अहिंसेचा संदेश देत महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

0
Newsworldmarathi Pune : श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आज (दि. 10) तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या 2624व्या जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. “त्रिशला नंदन वीर की …. जय बोलो महावीर की,,, जय बोलो महावीर की” असा जयघोष करीत मंगलवाद्यांच्या सुरात शोभायात्रेची सुरुवात झाली.श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज आणि स्थानिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, समीर जैन, प्रचार प्रमुख सतीश शहा, विलास शहा, हरेश शहा, महावीर कटारिया, अल्पेश गोगरी यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेला सकाळी ७.३० वाजता गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचा जयघोष करीत सुरुवात झाली. पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जैन बंधू-भगिनी उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. शोभायात्रेत पुण्यातील विविध भागांमधून रथ सहभागी झाले होते त्याच प्रमाणे महिला मंडळांचाही सहभाग होता. शोभायात्रा भांडी आळी, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती मंदिर चौक, गणेश पेठ, गोविंद हवालई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हल लव्हज्‌‍ चौक, अप्सरा चौक, प्रभात प्रेस, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर सभागृह, सातारा रोडमार्गे आदिनाथ स्थानक येथे दुपारी 12:30 वाजता पोहोचली. ढोल-ताशाच्या गजरात उत्साहाने आणि भावपूर्णतेने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. आकर्षक फुलांच्या सजावटीने शोभायात्रेतील रथ सजविण्यात आले होते. शोभायात्रेच्या सुरुवातीस भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला चांदीचा रथ होता. हा रथ भाविकांनी स्वत: ओढत नेला. भगवान महावीर यांच्या जन्माचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. महिलांनी महावीर जयंतीचे महत्त्व सांगणारे तसेच सामाजिक संदेश देणारे विविध फलक हाती घेऊन जनजागृती केली. सप्त अश्वांचा चंदेरी रथ, गजरथ, सिंहरथ यांच्यासह विविध बँड सहभागी झाले होते. सोन्या मारुती चौकात भगवान महावीर आणि शोभायात्रेच्या अग्रभागी असलेले आचार्य विरागसागर सुरीश्वरजी महाराज आदि ठाणा यांचे दर्शन केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, ना. चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप,अभय छाजेड, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले आदींनी घेतले. समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर घेण्यात आले. दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे वाटप, पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याकरीता मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. वडगाव धायरी येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. भवानी पेठेत नि:शुल्क आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. पोपटसेठ ओस्तवाल, राजेश शहा, सुनील कटारिया, नितीन जैन, निलेश शहा, भूपेंद्र शहा, भद्रेश बाफना, भरत सुराणा, संदीप भंडारी, अभय जैन या प्रसंगी उपस्थित होते. अहिंसा रॅलीला प्रतिसाद भव्य दुचाकी अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात दादावाडी अहिंसा भवन येथे अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. जय जिनेन्द्र प्रतिष्ठान (नाजुश्री भवन) येथे रॅलीची सांगता झाली.

“निधी पुरेसा नाही, अजितदादांच्या टोल्याला सुळे यांचं थेट उत्तर!”

0
हो, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील हा शाब्दिक संघर्ष आता राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आंदोलन छेडल्यावर अजित पवारांनी ‘खासदार निधीतून रस्ता करता येतो’ असं सूचक वक्तव्य करत टोला लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना सुळे यांनी स्पष्ट केलं की, खासदार निधी ही मर्यादित रक्कम असते आणि त्यातून मोठे प्रकल्प पूर्ण करणं शक्य नसतं. त्यामुळे राज्य सरकारनेच हे काम हाती घ्यावं, अशी त्यांची भूमिका आहे. आता सुळे यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार काय म्हणतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, कारण हे संपूर्ण प्रकरण केवळ विकासकामांपुरतं मर्यादित न राहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील सूक्ष्म संघर्षाचं प्रतीक बनलं आहे. अजित पवार म्हणाले, “मी गेली ३५ वर्षं राजकारण करतोय, पण ६०० मीटर रस्त्यासाठी उपोषण…?” हे विधान केवळ एक तक्रार नाही, तर एक प्रकारचं सूचक राजकीय संकेत आहे—की हे उपोषण केवळ रस्त्यासाठी नव्हतं, तर त्यामागं राजकीय हेतूही असू शकतो. यावर सुप्रिया सुळे यांनीही संयम राखत स्पष्ट भूमिका मांडली—की खासदार निधी मर्यादित असतो आणि तो सगळ्या आवश्यक कामांसाठी पुरेसा नाही. शिवाय हा रस्ता स्थानिक भावनांशी जोडलेला आहे आणि जनतेच्या मागणीवरूनच ती कृती करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील संघर्ष आता थेट लोकांसमोर दिसू लागला आहे.

