पुणेकरांना आनंदाची बातमी! हा मेट्रो मार्ग होणार लवकरच सुरु…
Newsworldmarathi Pune : : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व जागा उपलब्ध झाल्या असून, आता या प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. यांना १०० टक्के जागा हस्तांतरित केल्या आहेत.
हा मेट्रो प्रकल्प २३.२०३ किलोमीटर लांबीचा असून, त्याची अंमलबजावणी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर करण्यात येत आहे. या प्रकल्पास ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शासनाने मान्यता दिली होती. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ परिसरातील राजभवन कार्यालयाजवळील २६३.७८ चौ.मी. जागा जीन्यासाठी आवश्यक होती. त्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राजभवन कार्यालयाने या जागेच्या हस्तांतरणास मंजुरी दिल्याने आता मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जागा उपलब्ध झाली आहे.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा
Newsworldmarathi Pune : बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ संघम् शरणम् गच्छामि .. च्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आयोजित या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते.
बिहार मधील बूद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे. मात्र त्याचा ताबा बौद्धेतर विशेषता ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे. या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला.
भदंत नागघोष महाथेरो, भंते राजरत्न, भंते बुद्धघोष थेरो, भंते धम्मधर थेरो.भंते पय्यारक्खित.भंते धम्मानंद, भंते यश, भंते प्रियदर्शी भंते सुमंगल, भंते राहुल आदी बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महामोर्चातलाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. बालगंधर्व चौकात बुद्ध वंदना करून मोर्चाची सुरूवात झाली. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसह शांतता संदेश देत हा मुक महामोर्चा मार्गस्थ झाला. भंते च्या हस्ते डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अलका चौकात सभा घेवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी निवेदन स्वीकारले.
मोर्चाला संबोधीत करताना भंते राजरत्न म्हणाले, इ. स. पूर्व 563 पासून तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने त्यांच्या काळात ऐतिहासिक बौद्ध विहाराची निर्मिती केली आहे. मात्र आज त्या विस्तीर्ण बौद्ध विहाराच्या परिसरात अतिक्रमण करण्यात आले असून इतर देवी देवतांच्या नावाने तेथील विहार रूपांतरीत करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी महाविहार आहे त्याच्या उजव्या बाजूस बौद्ध मूर्तीं सापडून देखील तिथे इतर देवी देवतांची मंदिर उभारली जात आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी म्हणून आज जागतिक स्थरावर भारताकडे आदराने पाहिले जात. अन् आज त्याच देशात महाबोधी महाविहार मुक्तीसाथी जगभरात आनंदोलन केली जात आहेत. लोकं रस्त्यावर उतरली आहेत. ही भारतसरकारसाठी निंदनीय बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील भंते राजरत्न यांनी केली.
भंते नागघोष म्हणाले, जगात बौद्ध धम्म बुद्धगया येथून प्रसारित झाला आहे, भारत देशाची ओळख जगात बुद्धभूमी अशी आहे. आपले पंतप्रधान, राष्ट्रपती अन्य देशांच्या प्रमुखांना बुद्ध मूर्ती देतात. सम्राट अशोकाणे बांधलेले बुद्ध विहार आपल्या ताब्यात नाही. बुद्धिस्ट टेंपल मॅनेजमेंट कामिटी मध्ये ९ पैकी ५ लोक हिंदू आहेत यामुळे तिथे हिंदूचे बहुमत आहे, त्या जोरावर तिथे कर्मकांड केले जाते. बुद्ध चरणी आलेल्या अनुयायांना मात्र कोणत्याही सुविधा मिळू शकत नाहीत, यामुळे जो पर्यंत १९४९ चा कायदा रद्द होणार नाही तो पर्यंत महाविहार मुक्त होणार नाही. बिहार पोलिस आणि शासन तिथे बसलेल्या उपोषण करत असलेल्या भंते आणि बौद्ध अनुयायांवर दडपशाही करत आहे. श्रीलंकेतून आलेले भंते अनागारिक यांनी १८९१ साली सुरू केलेला महायबिधी महाविहार मुक्तीचा लढा १३५ वर्षे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
धम्म पालन गाथेने या विराट मोर्चाची सांगता झाली.
