Newsworldmarathi Pune: अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव यंदा भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरला. मा नगरसेविका अर्चना पाटील आणि उपाध्यक्ष तुषार पाटील व मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या “मार्तंड भैरव खंडोबाचा मंगल विवाह सोहळा” यांसारख्या भव्य जिवंत देखाव्यांनी भाविकांची मने जिंकली.
उत्सवाचा सर्वोच्च क्षण ठरला तो म्हणजे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला भव्य महिला महाआरतीचा सोहळा. हजारो महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या महाआरतीने देवीच्या जयघोषाने आणि मंगल आरतीच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देवीची महाआरती केली. कत्यानंतर त्यांनी महिला भगिनींशी आणि नागरिकांशी संवाद साधत “समाजात एकजूट आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे” असा संदेश दिला. पोलिस आयुक्तांचा सत्कार नगरसेविका अर्चना पाटील आणि उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केला.
या सोहळ्याला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अभूतपूर्व होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या नियोजन आणि शिस्तबद्धतेमुळे कार्यक्रमाची शान अधिकच वाढली. अशोक तरुण मंडळ आणि अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या यशस्वी आयोजनामुळे हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक ऐक्य व समुदायभावनेचा एक प्रेरणादायी सोहळा ठरला.
Newsworldmarathi Pune: संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा यांची त्रैवार्षिक निवडणूक 2025 ते 2028 मराठा शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेजच्या सभागृहामध्ये नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीमध्ये राष्ट्रसेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सेक्रेटरी शिवाजी खांडेकर यांची संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
शिवाजी खांडेकर हे गेले 25 वर्ष शिक्षण चळवळीत काम करीत आहेत वेगवेगळ्या संघटनांमध्ये प्रमुख पदाधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांची भूमिका ते मांडत आले आहेत. यापुढील काळात विशेष करून मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्था चालक संघटनेतील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
संस्थाचालक शिक्षण मंडळाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली याप्रसंगी अनिल मेहेर, गणपतराव बालवडकर व प्रमिला गायकवाड यांनी शिवाजी खांडेकर यांचे निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वि. ल. पाटील यांनी कामकाज पाहिले.
Newsworldmarathi Pune: आई तुळजाभवानी प्रतिष्ठान, मा. नगरसेविका वर्षा साठे आणि ओबीसी अध्यक्ष भीमराव साठे यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव २०२५ चे औचित्य साधून रास दांडियाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
संध्याकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रंगीबेरंगी पोशाख, नृत्याची तालावर थिरकणारी तरुणाई आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दांडियाच्या उत्साहाने उजळून निघाला. महिलांनी आणि तरुणांनी पारंपरिक गार्बा व दांडियामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देवी आईची आरती पर्वती मतदारसंघाच्या रणरागिणी, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत करण दादा मिसाळही प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांचा सन्मान वर्षा साठे व भीमराव साठे यांनी केला. आरतीच्या वेळी वातावरणात भक्तिरस ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाला प्रशांत दिवेकर, प्रशांत थोपटे, मा. नगरसेविका दिपाली ओसवाल, अजयभाऊ भोकरे, विकास लवटे, संतोष लड्डा, मंदार रांजेकर, अरुणा पवार यांसह असंख्य मान्यवर उपस्थित राहिले. मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला व तरुणाई यांचा सहभाग लक्षणीय होता.
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांसाठी केंद्र सरकारने ३३२ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली असून त्यामुळे पुणे शहरातील नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघात सिंहगड रस्ता परिसरातील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, “अटल मिशन फॉर रेज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेअंतर्गत या मलनिस्सारण प्रकल्पाची एकूण किंमत १,४३७.९४ कोटी रुपये असून, त्यापैकी ५३३.८५ कोटी रुपयांचे काम आधीच मंजूर झाले आहे. त्यात नव्याने ३३२.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला गती मिळणार आहे.”
