हृदयद्रावक…! डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू; नाका- तोंडातून रक्तस्राव…

Newsworldmarathi Nashik : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर भागात घडली आहे. नितीन फकिरा रणशिंगे (वय-२३) असे मृत युवकाचे नाव आहे. नेमकं काय घडलं? डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येस रविवारी पेठरोड भागात निघालेल्या मिरवणुकीत रणशिंगे सहभागी झाला होता. फुलेनगर येथील तीन पुतळ्याजवळ सायंकाळी ७.३० च्या सुमारास डीजेचा दणदणाट सुरू असताना हा प्रकार घडला. डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे अचानक नितीनच्या तोंडातून, नाकातून रक्तस्राव सुरू झाला. ही बाब निदर्शनास येताच भाऊ आनंदा रणशिंगे यांनी त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फुप्फुसाच्या क्षयरोगाने पीडित असल्याने नितीनवर चार वर्षांपासून उपचार सुरू होते. तो न्यूमोनिया या आजारावरही उपचार घेत होता. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Newsworldmarathi Pune : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या धारकऱ्यांसमवेत विविध ठिकाणी फिरतीवर असतात. सोमवारी रात्री भिडे गुरूजी सांगलीमध्ये होते. सांगलीच्या माळी गल्ली परिसरात एका धारकऱ्याच्या घरी ते जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून व इतर चर्चा संपवून ते रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे निघाले. त्याच वेळी एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाचा चावा घेतला. यावेळी त्यांना काही अंशी दुखापत झाली. त्यांना लगेचच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले होते. “संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे” असे म्हणत भिडे गुरूजींनी स्मारकाला समर्थन दर्शवले होते.

“राजेश डेम्बला यांच्यासोबत एआय आणि संस्थापकांच्या मानसिकतेचा अद्वितीय प्रवास!”

0
Newsworldmarathi Pune : पुणे गुजराती युथ फोरम (पीजीवायएफ) ने “एआय आणि संस्थापकांची मानसिकता” या विषयावर एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दूरदर्शी उद्योजक आणि वक्ते श्री राजेश डेम्बला यांचा समावेश होता. या कार्यक्रमात त्यांनी कोंढवा बुद्रुक, पुणे येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथील भव्य क्रोम बँक्वेट येथे सहभाग घेतला. ४००+ हून अधिक उत्साही सहभागींसह, हा कार्यक्रम भव्य यशस्वी झाला, ज्यामुळे प्रेक्षकांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या भविष्याबद्दल ज्ञान, प्रेरणा आणि स्पष्टतेने समृद्ध केले. श्री राजेश डेम्बला यांचा प्रवास हा चिकाटी आणि दूरदृष्टीचा खरा पुरावा आहे. विनम्र सुरुवातीपासून ते मालिका उद्योजक बनण्यापर्यंत आणि भारताच्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप परिसंस्थेतील एक प्रसिद्ध नाव, त्यांची लवचिकता आणि स्वतः बनवलेल्या यशाची कहाणी प्रेक्षकांना खोलवर जाणवली. आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवसाय उभारणी आणि संस्थापकाची मानसिकता राखण्यावरील त्यांच्या शक्तिशाली अंतर्दृष्टीचा उपस्थित असलेल्या प्रत्येकावर कायमचा प्रभाव पडला. या कार्यक्रमाचे विजेते पीजीवायएफचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि युवा सल्लागार राजेशभाई शाह आणि एसपीजीबीएसचे संयुक्त व्यवस्थापकीय विश्वस्त नैनेशभाई नंदू होते, ज्यांचे सतत पाठबळ, प्रोत्साहन आणि नेतृत्व तरुणांना सक्षम करण्यात आणि अशा समृद्ध कार्यक्रमांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणे गुजराती युवा मंच टीम सत्येन पटेल (संस्थापक अध्यक्ष), हर्षित देसाई आणि सिद्धार्थ शाह (उपाध्यक्ष), जीत गांधी (एसआयजी लीड), अंकिता पटेल (सचिव), तसेच आमचे उत्साही योगदानकर्ते विशाल पटेल, नितेश पटेल, उल्का शाह आणि वैशाली शाह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम नावीन्यपूर्णता, शिक्षण आणि एकतेद्वारे समुदायाला सक्षम करण्याच्या सामूहिक प्रवासात आणखी एक मैलाचा दगड ठरतो.

ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत : संदीप खर्डेकर

0
Newsworldmarathi Pune : मी अमेरिका दौऱ्यावर गेलो असताना मी बघितलं की तेथील समस्यांमध्ये “एकाकी ज्येष्ठ आणि वैफल्यग्रस्त तरुण” ही समस्या फार मोठी आहे. तेव्हाच ठरविले की आपल्या कडे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ आनंदाने, सुखाने व्यतीत करता येईल यासाठी प्रयत्न करायचे असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत आणि समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी असेही खर्डेकर म्हणाले.आयुष्यभर कष्ट करून जे आपल्याला सुखात ठेवण्यासाठी धडपडत असतात त्यांना आनंदाने आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करता यावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, वृद्धापकाळ हे दुसरे बालपण असते म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत करावी असेही संदीप खर्डेकर म्हणाले. याच भूमिकेला अनुसरून आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिक संघांना उपयुक्त वस्तू भेट देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,डहाणूकर कॉलनी हैप्पी कॉलोनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह डॉ.शिरीष अमृतकर,सह कार्यवाह,राजेश टेंबे,खजिनदार शांताराम वाणी, सहकार्यवाह दत्तात्रय घाटे, उपाध्यक्ष सीमा माळवकर, सह खजिनदार चंद्रकांत टिकेकर,शैलाताई सातपुते,हरिभाऊ नेरकर इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाला वॉटर कुलर डिस्पेन्सर भेट देण्यात आले. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात आणि सर्व सभासद एकोप्याने संघात पडेल ते काम करतात असे संघाचे कार्यवाह डॉ. शिरीष अमृतकर म्हणाले. आमच्या संघाला इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर तर्फे कै.बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ 2024 हा पुरस्कार देण्यात आला असेही डॉ. अमृतकर म्हणाले. डॉ. रघुनाथ माशेलकर व श्री. जयंत उमराणिकर यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने आमचा उत्साह दुणावला असून आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू असेही संघाच्या सदस्यांनी एकमुखाने जाहीर केले.आमच्या यशात संघाचे माजी अध्यक्ष व कार्यवाह यांचा मोठा सहभाग असल्याने नुकतेच त्यांचेही सत्कार करण्यात आल्याचे डॉ. अमृतकर म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन उत्तम सामाजिक काम करत असून आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असे सांगून संघातर्फे संदीप खर्डेकर व मंजुश्री खर्डेकर यांना सन्मानित करण्यात आले. यापुढे क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रूप, मुकुलमाधव फाउंडेशन, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या वतीने अधिकाधिक सेवाकार्य करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.

जय हनुमानाच्या जयघोषाने रंगला अखंड कात्रज कोंढवा परिसर…

0
Newsworldmarathi Pune : अखंड हिंदुस्थानाचे जनक असलेले प्रभु श्रीरामचंद्र व सेवाभावी पवनकुमार हनुमान यांचे मुनोत परीवाराने कात्रज कोंढवा परिसरात स्थापलेल्या एकमेव श्री दक्षिणमुखी हनुमान जन्मोत्सव व रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कात्रज गावठाणातून भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेची सुरुवात कात्रज गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून करण्यात आली व सुंदरनगर येथील हनुमान मंदिर येथे समाप्ती करण्यात आली. यावेळेस एकता मित्र मंडळ चौक येथे नितिन शेलार यांनी शोभायात्रेचे स्वागत करून सर्वांसाठी थंडपेयाची सोय केली. शोभायात्रेत बलाढ्य बाहुबली हनुमान, घोड्याच्या रथामध्ये राम-लक्ष्मण व सीता यांच्या प्रत्यक्ष भूमिकेतील भक्तगण तसेच ढोल ताशा पथक यासोबतच महिलांचा विशेष पारंपरिक वेशभूषेतील फेटा परिधान केलेला सहभाग व परीसरातील अनेक बाल हनुमानांच्या सहभागाने शोभायात्रा नागरिकांसाठी विशेष लक्षणीय ठरली. शोभयात्रेमध्ये रामाची भूमिका मनोज छाजेड, सीता प्रिया छाजेड तर लक्ष्मणाच्या भूमिकेत मेहुल जयंत लुणावत यांनी हुबेहुब व लक्षवेधक भूमिका सादर केल्याबद्दल अशोक मुनोत यांनी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करत औक्षण व साखर वाटून आनंद व्यक्त केला. संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत यांनी सन 2000 साली स्थापन केलेल्या कात्रज कोंढवा परिसरातील एकमेव दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे यंदाचे रोप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त सालाबादप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सक्षम फाउंडेशनचे निखिल मुनोत यांनी सांगितले, प्रसंगी परिसरातील शेकडो भाविक तसेच सक्षम फाउंडेशनचे स्वयंसेवक व पोलीस बांधवंनी एकेरी वाहतूक ठेवून मोलाचे सहकार्य केले. 30 ते 35 वर्षापासून कात्रज परीसरात वास्तव्यास असणारे मुनोत परिवार कुठलेही जाती-धर्म न मानता शिक्षण, सामाजिक, गोपालन तसेच अध्यात्मिक अशा अनेकविध क्षेत्रात निस्वार्थपणे स्वखर्चातून वर्षभर अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असल्याबाबत जन्मोत्सवप्रसंगी नागरिकांकडून शुभेच्छा देत कौतुक करण्यात आले. प्रसंगी हनुमानाची महाआरती व भाविकांना महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वर्तमान परिस्थितीशी निर्भिडपणे लढा : ॲड. प्रकाश आंबेडकर