Pune Rape Case : नराधम दत्ता गाडेचे पोलीस वेषातील फोटो आले समोर..
Newsworldmarathi Pune : पुण्यातील स्वारगटे बस स्थानकात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे बाबत दिवसागणिक नवीन माहिती समोर येत आहे. नराधम गाडे स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, आता नवी माहिती हाती लागली आहे. दत्तात्रय गाडे याचा पोलिसी गणवेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता गाडे याला गेल्यावर्षी स्वारगेट पोलीसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईलमधे आढळलेला हा फोटो आहे. आपण पोलीस आहे अशी बतावणी करुन पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो, असे सांगत अनेक तरुणींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा.
गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात फिरायचा. कधी पोलीस अधिकारी, कधी बस कंडक्टर असल्याचे भासवून त्यांनी अनेकांना लुटल्याची माहितीही समोर आली आहे.
धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, आम आदमी पार्टीच्याचे आक्रोश आंदोलन
Newsworldmarathi Pune : धंनजय मुंडे यांनी आजाराच्या कारणास्तव मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर आज बुधवार रोजी पुण्यात डॉ आंबेडकर पुतळा , जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ आम आदमी पार्टी तर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सत्तेच्या नादात सामान्य माणसाला या शासनाकडून काय अपेक्षित आहे हेच शासन विसरले आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या वाल्मीक कराड ने केलेली आहे तो वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडे जवळचा सहाय्यक , व्यवसायिक भागीदार असून आर्थिक खंडणी च्या कारणास्तव ही हत्या झालेली आहे. यातील आर्थिक व्यवहारचे आकडे भाजप च्याच आमदारांनी मांडलेले आहेत. म्हणूनच धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणात वाल्मिक कराड सोबत सह आरोपी करावे व त्या अनुषंगानेच इडी ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत गुन्हे नोंदवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या नीतीभ्रष्ट लोकांचे सरकार असून धनंजय मुंडे सह संजय राठोड, तानाजी सावंत, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, अजित पवार, राणे, जयकुमार गोरे अश्या सर्व कलंकित, भ्रष्ट प्रवृत्तीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. राज्यात मागील काही काळामध्ये महिला अत्याचारच्या अनेक घटना घडलेल्या असून या सर्व केसेस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या जाव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आंदोलनात आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, निखिल खंदारे, शिवाजी डोलारे, सुभाष करांडे, गजानन भोसले, संदेश दिवेकर, शीतल कांडेलकर, सचिन गरुड, कुमार धोंगडे, मनोज शेट्टी, मनोज एरंडकर, गुणाजी मोरे, अमित म्हस्के, उमेश बागडे, किरण कांबळे, नौशाद अन्सारी, प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, संजय कटारनवरे, इम्रान खान, मंगेश आंबेकर, विकास चव्हाण, सोमनाथ भगत, शंकर थोरात, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, अभिजीत बागडे, निलेश वांजळे, अली सय्यद व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
– मीडिया टीम, आम आदमी पार्टी
पिढी समृद्ध होण्यासाठी स्वतःची अध्यापन पद्धती समृद्ध करावी : शामराव कराळे
Newsworldmarathi Pune : साने गुरूजींचे बालपण पालगडला गेले, सहा वर्षे त्यांनी प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सेवा केली.याच दरम्यान त्यांना गुरुजी ही आदराची पदवी लोकांनी दिली. अध्यापनासाठी साने गुरुजींची स्वतःची अशी एक पद्धत होती. म्हणून ते समाजासाठी आदर्श शिक्षक म्हणून गणले गेले.त्यांच्याप्रमाणेच सर्व शिक्षकांनी स्वतःची पद्धती विकसित करुन भावी पिढी समृद्ध करावी असे प्रतिपादन साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामराव कराळे यांनी केले.कै. चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक विद्यालय, वडगाव बु पुणे येथे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० या टप्प्यातील समारोप प्रसंगी ते बोलत होते.