मोहोळ पुढे म्हणाले, “या आराखड्यांतर्गत जुन्या ड्रेनेज लाईन्स बदलण्यात येणार असून जवळपास ४७२ किलोमीटर नवीन पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. यासोबतच ८ नवीन मलशुद्धीकरण केंद्रे (STPs) उभारली जाणार असून त्यांची एकत्रित क्षमता २०१ एमएलडी (मिलियन लिटर प्रति दिवस) इतकी असेल.”
खडकवासला, नऱ्हे, जांभुळवाडी, नांदोशी, किरकटवाडी पिसोळी, सणसनगर, कोंढवे धावडे, किर्कटवाडी, भिलारवाडी, सुस, म्हाळुंगे, गुजर निम्बाळकरवाडी, आणि मंगदेवाडी या गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती ही मोहोळ यांनी दिली.
पुणेकर नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीतील हा मोठा टप्पा आहे. समाविष्ट गावांमध्ये स्वच्छ व शास्त्रशुद्ध मलनिस्सारण यंत्रणा उपलब्ध होणार असून, त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण !
सामान्य पुणेकरांच्या समस्या प्रश्न अडीअडचणी सुटाव्यात यासाठी मोहोळ यांनी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन वेळा हे अभियान राबवण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. नागरिकांचे प्रश्न या अभियानाद्वारे सुटत असल्याने दिवसेंदिवस या उपक्रमात अधिकाधिक पुणेकर सहभागी होताना पाहायला मिळत आहेत.
Newsworldmarathi Pune: भंडारी समाजसेवा ट्रस्ट, रेणुका माता मंदिर, केशवनगर येथे सुरू असलेल्या 25 व्या रौप्यमहोत्सवी नवरात्र उत्सवानिमित्त भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देवी रेणुका मातेस दर्शन देऊन आरतीचा लाभ घेतला. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
भंडारी समाजसेवा ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. या विशेष वर्षात म्हणजेच रौप्यमहोत्सवी उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक नागरिक, महिला मंडळे आणि तरुणाई उत्साहाने सहभागी होत असून उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Oplus_16908288
धीरज घाटे यांनी रेणुका मातेसमोर समाजातील ऐक्य, सुख-समृद्धी व जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. या भेटीवेळी त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी भंडारी समाजसेवा ट्रस्टच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ट्रस्टच्या वतीने मा. सभागृहनेते श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी धीरज घाटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी घाटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
Newsworldmarathi Pune: २७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आयोजित म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला महिलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. सुरेल गाण्यांच्या साथीने खेळलेली ही स्पर्धा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, महिलांना आनंद, मैत्री आणि स्नेहबंध दृढ करण्याची संधी ठरली.
ही स्पर्धा पुण्यातील सुप्रसिद्ध गायिका आरती दीक्षित आणि आकाश सोळंकी यांच्या मधुर गायनाने घेण्यात आली. त्यांच्या गायनामुळे वातावरण अधिकच रंगतदार व सुरेल झाले.
शिवदर्शन–सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या या स्पर्धा कार्यक्रमात प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सामूहिक आरती झल्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. यामध्ये २००हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिला पुढीलप्रमाणे –
1st Row – रतन मोरे
2nd Row – नंदा भट्टड
3rd Row – शकुंतला सिकची
4 Corner – सुप्रिया पुरोहित
1st Five Songs – दीपाली घाटे
Full हाऊजी – वर्षा बेंद्रे
विजेत्या महिलांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमामुळे महोत्सवात उत्साह, हास्य आणि आनंदाची रंगत भरली. महिलांच्या जोशपूर्ण सहभागामुळे वातावरणात खऱ्या अर्थाने नवरात्रीचा उत्सव रंग चढला.
याप्रसंगी श्रुतिका बागुल, वृषाली बागुल आणि वैष्णवी वाघोलीकर यांची विशेष उपस्थिती होती.
