अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ला काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद

0
Newsworldmarathi Pune: सध्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी सिंहगड किल्ल्यातील नागरिक व पर्यटकांचा प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, गुरुवार दिनांक २९ मे रोजी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात कोणालाही किल्ल्यावर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या बंदीमध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचाही समावेश असून, किल्ल्यावर जाणाऱ्या सर्व मार्गांवर बंदी लागू करण्यात आली आहे. विशेषतः कल्याण दरवाजा, आतकरवाडी आणि इतर सर्व पायी मार्गांद्वारे प्रवेश थांबवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पावसामुळे किल्ल्याच्या काही भागात माती सरकण्याचा किंवा दरड कोसळण्याचा धोका असल्याने हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात घेतल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. किल्ला पुन्हा उघडण्याबाबतचा निर्णय हवामानाच्या स्थितीचा आढावा घेऊन लवकरच घेण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“बलात्कारासाठी माणसं पाठवण्याची धमकी”; आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Newsworldmarathi Nagapur: भाजपचे विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांच्या कुटुंबातील वाद सार्वजनिक पटलावर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. फुके यांच्या लहान भावाची पत्नी प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सासरच्या मंडळींवर मानसिक छळ, बलात्काराच्या धमक्या, संपत्तीवरील वादातून घराबाहेर हाकलणे यांसारखे गंभीर आरोप केले. या आधी परिणय फुके यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटले होते की, प्रिया फुके नातवंडांना भेटू देत नाही आणि पैशांची मागणी करतेय. मात्र प्रिया फुके यांनी आज शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत आपल्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडली. प्रिया फुके यांनी सांगितले की, “माझं आणि संकेत फुके यांचं २०१२ मध्ये लग्न झालं. पण लग्नाआधीच त्यांच्या किडनीचे प्रत्यारोपण झाले होते, याबाबत आम्हाला माहिती दिली नव्हती. जेव्हा मला हे कळलं आणि मी विचारलं, तेव्हा मला धमकावण्यात आलं. ‘बोललीस तर बलात्कारासाठी माणसं पाठवू’ अशा घाणेरड्या धमक्या देण्यात आल्या.” पतीच्या मृत्यूनंतर देखील छळ सुरूच राहिला, असा दावा करत प्रिया म्हणाल्या, “रात्री १०.३० वाजता मला घराबाहेर काढण्यात आलं. अजूनही माझ्यावर नजर ठेवली जाते. घरी अज्ञात लोक येतात, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.” राजकीय पाठिंबा मिळत असल्याचा दिलासा: राजकीय क्षेत्रातून सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी पुढे येत प्रिया फुके यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची मागणी केली. “महिला आयोगाने वेळेवर दखल घेतली असती, तर हे प्रकरण इतकं वाढलं नसतं,” असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

Jalgaon News : जळगावात महिलेनं भर रस्त्यात दिला बाळाला जन्म; रोहिणी खडसेंची सरकारवर आगपाखड

Newsworldmarathi Jalgaon : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात एका आदिवासी महिलेने, आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे भररस्त्यात बाळाला जन्म दिला. या प्रकाराने राज्यभर खळबळ उडवली असून सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. खडसे म्हणाल्या, “कालपासून आपण मीडिया, सोशल मीडियात पाहतोय की भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा टप्पा गाठला आहे. पण याच देशात, महाराष्ट्रात एक महिला रस्त्यावर बाळाला जन्म देते, कारण आरोग्य सेवा नाही! ही शोकांतिका आहे, विकासाचा फसवा चेहरा आहे.” “चार मंत्री, पण सेवा शून्य” त्या पुढे म्हणाल्या, “जळगाव जिल्ह्यात चार मंत्री असूनही आरोग्य सेवा सक्षम नाही. प्रसुतीकळा सुरू झाल्यावर महिला दवाखान्याकडे जात होती, पण मदतीअभावी तिला रस्त्यावरच बाळंत व्हावी लागली. ही घटना लाजिरवाणी आहे. प्रत्येक जबाबदार व्यक्तीने यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे.” सोशल मिडियावर खडसे यांची संतप्त पोस्ट: या घटनेबद्दल रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावर लिहिलं, “एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारतो, पण दुसरीकडे आपल्या बहिणीला भर रस्त्यावर बाळंत होण्याची वेळ येते. अजून किती दिवस ही ‘प्रगत भारत’ म्हणवणारी जाहिरात खरी मानायची?” या घटनेने आरोग्य खात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

पुण्यात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0
Newsworldmarathi Pune : पुणे शहरात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत असे आदेश महसूल, कृषि, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती इंदापूर तालुक्यात 25 मे रोजी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची 26 मे रोजी पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परीस्थितीचा आढावा घ्यावा व घडलेल्या घटनांबाबत तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून त्याचा हेल्पलाईन क्र. 020-26123371,26133522 व टोल फ्री क्रमांक 1077 असा असून या नियंत्रण कक्षाशी तालुका व गावपातळीवरील नागरिकांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन डुडी यांनी केले आहे.

