जैन बोर्डिंग भूखंड घोटाळा : श्रीखंड खाणाऱ्यांवर व मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : रोहन सुरवसे पाटील

Newsworldmarathi Pune: ऐतिहासिक एच.एन.डी. जैन बोर्डिंगचा मौल्यवान भूखंड गोखले लँडमार्क एलएलपी या बिल्डरला विकला गेल्याच्या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा व्यवहार समाजाच्या विश्वासाला तडा देणारा आहे. या प्रकरणातील ट्रस्टी, बिल्डर, धर्मादाय आयुक्त आणि राजकीय प्रभाव वापरून मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा,” अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की, “जैन बोर्डिंगचा भूखंड कायदेशीर दृष्ट्या रद्द कधी होणार?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. जैन बोर्डिंगचा भूखंड काही ट्रस्टींनी गुपचूप पद्धतीने खासगी बिल्डरला विकल्याचे उघड झाल्यानंतर जैन समाजात संताप उसळला आहे. समाजाने मोठा मोर्चा काढून या विक्रीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. तरीदेखील गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. दस्तऐवजांनुसार या व्यवहारात कायदेशीर प्रक्रिया आणि पारदर्शकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. काही राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही संशय समाजात व्यक्त केला जात आहे. रोहन सुरवसे पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, “भूखंड पुन्हा ट्रस्टच्या नावावर करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क कोण भरणार?” ट्रस्टींच्या चुकीमुळे झालेल्या या व्यवहाराचा आर्थिक भार समाजावर टाकणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात समाजाची फसवणूक करून फायदा घेणाऱ्या ट्रस्टी, बिल्डर, चॅरिटी कमिशनर तसेच राजकीय प्रभाव वापरणाऱ्या मास्टरमाइंड व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.

सिंधूताईंच्या लेकरांसोबत राठी कुटुंबाची दिवाळी; अनेक वर्षांपासून ममता बालसदनसोबत अनोखं नातं

0
Newsworldmarathi Pune: “काका, तुम्ही आलात कीच आमची खरी दिवाळी सुरू होते. तुमच्याशिवाय दिवाळीची मजा नाही,” — अशा शब्दांत कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बालसदन मधील सिंधूताई सपकाळ यांच्या लेकींनी मगराज राठी यांच्याबद्दलचा आपुलकीचा भाव व्यक्त केला. राठी उद्योग समूहाचे मगराज राठी हे मागील २३ वर्षांपासून ममता बालसदन या संस्थेशी जोडले गेले आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात ते आपल्या परिवारासह येऊन मुलांसाठी फटाके, सुग्रास भोजन, कपडे आणि किराण्याचा साठा देतात. यंदाही भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी पावभाजी, भेळ, विविध खाद्यपदार्थ आणि भेटवस्तू घेऊन बालसदनमधील मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या उपक्रमादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. फटाके फोडत, एकत्र जेवत त्यांनी राठी कुटुंबासोबत खऱ्या अर्थाने सणाचा आनंद घेतला. मगराज राठी म्हणाले, “व्यवसायानिमित्ताने पुरंदरमध्ये आलो, तेव्हा ममता बालसदनला भेटण्याचा योग आला. तेव्हापासून आजपर्यंत हा उपक्रम सतत सुरू आहे. सिंधूताई जिवंत असताना त्या माझ्याकडून घेतलेली साडी नेहमी हक्काने वापरत असत. त्यांना एकाच रंगाची साडी आवडायची आणि त्यांचा तो आग्रह आजही आठवतो. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या समवेत एकाच ताटात जेवण्याचं भाग्य लाभलं, हे आमच्यासाठी अमूल्य होतं.” ममता बालसदनचे व्यवस्थापक दीपक गायकवाड म्हणाले, “माई नेहमी म्हणायच्या — ‘मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा’. पण माई गेल्यानंतरही राठी कुटुंब हे नातं जपत आहे. त्यांनी घेतलेली जबाबदारी आजही तितक्याच मनापासून निभावत आहेत.” राठी कुटुंबामुळे या वर्षीची दिवाळी ममता बालसदनसाठी अधिक खास ठरली. आपुलकी, माया आणि समाजसेवेचा संदेश देणारे हे नाते सिंधूताईंच्या कार्याचा खरा वारसा पुढे नेत आहे. यावेळी ममता सपकाळ, महेश नागरी पतसंस्थेचे मगराज राठी, रवि अग्रवाल, कैलाश सारदा, राठी परिवार उपस्थित होते.