हिल टॉप-हिल स्लोप व जैवविविधता उद्यानांसाठी नवा नियोजन आराखडा : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नाना यश

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित असून जैववैविध्य उद्यान आरक्षण बायो-डायर्व्हसिटी पार्क (बी.डी.पी.) हे आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यामध्ये देखील डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर हिल टॉप हिल स्लोप विभागात समाविष्ट असलेल्या जमिनी व बी.डी.पी. आरक्षणातील जमिनी या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असून आरक्षणातील जमिनींच्या मालकांकडून उक्त जमिनीवरील वापर विभाग / आरक्षण वगळून सदरहू जमिनी रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने शासनाकडे अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात येत होता. या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर माधुरी मिसाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार स्वतंत्र व्यक्तिगत प्रस्तावांवर निर्णय घेणे ऐवजी एकत्रित सर्वंकष निर्णय घेणेसाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राच्या वेगवेगळ्या स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली एकत्र करुन एकच पर्यावरण पूरक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याकरिता रमानाथ झा,निवृत्त आय.ए.एस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासगट गठीत केलेला आहे. रमाकांत झा यांनी अनेक महानगरपालिकात आयुक्त म्हणून तसेच एमएमआरडीए आयुक्त आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये नगर नियोजनात मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर अभ्यासगटात त्यांचे सोबत आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे,महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे,सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, शहर अभियंता, पुणे महानगरपालिका, उपसंचालक, नगर रचना नागरी संशोधन घटक, पुणे यांचा समावेश आहे.