0
Newsworldmarathi Pune : इतिहास विसरलो तर वर्तमान परिस्थितीशी लढायला संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे इतिहास विसरू नका. तो समजून घ्या. आंबेडकरी चळवळीत आपण किती टप्पे गाठले याची जाणीव नसल्याने अनेकदा आपलेच लोक त्या चक्रात अडकतात. पण आपल्याला इतिहास माहिती असेल तर वर्तमान परिस्थिती निर्भिडपणे लढता येते, ती लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकरी चळवळीच्या कालखंडातील महत्त्वाच्या टप्प्यांचा दस्तऐवज असलेले “सम्यक ते वंचित : चळवळीचा दस्ताऐवज” या शांताराम पंदेरे यांनी संकलित केलेल्या ग्रंथाचे पुण्यातील निळू फुले सभागृहात प्रकाशन झाले. याप्रसंगी ॲड. आंबेडकर बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांनी 1977 नंतरच्या राजकीय घडामोडी, रशियाच्या उदाहरणाने दाखवलेली दूरदृष्टी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील सरकारी लाठीमार आणि जनतेमध्ये पसरवलेली दहशत यावर सखोल विवेचन केले. ॲड. आंबेडकर म्हणाले, मी लोकांमध्ये बसून चर्चा केल्या, भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नाशिक ते मुंबई लॉंग मार्चचा निर्णय झाला आणि त्यातून लोकांचा चळवळीवरचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला. चळवळीत नेमकं काय साधायचं आहे, हे लक्षात ठेवा. टीकाकारांना घाबरण्याचे कारण नाही. निर्भिडपणे आपले मत मदत रहा. वाचन करून समजून घेणे, निर्णयक्षम होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टीव्हीवर जे दिसते आणि वर्तमानपत्रात जे छापून येते ते तपासून घ्या. लगेच खरे मानू नका, विचार करा, तपासा,” असा सल्लाही त्यांनी दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज. वि. पवार, शांताराम पंदेरे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, प्रा. संजीव चांदोरकर, ॲड. अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, देवेंद्र उबाळे, पुष्पाताई इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रबुद्ध भारतच्या कार्यकारी संचालक प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, राजेंद्र पातोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करा; युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांची मागणी

