शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Newsworldmarathi Mumbai: आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावे, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याची कबुली खुद्द शरद पवार यांनीच एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांच्या पक्षातून यासाठी दबाव येत आहे. यातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तसे झाल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दाखवल्याचे समजते.
अजित पवार आणि सुप्रिया यांची विचारधारा एकच आहे. पक्ष वाढला तेव्हा हे सगळे एकत्रच होते. त्यामुळे आता पुन्हा एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजित यांनी बसून निर्णय घ्यावा, असे पवार म्हणाले. त्यांनी ठरवल्यास भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात.
तसे झाल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे. आपण मात्र या निर्णय प्रक्रियेपासून खूप दूर आहोत. पक्षात फेरबदल करण्याचा अधिकार जयंत पाटलांना आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला कुठे जायचे आहे? इंडिया आघाडीसोबत राहाणार की पर्याय खुले ठेवायचे आहेत? या प्रश्नावर विरोधी पक्षात काम करून भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
तुमच्या स्वतःच्या पक्षाचे भविष्य तुम्हाला कसे दिसते? असा प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षात दोन मते आहेत. एक म्हणजे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र येऊन भाजपसोबत सत्तेत जावे, असे एका गटाचे म्हणणे आहे.
दुसऱ्या गटाला वाटतं की, आम्ही प्रत्यक्ष वा किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत न जाता इंडिया आघाडीतच राहून या आघाडीची पुनर्रचना करावी, इंडिया आघाडी आज सक्रिय नाही. आता आम्हाला आमच्या पक्षाची पुनर्रचना करून पुनर्बाधणी करावी लागेल, तरुणांना त्यात सामील करावे लागेल.
Devendra Fadnavis : सायबर क्षेत्रात अधिक परिणामकारक काम करणार : देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Mumbai : Devendra Fadnavis : सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे, सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळातही सायबर फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारकपणे काम करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट व सायबर जागरुकता माहितीपट या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रीत उपक्रमांचे अनावरण सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते. या वेळी सायबर सुरक्षाविषयक माहितीपट दाखवण्यात आला.
मराठी आणि हिंदी भाषेत असलेल्या या माहितीपटात शरद केळकर, अमिषा पटेल यांनी काम केले आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणूकसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्र सायबरच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉटचे सादरीकरण करण्यात आले. हा चॅट बॉट महाराष्ट्र सायबरच्या १९४५ या हेल्पलाइनशी जोडले गेले आहे. तक्रार कशी करावी, यासंबंधीची माहिती मिळणार आहे. मानवी तस्करीमध्ये लोकांना वाईट पद्धतीने वागवले जाते. यासारखे अमानुष प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबरने जनजागृती करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
पुणे विमानतळावर तेरा उड्डाणे रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम
Newsworldmarathi Pune : पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आता देशांतर्गत विमान सेवा व्यवस्थेवरही दिसून येत आहे. पुणे विमानतळावर गुरुवारी एकूण तेरा उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या निर्णयामागे संरक्षण विषयक गरजा कारणीभूत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये इंडिगो आणि स्पाइसजेट या दोन प्रमुख विमान कंपन्यांच्या सेवा असून, इंडिगोच्या ११ आणि स्पाइसजेटच्या २ उड्डाणांचा समावेश आहे. रद्द झालेल्या मार्गांमध्ये अमृतसर, कोची, चंडीगड, हैदराबाद, राजकोट, जोधपूर, सुरत, भावनगर व जयपूर हे प्रमुख गंतव्यस्थान आहेत.
प्रवाशांना याची माहिती देण्यात येत असून, संबंधित विमान कंपन्यांकडून पूर्ण रकमेची परतफेड किंवा पर्यायी उड्डाणांची सुविधा दिली जाणार आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जातील, असेही सांगण्यात आले.
ऑपरेशन सिंदूर’नंतर गृहमंत्री ‘अमित शाहांनी सैनिकांना दिले ‘हे’ आदेश
Newsworldmarathi Delhi: पाकसोबत युद्धाचा भडका उडण्याच्या शक्यतेमुळे भारतीय निमलष्करी दल जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सशस्त्र दलाने मध्यरात्री उशिरा हवाई हल्ल्याद्वारे पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले. यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर गेलेल्या जवानांना पुन्हा तैनातीसाठी बोलावले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलाच्या प्रमुखांना सुट्टीवर गेलेल्या जवानांना परत बोलविण्यास सांगितले आहे. तसेच शाह सातत्याने जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत संपर्कात आहेत.