त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र सक्षम होईल : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0
Newsworldmarathi Pune : सहकाराला शास्त्रशुद्ध पद्धतीने दिशा देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. देशातील ८ लाख सहकारी संस्थात आज ४० लाख लोक काम करत आहे तर, ८० लाख सदस्य सहकार विभागाशी निगडित आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याकरिता उत्तम प्रशासन, अनियमितता टाळण्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र व्याप्ती वाढेल आणि उद्योग, रोजगार संधी नव्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षात सहकार क्षेत्राला १७ लाख प्रशिक्षित मनुष्यबळ गरज आहे, त्यामुळे त्रिभुवन सहकार विद्यापीठाची गरज होती. हे विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर काम करेल आणि सहकार अधिक सक्षम होईल. संसद अधियनियम अंतर्गत हे विद्यापीठ चालणार असून यात संशोधन आणि विकास यावर देखील भर दिला जाणार आहे असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, सहकार विषयात काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहे. नुकतेच संसद अधिवेशनमध्ये दोन्ही सभागृहात सहकार मंत्रालया माध्यमातून देशातील पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्याता निर्णय झाला आहे. यामागील उद्देश, विद्यापीठ गरज काय, देशभरात त्यांचे काम कसे असेल याबाबत माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. देश कृषी प्रधान असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक जनता सहकार क्षेत्राशी जोडलेली आहे. देशातील ३० कोटी जनता वेगवेगळया मार्गाने सहकार क्षेत्राशी संबंधित आहे. साडेतीन वर्षापूर्वी सहकार मंत्रालय स्थापन झाले आणि त्याची जबाबदारी सहकारमध्ये भरीव योगदान असलेल्या अमित शाह यांना दिली गेली. त्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय सहकार क्षेत्रासाठी झाले. ग्रामीण भागातील पॅक्स यांना ताकद देण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता जिल्हा बँकेकडून जी आर्थिक रक्कम येत ती शेतकऱ्यांना छोट्या कर्ज स्वरूपात पूर्वी वाटप केली जात होती पण, आता पॅक्सला २५ विविध उद्योग दिले गेले आहे. देशात मोठ्या प्रमाणात पॅक्स कार्यरत आहे. ३२ राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेश यांनी ही मॉडेल स्वीकारले आणि त्यांना मोठा आर्थिक निधी मदत देखील दिली गेली आहे. सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी अनेक गोष्टी पूर्तता करण्यात आली आहे. शहरी नागरी बँकांच्या सशक्तीकरण आणि त्यांचे आर्थिक बळकटीसाठी पुढाकार घेण्यात आला. तीन मोठ्या संस्था देखील स्थापन करून शेती समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. चौकट ‘वैकुंठ मेहता’ असणार सहकार विद्यापाठीचा महत्त्वाचा भाग ! त्रिभुवन सहकार विद्यापीठासाठी पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था महत्वपूर्ण भाग राहणार आहे, कारण या संस्थेचे सहकार क्षेत्रासाठी असणारे योगदान मोठे आहे. त्यामुळे ही संस्था विद्यापीठाचा अविभाज्य घटक असणार आहे. मोहोळ यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील १५ हजार सेवा सोसायट्यांना दिलासा… नियमाप्रमाणे सेवा सोसायट्यांना आयकर भरावा लागत नाही. पण त्यासाठी त्यांना आयकर रिटर्न भरावा लागतो. देशात एक लाख सेवा सोसायट्या (पॅक्स) आहे. त्यापैकी अनेक पॅक्स यांना आयकर विभाग बाबत नोटीस आली होती. महाराष्ट्रामध्ये १५ हजार पॅक्स यांना आयकर रिटर्न वेळेत न भरल्याने २० टक्के आयकर लागू झाला होता. पण याबाबत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याशी समन्वय साधून याला स्थिगिती मिळवली आहे. पॅक्स यांना सक्षम अधिकारी यांच्यासमोर प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित आयकर लागू होणार नाही, अशी माहिती यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

आळंदी देवाची येथे हिमालयीन समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune : हिमालयीन समर्पण ध्यान महाशिबिराचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत मुंबई मराठा फ्रुटवाला धर्मशाळा ग्राउंड, आळंदी देवाची, पुणे येथे होणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाढलेला तणाव, दुःख आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी बाह्य उपायांचा शोध यातच मनुष्य अडकला आहे. परंतु, दुःख दूर करण्याचा उपाय बाहेर नसून आपल्या आतच आहे. व्यक्तिने आपल्या जीवनात ध्यान जोडल्यास तो शांती प्राप्त करू शकतो आणि यातूनच शांतिमय विश्वाची निर्मिती केली जाऊ शकते. ध्यानयोग केल्याने शरीरभाव कमी होऊन आत्मभाव वाढण्यास मदत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात शांती आणि आत्मसाक्षात्काराच्या शोधात असलेले असंख्य साधक ‘हिमालयीन समर्पण ध्यानयोग’ च्या मार्गाने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या आत्मधर्माची, विश्वधर्माची आणि ध्यानाची प्रत्यक्ष अनुभूती या निःशुल्क शिबिरामध्ये आपल्याला जिवंत सद्गुरूंच्या सानिध्यात प्राप्त होऊ शकते. सद्‌गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजी एक आत्मसाक्षात्कारी ऋषी आहेत ज्यांनी १६ वर्षे हिमालयात ध्यान साधना करून अनेक कैवल्य कुंभक योगी , जैन मुनी आणि हिमालयीन गुरूं कडून दिव्य आत्मज्ञान आत्मसात केले. हिमालयातील हा अनुभूती प्रधान, अमूल्य ८०० वर्ष जुना समर्पण ध्यानयोग संस्कार भारतासहित जगातील ७२ देशातील लोकांनी आपलासा केला आहे . श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मानुभूती बाबत, विश्वधर्म, आत्मधर्म बाबत जे सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सुयोग या अद्वितीय तीन दिवसीय निःशुल्क हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिराच्या माध्यमातून घडणार आहे. शिवाय शिविराच्या निमित्ताने, शिविरस्थळीच एक विशेष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे- आळंदी ते आळंदी (गुरु अनेक गुरु तत्व एक) प्रदर्शनीची मुख्य आकर्षणं: •संत ज्ञानेश्वर महाराज व परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक विषयांचे सुंदर समन्वय व सचित्र सादरीकरण •परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या हिमालयातील आध्यात्मिक प्रवासाची झलक •वेळ: सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरू आपण सर्वांनी या प्रदर्शनीस अवश्य भेट द्यावी, असे मनःपूर्वक आमंत्रण.

