कुणाल कामराला पुणेकराचे चोख प्रत्युत्तर

Newsworldmarathi Pune: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कामराच्याच शैलीत काव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक टिळक रस्त्यावर झळकला आहे. रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ असे व्यंगचित्र असलेला हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए !’ अशा शब्दांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकुर डायनिंग हॉलसमोर लावला आहे. ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ गाण्यांच्या ओळी लिहीत ‘शेर नजर वो आए’ असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला. हिंदुत्वाचा कैवारी, चिपळूणचा महापूर, इर्शाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते, असे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात वैभव वाघ म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधीक चांगल्या सोयीसुविधा, योजना देण्याचे काम त्यांनी केले. लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून लाखो गोरगरिबांना सेवा दिली. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, हिंदुत्वासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने बदनामीकारक वक्तव्य संतापजनक आहे. कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे. कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये. सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.” नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा हा फ्लेक्स लावणारे वैभव वाघ हे पुणे जिल्ह्यात एक कल्पक आणि क्रियाशील नेतृत्व म्हणून प्रसिध्द आहेत. वंदेमातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून वाघ ह्यांनी काम पाहिले आहे. कोरोना काळात विविध संघटना आणि गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून वैभव वाघ ह्यांनी केलेल्या कामाची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. ह्याच कामावर आधारित वाघ ह्यांनी लिहिलेले #व्हायरल_माणुसकी हे पुस्तक अल्पावधीतच प्रसिध्द झाले आहे. निवडणुकांचे व्यवस्थापन ह्या विषयात देखील वाघ ह्यांचा हातखंडा आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाघ ह्यांची राज्यभर निवडणुक व्यवस्थापन ह्या विषयावर भाषणे आयोजित केली जात. आता ह्या फ्लेक्सच्या निमित्ताने पुणेकरांशी नाळ जोडला गेलेला पुण्याचा सामाजिक कामातील वाघ एकनाथ शिंदे ह्यांच्या शिवसेनेत प्रवेश करतोय की काय अशी चर्चा पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

समान पाणीपुरवठा व कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लावणार; आमदार योगेश टिळेकर यांची माहिती

Newsworldmarathi Pune: “शहराला समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्त्याचे विस्तारीकरण, बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग, महावितरण कोंढवा कार्यालयाचे विभाजन, उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवली असून, आठवडाभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील,” अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार योगेशअण्णा टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेशअण्णा टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रा. सचिन जायभाये, भूषण नाहाटा, बाळासाहेब घुले आदी उपस्थित होते. योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, “विधानपरिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३२ तारांकित प्रश्न, ११ लक्षवेधी, ९ औचित्याचे मुद्दे आणि ७ विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली. कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले. पुण्यातील पाण्याचा प्रश्न, बेकायदेशीर व अनधिकृत प्लॉटिंग आणि कोंढव्यात अनधिकृत इमारतीत सुरु असलेली शाळा या लक्षवेधीना मंत्रिमहोदयांनी उत्तर देऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २८० कोटींचा निधी आला, मात्र, त्याचे काम अद्यापही सुरु झाले नाही, याकडे लक्ष वेधले.” “पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून, त्याचा ताण महापालिका प्रशासनावर पडत आहे. परिणामी मुलभुत सोईसुविधा पुरविण्यामध्ये अडचणी येत आहेत. उपनगरांमधील नागरिक कर भारत असूनही त्यांना विकासकामांचा लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरु आहे. लवकरच यावर निर्णय होईल. शहरात बकालपणा वाढतो आहे. व्यापाऱ्यांकडून, विकसकांकडून बांधकामे सुरु आहेत. ते थांबवण्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा झाली आहे,” असे ते म्हणाले. योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाशेजारील जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे किंवा त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, अशी आमची मागणी आहे. ही जागा खासगी विकासकाला देता कामा नये. तसेच संगमेश्वर येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीरगडावरही स्मारक व्हावे, अशी भूमिका मांडली. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभागृहात संविधानावर भाषण करण्याची संधी मिळाली. संत सावता माळी यांच्या अरण (सोलापूर) येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी मिळावेत व त्याला ‘अ’ दर्जा मिळावा, अशी मागणी केली.