‘महावृष्टी’चा इशारा… ! महाराष्ट्रात मान्सूनचा जोर, शेतकऱ्यांवर संकट

Newsworldmarathi Pune: यंदा महाराष्ट्रावर जोरदार पावसाची ‘महावृष्टी’ होणार असून, मान्सून आज (२८ मे) संपूर्ण राज्य व्यापणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या काळात राज्यात १०७ ते ११२ टक्के पाऊस पडणार आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. जिल्हावार पावसाचा अंदाज: कोकण: 107% मध्य महाराष्ट्र: 110% मराठवाडा: 112% विदर्भ: 109% ही माहिती दिल्लीतील पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. देशासाठी आधी दिलेला 105% पावसाचा अंदाज आता वाढवून 106% करण्यात आला आहे. हवामान विभागाने यंदा प्रथमच राज्यवार पावसाचे आकडे अधिक स्पष्टपणे सादर केले आहेत. मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांवर घाला राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ४०,९४९ हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भात, मूग, उडीद, मका, कांदा, भाजीपाला, आंबा, संत्रा, पपई, केळी यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान झालेली जिल्हे (हेक्टरमध्ये): अमरावती: १२,५६५ बुलडाणा: ६,६९९ जळगाव: ४,५३८ नाशिक: ३,५२३ अहिल्यानगर: १,४४१ इतर जिल्हे: अकोला, लातूर, पालघर, सोलापूर, पुणे, सातारा कृषी विभागाच्या अहवालानुसार, हवामानाची ही स्थिती पुढेही कायम राहिल्यास नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शेतजमीन वाटपाचे नोंदणी शुल्क माफ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० मोठे निर्णय, वाचा संपूर्ण यादी

Newsworldmarathi Mumbai: शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मंगळवारी दुपारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटपपत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाममात्र आहे. मात्र, नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही. मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करीत नाहीत. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर कॅबिनेट निर्णय १ ) इचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा करभरपाईपोटी पुढील ५ वर्षात अनुक्रमे ६५७ कोटी, ३९२ कोटी रुपये मिळणार. २) महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना सुमारे १२ कोटी रुपयांची ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर. ३) महाराष्ट्र अॅग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहतील. तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील. ४) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास मान्यता. ५) राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार विधि व न्याय विभागात ५ हजार २३३ टंकलेखकांची एकाकी पदे निर्माण करण्यास मान्यता. ६) महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी. ७) नागपूरमधील पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या करारनाम्यातील अटी व शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता. यातून क्लबला उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाल्यास, पत्रकार सभासदांना सवलतीच्या दरात विविध सुविधा पुरविता येणार आहेत. ८) रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या गतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेस ७५ अनिवासी विद्यार्थी संख्येस अनुदानतत्त्वावर घेण्यास मान्यता. ९) राज्यातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषी अधिकारी’ व’सहाय्यक कृषी अधिकारी’ असा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Panchkula crime news : कर्जाच्या विळख्यात अख्ख कुटुंब संपलं; ७ जणांची विषप्राशन करून आत्महत्या

Newsworldmarathi Hariyana: पंचकुला जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एकाच कुटुंबातील ७ जणांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अंदाजे १५ ते २० कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्याने निराश होऊन मित्तल कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटना सेक्टर २७ मध्ये घडली. घराबाहेर उभी असलेली देहरादून पासिंग कार ही मृत्यूचा साक्षीदार ठरली. या कारमध्ये ६ जण मृतावस्थेत, तर एकजण अतिशय नाजूक अवस्थेत आढळून आला. या सातव्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यानेही अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, मित्तल कुटुंब पंचकुलामध्ये धीरेंद्र शास्त्री यांची कथा ऐकून परतत असताना ही घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेपूर्वीचे भयाण चित्र कारमधून दुर्गंधी येत असल्यामुळे एक स्थानिक युवक पुनीत राणाने दार उघडले असता, अंतर्गत उलटीचे निशाण, विषप्राशनाचे संकेत आणि मृतदेहांचे हालचाल नसलेले शरीर दृश्यामध्ये आलं. वाचलेली एकमेव व्यक्ती त्या क्षणी म्हणाली, “कर्जाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कोणी मदतीला आलं नाही… आता आम्ही संपलो!” मृतांमध्ये कोण होते? पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये प्रवीण मित्तल (४१), त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि आई-वडील यांचा समावेश आहे. मित्तल कुटुंब काही वर्षांपूर्वी देहरादूनमध्ये स्थायिक झालं होतं. मात्र अलीकडे पुन्हा पंचकुलात वास्तव्यास आले होते. पोलिसांचा संशय: आत्महत्या की हत्या? जरी प्राथमिकदृष्ट्या हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी, पोलिसांनी हत्या करण्याचाही शक्यता वर्तवून सखोल तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सापडलेले विषाचे नमुने, टॉवेल, आणि कारमधील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