इ २री,४ थी व ६ वी इयत्तेतील तिसऱ्या टप्प्यातील हे प्रशिक्षण होते.सदर प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम आराखडा,मूल्यांकन तसेच समग्र प्रगती पुस्तक याबाबत चर्चा झाली.यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विकास दांगट,चिरंजीव दांगट, मंजू मते,मधुरिमा देशमुख,सारंग पाटील, सोपान बंदावणे उपस्थित होते.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अविनाश महाजन,आर एन देशपांडे,सत्यवती कांबळे,व्ही डी महाजन,प्रिती जोशी, महेश माळी , बसवराज कांबळे, नितीन जोगदंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान बंदावणे यांनी केले, वैशाली रणधीर व अनिता स्वामी यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन श्रीनिवास शिंदे यांनी तर आभार दिपक अंदुरे यांनी मानले.
दत्तात्रय भरणे होणार वाशिमचे पालकमंत्री
Newsworldmarathi Mumbai : हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडल्याने वाशिम जिल्ह्याला आता नवीन पालकमंत्री मिळेल. क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ २६ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेले नाहीत. यामुळे ते जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडणार असल्याची चर्चा होती.
मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांनी सोडले पालकमंत्रीपद…
Newsworldmarathi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. वाशिमचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आली होती, मात्र आता त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद सोडल्याची बातमी समोर आली आहे.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूरशी संबधित आहेत. वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी वक्तव्यही केल्याने चर्चेत होते. पण आता त्यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यावरून महायुतीतील पक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरू आहे. मात्र असे असतानाच हसन मुश्रीफांनी हा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
पुनित बालन ग्रुप आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे उद्घाटन
Newsworldmarathi Pune : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत रंगारी रॉयल्स्, तुळशीबाग टस्कर्स, सुर्योदय रायझर्स आणि रमणबाग फायटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.
सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पोलिस उपायुक्त (झोन १ चे) संदीपसिंग गिल आणि पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री. पुनितदादा बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे संजीव जावळे, तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडीत यांच्यासह पुण्यातील गणपती उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुण्यातील गणेशोत्सवामध्ये किंवा नवरात्रोत्सवामध्ये मंडळामध्ये झोकून देऊन काम करणार्या अध्यक्ष, पदाधिकार्यांपासून कार्यकर्त्यांना एकमेकांशी निवांत बोलण्यासाठी दोन मिनिटेसुद्धा नसतात. त्यांच्या अथक परिश्रमातून पुण्यातील उत्सव निर्विघ्नपणे पार पडत असतात. अशा या माझ्या मित्रांसाठी या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेव्दारे या सर्व लोकांनी एकत्र येवून मैत्रीचे दोन क्षण अनुभवावे, हा आमचा मुख्य हेतू आहे. स्पर्धेत अधिक संघांना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी गतवर्षी झाली होती. त्यामुळे स्पर्धेच्या चौथ्या वर्षी आम्ही ८ नवीन संघांना स्पर्धेत सहभागी केले आहे. विविध मंडळे आणि ढोल-ताशा पथकांमध्ये महिला आणि मुलींचा सहभाग असतो. त्यामुळे पुढील वर्षी महिलांचीसुद्धा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला निश्चितच आनंद होईल, असे पुनितदादा बालन यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संदीपसिंग गील म्हणाले की, श्री. पुनितदादा बालन यांच्या तर्फे आयोजित ही ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसुन एक क्रिकेट महोत्सवच आहे. या महोत्सवामध्ये पुण्यातील विविध गणेश मंडळ, नवरात्र मंडळ तसेच ढोल-ताशा पथक अशा सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक एकत्र येत आहेत आणि मैत्रीचे नवे नाते निर्माण करत आहेत. या वेगवेगळ्या मंडळांच्या कार्यकर्ते आणि सभासदांच्यावतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. अशाप्रकारे आपले सामाजिक कर्तव्य पार पाडून नागरिकांचे जीवन समृद्ध करत आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.
