पुण्याचा आयुष चौधरी “जेईई मेन” मध्ये महाराष्ट्रात पहिला

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील सर्वात विश्वासार्थ जेईई कोचिंग इन्स्टिट्यूट असलेल्या बाकलीवाल ट्यूटोरियल्सचा (BT) २० वर्षांचा यशस्वी प्रवास पुन्हा एकदा सार्थ झाला आहे. इयत्ता ८वी पासून बाकलीवाल विद्यार्थी असलेल्या आयुष रवी चौधरी यांने परिपूर्ण १०० पर्सेन्टाइल आणि ऑल इंडिया रँक (AIR 7) मिळवून महाराष्ट्रात प्रथम स्थान पटकावले आहे. पुणे शहरात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोहन चेलेकर यानेही AIR ६१ मिळवून बाकलीवालच्या यशोगाथेला भर घातली आहे. एकूण 8 विद्यार्थ्यांनी कॉमन रँक लिस्टमध्ये टॉप ५०० मध्ये स्थान मिळवले आहे. बाकलीवालच्या विद्यार्थ्यांची संख्या टॉप १०००/१०००० एकूण यादीत इतर कोणत्याही संस्थेपेक्षा लक्षणीय फरकाने अधिक आहे, हे महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेच्या सर्वोत्तम कामगिरीचे द्योतक आहे. ही यशस्वी कहाणी इथेच थांबत नाही. बाकलीवाल ट्यूटोरियल्सच्या 15 विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉप १००० मध्ये स्थान मिळवले असून, अनेकांनी १८ मे २०२५ रोजी होणाऱ्या जेईई ऍडव्हान्स २०२५ साठी कटऑफ पार केला आहे. हे यश संस्थेच्या संकल्पनात्मक समज, समस्या सोडवण्याच्या क्षमता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक सहनशक्तीवर असलेल्या अविचल लक्ष्याचे प्रतिबिंब आहे. या निकालाबाबत बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे संचालक वैभव बाकलीवाल म्हणाले, “मी नम्रतेने भारावून गेलो आहे. केवळ महाराष्ट्रातील पहिला क्रमांक आणि इतर उच्च रँकच नव्हे तर टॉप ५००० एकूण यादीतील विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षांपेक्षा लक्षणीय वाढली आहे. वर्षानुवर्षे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर, संपूर्ण टीमसाठी हा क्षण खरोखर समाधानाचा आहे. जेईई ऍडव्हान्स २०२५ साठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा.”सात हा बाकलीवाल ट्यूटोरियलचा लकी नंबर असावा! चौथ्यांदा, बाकलीवाल ट्यूटोरियल्सच्या विद्यार्थ्याने (जेईई मेन आणि ऍडव्हान्स मिळून) मध्ये AIR 7 मिळवला आहे. याआधीही बाकलीवालच्या विद्यार्थ्यांनी AIR 2, 3 आणि 3 अशा उत्कृष्ट रँक मिळवून संस्थेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्टतेची साक्ष दिली आहे. टॉपर आयुषचा भाऊ अक्षत हा देखील बाकलीवाल ट्यूटोरियलचा विद्यार्थी होता आणि त्याने आयआयटीकेमधून पदवी प्राप्त केली आहे. जेईई मेन २०२५ मधील ही यशस्वी कामगिरी बाकलीवालच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रतिष्ठेला आणखी बळकटी देते. वर्षानुवर्षे जेईई मेन आणि जेईई ऍडव्हान्समध्ये सातत्याने उच्च रँक देणाऱ्या या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत पात्र शिक्षक मंडळ, सुविचारित अभ्यास साहित्य, नियमित चाचण्या, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण आणि एकांतिक शंका निरसन सत्रांसारखी सोय मिळते.

साई भक्ताकडून शिर्डीत सोन्याचा मुकुट दान; किंमत ऐकून व्हाल थक्क !

