शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ स्थळाची क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी

0
Newsworldmarathi Pune : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात शुक्रवारी वितरण होणार असून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी समारंभ स्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. हा पुरस्कार सोहळा सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक क्रीडा प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले. यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार वितरण राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे चोख नियोजन करा अशा सूचना श्री. भरणे यांनी दिल्या यावेळी श्री. भरणे यांनी व्यासपीठ व्यवस्था, बैठक व्यवस्था, प्रवेशद्वार, पुरस्कारीर्थींची निवास व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींविषयी माहिती घेतली. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ५ प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. जीवन गौरवसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख मोग-यांचा पुष्पनैवेद्य

0
Newsworldmarathi Pune : मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांनी सजलेल्या गाभा-यातील गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल १४० महिला व ८० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३००० गुलाब बंडल, १५०० लिली बंडल, १४०० किलो झेंडू, १५०० किलो शेवंती, १००० किलो गुलछडी, २० हजार चाफा, १०० किलो गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

जुहू विमानतळ : भारतातील सर्वात पहिले नागरी व व्यावसायिक सेवा देणारे विमानतळ : लेखन अक्षय बनकर

Newsworldmarathi special: जगातील सर्वात प्रसिद्ध अश्या आपल्या मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वांना परिचित आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? याच आपल्या मुंबई शहरात आणखी एक विमानतळ आहे. जुहू विमानतळ. होय. हे देशातील पहिले नागरी विमानतळ आहे आणि १९४० या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत या विमानतळाची भूमिका ही महत्वपूर्ण ठरली आहे. आजही या ठिकाणी काही अतिमहत्वाची (VIP) उड्डाणे, सामान्य विमान वाहतूक (General Aviation) आणि इतर सेवा चालू आहेत. भारतामध्ये व्यावसायिक हवाई सेवा १५ ऑक्टोबर १९२९ रोजी भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांच्या ऐतिहासिक विमान उड्डाणाने सुरू झाली. भारतातील पहिले वैध वैमानिक परवाना (पायलट लायसन्स) मिळवलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे जे. आर. डी. टाटा यांनी कराचीहून मुंबईपर्यंत एअरमेल सेवा सुरू केली. त्यांनी चालवलेले ‘de Havilland Puss Moth’ हे विमान जुहू विमानतळावर उतरले आणि तिथूनच टाटा एअर मेल सेवा सुरू झाली. हीच कंपनी पुढे एअर इंडिया म्हणून प्रसिद्ध झाली. भारतीय राष्ट्रीय ध्वजवाहक विमानसेवेच्या स्थापनेमुळे मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असलेल्या जुहू विमानतळावरील कार्यप्रवृत्तीला चालना मिळाली. हे विमानतळ मुंबईच्या लोकप्रिय जुहू समुद्रकिनाऱ्याच्या शेजारील वर्दळीच्या भागात होते. १९३६ साली येथे दोन नवीन धावपट्ट्यांचे (०८/२६ आणि १६/३४) बांधकाम करण्यात आले आणि तिसऱ्या धावपट्टीसाठीही योजना आखण्यात आली होती.१९३७ आणि १९३८ मध्ये जुहू विमानतळावर आणखी सुधारणा करण्यात आल्या, ज्यामध्ये धावपट्ट्यांवर काँक्रीटचे आच्छादन तयार केले गेले. या कालखंडातच रात्रीच्या वेळेतही उड्डाण सेवा सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे जुहू विमानतळावर हळूहळू अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या. कालांतराने पावसाळ्यात जुहू विमानतळ परिसरात पाणी साठू लागल्याने ते वापरण्यास असुरक्षित ठरू लागले. त्यामुळे विमानांची वाहतूक तात्पुरती पूना विमानतळावर (सध्याचे पुणे विमानतळ, स्थापना वर्ष १९३९) येथे वळवण्यात येत असे. काँक्रीटी धावपट्ट्यांमुळे ही समस्या काही प्रमाणात दूर झाली, तरीही हळूहळू मुंबईसाठी स्वतंत्र आणि अधिक सक्षम विमानतळाची गरज स्पष्ट होऊ लागली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जुहू विमानतळाने ब्रिटनच्या आशियातील युद्धप्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक रणनीतिक तळ म्हणून काम केले आहे. मुंबईसाठी नव्या विमानतळाची गरज पाहता सांताक्रूझ विमानतळाची निर्मिती (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) १९४२ मध्ये करण्यात आली. जे जुहू विमानतळापासून साधारण दोन मैलांवर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४८ मध्ये या विमानतळाने अधिकृतपणे प्रवासी विमानसेवा स्विकारली आणि त्याच्या दोन मोठ्या टर्मिनल्सचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी करण्यात आला. तथापि, याचा अर्थ असा नव्हता की जुहू विमानतळ बंद करण्यात आले होते. हे विमानतळ आपली भूमिका सामान्य विमान वाहतूक, प्रशिक्षण, तसेच काही विशिष्ट VIP सेवा आणि हेलिकॉप्टर उड्डाणांपुरती मर्यादित ठेवून आजही कार्यरत आहे. लेखक अक्षय बनकर