सेवानिवृत्तीनंतरही सेवेचा वसा जपणारे पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी

Newsworldmarathi Pune: सरकारी सेवेत कार्यरत असताना समाजसेवा करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य असते, मात्र सेवानिवृत्तीनंतर अनेकजण सामाजिक कार्यापासून दूर जातात. पण पुणे जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या परंपरेला छेद देत सेवेचा वसा कायम ठेवला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या कर्मचाऱ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांचा निधी उभारला आणि बीड जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना दिवाळी साठीचे साहित्य वाटप केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल, जनावरे आणि संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाने समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने पुढाकार घेतला. संघाचे पदाधिकारी आणि सभासदांच्या सहकार्याने दीड लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील मौजे केळ (ता. आष्टी) येथे प्रत्यक्ष भेट देत सुमारे २०० शेतकरी कुटुंबांना दिवाळी साहित्याचे किट वाटप केले. हा कार्यक्रम रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला. या कृतीमुळे शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला, असे संघाचे अध्यक्ष पंडित मर्डेकर यांनी सांगितले. या उपक्रमात कार्याध्यक्ष विनायक बहिरट, सचिव जीवन गायकवाड, खजिनदार सुभाष झणझणे, सहसचिव वि. ल. पवार, कार्यकारी सदस्य टी. एन. गायकवाड, ए. बी. सैंदाणे, जी. एम. डोळे, एच. डी. जगताप, दशरथ घुले यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच सचिन दळवी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात सहकार्य केले. सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासत या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने “सेवेचा वसा” जपल्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.

श्री. पुणा गुजराती बंधू समाज संस्थेची ‘दिवाळी पहाट’ उत्साहात

0
Newsworldmarathi Pune: श्री. पुणा गुजराती बंधू समाज आयोजित व निलकंठ ज्वेलर्स प्रस्तुत ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद देत तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेने प्रथमच या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कोंढवा येथील संस्थेच्या नवनिर्मित अशा जयराज स्पोर्ट्स ॲण्ड कन्वेन्शन सेंटरच्या प्रशस्त ‘अनायास लॉन’वर केले होते. पहाटेच्या मंगलमय वातावरणात सुप्रसिद्ध संगीत संयोजक संदिप पंचवटकर व त्यांच्या सहकारी वादक कलावंत आणि गायकांनी आपल्या सुरेल प्रस्तुतीने कार्यक्रमात रंगत आणली. सतारवादन आणि तबल्याच्या मनमोहक जुगलबंदीने या संगीत मैफलीची शानदार सुरुवात झाली. यानंतर, संस्थेचे ट्रस्टी आणि देणगीदार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दिपावलीच्या या मंगलमय पर्वाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे मॅनेजिंग संचालक राजेश शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित सर्वांचे विशेष करून जैन सोशल ग्रुप पुणे झोनचे झोन को-ऑर्डीनेटर सुजस शहा व सर्व सदस्यांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष धन्यवाद दिले. संस्थेचे ट्रस्टी आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक दिलीप मेहता यांच्या आभार प्रदर्शनाने या यशस्वी कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वल्लभभाई पटेल, मॅनेजिंग सहसंचालक नैनेश नंदु, खजिनदार हरेश शहा, सेक्रेटरी राजेंद्र शहा, तसेच पदाधिकारी हेमंत मेहता, विनोद देढिया, मोहन गुजराती, जनक शहा, पंकज कपाडिया, दिपक मेहता, केतन कपाडिया, माधुरीबेन शहा, सत्येन पटेल, ब्रिजेन शहा, राजेश शहा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेच्या आजवरच्या यशस्वी उपक्रमांमध्ये एक मानाचा तुरा ठरला.

