अजित पवार गप्प बसल्याने, मराठा आंदोलकांमध्ये नाराजी पसरली आहे. मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : नागरिकांनो काळजी घ्या…! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Newsworldmarathi Pune: राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. तर मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार, मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यावर पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह उपनगर आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
आजच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून वीजांसह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे. एकूणच पाहता महाराष्ट्रातील हवामान सध्या मोठ्या प्रमाणावर बदलत असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात गेले काही दिवस वादळी पावसाचा अनुभव सुरू आहे. सकाळच्या वेळात उष्णता जाणवत असली तरी दुपारनंतर वादळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तापमानात सतत चढ-उतार होत असून, उकाडा अधिक जाणवत आहे.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक, मंत्रिपदाची घेतली शपथ, नाराजीनाट्याचा शेवट गोड
Newsworldmarathi Mumbai : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार अस्तित्वात आल्यावर डिसेंबर २०२४ मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या विस्तारावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज झाले होते. यानंतर त्यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. अखेर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असून, त्यांनी आज सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाली आहे.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
Newsworldmarathi Pune: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. झोपेत असतानाच त्यांनी शांतपणे शेवटचा श्वास घेतला.
डॉ. नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला होता. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आणि जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत ‘हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत’ मांडला, ज्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले.
भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘आयुका’ (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना करून त्यांनी संचालक म्हणून दीर्घकाळ कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले.
त्यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर या देखील ज्येष्ठ गणितज्ञ होत्या. जुलै २०२३ मध्ये त्यांचे पुण्यात कर्करोगाने निधन झाले होते.
डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय विज्ञानजगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