सीमावर्ती भागातील सामान्य लोकांना सुरक्षा सुनिश्चित करण्यास त्यांनी सांगितले आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये सामान्य नागरिकांच्या आश्रयासाठी बंकर तयार ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशातील अंतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावाही शाह यांनी घेतला. सोबतच सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क आणि कडा पहारा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mumbai BEST Bus Real Time : मुंबईकरांचा बेस्ट प्रवास होणार सुलभ, बसेसचा रिअल-टाईम आता गुगल मॅपवर
Newsworldmarathi Pune : Mumbai BEST Bus Real Time: बेस्ट बस स्टँडवर कधी येणार याची वाट पाहत बसावं लागतं. बेस्टच्या वेळा या ठरलेल्या असतात मात्र ट्रॅफिकमुळं आणि काही कारणास्तव बेस्ट कधीकधी उशिरा येतात. मात्र प्रवाशांना स्टँडवरच ताटकळत वाट पाहत बसावे लागते. मात्र, आता तुमची बस कुठपर्यंत पोहोचली याची वेळ तुम्हाला रिअल टाइमने समजणार आहे. त्यामुळं प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणारच आहे पण त्याचबरोबर प्रवासही सुलभ होणार आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे.
बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल.
प्रवाश्यांना या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर’ ; पुणे विमानतळावरून पाच उड्डाणे रद्द
Newsworldmarathi Pune:’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील काही महत्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणार्या पाच उड्डाणांवर झाला असून, त्या मार्गांवरील सेवा बुधवारी (दि.07) रद्द करण्यात आल्या आहेत, यासंदर्भातील माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार पाच मार्गावरील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक प्रवासी प्रभावित झाले असून, त्यांना याची कल्पना देण्यासाठी विमानतळ प्रशासन, विमान कंपन्या व अन्य संबंधित यंत्रणा तत्पर झाल्या आहेत.
प्रवाशांना त्यांच्या बुकिंगनुसार वैयक्तिकरित्या संपर्क साधण्यात आला असून, घोषणा वाहिन्यांद्वारे तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही सतत अद्ययावत माहिती दिली जात आहे. प्रभावित प्रवाशांबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्ण रकमेची परतफेड अथवा अन्य पर्यायी उड्डाणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
सध्याची स्थिती ही पूर्णपणे संरक्षणविषयक गरजांमुळे उद्भवलेली असून, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रवाशांनी त्यांच्या तिकीट बुकिंग संबंधित प्रश्नांसाठी थेट संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
…रद्द झालेली उड्डाणे
1) पुणे – अमृतसर
2) पुणे – चंदीगड
3) पुणे – किशनगढ
4) पुणे – राजकोट
5) पुणे – जोधपूर
माजी सैनिकांच्या मागण्या-अडीअडचणी सोडविण्यासाठी 13 मे रोजी जिल्हाधिकारी यांचा सैनिक दरबार
Newsworldmarathi pune: जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांसाठी १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरवार आयोजित करण्यात येणार आहे.
तरी जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता,वीरपिता, वीरपत्नी यांनी आपले अर्ज सैन्य नंवर, पद, नाव, पत्ता, मोबाईल नंबर व स्पष्ट विषयांसह तीन प्रतीमध्ये घेऊन अर्जदार यांनी आपले अर्ज ०९ मे २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे जमा करावेत व स्वतः १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
Newsworldmarathi Pune: केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्यादृष्टीने विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’घेण्यात आलं मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम केले या ठिकाणी आपण पुणे विधान भवन या ठिकाणची काही प्रात्यक्षिके पाहिली.
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रील घेण्यात आले. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली गेली.
केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यांचा या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होता.
रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहर कार्यकारणी बरखास्त
Newsworldmarathi Pune: रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच फेरनिवड करण्यात येणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी करण्याकरीता एकमताने निर्णय घेण्यात आला असून येत्या पंधरा दिवसात नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे, असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
या बैठकीस परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, रफिक दफेदार, महेंद्र कांबळे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, हिमाली कांबळे, महादेव दंदी, बाळासाहेब जगताप, विरेन साठे, संदिप धांडोरे आदि उपस्थित होते.
Pratap Sirnaik : एसटीच्या ताफ्यात पाच वर्षांत २५ हजार बस : प्रताप सरनाईक
Newsworldmarathi Mumbai : एसटीची सेवा आणखी वगेवान करण्यासाठी पुढील पाच वर्षांत २० ते २५ हजार बस येणार असून याच महिन्यात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी बैठक घेऊन त्यांचे प्रश्न आणि विविध मागण्या मार्गी लागतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या ५७ वे महाअधिवेशन माणगावमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही नेते अत्यंत संवेदनशील आहेत. एसटी चिरकाल टिकली पाहिजे. त्यासाठी सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशांद्वारे शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी खा. सुनील तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, एसटी कामगार संघटनेचे संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे, सुभाष केकाणे, रायगड जिल्हा अध्यक्ष विलास खोपटे, विभागीय सचिव गणेश शेलार, युवासेना जिल्हाध्यक्ष विपुल उभारे उपस्थित होते.