आमदार महेश लांडगे यांची आमदारकी अडचणीत? काय आहे प्रकरण जाणून घ्या…

Newsworldmarathi Pune : भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार झाली नाही असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत आमदार महेश लांडगे यांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आमदार लांडगे यांची आमदारकी धोक्यात येणार का अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे आणि आमदार महेश लांडगे या दोघांमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये लढत झाली. या लढतीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी 62 हजार बोगस मतदारांचा समावेश केला असून 15 हजार मतदारांचे नावे वगळण्यात आली असल्याचा आरोप करत गव्हाणे यांनी आमदार लांडगे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आमदार लांडगे यांनी प्रशासनाला हाताशी धरून नियोजनबद्ध भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असल्याचे या याचिकेत गव्हाणे यांनी नमूद केले आहे. या याचिकेची दखल न्यायालयाने घेतली असून न्यायाधीश आर.आय. छागला यांनी दिनांक 21 मार्च 2025 रोजी प्राथमिक सुनावणी झाली. या सुनावणीनंतर आमदार लांडगे यांना 15 एप्रिल पर्यंत याचिकेतील आरोपांना उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुण्यात १२ एप्रिलला होणार २७ वे विश्वबंधुता साहित्य संमेलन

0
Newsworldmarathi Pune: विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या सदस्या डॉ. तेजश्री पारंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तिरंगा महावस्त्र, भारताचे संविधान आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होईल. प्रसंगी स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे प्रा. चंद्रकांत वानखेडे आणि प्रा. शंकर आथरे यांची उपस्थिती राहील.” दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री सीमा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे ‘जल्लोष अभिजात मराठीचा’ काव्यसंमेलन होईल. यावेळी संगीता झिंजुरके, डॉ. अशोककुमार पगारिया, सीमा झुंजारराव, शिल्पा कुलकर्णी, चंदन तरवडे, मधुश्री ओव्हाळ आणि विनोद सावंत यांची उपस्थिती राहील. २५ कवी यामध्ये सहभागी होतील. त्यानंतर प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांचे ‘सुवर्णमहोत्सवी विश्वबंधुता लोकचळवळीची प्रशंसनिय यशोगाथा’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. सविता पाटील, प्रा. भारती जाधव आणि प्रा. सायली गोसावी हे संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत, असे रोकडे यांनी नमूद केले.

हा आठवडा पावसाचा! राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Newsworldmarathi Pune : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि उष्णतेच्या लाटांचा अनुभव येण्याची शक्यता आहे. विशेषतः, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच ते सात दिवसांत (२ एप्रिलपासून) काही भागांत अवकाळी पावसाच्या सरी आणि गडगडाटी वादळांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी हवामानातील बदलांबाबत सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांत पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबईत सध्याचे हवामान ढगाळ असून, आर्द्रता वाढली आहे. तसेच, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे हवामानशास्त्रज्ञांच्या मते, मध्य महाराष्ट्रात सध्या चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणातील खालच्या आणि वरच्या थरांमध्ये विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगांच्या वाढीस मदत होत आहे. परिणामी, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि काही भागांत गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. डॉ. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थिती मागील दोन दिवसांपासून दिसून येत आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

