मुंबई, पुण्यासह राज्यातील १६ शहरांत ‘मॉ ड्रिल’; राज्य सरकार ‘अलर्ट मोड’वर
Newsworldmarathi Mumbai: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १६ ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल घेण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत देशभरातील २४४ जिल्हा नागरी संरक्षण केंद्रांची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये निवारा केंद्रे, इशारा देणारी यंत्रणा आणि समन्वय सुविधा कार्यरत आहेत की दुरुस्तीची गरज आहे, याचे मूल्यमापन करण्यात आले. या ड्रिलचा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे असणार आहे.
गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार
प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्चिती केली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अनेक उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे, शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे, तसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असून, सर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या राज्यातील १६ ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट होणार आहे.
महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉकड्रिल
मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मिशन सिंदूर’चा विजयोत्सव: श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर महाआरती
Newsworldmarathi Pune: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सेनेनं पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर यशस्वी कारवाई केली. या ‘मिशन सिंदूर’च्या यशाचा उत्सव पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करून साजरा करण्यात आला. “वंदे मातरम”, “भारत माता की जय” आणि “नरेंद्र मोदी यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते श्रीमंत गणपतीची महाआरती करण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, विशाल धनवडे, प्रमोद कोंढरे, महिला पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरतीनंतर बोलताना आमदार रासने म्हणाले की, “27 निरपराध पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या दिवशीच नरेंद्र मोदी परदेशातून आणि अमित शहा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ठामपणे सांगितले होते की, याचे उत्तर दिले जाईल. आजच्या कारवाईतून हे उत्तर मिळालं आहे.”
ते पुढे म्हणाले, “मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत शांतता आणि विकासाकडे वाटचाल करत असताना, कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. पहलगाम हल्ल्यातील 27 पर्यटकांच्या मृत्यूला ही खरी आदरांजली आहे. ‘मिशन सिंदूर’ हे केवळ लष्करी कारवाई नव्हे, तर देशाच्या अस्मितेचं आणि वीर जवानांच्या शौर्याचं प्रतीक आहे.” या कार्यक्रमाद्वारे पुणेकरांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करत श्रद्धांजली अर्पण केली.
या मोहिमेला दिलेले नाव योग्य : शरद पवार
Newsworldmarathi Pune : भारत सरकारने केलेल्या मोहिमेला दिलेले ऑपरेशन सिंदूर हे नाव योग्य आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. त्यांनी कारवाईला पाठिंबा दर्शवला असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय समर्थनीय असल्याचे सांगितले. राष्ट्रीय एकात्मतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वपक्षीय सहकार्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. “हा संपूर्ण निर्णय योग्य प्रकारे घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. काल रात्री भारताने केलेल्या कारवाईनंतर आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पवार यांनी सांगितले की, या विषयात राजकारण न आणता सर्वपक्षीय बैठक झाली आणि त्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. “या मुद्यावर आम्ही सर्वजण एकत्र आहोत,” असे सांगत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर एकीचे महत्त्व अधोरेखित केले.
पवार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिक्रियांवरही भाष्य केले. “अमेरिका, जपान आणि अनेक देशांनी भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे, मात्र काळजीची बाब म्हणजे चीनने अजूनही अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
पाकिस्तानच्या भूमिकेवर भाष्य करताना पवार म्हणाले, “आपल्याला माहित नाही की पाकिस्तान काय करेल, पण त्यांना स्वतःची ताकद आणि भारताची ताकद याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल.”
ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल, हे पाहण्याचे धोरण चुकीचे नाही. आणि या मोहिमेला दिलेले नाव योग्य आहे.” अशा शब्दांत पवार यांनी देशाच्या भूमिकेचे समर्थन करत सर्वपक्षीय सहकार्याची भावना अधोरेखित केली.
भारतात सर्व यंत्रणा अलर्टमोडवर; पुढील आदेशापर्यंत ‘हे’ विमानतळे तात्पुरती बंद
Newsworldmarathi Delhi: भारत प्रशासित काश्मीरमध्ये आणि सीमावर्ती राज्यांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी आपल्या उड्डाणांमध्ये बदल केले आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगड आणि राजकोटसारख्या ठिकाणांवरील उड्डाणे रद्द करण्यात आली असून काही विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
एअर इंडियाने जाहीर केल्यानुसार, वरील सर्व ठिकाणांसाठीची उड्डाणं आज दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. अमृतसरकडे जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग वळवून त्यांना दिल्लीकडे पाठवण्यात आले आहे.
स्पाइसजेटने देखील धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील अनेक विमानतळ बंद झाल्याची माहिती दिली असून, त्यामुळे त्यांच्या उड्डाणांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
इंडिगो एअरलाइन्सनेही सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे काही शहरांमध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लाहोर आणि कराची या प्रमुख शहरांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे
“सडेतोड उत्तर दिलं जाईल”; भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा संताप : पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची तीव्र प्रतिक्रिया
Newsworldmarathi Team: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईला “युद्धाची कृती” (Act of War) म्हटले आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, “शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि आमचं मनोधैर्य मजबूत आहे. पाकिस्तान आणि त्याचं सैन्य शत्रूशी कसा मुकाबला करायचा हे जाणून आहे. आम्ही शत्रूच्या कोणत्याही वाईट हेतूला यशस्वी होऊ देणार नाही.”