“बाळासाहेब असते तर गृहमंत्री अमित शहांना गेट आऊट केले असते “; सामना अग्रलेखातून घणाघात

Newsworldmarathi Mumbai: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर शिवसेना फोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहांवर “जीवनभर लक्षात राहील” अशा कठोर कारवाया झाल्या असत्या, अशी जोरदार टीका शिवसेनेच्या ‘सामना’ अग्रलेखातून करण्यात आली आहे. ‘सामना’ने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, ज्यांनी हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्त शिवसेनेला खिळखिळं केलं – त्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना सत्ता व पैशांच्या जोरावर विकत घेणारे आता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन लोकांच्या भावना भडकवत आहेत, ही महाराष्ट्रद्रोहाचीच लक्षणं आहेत. अमित शहा यांच्यावर टीका करताना अग्रलेखात त्यांना देशाच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय आणि फुसके गृहमंत्री म्हणून हिणवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात देशातील सुरक्षा यंत्रणा ढासळली, कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आणि देशात अराजकतेचं वातावरण निर्माण झालं, असा आरोप करण्यात आला. विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ज्यात 26 हिंदू महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसण्यात आलं, त्या घटनेवरून ‘सामना’ने सरकारला धारेवर धरलं आहे. या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, यावरून गृहखात्याच्या निष्क्रियतेची पोलखोल करण्यात आली आहे. ‘सामना’ म्हणतो की, बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून अमित शहांचा राजीनामा मागितला असता. तेच शहा महाराष्ट्रात येऊन सांगतात, “बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींना गळामिठी दिली असती” हे विधान म्हणजे बाळासाहेबांचा घोर अपमान आहे, असा घणाघात अग्रलेखातून केला गेला आहे.

Padma Awards 2025 : शेतकरी ते कलाकार; महाराष्ट्रातील ६ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित, वाचा सविस्तर…

Newsworldmarathi Delhi : नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्विकारला. डॉ. जोशी यांनी पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. सन 1995 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी जन्मलेल्या जोशी यांनी शिक्षण, शिस्त, आणि कार्यक्षम नेतृत्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान अशोक सराफ मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि ‘पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत. अच्युत पालव देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सर्जनशीलतेतून देवनागरी लिपीचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता प्रभावीपणे समोर येते. अश्विनी भिडे-देशपांडे जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालपणापासून संगीताची गोडी असलेल्या अश्विनी यांनी “गांधर्व महाविद्यालयातून “संगीत विशारद” पदवी प्राप्त केली. सुभाष शर्मा यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींचा अवलंब करून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देत आहेत. डॉ. विलास डांगरे 70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात. यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्पयात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

राजेंद्र हगवणेला थार देणाऱ्या चोंधे कुटुंबाची कुंडली बाहेर आली, पोरांना बायकांचा नाद, हुंड्यासाठी सूनेचा छळ

0
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थार गाडीमध्ये बसून ते फिरत होते, त्या गाडीच्या मालकाबाबतची माहिती समोर आली आहे. संकेत नरेश चोंधे हे या थार गाडीचे मालक असून, त्याचा भाऊ सुयश चोंधे याची क्रेटा गाडीही पोलीसांनी जप्त केली आहे. या प्रकरणातील नवा तपशील अधिक धक्कादायक ठरतो, कारण चोंधे कुटुंबातील सुनेवर देखील पैशांसाठी आणि हुंड्यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा आरोप समोर आला आहे. सुयश चोंधेने आपल्या पत्नीला वीस लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळले असून, या छळाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्नही केल्याची माहिती आहे. याप्रकरणी तिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सुयशची पत्नी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, “माझ्यावर मानसिक आणि शारिरीक अत्याचार केले गेले. पैशांसाठी दबाव टाकण्यात आला आणि एकटं पाडण्यात आलं. अखेर मी महिला आयोगाकडे धाव घेतली.” दरम्यान, संकेत चोंधेची थार गाडी आणि सुयशची क्रेटा ही दोन्ही वाहने पोलिसांनी तपासासाठी जप्त केली आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक नवीन धक्कादायक तपशील समोर येत असून, आता चोंधे कुटुंबावरही संशयाचे सावट घनघोर बनले आहे.