0
Newsworldmarathi Pune : दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता नवीन वादात सापडले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ पासून पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकत कर थकवला असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर रुग्णालयाविरोधात प्रचंड प्रमाणात रोष वाढला आहे. मिळकत कर थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ दंडात्मक कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिका कर आकारणी व संकलन विभागाच्या उप आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, विद्यार्थी काँग्रेस पुणे सरचिटणीस कृष्णा साठे, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर जाधव, कुलदीप नाईकनवरे, देवेंद्र खाटीर, बाबा मिसाळ, सुनील कुसाळकर, ऋषिकेश आंधळे हे उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत कर प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. पुढील दोन दिवसात तत्काळ कायदेशीर बाबी तपासून रुग्णालयावर कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून मी स्वतः युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनास बसणार असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी महापालिकेला दिला आहे. सरकार या रुग्णालयास पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य पुणेकरांना एक न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय अशी भूमिका घेता येणार नाही असेही सुळे यांनी म्हटले आहे.
पैश्यासाठी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, एका गर्भवती महिलेचा जीव घेऊन नवजात दोन जुळ्या मुलांना आईच्या मायेला पोरकं करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने २०१९ साला पासून २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपये इतका मिळकत कर भरला नाही. गेल्या ६ वर्षांपासून जर रुग्णालय कर भरत नसेल तर आजपर्यंत महापालिकेने या रुग्णालयावर कारवाई का केली नाही? सर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर भरला नाही तर घराला टाळे ठोकण्याची, शास्ती आणि जप्तीची तसेच दंड आकारण्याची कारवाई करण्यात महापालिका जी तत्परता दाखवते तीच तत्परता दाखवून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आमच्या निवेदनाची दखल घेऊन खासदार आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांनी महापालिकेला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कायदेशीर बाबी तपासून दोन दिवसात उत्तर न दिल्यास व रुग्णालयावर कारवाई न केल्यास गुरुवारपासून सुप्रिया ताई स्वतः आमच्यासोबत आंदोलनास बसणार आहेत.
रोहन सुरवसे-पाटील सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या वतीने कातकरी कुटुंबांना ताडपत्री वाटप

0
Newsworldmarathi Pune : अहिंसा जैन ग्रुप यांच्या विनंतीवरून पुणे येथील सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या सर्व परिचित इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम या संस्थेच्या वतीने वाईच्या दुर्गम पश्चिम भागातील मालतपूर, बोरगाव,वगाव येथील वीस कातकरी कुटुंबांना वाई येथील गरवारे कंपनीच्या अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या ताडपत्रींचे वाटप करण्यात आले आणि वीस कुटुंबांना डोक्यावर छप्पर देण्याचे महान कार्य इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम तर्फे करण्यात आले. तसेच याच कुटुंबातीलसदस्यांना कपडे आणि खाऊचे वाटप, शाळेत जाणाऱ्या मुलांना गणवेश वाटप सुद्धा करण्यात आले. या सर्वच कातकरी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व सदस्यांना समाधान देऊन गेला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माननीय प्रीती शिरुडकर, संस्थापिका मंगल वाईकर, वीणा परब, सेक्रेटरी मंजुश्री उपासनी, सदस्या कल्पना बोरा,वृषाली शिरूडकर आणि वाईच्या वैजयंती सोनीगरा उपस्थित होत्या. वाई येथील सामाजिक कार्यकर्ते भावेश ओसवाल,आशुतोष शिंदे,प्रशांत डोंगरे उपस्थित होते.संस्थेच्या या बहुमूल्य सहकार्याबद्दल ग्रामस्थ मालतपूर,बोरगाव, वयगाव यांनी आभार मानले.

जामखेडमध्ये ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव भरणार: गायक आनंद शिंदेच्या गाण्यांनी उत्सव रंगणार…

Newsworldmarathi Nagar : हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या १७ एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे. जामखेडमधील जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदेसाहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली. १७ एप्रिल (वार) गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अजितदादा पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले. संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’ संविधानिक विचार पुढे नेण्याची गरज : सोनवणे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात माणसांमाणसांत समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले. राजकीय जुगलबंदी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजितदादा नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याने राजकीय जुगलबंदी करण्याची शक्यता आहे.

प्राचीन ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ उत्सवानिमित्त कसब्यात बगाड

0
Newsworldmarathi pune : श्री काळ भैरवनाथ महाराज की जय.. चा अखंड जयघोष आणि पारंपरिक वाद्य ढोल-ताशा व बँड च्या निनादात पालखी खांद्यावर घेताच फुले आणि गुलालाची झालेली मुक्त उधळण… अशा भक्तीमय वातावरणात कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांची पालखी आणि बगाड मोठया उत्साहात साजरे झाले. शेकडो वर्षांची परंपरा जपत साजरा झालेला बगाड उत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांच्या उत्सवांतर्गत पालखी व बगाड उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा मोठया उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यानंतर महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी नामावली व माध्यान्ह आरती झाली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. मंदिराला फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. त्यामुळे या मंदिराला व येथील उत्सवाला विशेष महत्व आहे.