‘पीएमआरडीए’ विकास आराखड्याबाबत चौकशी करा : सुनील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
Newsworldmarathi Pune : ‘पीएमआरडीए’ विकास आराखड्याच्या जागांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने आणि अर्थिक गैरव्यवहार करून टाकण्यात आल्याची शक्यता आहे. त्याबाबत काही हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी आणि हे गैरप्रकार करणाऱ्यांना जबाबदार धरावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई मेल द्वारे पाठवले आहे. गैरप्रकार झालेला हा विकास आराखडा रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच सुनील माने यांनी, हा विकास आराखडा करण्याचे काम सुरू असताना मुंबईतून दोन खासगी व्यक्ती पुण्यात येऊन या कामात सहभागी होत होते. या प्रकरणात रोख रक्कम आणि चेकने सुद्धा व्यवहार झाल्याची आमची माहिती आहे, असा आरोप केला आहे. काही अधिकाऱ्यांची वाढलेली मालमत्ता, त्यांनी विकत घेतलेल्या जमिनी याबाबत ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी या प्रकरणात सर्वांवर जबाबदारी निश्चित करून दोषी असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विकास आराखडा रद्द झाल्याने पुणे परिसराचे नियोजन पुन्हा अनेक वर्षे मागे गेले आहे. या नुकसानीस जबाबदार कोण हे सरकारला निश्चित करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी लागेल. अन्यथा जनतेचा वेळ, पैसा आणि परिश्रम, हे अर्थशून्य होईल. त्यामुळे या संबंधित सर्वांची चौकशी केली पाहिजे. यानंतर विकास आराखडा करताना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील तज्ञ व नागरिक यांचा सहभाग घ्यावा. ठिकठिकाणी चर्चासत्रे व कार्यशाळा घेऊन लोकांना सहभागी करावे. बांधकाम व्यवसायिकांना, खासगी व्यक्तींना या प्रक्रियेपासून दूर ठेवावे आणि कालबद्ध नियोजन करून विकास आराखडा लोकांसमोर आणावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षण घेत आहेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू

0
Newsworldmarathi Pune: तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाणेर येथील पुणे महानगरपालिकेच्या कै.धनंजय मधुकर ताम्हाणे जलतरण तलावावर पोहण्यासाठी तसेच पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .सुट्ट्यांमुळे लहान मुले पोहण्यासाठी गर्दी करत आहेत त्यामुळे जलतरण तलाव फुल होत आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ तपन कुमार पाणिग्रही हे या ठिकाणी मुलांना दर्जेदार पद्धतीने होण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अत्यल्प फी मध्ये दर्जेदार पद्धतीने महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये मुलांना प्रशिक्षण लाभत असल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू सराव करण्यासाठी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे त्यामुळे उन्हापासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास नागरिक गर्दी करू लागले आहेत लहान मुलांबरोबरच त्यांचे पालक देखील पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जलतरण तलावांवर येत आहेत. बच्चे कंपनी या जलतरण तलावावर सकाळपासूनच गर्दी करत आहेत. बाणेर परिसरातील इतर जलतरण तलावांच्या मानाने महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर माफक दरामध्ये नागरिकांसाठी कोचिंग तसेच पोहण्याच्या तलावाची सोय उपलब्ध केली असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षकाचे देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाणेर परिसरातील खाजगी जलतरण तलावांवर पोहणे शिकण्यासाठी पाच ते सात हजार फी आकारले जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना ही फी परवडत नाही परंतु महानगरपालिकेच्या जलतरण तलावांवर अत्यंत कमी फी मध्ये कोचिंग उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांना देखील या ठिकाणी पोहण्यासाठी दर्जेदार कोचिंग मिळत आहे. बाणेर येथील महानगरपालिकेच्या ताम्हाणे जलतरण तलावामध्ये मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असल्यामुळे परिसरातील नागरिक पोहण्यासाठी या जलतरण तलावाला प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी चेंजिंग रूम तसेच शॉवरची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच पोहण्यासाठी पोहण्याचा ड्रेस कंपल्सरी करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेने अत्यंत अल्प दरामध्ये बाणेर परिसरामध्ये पोहोण्याचा तलाव नागरिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत तसेच लहान मुलांबरोबरच पालक देखील या तलावामध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहेत.

