विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी बौद्धिक परिस्थिती मात्र गरीब नसते. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना या अभ्यासिका व ग्रंथालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या वाटेवर अभ्यासिका व ग्रंथालयाच्या माध्यमातून एक दिवा लावण्याची संधी आम्हाला मिळाली. यातूनच देशाची आणि समाजाची अधिक चांगली सेवा करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास आहे.पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)
पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय
Newsworldmarathi Pune: ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरात सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना हक्काची अभ्यासिका व ग्रंथालय उपलब्ध होणार आहे.
शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्रात ‘पुनीत बालन ग्रुप’चे कार्य हे उल्लेखनीय असे आहे. त्यांच्या या कामाचे क्षेत्र केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही तर या कामाचा विस्तार काश्मिरपर्यंत झालेला बघायला मिळतो. पुणे हे तर राज्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. परंतु अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिका व ग्रंथालयाचे भरमसाठ शुल्क भरणे शक्य होत नाही.
या विद्यार्थ्यांनाही चांगले शिकून मोठे होण्याचे स्वप्न साकार करता यावे या दृष्टीने ‘पुनीत बालन ग्रुप’ने पुढाकार घेतला आणि पुण्यात अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसरात ७ हजार ५०० चौ. फुट इतकी प्रशस्त अशी दुमजली अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून या बांधकामाचे भूमिपूजन श्री. पुनीत दादा बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट शिरीष केंभावी, श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव बहिरट-पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त संजय सातपुते आणि वृद्धेश्वर चौपाटीचे लाला गायकवाड उपस्थित होते.
श्री साई मित्र मंडळात यंदा ‘महिलाराज’; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निर्णय
Newsworldmarathi Pune: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. एकीकडे गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र सरकारने राज्यउत्सव म्हणून मान्यता द्यायचा निर्णय घेतला असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या साई मित्र मंडळाने यंदाच्यावर्षी मंडळाचा सर्व कारभाराची दोरी महिलांच्या हातात देण्याचा औचित्यपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून यंदा महिलांच्या हाती कारभार देत मंडळ वेरुळ येथील कैलास मंदीर साकारणार आहे. या देखाव्याच्या कामाचे कळसपूजन चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी केंद्रीय मोहोळ यांनी ही घोषणा केली.
कोथरूड परिसरातील केंद्रीय मंत्री मोहोळ संस्थापक असलेले श्री साई मित्र मंडळ हे भव्य व देखण्या प्रतिकृती गणेशोत्सवात सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्यावर्षी ३० वा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, अशीच भव्य, आकर्षक आणि कलात्मक प्रतिकृती सादर करताना मंडळाची धुरा महिलांच्या हातात त्यांनी दिली आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्व संयोजन महिलाभगिनी करणार आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून पुरूष कार्यकर्ते काम करणार आहेत.
भारतीय शिल्पकारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पाषाणात कैलास लेणीची केलेली निर्मिती हे जगभरासाठी आश्चर्य ठरले आहे. ही लेणी बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दरवर्षी वेरूळला भेट देतात. या कैलास लेणी संकुलातील ‘कैलास मंदिराची’ प्रतिकृती मंडळाच्यावतीने यंदा करण्यात येणार आहे. या सजावटीच्या कामाच्या कळस पूजनाचा शुभारंभ यावेळी प्रसिद्ध मूर्ती आणि मंदिर अभ्यासक गणेश धालपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्यावर्षी आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती मंडळाने केली होती.
याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘गणेश मंडळांचा मुख्य कारभार पुरूष मंडळींच्याच हातात असतो. मंडळातील महिला भगिनी काम करतातच, मात्र त्यांना खुले व्यासपीठ मिळत नाही. मात्र हे चित्र बदलायचे असून यंदाचे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्षे आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने आमच्या मंडळातील महिला भगिनी अनोखी आदरांजली वाहतील. अहिल्यादेवींच्या चरित्रापासून महिला वर्गाल स्फूर्ती मिळावी आणि त्यांचा सार्वजनिक कामातील माताभिगीनींचा आत्मविश्वास, सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सर्वांनी ही निर्णय घेतला आहे’
चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक : नितीनभाई देसाई
Newsworldmarathi Pune: समाजाच्या सर्व स्तरांमध्ये फार गतीने बदल घडून येत आहेत. त्या बदलांच्या अनुषंगाने नवीन समस्यांना सामोरे जावे लागत असून नवीन संधी देखील निर्माण होत आहेत. त्या समस्यांवर तोडगा काढून संधींचा फायदा घेण्यासाठी चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे प्रेसिडेंट आणि प्रसिध्द उद्योजक नितीनभाई देसाई यांनी व्यक्त केले. दी पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज नितीनभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन राजेशभाई शहा, व्हाईस चेअरमन जनकभाई शहा, विश्वस्त मोहनभाई गुजराथी, विश्वस्त जितेंद्रभाई मेहता, विश्वस्त किरीटभाई शहा, सचिव हेमंतभाई मणियार, सहसचिव विनोदभाई देडीया, सहसचिव संदीपभाई शहा, खजिनदार महेशभाई धारोड, सहसचिव दिलीपभाई जागड आणि सहसचिव प्रमोदभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन देसाई म्हणाले की, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाची दरी दिवसागणिक वाढत असून ती दरी कमी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक संवादसेतू उभा राहिला पाहिजे. पारंपारिक शिक्षणाचे बोट न सोडता आधुनिकतेची कास धरत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांशी वैयक्तिक नाते दृढ करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि क्षमता ओळखून अनुबंध निर्माण करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर दिला पाहिजे. संस्थेच्या नावात असलेल्या केळवणी या शब्दाचा अर्थ शिक्षण अधिक संवाद असा होतो. विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव किंवा ताण निर्माण न होऊ देता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देता आला पाहिजे.
यावेळी बोलताना श्री पूना गुजराथी केळवणी मंडळाचे विश्वस्त मोहन गुजराथी म्हणाले की, संस्थेची शताब्दी हा केवळ एक टप्पा असून आगामी शतकाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आपले हे पहिले पाऊल आहे. या टप्प्यावर भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने चिंतन आणि सिंहावलोकन होणे आवश्यक आहे. गेल्या शंभर वर्षात संस्थेने केलेल्या कार्याच्या आढावा घेत शंभर वर्ष पूर्ण केलेल्या इतर शिक्षण संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथे राबविण्यात येणाऱ्या आधुनिक उपक्रमांची अंमलबजावणी आपल्या संस्थेत करणे आवश्यक आहे. केवळ अर्थार्जनापुरती सक्षम पिढी न घडवता जगण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारे शिक्षण तसेच जीवनदायी शिक्षण देणे आवश्यक आहे. उद्याचा जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी कार्यरत राहिले पाहिजे. संस्थेने भविष्याचा विचार करता एक थिंक टँक समुह निर्माण करून त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
यावेळी एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र गुरव, दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सहसचिव प्रमोदभाई शहा, दी पूना गुजराथी केळवणी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता भिडे आणि अर्चना धारू आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा यांनी केले. सूत्रसंचालन अनुजा सेलोत यांनी केले. जनक शहा यांनी आभार मानले.
वीर जिवाजी महाले यांचे कार्य समाजाला आदर्श प्रेरणास्रोत : गणेश बिडकर
Newsworldmarthi Pune: प्रतापगडावरील रणसंग्रामाच्या वेळी छत्रपती शिवरायांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आपले अनमोल योगदान देणारे शूरवीर जिवाजी महाले यांचे कार्य सर्व समाजाला आदर्श प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन पुढे मनपाचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केले.
बारा बलुतेदार समाज विकास संघ आणि सकल नाभिक समाज यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. रास्ता पेठ येथील वीर शिवाजी महाले स्मारकाचे रंगकाम आणि प्रकाश योजनेचे काम लोकार्पण करण्याचा कार्यक्रम गणेश बिडकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत पूजन करीत तसेच नारळ वाढवत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारा बलुतेदार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी होते. यावेळी व्यासपीठावर माथेरानचे नगरसेवक आकाश चौधरी,सौ अनिता गणेश वाळुंजकर, प्रदेश सचिव राजेंद्र पंडित,प्रभारी शहराध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष उदय दैठणकर विनायक लांबे, प्रमुख व समान वेळेत हेमंत श्रीखंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान गणेश बिडकर व रामदास सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती व शाल,गुलाबपुष्प देऊन संपन्न झाला.