Newsworldmarathi shirdi: ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं जीवनच पालटतं, अशा साईनाथांच्या चरणी पुन्हा एकदा एका भक्ताने भक्तीचा अनमोल नजराणा अर्पण केला आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या नव्या अर्पणामुळे साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साईचरणी अर्पण केलेल्या मुकुटाची किंमत अंदाजे ६८ लाख रुपये असून मुकुट अर्पण करणाऱ्या भाविकांच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. साईबाबांच्या दानपेटीत सोने, रोकड, जड जवाहीर दान केले जाते. शनिवारी (दि. १९) आंध्र प्रदेश मधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. सुंदर कोरीव कलाकुसर केलेला हा सुवर्ण मुकुट आकर्षक आहे. मुकुटाच्या मधोमध ‘ओम’ लिहिलेले असून त्यावरती हिरवा तर खाली लाल रंगाची टिकली आहे. विविध कलात्मक पद्धतीने बारीकसारीक कोरीव काम सुवर्ण मुकुटावर केल्याचे दिसत आहे.

छ. संभाजीनगर हादरलं…! दुचाकी चोरीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

Newsworldmarathi Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी केलेल्या दुचाकीच्या वादातून कुख्यात गुन्हेगाराने सतरा वर्षांच्या मुलासह त्याच्या मेहुण्याची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बायजीपुरा भागातील गंजे शाहिदा मशिदीमागे शनिवारी (दि. १९) घडली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. शेख आसिफ शेख हाफीज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी इम्रान खान आरेफ खान याने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शनिवारी सकाळी चंपा चौकात उभा होता. तेव्हा त्याचा चुलत भाऊ मुज्जू खानने इम्रानला सांगितले की, तुझा भाऊ सलमान खान आरेफ खान व त्याचा मेहुणा सुलतान शेख इसा यांना तुझ्या काकाच्या घरासमोर कोणीतरी मारले असून, ते मृत झाले आहेत. हे ऐकताच इम्रानने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. खुनाच्या घटनेपूर्वी सलमानचा चुलत भाऊ जुबेरला रात्री १२.३० वाजता आरोपी शेख आसिफचा कॉल आला होता. तेव्हा घाबरलेल्या जुबेरने त्याला आपण बुलढाणा येथे असल्याचे सांगितले. आसिफने फोनवर सुलतानबद्दल विचारणा केली होती. आपली दुचाकी सुलतान परत देत नाही. ती पोलिसांनी पकडली असून, त्यावरून पोलीस माझा शोध घेत आहेत. त्यामुळे सुलतानला आपण सोडणार नसल्याची धमकीही आसिफने दिली होती. या कॉलनंतर आसिफ हा सुलतानचा शोध घेत गंजे शाहिदा मशिदीच्या मागे आला. शनिवारी पहाटे त्यांच्यात वाद झाल्यानंतर सलमान व सुलतानवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील कात्रजमध्ये जागेच्या वादातून 27 वर्षीय तरुणाचा खून

Newsworldmarathi Pune: पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर भागात जागेच्या वादातून तीन सराईत गुन्हेगारांनी खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे कात्रज भागात खळबळ उडाली आहे.शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर अमर साकोरे आणि इतर दोघे अशी आरोपींची नाव आहेत. काय आहे प्रकरण… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये रविवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास शुभम चव्हाण हा घरी जात होता.त्यावेळी अमर साकोरे आणि इतर दोघां साथीदारांनी शुभम याला थांबून जागेच्या व्यवहाराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि शुभम हा तेथून पळून जाऊ लागला.त्यावेळी आरोपी अमर साकोरे आणि दोघांनी त्याचा पाठलाग करत लाकडी बांबू, काठी, दगड, विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.त्या मारहाणीत शुभम चव्हाण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेनंतर आरोपी अमर साकोरे आणि त्याचे साथीदार पळून गेले आहेत. या प्रकरणातील तीन ही आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली असून जागेच्या वादातून शुभम चव्हाण याचा खून केल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हॉइस केअर हे पुस्तक गायकांसाठी वरदान : पंडित हरिहरन