रमणबाग शाळेत उभारली ‘सद्गुणांची संकल्प गुढी

0
Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये वर्षप्रतिपदा गुढीपाडव्या प्रीत्यर्थ शाला समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर, सर्व पदाधिकारी व शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थी मंत्रांच्या हस्ते अभिनव गुढी उभारण्यात आली.ज्ञान,श्रम,मूल्य संस्कार,एकी,कर्तृत्व,विज्ञान इत्यादी गुणांची जोपासना नव वर्षात करण्याची ‘संकल्प गुढी’ प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ चारुता प्रभुदेसाई यांच्या कल्पनेतून उभारण्यात आली. या कार्यक्रमाला चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे शुभांगी पाखरे तसेच मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यात आणखी एक होणार नवा महामार्ग

Newsworldmarathi Team: केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राला आणखी एक महामार्ग मिळणार आहे. त्यामुळे ७ तासांचा प्रवास फक्त २ तासांत करता येणार आहे. हा महामार्ग पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे. या महामार्गासाठी १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान नवा महामार्ग विकसित होईल आणि यामुळे सात तासांचा प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण होईल अशी माहिती दिली. नितीन गडकरी यांनी देशातील महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे सभागृहात सांगितले. आगामी दोन वर्षांत दोन पदरी रस्ते चार पदरी तर चार पदरी रस्ते सहा पदरी करण्यात येणार आहेत. देशातील जवळपास २५ हजार किलोमीटरचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांची संख्या किती राहिली याचा एक डेटा सादर करत गडकरींनी अपघात नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारची भूमिका काय ? याबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे यासंदर्भातही सभागृहाला माहिती दिली. यावेळी गडकरी म्हणाले, वाहनाचा जास्त वेग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे, रस्त्यांची खराब स्थिती यामुळे अपघात होतात. म्हणून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग मंत्रालय उपाययोजना राबवत आहे, असे त्यांनी सांगितले

द्राक्ष निर्यातदारांचा हंगाम गोड!

Newsworldmarathi Team : सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये यंदाच्या हंगामात द्राक्ष मालाची असणारी कमी, अवकाळी पाऊस न पडणे त्यामुळे मुबलक सूर्यप्रकाश, द्राक्षाला असणारी गोडी यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम गोड ठरला आहे. गेल्या सहा ते सात दिवसांत स्थानिकसह निर्यातक्षम द्राक्षमालाचे दर पाच रुपयांपर्यंत कमी झाले असले तरी येत्या काही दिवसांत हे दर पुन्हा सुरळीत होतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत १ लाख १० हजार ५३१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. त्यापासून अंदाजे एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. अजून ३० टक्के द्राक्षमाल शिल्लक असून, दीड लाख मेट्रिक टनापर्यंत द्राक्षाची निर्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक असणारा महाराष्ट्र आणि राज्यातील एकूण उत्पादनाच्या ९१ टक्के उत्पन्न एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. पण, गेल्या काही वर्षांत अवकाळी पावसाचा कोप, व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे अनेक उत्पादकांनी नको ती द्राक्षशेती म्हणत बाग तोडले होते. मात्र, सन २०२४-२५ चा द्राक्ष हंगाम उत्पादकांसाठी लाभदायक ठरला असून, यावर्षी मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याचा परिणाम द्राक्ष उत्पादकांना दराबाबत दिलासा मिळाला आहे. निफाड, दिंडोरी, चांदवड, नाशिक या चार तालुक्यांत ५८४१८.२४ हेक्टर क्षेत्रात यावर्षी द्राक्ष लागवड होती. थॉमसन, सीडलेस, माणिक चमन, सुपर सोनाका, गणेश हे हिरवे वाण तर शरद सीडलेस, क्रीम्सन सीडलेस, फ्लेम सीडलेस, रेड ग्लोब, मेडिका हे रंगीत वाणाचे द्राक्षपीक जिल्ह्यात घेतले जाते. युरोपीय देशात नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, यूके तर नॉन युरोपियन देशात रशिया, युएई, कॅनडा, तुर्की, चीन या देशात द्राक्षनिर्यात होते. दरम्यान, द्राक्ष निर्यातदार पूर्वा चव्हाण यांनी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक उत्पादकांचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा धडा घेत फसवणूक होणार नाही, असा विश्वास निर्यातदारांमध्ये निर्माण झाला आहे.