शरद पवार आणि अजित पवारांच्या साक्षीने जय पवार यांचा आज साखरपुडा

0
Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या मुलगा जय पवार यांचा आज, 10 एप्रिल रोजी पुण्यात साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा खासगी स्वरूपाचा असून, त्यात पवार कुटुंबातील सदस्यांसोबत काही मोजकेच नातेवाईक आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जय पवार यांचं ऋतुजा पाटील यांच्यासोबत लग्न ठरलेलं असून, ऋतुजा या सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रवीण पाटील यांच्या मुलगी आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी साखरपुड्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने, हे नातं केवळ कुटुंबापुरतंच न राहता, एकप्रकारे राजकीय सौहार्दाचंही प्रतीक बनत आहे. जय पवार सुरुवातीला राजकारणापासून दूर राहिले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर त्यांनी सक्रियता वाढवली आहे. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर, घरच्याच राजकीय भूमिकेमुळे जय पवार यांनाही पुढे यावं लागलं. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोही पवार कुटुंबाच्या एकत्र येण्याची खूण मानले जात आहेत. विशेषतः अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय अंतर लक्षात घेतलं, तर या साखरपुड्याच्या निमित्ताने दोघे एकत्र येत असल्याची बातमी राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरतेय. कोण आहे ऋतुजा पाटील? जय पवार यांचा साखरपुडा फलटण येथील प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत ठरला आहे. ऋतुजा या एक सोशल मीडिया कंपनी सांभाळतात आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांची बहीण प्रसिद्ध केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटील कुटुंबातल्या घरात सून म्हणून आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता हे नातं अधिकृत होत असून दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

सत्य घटनेवर आधारित ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे : अभिनेत्री संस्कृती बालगुडे

0
Newsworldmarathi pune: मराठी चित्रपटकर्मींना जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्यात ’करेज’ या चित्रपटाने निश्चितच पुढचे पाऊल टाकले आहे. जे आपल्या मराठी चित्रपटांना प्रेरणा देईल. असा विश्वास अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी व्यक्त केला. ’करेज’ चित्रपटातील केंद्रीय भूमिका करणाऱ्या अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचा विशेष सन्मान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी लेखक समीक्षक राज काझी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे यावेळी मंचावर उपस्थित होते.  हॉलिवूडच नव्हे तर जगात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ’वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओज’मध्ये ’करेज’ या चित्रपटाचा लॉस एंजेलिस येथे एका खास शो नुकताच पार पडला. चित्रपट इंगजी असला तरी निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मराठी असल्याने याचा प्रातिनिधिक सन्मान म्हणून महामंडळातर्फे या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात दुख: असते आणि प्रत्येकाचे वेगळे असते आपण त्याला  कसे सामोरे जातो हे अत्यंत महत्वाचे असते, असे भान या चित्रपटाने दिले असे नमूद करत एक चांगली कलाकृती, वेगळा सामाजिक संदेश देणारा आणि सत्य घटनेवर आधारित असणारा ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहन अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी केले.  पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मराठी माणसांनी इंग्रजीत केलेल्या या चित्रपटांचे जगभर कौतुक होत आहे. सध्या हा चित्रपट जगभरातील विविध फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रदर्शित केला जात आहे. चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा एक सामाजिक विषय असला तरी यात एक ह्रदयास्पर्शी प्रेमकथा दडलेली आहे. राजराणी शर्मा  यांनी पतीला किडनी देताना केलेला संघर्षमय प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.  मेघराज राजेभोसले म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सातत्याने नवनवीन संकल्पना राबवत असते, काही नवीन करू पाहणाऱ्या चित्रकर्मीच्या पाठीशी उभे राहते आणि त्यांना प्रोत्साहन देत असते. आम्हाला अभिमान आहे की ‘करेज’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी एक जागतिक दर्जाचा चित्रपट निर्माण केला आहे. संस्कृती बालगुडे या आपल्या पुण्यातील आहेत, महामंडळाशी संलग्न आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