मुंबई स्मार्ट करणाऱ्यांची दिवाळी ‘गोड’ ! मधुरा गेठेंचा कामगारांसाठी पुढाकार

0
Newsworldmarathi mumbai : मुंबईतील मेट्रो, मोनोरेल पासून उड्डाणपुलापर्यंत, रस्त्यापासून उंच इमारतीपर्यंत घाम गाळून विकासाची निर्मिती करणारे लोक जाता-येता दिसतात; पण दिवाळीचा आनंद साजरा करताना असे समाजघटक विस्मृतीत जातात. निर्मितीचा आधार असलेल्या या श्रमिकांची दिवाळी गोड आणि प्रकाशमय करण्याच्या हेतुने ‘आरबीजी’ फाउंडेशनन् मुंबई ‘स्मार्ट’ ती गतीमान करणाऱ्या राबणारया कामगारांना दिवाळीची अनोखी भेट देऊन या मंडळींच्या चेहऱ्यांवर आनंद आणला. विकासाचा पाया असलेल्या बांधकाम क्षेत्राकडून सार्वजनिक आणि खासगी कामे रात्रंदिवस सुरू असतात. या काँक्रिटी विकासात सिमेंट, विटा आणि रेतीसह हजारो श्रमिकांचा घामही मिसळलेला असतो. त्यातूनच सहा-आठपदरी रस्ते, उड्डाणपूल, इमारती आणि मेट्रोसारख्या सुविधांची निर्मिती महानगरांमध्ये होत असते. आपल्या मूळ गावापासून शेकडो मैल दूर येऊन हे कष्टकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन कंठत असतात. पदराआड लेकराला झोपवून काम करणाऱ्या महिलेची, धुळीने माखलेल्या लहानग्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, या भावनेतून ‘आरबीजी फाऊंडेशनच्या चेअरमन मधुरा राहुल गेठे यांनी ही मोहीम हाती घेतील. तिच्या माध्यमातून शंभरपेक्षा अधिक कामगारांच्या कुटुंबांना साडी, ड्रेस, मिठाई देऊन, या कामगारांच्या घरीही दिवाळीच आणली. मुंबई शहर निर्माणात श्रमांचे मौल्यवान योगदान देणाऱ्या कष्टकर्यांची दिवाळी मधुरा गेठे यांच्या पुढाकाराने प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. या उपक्रमाबद्दल कष्टकर्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘आरबीजी फाउंडेशनचे आभार मनापासून आभार मानले. कोण आहेत मधुरा गेठे? नवी मुंबईतील आरबीजी’ फाऊंडेशनच्या चेअरमन म्हणून मधुरा राहुल गेठे काम करीत आहेत.आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विशेषत: महिलांचे आरोग्याच्या क्षेत्रात मधुरा गेंठेचे काम आहे. राज्यातील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मधुरा गेठे यांचा पुढाकार आहे.
आपण मुंबईत राहतो, पण तिच्या उभारणीत झटणारे हात दुर्लक्षित राहू नयेत. या प्रत्येकाच्या अंगणी दिवाळी उत्सवाचा सुगंध असावा, कामगारांच्या छोट्या घरातही दिवाळीचा गोडवा यावा, या भावनेने कामगारांच्या कुटुंबियांसोबत अशा प्रकारे दिवाळी साजरी करून उत्सवाला सुरवात केली.
मधुरा राहुल गेठे चेअरमन, आरबीजी फाउंडेशन, नवी मुंबई

बँकॉकमध्ये होणाऱ्या “हेरिटेज इंटरनॅशनल ब्यूटी पेजंट” साठी टीम इंडियाची जोरदार तयारी

0
Newsworldmarathi pune: हेरिटेज इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय संचालिका मृणाल सुमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची टीम आगामी “हेरिटेज इंटरनॅशनल ब्यूटी पेजंट” साठी जोरदार तयारी करत आहे. ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा १ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत थायलंडच्या बँकॉक येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत भारतातून पाच प्रतिनिधी विविध श्रेणींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामध्ये अवियाना मोरे (Kids Category), सौम्या नायर (Mrs Category), ज्योती मलार (Miss Category), दीपाली अमृतकर (Gold Category) आणि रुपाली ढेकेकर (Ms Category) यांचा समावेश आहे. हे पाचही स्पर्धक आपल्या सादरीकरणातून भारताचा समृद्ध इतिहास, विविधतेने नटलेली संस्कृती आणि वैभवशाली वारसा जगासमोर मांडणार आहेत. ही स्पर्धा दरवर्षी *E Planet* या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित केली जाते. सुमारे ३५ देश या पेजंटमध्ये सहभागी होत असून, विविध देशांतील संस्कृतींचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. टीम इंडियाच्या तयारीसाठी *मृणाल्स एंटरटेनमेंट*च्या संचालिका आणि *हेरिटेज पेजंटच्या नॅशनल डायरेक्टर* मृणाल सुमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण, वेशभूषा निवड आणि प्रस्तुतीचे नियोजन सुरू आहे. त्यांच्या सर्जनशील नेतृत्वामुळे टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारताच्या या प्रतिनिधी मंडळामुळे देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर झळकणार असून, बँकॉकमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