अभिजीत वाडेकर यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर तुळशीबाग टस्कर्स संघाने कसबा सुपरकिंग्ज् संघाचा ७ गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. विशाल मुधोळकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर रंगारी रॉयल्स् संघाने एचएमटी टायगर्स संघाचा ४८ धावांनी सहज पराभव केला. मयुर साखरे याने केलेल्या नाबाद पन्नास धावांच्या खेळीमुळे सुर्योदय रायझर्स संघाने गुरूजी तालिम टायटन्स् संघाचा ८ गडी राखून पराभव केला. सत्यजीत पाले याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रमणबाग फायटर्स संघाने नुमवी स्टॅलियन्स् संघाचा ४५ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
कसबा सुपरकिंग्ज्ः ८ षटकात २ गडी बाद ६६ धावा (नचिकेत देशपांडे ५१ (२७, ६ चौकार, २ षटकार), भुषण ढेरे १०, उमेश तांबडे १-८) पराभूत वि. तुळशीबाग टस्कर्सः ५.२ षटकात ३ गडी बाद ६७ धावा (अभिजीत वाडेकर २६, अमित सावळे नाबाद १६, नितीन पंडीत नाबाद १२, सचिन पै १-७); सामनावीरः अभिजीत वाडेकर;
रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात ६ गडी बाद १२६ धावा (विशाल मुधोळकर ५४ (१५, ३ चौकार, ६ षटकार), निलेश एस. ३१, समीर भट २०, अजिंक्य मारटकर २-२६) वि.वि. एचएमटी टायगर्सः ८ षटकात ९ गडी बाद ७८ धावा (अर्थव ए. ३४, रूग्वेद शिंदे २३, विशाल मुधोळकर ४-२०, निलेश एस. ३-१०); सामनावीरः विशाल मुधोळकर;
गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात ४ गडी बाद ८६ धावा (भावेश एस. २९, रोहन शेडगे २९, गंगाधर कांगणे २-११) पराभूत वि. सुर्योदय रायझर्सः ५.२ षटकात २ गडी बाद ८७ धावा (मयुर साखरे नाबाद ५० (१३, १ चौकार, ७ षटकार), वैभव अव्हाळे नाबाद २५, सुशील फाले १-२८); सामनावीरः मयुर साखरे;
रमणबाग फायटर्सः ८ षटकात ६ गडी बाद १०० धावा (समीर पंचपोर ३४, प्रज्योत शिरोडकर १७, सत्यजीत पाले १६, प्रणव लोखंडे २-९) वि.वि. नुमवी स्टॅलियन्स्ः ५.४ षटकात १० गडी बाद ५५ धावा (सोमा खांडेकर २३, ओम भिसे १८, सत्यजीत पाले ५-१७, प्रज्योत शिरोडकर १-३); सामनावीरः सत्यजीत पाले;
स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका पुन्हा लांबाणीवर?
Newsworldmarathi Delhi : बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर आज सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी पार पाडली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरु आहे. मुंबई, पुण्यासह अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ३ ते ४ वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निवडणुकांकडे लागले आहे.
लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरु होतील, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहे.
अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला…
Newsworldmarathi Mumbai : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहे. धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मुंडेचे पीए प्रशांत जोशी हे सातपुडा निवास्थानाच्या बाहेर पडून मुख्यंमत्र्यांच्या सागर बंगल्याकडे रवाना झाले. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहून घेतला असल्याची माहिती समोर आली होती. अखेर आज त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. कालच राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमानशी बोलताना दिली होती.