जितो आयोजित सामूहिक नवकार महामंत्र पठणात 11 हजार पुणेकरांचा सहभाग

0
Newsworldmarath Pune : विश्वशांती आणि विश्वकल्याणाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागातर्फे आज (दि. 9) विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतासह 108 देशांमधील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी सुरू झालेला हा सोहळा नऊ वाजून 36 मिनिटांनी संपला. जात-धर्म-पंथाच्या सीमारेषा ओलांडून पुणे व परिसरातून जवळपास अकरा हजार स्त्री-पुरुषांनी नवकार महामंत्राचे पठण केले. देशातच नव्हे तर जगात शांतता नांदावी, सुखसमृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या ग्राउंडवर आज भव्य-दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. प. पू. आ. लब्धीप्रभ सुरीश्वरजी, प. पू. जयप्रभ विजयजी मसा, प. पू. आ. विरागसागर सुरीश्वरजी महाराजा आदि ठाणा, प. पू. पन्यास तत्वरत्न विजयजी, प. पू. उपाध्याय गौतममुनीजी, प. पू. सा. सिद्धीपूर्णा श्रीजी म. सा. आदि ठाणा, प. पू. सा. चारुयशाश्री म.सा., प. पू. अर्हद ज्योतीजी म. सा., प. पू. सौम्याज्योतीजी म. सा., प. पू. गुरूछायाजी म. सा., प. पू. चारुप्रज्ञाजी मा साहब आदि ठाणा, प. पू. वैभवमुनीजी म. सा. यांची प्रवित्र उपस्थिती होती. पारंपरिक वेश परिधान करून, विश्वकल्याणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्त्री-पुरुष या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तरुणांची संख्याही लक्षवेधी होती. नवकार मंत्राच्या सामूहिक पठणादरम्यान वंदे नवकारम्‌‍ जय जिनेंद्र या घोषणेने वातावणात चैतन्य निर्माण झाले. सुरुवाती दर्डा परिवारातर्फे शंखनाद करण्यात आला. दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या उपक्रमात सहभाग होता. नवकार महामंत्राच्या पठणानंतर मंत्राच्या महात्म्याचे वर्णन करून उपस्थितांना संबोधन करताना नरेंद्र मोदी म्हणाले, हा मंत्र देश-विदेशासह अनेक ठिकाणी एकाचवेळी पठण केला जात आहे त्यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा अभूतपूर्व आहे. हा केवळ मंत्र नसून आस्थेचे केंद्र, जीवनाचे मूळ स्वरूप आहे. नवकार मंत्राची नऊ तत्त्वे सांगून या उपक्रमानिमित्त नागरिकांनी नऊ संकल्प करावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना पाणी बचत, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, स्वच्छता, स्वदेशीचा स्वीकार, देशदर्शन, सेंद्रिय शेती, आरोग्यपूर्ण जीवनपद्धती, योग आणि क्रीडा यांचे महत्त्व, गरिबांना मदत या नऊ सूत्रांचा प्रत्येक नागरिकाने अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. युवा कलाकार विश्व विशाल चोरडिया याने नवकार मंत्राचे पठण केले. त्यास शिव विशाल चोरडिया याने तबलासाथ केली. विनित घेमावत यांनी नवकार महामंत्राची महिती सांगणाऱ्या भक्तीरचना सादर केल्या. सचिन इंगळे आणि सहकाऱ्यांनी सहवादनातून नवकार महामंत्र सादर केला. केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती होती. पुणेकरांशी संवाद साधताना जय जिनेंद्र असा जयघोष करून ते म्हणाले, हा एक मंगलमय धार्मिक सोहळा असून यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. 68 अक्षरांच्या या मंत्राचा महिमा अपरंपरा असून यात ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ गुरूंना वंदन केले आहे. विश्वकल्याणासाठी पुणेकर जातीभेद विसरून मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. स्वागतपर प्रास्ताविकात दिनेश ओसवाल म्हणाले, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रकुमार छाजेड म्हणाले, पुण्यासह भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक शहरांमधून नवकार मंत्राचे एकाच वेळेला पठण होत आहे, यातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत आहे, जी विश्वशांती व विश्व कल्याणाला पोषक ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, प्रविण चोरबेले, अभिजित डुंगरवाल, विशाल चोरडिया, अचल जैन दिलीप विनाकीया,रुपेश कोठारी,विशाल शिंगवी, अजय मेहता यांनी प्रयत्न केले.