0
Newsworldmarathi Pune: रावसाहेब पटवर्धन विद्यालयात “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि फटाकेमुक्त, स्वच्छ व सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा संदेश देणे हा होता. या अभियानाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी फटाके न फोडण्याची आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणावर तसेच माणसाच्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक पुष्पक कांदळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रदूषणाचा वाढता धोका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या छोट्या कृतीतूनही पर्यावरण संवर्धनात मोठा वाटा उचलता येतो, हे समजावून सांगितले. शाळेचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी फटाके न फोडता आनंदी आणि सुरक्षित दिवाळी कशी साजरी करता येते, याचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या वतीने पर्यावरणपूरक दिवे, कागदी सजावट आणि सेंद्रिय रंग वापरून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “हरित दिवाळी, सुरक्षित दिवाळी” या घोषणांद्वारे संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून शालेय स्तरावरच पर्यावरण रक्षणाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्वांनी दृढतेने व्यक्त केला.

दोन भावांच्या सेंद्रिय स्वप्नाची यशोगाथा: टू ब्रदर्स

0
Newsworldmarathi Pune: भारतीय शेतीच्या मातीत रुजलेले एक स्वप्न, जे आज जागतिक स्तरावर फुलत आहे. ही आहे टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म्सची कथा – दोन भावांच्या धैर्याची, शाश्वततेची आणि नाविन्याची. पुण्याजवळील भाळावडी गावातून सुरू झालेली ही यात्रा आज ११० कोटी रुपयांच्या सीरिज बी फंडिंगपर्यंत पोहोचली आहे. पण ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही; ही आहे मातीशी नाळ जोडलेल्या दोन भावांच्या संघर्षाची आणि यशाची. सर्व काही सुरू झाले २०१७ मध्ये, जेव्हा सत्यजित आणि अजिंक्य हांगे या दोन भावांनी कॉर्पोरेट जगत सोडले आणि शेतीकडे वळले. सत्यजित, ज्याने आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतले होते, आणि अजिंक्या, ज्याने मार्केटिंगचा अनुभव घेतला होता, दोघांनीही शहरातील चकचकीत जीवन पाहिले होते. पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता: आपल्या देशातील अन्न का विषारी होत चालले आहे? रासायनिक खतांमुळे माती खराब होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि ग्राहकांना स्वच्छ अन्न मिळत नाही. “आम्ही ठरवलं, की आम्ही स्वतःच्या शेतातून सेंद्रिय उत्पादने उगवू आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू,” असे अजिंक्या सांगतात. शुरूवातीला आव्हानांचा डोंगर होता. भाळावडीतील त्यांचे १०० एकर शेत रासायनिक शेतीने खराब झाले होते. रिजेनरेटिव्ह फार्मिंग – म्हणजे मातीला पुन्हा जीवंत करण्याची पद्धत – अवलंबली. गायींच्या गोठ्यातून मिळणारे नैसर्गिक खत, कीटकनाशकांऐवजी नैसर्गिक उपाय आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण. पहिल्या वर्षी उत्पादन कमी होते, विक्री अवघी. पण भावांनी हार नाही मानली. सोशल मीडियावरून त्यांनी स्वतःची कहाणी सांगितली – व्हिडिओ, पोस्ट आणि थेट ग्राहक संवाद. “आम्ही ब्रँड नाही, आम्ही विश्वास आहोत,” असा त्यांचा दावा. लवकरच त्यांचे अमरनाथ गायीचे तूप, सेंद्रिय धान्य आणि मसाले घराघरात पोहोचू लागले. २०२० पर्यंत कंपनीने पाय रोवले. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री वाढली, विशेषतः महामारीत जेव्हा लोक स्वच्छ अन्न शोधत होते. २०२२ मध्ये सीरिज ए फंडिंगमध्ये ५८.२५ कोटी रुपये उभारले. हे पैसे शेतकरी नेटवर्क वाढवण्यात, उत्पादन सुविधा उभारण्यात वापरले. आज कंपनी ५,००० हून अधिक शेतकऱ्यांशी जोडलेली आहे, ज्यांना ते प्रशिक्षण देतात आणि हमी भाव देतात. “शेतकरी हा आमच्या कुटुंबाचा भाग आहे,” सत्यजित म्हणतात. आता सीरिज बी मध्ये ११० कोटी रुपये मिळाले – ३६० वन अॅसेट, रेनमॅटर, नरोत्तम शेखसरिया फॅमिली आणि राहुल गर्ग यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांकडून. हे पैसे नवीन फॅक्टरी, अमेरिका आणि एमईएनए बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि टीम वाढवण्यासाठी. सणासुदीत विक्री दुप्पट होईल, असा अंदाज. पण यशाचे खरे रहस्य? पारदर्शकता. प्रत्येक उत्पादनावर क्यूआर कोड – स्कॅन केले की शेतकऱ्याचे नाव, मातीची चाचणी आणि उत्पादन प्रक्रिया दिसते. गुंतवणूकदारही प्रभावित. रेनमॅटरचे दिनेश पै म्हणतात, “४५ टक्के भारतीय कृषीत कार्यरत असताना, ही कंपनी शाश्वत बदल घडवते.” राहुल गर्ग, जे गेल्या वर्षभरात मेंटॉर आहेत, म्हणतात, “हे भावांचा ब्रँड वैयक्तिक स्पर्शाने चालतो.” ही कथा शिकवते की, स्वप्न आणि मेहनत असली की मातीपासून आकाश गाठता येते. टू ब्रदर्स आज केवळ कंपनी नाही, तर एक चळवळ आहे – सेंद्रिय भारताची. पुढे काय? जागतिक ब्रँड होणे. दोन भावांच्या या यात्रेला शुभेच्छा!