0
Newsworldmarathi Pune : “आवाज “ही आपल्याला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. तिची जपणूक करणे, काळजी घेणे हे खूप आवश्यक आहे. आपल्या स्वरयंत्र मध्ये जर काही दोष निर्माण झाले आणि आवाज खराब झाला तर हे बरे होणे अतिशय कठीण असून यासाठी आहार, विहार ,विविध सवयी, दिनक्रम या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.या दृष्टीने सुप्रसिद्ध स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या *व्हॉइस केअर* या पुस्तकाचा गायक ,निवेदक, कीर्तनकार, शिक्षक , व्याख्याते विशेषता आवाजाशी संबंधित मंडळींना खूप मोलाचे मार्गदर्शन होत आहे. यामधील संगीत विषयक माहिती, शास्त्रीय वैज्ञानिक माहिती आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती या सर्वांचा उत्कृष्ट संगम ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाचा प संदर्भ ग्रंथ म्हणून नक्की वापर होऊ शकेल असा मला विश्वास आहे. स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी गायकांसाठी केलेले या संशोधनाबद्दल मी त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे असे प्रतिपादन जगप्रसिद्ध गायक हरिहरनजी यांनी व्यक्त केले. गायकांसाठी स्वरतज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी लिहिलेल्या व्हॉइस केअर फॉर सिंगर्स अँड प्रोफेशनलस या पुस्तकाची दुसरी आवृत्ती च्या निमित्ताने स्वर साधना या विषयावर बोलताना पं. हरिहरन यांनी हे मत व्यक्त केलं. याप्रसंगी जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी स्वरसाधना, संगीत साधना या गोष्टी केवळ प्रसिद्धी, पैसा मिळवण्यासाठी नसून ती तपश्चर्या आहे, हा विचार गायक आणि विशेषता या क्षेत्रात येणारे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले.

राज्याचं दुर्दैव…! ‘१ ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवायला निघालेत; पाण्यासाठी मुलीने जीव गमावला’, रोहिणी खडसेंची सरकारवर टीका

Newsworldmarathi Mumbai: राज्यकर्ते महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायला निघाले आहेत. पण, पाण्यासाठी एका १२ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागतो, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेड्यावर राहणाऱ्या १२ वर्षीय वेदिका चव्हाणचा पाण्यासाठी दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर रोहिणी खडसे यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करीत सरकारवर सडकून टीका केली आहे. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे नेमक्या काय म्हणाल्या? प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्रात अनेक भाग जिथे महिलांची आणि लहान मुलींची पाण्याअभावी फरफट होते. महाराष्ट्र सरकारकडून जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली, ज्यात प्रचंड पैसा खर्च केला गेला पण या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात याच्या तक्रारी आल्या आहेत, असा आरोप करत रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पुढे म्हणाल्या की, ज्या गावात ही घटना घडली त्या गावातही या जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन टाकण्यात आली. पण, पाणी साठवून ठेवण्यासाठी टाकीच बांधली नाही. फक्त पैसा कमावण्यासाठी ही कामे झाली आहे, ठेकेदारांना फायदा होण्यासाठी ही कामे केली जात आहे. तसेच ही योजना चांगल्याप्रकारे राबवली असती, तर त्या चिमुकलीला जीव गमवावा लागला नसता, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. https://x.com/Rohini_khadse/status/1913450777999548512