याप्रसंगी रामदास सूर्यवंशी यांनी वीर जिवाजी महाले,वीर भाई कोतवाल आणि वीर शिवाजी काशीद यांच्या स्मारकासाठी पुणे मनपातर्फे भरीव निधी देण्याची मागणी केली. तसेच भोर येथील कारी येथे होणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली. प्रतापगडावर होणाऱ्या स्मारकामध्ये वीर जिवाजी महाले यांचे स्वतंत्र दालन उभे करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उदय दैठणकर यांनी नाभिक व बारा बलुतेदार समाजाला आगामी निवडणुकीत संधी भाजपासह सर्व राजकीय पक्षांनी दिली पाहिजे कारण या समाजांतील कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहात आणल्याशिवाय त्या त्या समाजाचा विकास करताना त्यांचा सहभाग त्यामध्ये असेल व त्यातून सर्वांगीण विकास साधला जाईल असे ते शेवटी म्हणाले.
पुणे मनपा विद्युत विभागाचे सुनील कांबळे यांचाही प्रकाश योजना सुरु केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय दैठणकर,हेमंत श्रीखंडे,राजेंद्र पंडित,सुनील शिंदे,परशुराम काशीद,विनायक गायकवाड,प्रशांत गायकवाड,सुजीत मगर,रवींद्र मावडीकर,राजू माटे,विनोद माटे,सुजीत पुजारी, प्रशांत वाणी,उदय तुपे, संदीप दळवी,सोहंम सूर्यवंशी,अमोल थोरात, किशोर पवार,बबनराव काशीद,बाळासाहेब भामरे,वसंत गाडेकर,गोविंद वाघमारे, अशोक चटपल्ली, तुकाराम दैठणकर,गणेश दैठणकर,रवींद्र राऊत,राजेश आढाव,निलेश चटपल्ली, हनुमंत यादव, सूर्यकांत भोसले,लियाकत महाजन,गणेश आहेर,रवींद्र ननावरे,चारुदत शिंदे,मेजर सईद अन्सारी, रमेश पायगुडे,अनिल जाधव,संजय पाचेरकर,दत्ताभाऊ पाकिरे,महेंद्र गायकवाड,बालाजी तिरमकदार,जितेंद्र जाधव,सुरेंद्र तावरे, रोहित यवतकर,नाना आढाव,आदित्य दैठणकर,अपेक्षा राऊत,विवेक नायडू,ओंकार जोशी,भाऊ पवार,नागेश कोकाटे, नितीन दैठणकर,राहुल आढाव,संदीप जांभळे,वसंत ढवळे, नेताजी काशीद,प्रवीण दैठणकर,श्याम काशीद,सौ.नीता दैठणकर,राजकुमार राव, नुरायन सलमानी,सौ.रोहिणी दैठणकर,सुरेश गायकवाड सौ.नीलम दैठणकर,दिलीप गवते,सौ. झेंडे,निलेश चातुर,सौ.रेश्मा दैठणकर,दिलीप शाह, सुरेश नाईक,सौ.केतकी दैठणकर,सचिन दळवी, प्रकाश राणे यांच्यासह अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले.यावेळी महिलांनी सुरवातीला औक्षण केले. महिलांची उपस्थिती मोठी होती.
कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय सुनील शिंदे अन त्यांचे स्वागत उदय दैठणकर,अध्यक्षीय मनोगत रामदास सूर्यवंशी व सुंदर सूत्रसंचालन रवींद्र राऊत तर आभार हेमंत श्रीखंडे यांनी मानले.
वाहतूक कोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन त्रिसूत्रीवर काम करा : चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
Newsworldmarathi Pune: वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा, अशी सूचना ही त्यांनी आजच्या बैठकीत केली.
कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे ना. पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आज ना. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारावाईचा आढवा ना. पाटील यांनी घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली असा, सवाल ना. पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वास्त करण्यात आले. यासोबतच वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा ना. पाटील यांनी केली. त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
या बैठकीत सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर ना. पाटील यांनी वाहतूक विभागाने कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करु असे आश्वस्त केले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार एआय बेस चलान प्रणालीचाही अवलंब करावा, असेही सूचित केले. वाहतूककोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांना दिली.
दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार असून, विभागाने मागील बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांच्या निर्देशामुळे राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना दिलासा
Newsworldmarathi Pune: राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी काही बॅंका अडचणीत आहेत किंवा बंद आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेकडून होणार वित्त पुरवठा बंद झाला आहे. कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत असून यात लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली होती. त्यानुसार राज्य सहकारी बँकेने थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कार्यवाहीलाही सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील हजारो सेवा सोसायट्यांना आधार मिळणार आहे.
आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या किंवा बंद पडलेल्या काही जिल्हा बँकामधून विविध कार्यकारी सोसायट्यांना वित्त पुरवठा होत नव्हता. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांना हंगामासाठी कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळे हंगामासाठी पैसे हवे असतील तर इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत असल्याची बाब शेतकऱ्यांनी आणि संस्थांनी निदर्शनास आणून दिली होती.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सहकारी बँकने या विषयात लक्ष घालावे अशी सूचना बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना केली होती. आता या नियमांतील बदलामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांनाही काही निकष पाळून वित्त पुरवठ्याबाबत राज्य सहकरी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ज्या विविध कार्यकारी सोसायट्या गेली तीन वर्षे नफ्यात आहेत, ज्यांचा एनपीए १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, अशा सोसायट्यांना थेट वित्त पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. राज्यात एकूण २१ हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमार्फत खरीप आणि रब्बी हंगामासाठी वित्त पुरवठा करण्यात येतो.
सोसायटी सक्षम तर गावही सक्षम : केंद्रीय मंत्री मोहोळ
गावचे अर्थकारण मजबूत ठेवण्यात गावातील सेवा सहकारी संस्था अर्थात सोसायट्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच या सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय ज्या जिल्हा बँका अडचणीत आहेत, त्या बॅंकांच्या कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी सोसायट्यांना शिखर बॅंकेतून थेट कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गावची सोसायटी सक्षम असेल तर गावचे अर्थकारणही सक्षम असते, म्हणूनच सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत
Newsworldmarathi Pune: गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत न करण्याचा निर्णय घेऊन विधायक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचा ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’ पुणे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन दरवर्षी गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करत असतात. याशिवाय ढोल ताशा पथकांनाही त्यांचे मोठे सहकार्य असते. गणेशोत्सवात प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यात असल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच डिजे मुळे अनेकांना शारीरिक इजा झाल्याचेही प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर बालन यांनी यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचा संकल्प केला असून डीजे लावणाऱ्या गणेश मंडळाना जाहिरात प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. बालन यांनी घेतलेल्या या विधायक भूमिकेचे ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’ यांनीही स्वागत केले असून याबाबत त्यांनी पुनीत बालन यांचा सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे ओंकार आढाव, औदुंबर शिंदे, हेमंत माने, सुवन गवळी, बाळासाहेब आढाव हे पदाधिकारी उपस्थित होते.
‘‘पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे. या परंपरेला कुठंही गालबोट लागू नये उलट ती पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवरच आहे. त्याचाच भाग म्हणून डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे मंडळांकडूनही सहकार्य मिळत असल्याने हा गणेशोत्सव अधिक उंचीवर घेऊन जाण्यास मोठी मदत होणार आहे.’’पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप
नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेंना यांच्या कार्यालयात स्वाभिमानी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन
Newsworldmarathi Pune: राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्या उद्धट वर्तनाविरुद्ध स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने बिनवडेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीप्रक्रियेत येणाऱ्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे होणारा नाहक त्रास व इतर मागण्यांकरिता स्वाभिमानी ब्रिगेडचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील व शिष्टमंडळ हे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांना भेटण्यासाठी गेले असता बिनवडे यांनी उद्धटपणे व अपमानास्पद वागणूक स्वाभिमानी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिली. “ऑफिसच्या बाहेर निघा, मला शिकवू नका, काय करायचं ते मला समजतं” अशी अरेरावीची आणि उर्मटपणाची भाषा बिनवडेंनी वापरल्याचा आरोप सुरवसे पाटील यांनी केला आहे.