जेव्हा उड्डाण मंत्रीच थेट पायलट होतात…

0
Newsworldmarathi Pune : देशाच्या नागरी विमान वाहतूक खात्याचा कारभार दिल्लीपासून सांभाळणारे आणि पुण्यातील गल्लीबोळातील कार्यकर्त्यांमध्ये सहज मिसळणारे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वतः पायलट होऊन थेट विमानच चालवून उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. मोहोळ यांनी प्रशिक्षणार्थी पायलटकडून विमानाच्या यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली आणि काही वेळातच “तयार है हम!” या आत्मविश्वासात भरून थेट विमान चालवले. आकाशात झेपावताना त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आणि आत्मविश्वास याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मंत्री मोहोळ यांनी विमान आकाशात टेक ऑफ करताच विमानातील उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हा प्रसंग पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी होता — कारण एखादा मंत्री केवळ फाईलांपुरता मर्यादित न राहता, क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास उत्सुक असल्याचे दर्शन त्यातून घडले. दिल्लीतील कारभार सांभाळत असताना मोहोळ यांनी पुण्यावरील लक्ष थोडे ही कमी केलेले नाही. उलट पुणेकरांसाठी काय करता येईल याचा विचार ते नेहमी करताना दिसतात. बाणेर येथील ‘यो स्काईज एव्हीएशन’ प्रशिक्षण इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या ‘एअरबस A320’ फ्लाइट सिम्युलेटरचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विमान चालविण्याचा अनुभव घेतला. हे इन्स्टिट्यूट हवाई क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे, अशांसाठी ही संस्था प्रशिक्षण देणार आहे. या प्रसंगी ‘यो स्काईज’चे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी सिम्युलेटरविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी कृष्णकुमार गोयल, विजय भंडारी, प्रवीण बढेकर, राजेंद्र जैन, राजेंद्र मुथा, मोतीलाल सांकला, .सनी सांकला, श्री. सुनील नहार, उमेश जोशी, डॉ. रवी चिटणीस, डॉ. मनोज तरांबळे, यो स्काईजचे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट आदींसह मान्यवर उपस्थित होते.

नवकार महामंत्र जप जनजागृतीसाठी जितोच्या वतीने दुचाकी रॅली

0
Newsworldmarathi Pune: जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे चॅप्टरच्या वतीने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहराच्या विविध भागांतून एकाच वेळी निघालेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. नवकार महामंत्र सामूहिक जप सोहळ्याबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. ९ एप्रिल रोजी सकाळी ७:०२ ते ९:३६ या वेळेत एस. पी. कॉलेज ग्राउंड, टिळक रोड, पुणे येथे नवकार महामंत्राचा सामूहिक जप करण्यात येणार आहे. भारतासह १०८ देशांतील नागरिक या दिवशी एकत्रितपणे नवकार महामंत्र पठण करीत विश्वशांती व विश्वकल्याणासाठी प्रार्थना करणार आहेत. दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, ते स्वतः नवकार महामंत्राचा जप करतील आणि नंतर देशवासियांना संबोधित करतील. पुण्यातील कार्यक्रमस्थळी पंतप्रधानांचे भाषण थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचे आयोजन जितो पुणेच्या वतीने करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया आणि मीडिया कोऑर्डिनेटर अभिजित डुंगरवाल यांनी केले आहे.