Sunday special : ग्रेट ग्रुप कॅप्टन शुभांशू

Newsworldmarathi Team: भारताची अंतराळ संशोधन क्षेत्रातील झेप आता नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. भारतीय वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला येत्या मे महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत. त्यांची निवड अमेरिकेच्या अ‍ॅक्सिओम स्पेसच्या Ax-4 या खासगी अंतराळ मोहिमेसाठी करण्यात आली आहे अशी माहिती देशाचे अंतराळ व अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधिकृतरित्या जाहीर केली असून, ISROचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनीदेखील या ऐतिहासिक मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. (group captain shubhanshu shukla) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याविषयी थोडक्यात -लखनऊ, उत्तर प्रदेश येथे जन्मलेले शुभांशू शुक्ला हे २००६ पासून भारतीय वायुदलात कार्यरत आहेत. त्यांना २,००० तासांहून अधिक लढाऊ विमानांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी रशियातील युरी गागरिन ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि ISROच्या बंगळुरू येथील केंद्रात विशेष अंतराळ प्रशिक्षण पूर्ण केले आहे. २०१९ मध्ये ‘गगनयान’ मोहिमेसाठी त्यांची निवड झाली होती. Ax-4 मोहिमे विषयी: Ax-4 ही अ‍ॅक्सिओम स्पेस आणि SpaceX यांची संयुक्त मोहीम आहे. २९ मे २०२५ रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ही मोहीम SpaceX च्या Falcon 9 रॉकेटद्वारे प्रक्षिप्त केली जाईल. मोहिमेसाठी वापरण्यात येणारे अंतराळयान असेल Crew Dragon. या मोहिमेमध्ये चार अंतराळवीर सहभागी असतील कमांडर: पेगी व्हिटसन (अमेरिका) पायलट: ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (भारत) मिशन स्पेशालिस्ट: स्लावोश उझ्नान्स्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) या मोहिमेदरम्यान विविध वैज्ञानिक प्रयोग केले जातील, ज्यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, अवकाशात माणसाच्या स्नायू व पेशी यावर होणारे परिणाम, अंतराळामध्ये बीजसंवर्धन व त्याची प्रतिकारशक्ती अशा बाबींचा समावेश अभ्यासाअंतर्गत असणार आहे. भारतातून अंतराळात जाणारे शुभांशू शुक्ला हे दुसरे व्यक्ती असतील. १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या Soyuz मोहिमेद्वारे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ही मोहीम भारताच्या ‘गगनयात्री’ या उपक्रमासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, तसेच भारताच्या जागतिक अंतराळ सहकार्याला बळकटी देईल. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याविषयी सविस्तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे एक अनुभवी लढाऊ वैमानिक आणि भारताच्या गगनयात्रा मानव अंतरिक्ष कार्यक्रमासाठी निवडलेले अंतरिक्षवीर आहेत. ते लखनऊ, उत्तर प्रदेश येथील असून, १० ऑक्टोबर १९८५ रोजी त्यांचा जन्म झाला आहे. शिक्षण आणि प्रारंभिक कारकीर्द शुक्ला यांनी सिटी मॉन्टेसरी स्कूल, लखनऊ येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. १९९८ मधील कारगिल युद्धाने प्रेरित होऊन, त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे येथे प्रवेश घेतला आणि २००५ मध्ये संगणक विज्ञानात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी भारतीय वायुसेना अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून जून २००६ मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती मिळवली . वायुसेना आणि अंतरिक्ष प्रशिक्षण शुक्ला हे एक अनुभवी वैमानि आहेत. त्यांनी Su-३० MKI, MiG-२१, MiG-२९, Jaguar, Hawk, Dornier २२८ आणि An-३२ यांसारख्या विविध विमानांवर २००० तासांहून अधिक उड्डाण अनुभव मिळवला आहे . २०१९ मध्ये त्यांनी इस्रोच्या मानव अंतरिक्ष कार्यक्रमासाठी निवड प्रक्रिया पूर्ण केली असून, रशियातील युरी गगारिन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रात मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू येथील इस्रोच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केले आणि IISc बेंगळुरू येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये M.Tech पदवी प्राप्त केली आहे. अ‍ॅक्सिओम मिशन ४ आणि अंतरिक्ष प्रवास शुक्ला यांची निवड अ‍ॅक्सिओम मिशन ४ (Ax-४) साठी पायलट म्हणून झाली आहे, ज्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर (ISS) जाणार आहेत.हे मिशन नासा, स्पेसएक्स आणि इस्रो यांच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे. या मिशनमध्ये ते ISS वर जाणारे पहिले भारतीय आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतरिक्षात जाणारे दुसरे भारतीय बनतील . वैयक्तिक जीवन शुक्ला यांचा विवाह डॉ. कामना शुभा शुक्ला यांच्याशी झाला असून, त्या एक दंतचिकित्सक आहेत. त्यांना एक मुलगा आहे. त्यांचे वडील शंभू दयाल शुक्ला हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत, तर आई आशा शुक्ला गृहिणी आहेत. ते तिघा भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत . लेखन अक्षय बनकर