Newsworldmarathi Pune: सुखसागरनगर येथील श्री अंबा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वस्थ नारी – सशक्त परिवार या सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आहे होते. या उपक्रमात परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य व सशक्तिकरणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे होते. महिलांसाठी आरोग्य तपासणी, मार्गदर्शन तसेच मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य याविषयी तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सहभागी महिलांनी या उपक्रमातून आत्मविश्वास, आरोग्याची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी याबाबत सकारात्मक अनुभव घेतला.
ट्रस्टचे पदाधिकारी मगराज राठी यांनी सांगितले की, “महिला सशक्त झाल्या तर संपूर्ण कुटुंब आणि समाज मजबूत होतो. त्यामुळे आरोग्यदायी व जागरूक महिलांसाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, भविष्यात अशा सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांची मालिका राबविली जाणार आहे.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकतेची भावना वाढीस लागली असून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यास मोठी मदत झाली आहे. उपस्थित महिलांनी ट्रस्टचे आभार मानले व या उपक्रमामुळे त्यांना लाभदायक माहिती मिळाल्याचे सांगितले.
स्वस्थ नारी – सशक्त परिवार हा उपक्रम महिलांच्या आरोग्य, जागरूकता आणि सशक्तिकरणाचा एक आगळावेगळा प्रयत्न ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Newsworldmarathi Pune: गोरक्ष स्मृती फाउंडेशन आणि गुजर निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी मारुती खोपडे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ३८ मधील माता-भगिनींसाठी मोफत महालक्ष्मी दर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. सर्वांनी भक्तीभावाने ‘जय अंबाबाई’च्या घोषणांमध्ये यात्रेची सुरुवात केली. या यात्रेत शेकडो माता-भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला व आई अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दर्शनानंतर सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि श्रद्धेचे तेज दिसत होते. खोपडे यांनी या यात्रेचे आयोजन केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित न ठेवता समाजातील एकता, सेवाभाव आणि सामूहिक श्रद्धेचा सुंदर संगम घडवून आणला. हा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरल्याचे उपस्थित महिलांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरीत्या पार पडले असून यात्रेतील सर्व व्यवस्थेमुळे सहभागी महिलांना कोणताही त्रास जाणवला नाही. गोरक्ष स्मृती फाउंडेशनने या माध्यमातून समाजकार्याची नवी दिशा दाखवली आहे.
या यात्रेद्वारे धार्मिकतेबरोबरच सामाजिक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि आनंदाचा संदेश मिळाला. सहभागी माता-भगिनींनी दिलेल्या प्रतिसादामुळे आयोजकांमध्ये आणखी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर सरपंच व्यंकोजी मारुती खोपडे यांनी सहभागी झालेल्या सर्व माता-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी भविष्यातही अशाच सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Newsworldmarathi Pune: घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप, लालित्यपूर्ण पदन्यास, सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे ‘वन्स मोअर’चे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’त रविवारी दुपारी १२ पासून सलग १२ तासांचा ‘लावणी धमाका’ श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आयोजित केला गेला. “महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज ‘लावणी महोत्सव’ पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम ३१ वर्षांपूर्वी सुरू केला. गेली ३१ वर्षे त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो,” असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.
विक्रमी लावणी महोत्सवात सीमा पोटे, भाग्यश्री बारामतीकर (पाव्हनं फक्त तुमच्यासाठी), रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर (तुमच्यासाठी कायपण), रील स्टार कुकू, वर्षा मुंबईकर (लावणी सुपरस्टार), सिनेतारका अर्चना सावंत, ज्योती मुंबईकर (मदनाची मंजिरी), शलाका पुणेकर, सोनाली शिंदे (कैरी मी पाडाची) या नामवंत कलावंत सहकाऱ्यांसह सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल १२ तास ठसकेबाज लावणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
प्रारंभी भारतरत्न स्वरसम्राज्ञी कै. लता मंगेशकर यांच्या २८ सप्टेंबर या जन्मदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्रास आबा बागुल यांच्यासमवेत लावणी कलावंतांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लावणी महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सवाची सुरुवात गण-गवळण व मुजऱ्याने झाली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्याविष्कार सादर करून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री गणेश कला-क्रीडा रंगमंचाचे प्रेक्षागृह दुपारी १२पासून रसिक प्रेक्षकांनी अखेरपर्यंत गच्च भरले होते. यावेळी प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्या व नृत्य करून लावणीला ‘वन्स मोअर’ची दाद दिली. या लावणी महोत्सवात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचाही मोठा प्रतिसाद होता.