हृदयद्रावक…! कालव्यात बुडून बहिणींसह तिघांचा मृत्यू; कर्जत तालुक्यावर शोककळा

Newsworldmarathi Nagar : कर्जत तालुक्यातील ताजू गावच्या शिवारात घोड कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा व त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. दीपाली वनेश साबळे (वय १४), ऐश्वर्या वनेश साबळे (वय १०) आणि कृष्णा रामदास पवळ (वय २६) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नेमकं काय घडलं? याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यात घोड कालव्याचे आवर्तन सुरू आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे कालव्यात पोहण्यासाठी ठिकठिकाणी मुले व तरुण गर्दी करत आहेत. ताजू गावाच्या शिवारात बुधवारी दुपारी दीपाली व ऐश्वर्या साबळे आणि आणखी दोन लहान मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरले. मात्र, पाण्याला वेग जास्त असल्यामुळे ते चौघेही पाण्यात बुडू लागल्याने जोरजोरात ओरडले. जवळच्या शेतात ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवळ काम करत होता. त्याने मुलांचा आवाज ऐकून कालव्याकडे धाव घेतली आणि पाण्यात उडी मारून दोन मुलांना बाहेर काढले. दीपाली व ऐश्वर्याला वाचविण्यासाठी त्याने पुन्हा कालव्यात उडी मारली. मात्र त्या दोघींना वाचवताना कृष्णाचाही बुडून मृत्यू झाला. परिसरातील रहिवाशांनी धाव घेऊन तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तीनही मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले तेव्हा मुलींच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार : ज्योती सावर्डेकर

0
Newsworldmarathi pune : मागील 25 वर्षांपासून कामगारांच्या प्रश्नांवर काम करत आहे. बांधकाम व्यावसाय, असंघटित कामगार यांच्यामध्ये सुरक्षा आणि आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत, कामगारांच्या मुलांचे शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, यामुळे कामगारांचे हित जोपासत त्यांच्या कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचा संकल्प भारतीय जनता मजदूर सेलच्या नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी व्यक्त केला. भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमन विष्णुप्रिय रॉय चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष अर्नब चॅटर्जी, राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल, महिला सेलच्या अध्यक्ष सविता पांडे, जयेश टांक,उमेश शहा आदि मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती सावर्डेकर यांचा पद नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला, यावेळी सावर्डेकर बोलत होत्या. विष्णुप्रिय रॉय चौधरी म्हणाले, भारतीय जनता मजदूर सेल दीनदयाळ उपाध्याय, श्यामप्रसाद मुखर्जी यांनी घालून दिलेल्या आदर्शाने काम करत आहे. शेवटच्या माणसाचे हित लक्षात घेऊन आम्ही सदैव काम करत आलो आहोत. आज महाराष्ट्र अध्यक्ष झालेल्या ज्योती सावर्डेकर या मागील अनेक वर्षे उत्तम काम करत आहेत, आता त्यांना पद मिळाले आहे, त्या पदला साजेसे काम त्यांच्याकडून होणार यात शंका नाही. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या साठे आणि मृदुला महाजन यांनी केले.

महाराष्ट्र हादरला…! शिक्षकाकडून २ विद्यार्थिनींचा विनयभंग; कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावून करायचा भयानक कृत्य

0
Newsworldmarathi Nagar : शासकीय पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली असून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी शिक्षक अमित खरडे असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. हा प्रकार १० एप्रिल रोजी सायंकाळी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी, तसेच १८ एप्रिल सायंकाळी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक अमित खरडे याने एका विद्यार्थिनीला वारंवार फोन करून कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलावले. वर्गातील एकत्र बसलेला फोटो मोबाईलमध्ये दाखवून तो एचओडीला दाखवण्याची धमकी देत विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केले. त्यानंतर त्याने तिचा हात हातात धरला आणि तुला यातून बाहेर काढीन असे सांगून तिच्यावर मानसिक दबाव टाकला. या वर्तनामुळे विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न झाल्याने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. दरम्यान, ११ एप्रिल रोजी सायंकाळी आणखी एका विद्यार्थिनीवरही अशाच प्रकारे संशयित आरोपीने गोदामामध्ये विनयभंग केला. तिचा हात पकडला व तिलाही लज्जास्पद वागणूक दिली. दरम्यान, फिर्याद दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला पोलिस कोठडी आरोपी शिक्षक अमित खरडे याला कोतवाली पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पुण्याची शांतता बिघडविणाऱ्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune : रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी रात्रौ ८ः१५ वा चे सुमारास पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी या वेळी लगत असलेल्या एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मस्जिदीत घुसुन गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्या कडून धक्काबुक्की करणायात आली. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही. दरम्यान या सर्व गोंधळापुर्वी त्यांनी एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी विधाने त्यांच्या भाषणातुन केली होती. यासंदर्भात एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्ट कडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. *शहराची शांसतता धोक्यात आनण्याचा प्रयत्न निंदनीय: राहुल डंबाळे* हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकूचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याद्वारो वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार असल्याची टिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली. हा संपुर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालणा देणारा असुन यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार ताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करुन दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण केले प्रकरणी कुलकर्णी यांचेवर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अशी माहीतीही राहुल डंबाळे यांनी यावेळी दिलीं