या हल्ल्यांबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आरोप केला की, भारताने दहशतवादी छावण्यांच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केले आहेत. ते म्हणाले, “या हल्ल्यात एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. सात लक्ष्यांपैकी दोन काश्मीरमध्ये आणि पाच पाकिस्तानमध्ये आहेत.”
ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना पाकिस्तानमध्ये येऊन परिस्थितीची सर्व बाजूंनी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
‘मिशन सिंदूर’ हे नाव वाचून डोळ्यात पाणी आलं : जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया
Newsworldmarathi Pune : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला पती गमावलेल्या प्रगती जगदाळे यांनी भारतीय सेनेच्या ‘मिशन सिंदूर’ या कारवाईवर प्रतिक्रिया देताना भावना व्यक्त केल्या. “मिशन सिंदूर” हे नाव अतिशय योग्य असून, हे वाचून डोळ्यात पाणी आलं, असं त्यांनी सांगितलं.
पहलगम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रगती जगदाळे यांचे पती संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. “दहशतवाद्यांनी माझं सिंदूर पुसलं होतं. आज भारतीय सेनेनं त्या प्रत्येक बहिणीच्या वेदनेचा बदला घेतला आहे. या मोहिमेला ‘सिंदूर’ हे नाव दिलं गेलं, हे आमच्यासाठी फार मोठं आहे,” असं प्रगती जगदाळे म्हणाल्या.
त्यांनी पुढे सांगितलं, “हे नाव केवळ एका मोहिमेचं नाही, तर प्रत्येक आई-वडिलांच्या दु:खाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या वेदनेची जाणीव आहे, याचा विश्वास वाटतो.”
भारतीय सेनेच्या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करताना म्हटलं की, “हे फक्त टार्गेट्स नष्ट करणं नाही, तर प्रत्येक शहीदासाठी उगवलेलं नवसंजीवन आहे. ‘मिशन सिंदूर’ हा फक्त हल्ला नाही, तर आमच्या अश्रूंना मिळालेली किंमत आहे.”
ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.
ऑपरेशन सिंदूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते
Newsworldmarathi Delhi: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानातील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला भारताच्या हद्दीत राहून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किमी आत केला गेला.
या ऑपरेशनदरम्यान एकूण 9 टार्गेट्स निश्चित करण्यात आले होते आणि सर्व 9 च्या 9 टार्गेट्स यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या टप्प्याटप्प्याने पार पडलेल्या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना मोठा फटका बसला असून, अनेक दहशतवादी छावण्या नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.
या महत्त्वाच्या कारवाईदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संपूर्ण ऑपरेशनवर नजर ठेवून होते. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त कारवाईत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यामुळे भारताने पुन्हा एकदा आपली दहशतवादविरोधी ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. ही कारवाई केवळ प्रतिशोध नव्हे, तर भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठीचा इशाराही मानला जात आहे.
मध्यरात्री दीड वाजता भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!
Newsworldmarathi Team : पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आहे. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आलं आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमधील नऊ ठिकाणे उद्धस्त करत, भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत ३ जणांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
काश्मीर हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जिल्ह्यातच नोकरी द्यावी : खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Newsworldmarathi Pune : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे व इतर भागांतील काही निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या हानीची भरपाई कोणत्याही प्रकारे शक्य नाही.
या पार्श्वभूमीवर, संबंधित कुटुंबातील एका पात्र सदस्याला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अशा कुटुंबातील पात्र सदस्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे ही समाधानाची गोष्ट आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती त्यांच्या मूळ जिल्ह्याच्या ठिकाणीच करण्यात यावी अशी मागणी खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरून त्यांना कुटुंबाची काळजी घेता येईल आणि मानसिक आधार मिळेल. यासंदर्भात स्व. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी यांचे उदाहरण देण्यात आले असून, त्या उच्चशिक्षित असून पुणे महानगरपालिकेत त्यांच्या अर्हतेनुसार नियुक्ती देता येऊ शकते, असे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षांचे घर, बाग पेटवली
Newsworldmarathi Paranda: महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या शेतात आग लावल्याने घरासह चिकूची बाग, ठिबक संच, केबल जळून भस्मसात झाले. ही दुर्घटना परंडा तालुक्यातील करंजा शिवारात रविवारी घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे ४ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदीप मोरे यांची करंजा शिवारात शेती आहे. अज्ञात व्यक्तीने रविवारी सकाळी त्यांच्या शेतातील घरासह आंबा व चिक्कूच्या बागेला आग लावली.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत बीएसएनएलचे केबल, चार एकरसाठी आणलेले ठिबक सिंचनचे पाईप तसेच शेतातील घर, इतर साहित्य, आंबा व चिक्कू बाग जळून खाक झाली. शेजारचे शेतकरी व लोकांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत मोरे यांचे जवळपास ४ लाख रुपयाचे नुकसान झाले.
याबाबत अॅड. पवन मोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी मोरे यांनी केली आहे.