‘माझी मैंना गावाकडे राहिली’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहार’, ‘रात्र धुंदीत ही जागवा..’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, तुमच्यासाठी जीव झाला वेडा पिसा’, ‘आंबा तोतापुरी’, ‘नाद खुळा’, ‘या रावजी बसा भावजी’, ‘फड सांभाळ तुऱ्याला’, ‘होऊ द्या दमानं’, ‘येऊ कशी तशी नांदायला’, ‘मला म्हनत्यात हो पुण्याची मैना’, ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ अशा अनेक लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
‘विचार काय आहे तुमचा पाहुनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ’आजकाल पाटलाचा’, ’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनि अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा’ अशा एकाहून एक सरस अशा लावण्या व गवळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली.
याबरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’ या लावणीने ‘वन्स मोअर’ची दाद मिळविली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यांसह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका उर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूनि गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या लावण्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग १२ तास नृत्यांगनांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. अनेक राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंत कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षागृह तुडुंब भरले होते.
Newsworldmarathi Pune: वयोगट ३ ते १२ वर्षांमधील १०००हून अधिक कन्या, रंगीबेरंगी ड्रेस, कपाळावर चुनरी, चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्रॉ, खाऊवाटप अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला. प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
सहभागी सर्व लहान मुलींच्या कपाळावर चुनरी, चंद्रकोर आणि कुमकुम तिलक पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी लावले. या सर्व लहान कन्यांचे पाय धुऊन त्यावर स्वस्तिक चिन्ह काढण्यात आले. त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. तसेच सामूहिक आरती करण्यात आली.
यावेळी बालगीते व नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी या मुलींनी नऊवारी साडी, घागरा, पंजाबी ड्रेस असे रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. याशिवाय कालिका देवी, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, अर्धनारी नटेश्वर, कमळातील देवी अशी रूपे वेशभूषेतून साकारली होती. याप्रसंगी अनेक मुलींनी गणपती स्तोत्र, श्रीसूक्तपठण, दुर्गास्तुती तोंडपाठ म्हणून दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लकी ड्रॉमधील विजेत्या दुर्वा जाधव, नंदिनी राजपूत, अक्षरा कदम, समृद्धी पवार, आरुषी भारती या मुलींना सायकल, ब्लँकेट, कॅरम इत्यादी बक्षिसे देण्यात आली. तसेच लकी ड्राॅमधील अन्य १० मुलींना स्कूल बॅग्ज व प्रवासी बॅग्ज देण्यात आल्या. सहभागी सर्व मुलींना वॉटरबॅग व खाऊ देण्यात आला.
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला ‘’तू मोठी झाल्यावर काय होणार ?’’ असे विचारले. यावर अनेकींनी डॉक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञ अशी उत्तरे दिली. यावर आबा बागुल म्हणाले की, ‘’मुलींना मोठी स्वप्ने बघू द्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.’’
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध व सुरक्षेबाबत आवाज उठविण्याचे आवाहन करून म्हटले की, ‘’पालकांनी मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे. मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा. त्याचबरोबर आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी या सर्वांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येबद्दल व सुरक्षेबद्दल जागरण करा.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बागुल, नूपुर बागुल आणि योगिता निकम यांनी केले. यावेळी डॉ. सौ. रांका, सौ. सुचेता अण्णा थोरात, उद्योगपती सुधीर वाघोलीकर उपस्थित होते.