कला उत्सव’ मधून अवतरणार अद्वितीय ‘चित्र’ कलेची दुनिया

0
Newsworldmarathi Pune : द्विज आर्ट्सच्या माध्यमातून पुण्यातील कला क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या चार कलाकारांनी एकत्र येत ‘कला उत्सव’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दिनांक २१ व २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती हेतल शहा आणि दीपाली जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, महेश थोरात आणि हनुमंत जगनगडा हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. चित्रकार हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती करंजवाला आणि मोहिनी गेंदे या आपापल्या कला वर्गांमधून कलाकार घडवणाऱ्या गुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. दीपाली जगताप म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण ११२ कलाकार सहभागी होणार असून, विशेष म्हणजे ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात एकूण ६५० हून अधिक चित्रे असणार आहेत. चारकोल, सॉफ्ट पेस्टल, वॉटर कलर्स, ऍक्रेलिक पेंटिंग्स, कॅलिग्राफी, टेक्स्चर आर्ट अशा विविध माध्यमांतील कलाकृतींनी सजलेले हे प्रदर्शन रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बीड पुन्हा हादरलं…! अल्पवयीन मुलाला सिमेंटच्या नाल्यावर आपटलं; मुलाचा तडफडून मृत्य, नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील केज शहरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे. रेहान कुरेशी असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अल्पवयीन आरोपीचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. रेहान कुरेशी नावाच्या अल्पवयीन मुलाचं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि आरोपीने रागाच्या भरात रेहानला उचलून थेट सिमेंटच्या नाल्यावर आपटलं. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रेहानचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 7 वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे तुकडे कचऱ्यात फेकले नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून काही अवशेष दुकानात गाडून तर काही अवशेष कचऱ्यात फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे. शोएब शेख (वय -१७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गुलाम रब्बानी शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या दिपस्तंभाच्या व योगदान देणाऱ्या कुटुंबाच्या’ बदनामीचे प्रयत्न : गोपाळ तिवारी

0
Newsworldmarathi Pune : २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत बॅंक-खाती गोठवुन देखील, जनतेने काँग्रेस पक्षास दुप्पट जागा देऊन मजबूत विरोधी पक्ष केले व देशात काँग्रेस पक्ष विरोघी पक्षाची भुमिका सक्षमतेने बजावत असतांना.. मोदी सरकार ११ वर्षा नंतर देखील स्वातंत्र्य संग्रामात दिपस्तंभाची भुमिका निभावणाऱ्या ‘नॅशनल हेरॅाल्ड वृत्तसंस्थेची व ती स्थापन केलेल्या नेहरू – गांधी कुटुंबाची तथ्यहीन बदनामी करण्याचे कुटील राजकारण’ करत आहेत व पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामा विषयी, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यां विषयी असूयाच स्पष्ट करत असल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या काँग्रेसच्या निदर्शनात ते बोलत होते. नॅशनल हेरॅाल्ड चा कथित घोटाळा व गांधी कुटुंबीयावरील ईडी च्या आरोपपत्रा विरोधात पुणे शहरासह देशभरात आज आंदोलने करण्यात आली. भाषणात ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या ‘भ्रष्टाचार विरोधी भुमिकेवर व हेतू’वर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नसुन केवळ स्वायत्त सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व दबाव आणून मोदी सरकार विरोधी पक्षास बदनाम करून नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानत आहे. ते करण्या ऐवजी मोदी सरकारने ‘पंतप्रधान-निधी’ची पारदर्शकता न दडवता त्याचे विवरण जाहीर करावे व देशाप्रती ऊत्तर दायीत्वाचा राजधर्म निभवावा.. असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.. या प्रसंगी मा अरविंद शिंदे, अविनाश बागवे, संजय बालगुडे, अभय छाजेड, रमेश बागवे इ भाषणे झाली. अजीत दरेकर यांनी संचालन केले व प्राची दुधाणे यांनी आभार व्यक्त केले.