पुणे महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

0
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या मतदार यादी पुनरावलोकनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. मतदारांना आपल्या नावाविषयी, पत्त्याविषयी किंवा इतर तपशीलांबद्दल तक्रारी अथवा हरकती नोंदविण्यासाठी संधी दिली जाणार आहे. प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि दुरुस्त्या नोंदवता येतील. या कालावधीत मतदारांनी आपल्या नावाची नोंद योग्य आहे का, त्यात काही त्रुटी आहेत का, हे तपासून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्राप्त हरकती आणि दुरुस्त्यांवर निवडणूक विभागाकडून योग्य ती छाननी करण्यात येईल. या छाननीनंतर आणि सर्व आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करून 28 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या अंतिम यादीतच पुढील महापालिका निवडणुकीसाठी पात्र मतदारांची नावे राहतील. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रकाशित केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदारांची अद्ययावत माहिती असेल. महानगरपालिका निवडणुका अपेक्षित असल्याने, या मतदार यादीच्या कार्यक्रमाकडे राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदार यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना आपली नावे मतदार यादीत निश्चित करण्याचे आवाहन केले असून, वेळेत हरकती किंवा दुरुस्त्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रुबाब इंडियाचा फॅशनला मिळाला नवा आयाम; तनिष्काच्या TASW सोबत आता नवीन स्टाईल