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास

0
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने द्राक्षाची सजावट करण्यात आली होती. ही सजावट पाहण्याबरोबरच बाप्पाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंदिरात बाप्पाला निळ्या आणि काळ्या द्राक्षाचा नैवद्य वाढवून त्यातून आकर्षक सजावट करण्यात आली होती. या द्राक्षांचे पुण्यातील ‘सुर्योदय फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला वाटप करण्यात आले.

नागपुरात खळबळ…! अवकाशातून घरावर कोसळला धातूचा तुकडा; नागरिक भयभीत

Newsworldmarathi Nagpur : नागपूरमधील उमरेड येथे एक विचित्र घटना घडली आहे. अमय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या छतावर शनिवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अवकाशातून अज्ञात धातूचा तुकडा कोसळला आहे. या घटनेने मोठा स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या गच्चीवर पडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. हा तुकडा एक मीटरचा असून उल्कापात आहे की उपग्रहाचे तुकडे आहेत, यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहेत. या तुकड्यामुळे बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅब आणि भिंतीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती सकाळी उमरेड पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना एक जाडसर आणि अपूर्ण तुटलेल्या अवस्थेतील लोखंडी धातूचा तुकडा आढळून आला आहे. हा तुकडा नेमका कसा आणि कुठून पडला, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी हा रहस्यमय धातूचा तुकडा ताब्यात घेतला असून तो पुढील तपासाचा भाग म्हणून पोलीस ठाण्यात जमा केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व धातूच्या तुकड्याची ओळख पटवण्यासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. उल्कापाताचा भाग तर काहीजण उपग्रहाचे तुकडे असावे, असा अंदाज व्यक्त करीत आहेत. उमरेड पोलीस या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तज्ज्ञांच्या निदानानंतर धातूच्या तुकड्याचे सत्य समोर येईल. तोपर्यंत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि लोक या रहस्यमय धातूच्या तुकड्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तीन वर्षीय बालकाचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; दोन भावंडांना वाचवण्यात यश

Newsworldmarathi Daund: दौंड तालुक्यातील सहजपूर येथील माकरवस्ती भागात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कालव्यात खेळताना उडी मारल्याने तीन वर्षीय चिमुकला आसिम जावेद मुजावर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेक जावेद मुजावर (वय ७) आणि रूहान जावेद मुजावर (वय ५) ही त्याची दोन भावंडं मात्र सुदैवाने बचावली. तीनही मुले कालव्याच्या कडेला खेळत असताना त्यांनी अचानक पाण्यात उड्या घेतल्या. ही घटना शेजारील एका महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली. आवाज ऐकताच निलेश खोमणे यांनी धाव घेत दोघा चिमुकल्यांना बाहेर काढले. परंतु आसिम याला पाण्यातून बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रयत्न करून आसिमला पाण्यातून बाहेर काढले आणि जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. महेक आणि रूहान यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. या प्रसंगी निलेश खोमणे यांनी दाखवलेली तत्परता व धाडसामुळे दोन चिमुरड्यांचे प्राण वाचले. स्थानिक नागरिक त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत. या दुर्घटनेमुळे पालकांमध्ये आणि परिसरातील लोकांमध्ये जागरूकतेची भावना निर्माण झाली असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित झाली आहे.