नोंदणीप्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या अडचणी, सर्व्हर डाऊन, नोंदणी महानिरीक्षकांची भेटीची वेळ मिळवण्यात होणाऱ्या त्रासाबाबत चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने अक्षरशः अपमानित करून हाकलल्याचे घटनेने खळबळ उडाली आहे.
बिनवडेंच्या या कार्यपद्धतीविरोधात स्वाभिमानी ब्रिगेडकडून जोरदार घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी ॲड.कृष्णा साठे, ॲड.सुधीर शिंदे, सचिन मोरे, तेजस गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, देवेंद्र खाटेर, सोनू आंधळे, आदित्य शेटे, आकाश नवले, सागर घाडगे, यश मोरे, बाबा मिसाळ हे उपस्थित होते.
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, नोंदणी महानिरीक्षकांचे कार्यालय हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे की विशेष लोकांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जर अशा प्रकारची वागणूक बिनवडे यांच्यासारखा अधिकारी देत असेल तर सामान्य माणूस आपले प्रश्न घेऊन गेल्यास काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. आम्ही सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन भेटण्यासाठी गेलो असता, बिनवडे यांनी आम्हाला अक्षरशः हाकलून लावले. आवाज चढवत ऑफिसमधून बाहेर व्हा असे उद्धटपणे बोलले. म्हणून आज आम्ही ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदवला आहे. लोकांची कामे करता येत नसतील तर अशा अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा.
लवकरच आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रविंद्र बिनवडे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहोत; असेही सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे.
न्यू अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरणातील बाळासाहेब मांडेकरसह तिघांना यवत पोलिसांकडून अटक
Newsworldmarathi Pune: दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्र येथे झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात मुख्य आरोपी बाळासाहेब मांडेकरसह इतर तीन आरोपींना यवत पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुण्यातून ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.
ही धक्कादायक घटना २१ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली होती. या गोळीबारामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. बाळासाहेब मांडेकर हा एका आमदाराचा भाऊ असल्याने, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन ते दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात होते. मात्र ही घटना प्रसारमाध्यमांमधून समोर आल्यानंतर यवत पोलीस सतर्क झाले आणि कारवाईस गती दिली.
या प्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि शेवटी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात यश मिळवले.
सध्या अटक केलेल्या आरोपींना अधिक तपासासाठी यवत पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशी सुरू असून, उर्वरित आरोपी आणि गोळीबारामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई अधिक तपशीलवारपणे करण्यात येत आहे.
पुण्यात अमानुष घटनेनं खळबळ; गर्भवती पत्नीला मारहाण केल्याने गर्भपात
Newsworldmarathi Pune: पुण्यातील एरंडवणे परिसरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रवी (वय 35 वर्षे) या व्यक्तीने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला इतकी अमानुष मारहाण केली की तिचा गर्भपात झाला. या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी हा पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. तो तिला मानसिक आणि शारीरिक छळ देत होता. सततच्या त्रासामुळे पीडित महिला आधीच धास्तावलेली होती.
ही अमानुष घटना 20 जुलै रोजी रात्री सुमारे साडेअकरा वाजता घडली. रवीने त्या रात्री पुन्हा एकदा पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने तिच्या पोटावर जोरात लाथ मारली. त्यानंतर तिचे केस धरून फरफटत नेले आणि जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीमुळे पीडितेचा गर्भपात झाला, असे डॉक्टरांच्या तपासणीत निष्पन्न झाले.
या अमानवी कृत्यामुळे आरोपीवर महिला अत्याचार, मारहाण, गर्भपात घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