0
Newsworldmarathi Pune:फॅशन आणि हस्तकलेच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या रुबाब इंडियाने आपल्या नवव्या वर्षात भव्य पदार्पण करत एक नवा पर्व सुरू केला आहे. या विशेष प्रवासात त्यांनी आता तनिष्काच्या TASW सोबत हातमिळवणी केली असून, एकत्रितपणे सर्जनशीलता, शैली आणि परंपरेचं अद्भुत मिश्रण साकारले आहे. ग्राहकांच्या अभिरुचीनुसार आणि आधुनिक ट्रेंडशी जुळवून घेत, दोन्ही ब्रँड्सनी एकत्र येऊन फॅशनच्या नव्या अध्यायाची निर्मिती केली आहे.
Oplus_16908288
पुणेकरांसाठी ही बातमी विशेष आनंदाची आहे, कारण या नव्या सहकार्याचे साक्षीदार होण्यासाठी आता स्वारगेट येथे मुक्ता अपार्टमेंटमधील नटराज हॉटेलच्या शेजारी असलेल्या आमच्या सहयोगी स्टोअरला भेट देता येणार आहे. येथे एकाच छताखाली परंपरा आणि आधुनिकतेचं अद्वितीय मिलन पाहायला मिळेल. रुबाब इंडियाच्या मनाली दानैत आणि तनिष्काच्या तनिष्का सावंत (TASW by तनिष्का) या दोन नावाजलेल्या डिझायनर्सनी एकत्र येऊन सर्जनशीलतेला नव्या उंचीवर नेलं आहे. त्यांची दृष्टी आणि कलात्मकता फक्त कपड्यांपुरती मर्यादित नसून, ती भारतीय हस्तकलेच्या आत्म्याला नव्या परिमाणात सादर करते. पारंपरिक डिझाईन्सना आधुनिक टच देत त्यांनी प्रत्येक पोशाखात एक वेगळेपणा आणि दर्जा जपला आहे. या सहकार्याच्या माध्यमातून रुबाब इंडिया आणि TASW आता फॅशनप्रेमींसाठी संपूर्ण भारतातील उत्कृष्ट हस्तकला, साड्या, आणि डिझायनर वस्तूंची आकर्षक श्रेणी सादर करत आहेत. खास बनारसी, पैठणी, चंदेरी आणि लिनन साड्यांपासून ते समकालीन फ्यूजन ड्रेसेसपर्यंत, प्रत्येक निर्मिती काळजीपूर्वक क्युरेट केली गेली आहे. या संग्रहात महिलांसाठी पारंपरिक तसेच आधुनिक दोन्ही शैलींचा समावेश आहे, ज्यामुळे प्रत्येक प्रसंगासाठी योग्य पोशाख सहज सापडतो. फक्त महिलांसाठीच नव्हे, तर पुरुष आणि मुलांसाठीदेखील खास हस्तकला आणि डिझायनर वस्तू येथे उपलब्ध आहेत. लग्नसोहळे, एंगेजमेंट, पारंपरिक सण, तसेच दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशा विविध पोशाखांच्या पर्यायांमुळे हा स्टोअर फॅशन आणि परंपरेचं परिपूर्ण केंद्र ठरतो. रुबाब इंडियाने आपल्या गेल्या नऊ वर्षांच्या प्रवासात ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांच्या आवडीनिवडी आणि शैलीचा सखोल अभ्यास केला आहे. त्या अनुभवावर आधारित त्यांनी आता “कस्टमाइज्ड फॅशन अनुभव” सादर केला आहे, जिथे प्रत्येक ग्राहकाच्या व्यक्तिमत्त्वानुसार आणि गरजेनुसार कपडे डिझाइन केले जातात. हेच या ब्रँडचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे – व्यक्तीच्या आत्मविश्वासाला आणि सौंदर्याला अधोरेखित करणारी फॅशन. रुबाब इंडिया आणि TASW यांच्या या सहकार्यामुळे पुण्याच्या फॅशनविश्वात एक नवा उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झालं आहे. ही केवळ कपड्यांची गॅलरी नसून, भारतीय कलात्मकतेचा उत्सव आहे. प्रत्येक वस्त्रात कारागिरांच्या हातांची मेहनत, डिझायनर्सच्या कल्पकतेचा स्पर्श आणि भारतीय परंपरेचा आत्मा जाणवतो. जर तुम्ही तुमच्या खास प्रसंगासाठी काहीतरी अनोखं, परंपरेशी निगडीत आणि तरीही आधुनिक अशा पोशाखाच्या शोधात असाल, तर रुबाब इंडिया आणि TASW यांचे हे सहयोगी स्टोअर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरेल. संपूर्ण कुटुंबासाठी कस्टमाइज्ड डिझाईन्स, नवीन ट्रेंड्स आणि दर्जेदार फॅब्रिक्स यांचा संगम येथे अनुभवता येईल. तुमच्या फॅशन कल्पनांना आकार देण्यासाठी आणि वैयक्तिक शैली साकारण्यासाठी आजच भेट द्या 📍 रुबाब इंडिया आणि TASW सहयोगी स्टोअर, मुक्ता अपार्टमेंट, नटराज हॉटेल शेजारी, स्वारगेट, पुणे. 📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा: 7507170170