शेतीसाठी मॉलही येणार! प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारण्यात येणार आहेत, अशी मोठी घोषणा कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. हे मॉल सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारले जाणार आहेत. दक्षिण सोलापूरच्या धर्तीवर ‘कृषी मॉल’ – शेतकऱ्यांसाठी नवा बाजारपेठ पर्याय कृषिमंत्री म्हणाले की, “सोलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या कृषी भवन व बाजार मॉलच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यांतही कृषी मॉल उभारले जातील. येथे शेतकरी त्यांचा माल विकू शकतील आणि शेतीसाठी लागणारे साहित्य, बियाणे, खते, औषधे आदी खरेदीही करू शकतील.” या मॉलमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार, तसेच त्यांना नवीन बाजारपेठ मिळणार, आणि ग्राहकांनाही थेट शेतमाल माफक दरात उपलब्ध होणार आहे. ‘एक गाव, एक पीक’ संकल्पनेवर विचार कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले की, ‘एक गाव – एक पीक’ ही संकल्पना विकसित करण्यासाठीही विचार सुरू आहे, जेणेकरून विविध भागांतील कृषी उत्पादनांचे प्रमाण, गुणवत्ता आणि ब्रँडिंग सुधारू शकेल. सांगलीच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयासाठी तात्काळ निधी वितरीत करा – मंत्री कोकाटे या बैठकीत कृषिमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठ येथील कामांबाबतही आदेश दिले. “या महाविद्यालयाचे काम तात्काळ सुरू करा. निधी वितरणात कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नका,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

“अजित पवार चोरांचा सरदार, उघडं नागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही!” लक्ष्मण हाकेंचा संतप्त घणाघात

Newsworldmarathi Mumbai : Laxman Hake slams Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत लक्ष्मण हाके यांनी त्यांना “चोरांचा आणि कारखानदारांचा सरदार” ठरवले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. हाकेंचा घणाघात : “अजित पवार म्हणजे लुटारूंचे सरदार!” लक्ष्मण हाके म्हणाले की, “अजित पवार हे चोरांचे, कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत. मी त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही.” त्यांनी भाजपवरही टीका केली आणि प्रश्न उपस्थित केला की, “भाजपने आधी अजित पवारांना, आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना का सोबत घेत आहे त्यांना बाहेरच ठेवायला हवं.” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे. माझ्याकडे गाडीसाठी चालक असताना अनेकांनी त्याला मदत केली, माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा. मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही, माझा कुठं कारखाना नाही किंवा रोहित पवार सारखी बारामती ऍग्रो नाही. अजितदादा पवार यांच्याबदल मंत्रिमंडळात नाराजी आहे. माझं भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणं आहे. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली. हा काय न्याय आहे? त्यांना बाहेर थांबू द्या, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटले. मिटकरींचा पलटवार : “हाके म्हणजे बारा छिद्राचा पाना!” अमोल मिटकरी यांनी हाकेंवर जोरदार टीका करत म्हटलं की, “हाके हा बारा छिद्राचा पाना आहे. त्याला ओबीसी नेतेपद मनोज जरांगे यांच्यावर टीका करून मिळालं आहे.” तसेच त्यांनी प्रश्न विचारला की, “हाकेच्या गाडीचा खर्च, फॉर्च्युनर घेण्याचे पैसे कुठून आले? राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यपद कुठून मिळाले?” त्यावर ते म्हणाले, “हाकेचा मालक दुसराच आहे, त्याने टाकलेल्या तुकड्यामुळेच तो पवार कुटुंबावर भुंकतोय.” संतप्त राजकारणात ओबीसी प्रश्न गमावतोय का? राज्याच्या राजकारणात ओबीसी समाजाचे नेतृत्व, प्रतिनिधित्व आणि त्याचे राजकीय भांडवल या पार्श्वभूमीवर हाके-मिटकरी वाद अधिकच तापला आहे. हाके यांनी मिटकरींच्या गावात जाण्याची धमकी दिली असून वाद विकोपाला जात असल्याची चिन्हं आहेत.

लाडक्या बहिणींना दिलासा…! मे महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार; आदिती तटकरे यांची माहिती

Newsworldmarathi Mumbai: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अजूनही खात्यावर जमा न झाल्याने राज्यातील महिलांमध्ये नाराजी दिसून येत होती. मात्र, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मोठी घोषणा करत महिलांना दिलासा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, ४ जूनपासून मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून, ५ जूनपासून रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा होईल. निवडणूकपूर्व गती, निवडणूकनंतरची प्रतीक्षा योजनेच्या सुरुवातीपासून दरमहा १५०० रुपये मिळणाऱ्या महिला लाभार्थींना एप्रिल महिन्याचा हप्ता ७ मे रोजी मिळाला होता. मात्र त्यानंतर मे महिन्याची रक्कम मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. आता सरकारने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करत ही अनिश्चितता दूर केली आहे. आदिती तटकरे यांचा विश्वासदायक संदेश योजनेविषयी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यापुढेही दमदारपणे सुरू राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे.” त्यांनी हे आशयाचे ट्वीटही सोशल मीडियावर शेअर केलं आहे. योजनेचा थोडक्यात आढावा योजना सुरूवात: मार्च २०२३ दरमहा रक्कम: 1500 एकूण मिळालेली रक्कम: ₹16,500 (११ हप्ते) एप्रिल हप्ता जमा: ७ मे मे हप्ता जमा: ५ जूनपासून काहीवेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या सुसंगततेसाठी आधार लिंक खातं असणे अनिवार्य आहे. राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत तात्पुरता विलंब झाला असला, तरी सरकारचा पाठिंबा कायम आहे, आणि हप्ता नियमितपणे मिळत राहील, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

खासदारकीच्या वर्षपूर्तीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पुणेकरांशी भावनिक संवाद, म्हणाले, माझ्या पुणेकर सुहृदांनो…

0
Newsworldmarathi Pune : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या खासदारकीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले. याबाबत त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या पुणेकर सुहृदांनो, आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार ! खासदारकीचे प्रथम वर्ष आज पूर्ण करीत असताना माझ्या मनात भावनांची गर्दी आहे. दिलेले तुमचे प्रत्येक मत माझ्यावरील विश्वासाची आणि प्रेमाची पावती होती, अशी माझी विनम्र भावना आहे. या क्षणी आपल्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून देतो आहे. पुणेकरांचे प्रेम आणि विश्वास गेली पंचवीस वर्षे मी सातत्याने अनुभवतो आहे. तुमच्या आशीर्वादांच्या बळावरच नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद आणि आता खासदार हा माझा प्रवास निर्वेध झाला. तुमच्या पाठबळाशिवाय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला हे सारे लाभणे अशक्य होते, याची नम्र जाणीव माझ्या काळजात सदैव आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो, की मी अशा विशाल संघ परिवारात आहे, जेथे राष्ट्रभक्तीचा संस्कार रोज केला जातो आणि हा यज्ञ गेली १०० वर्षे अखंड सुरू आहे. त्यातून कोट्यवधींच्या जीवनाला दिशा लाभली. कोट्यवधींच्या मनात समर्पणाचा संस्कार रुजला. मी अशा पक्षात आहे, जेथे कार्यकर्त्याला संधी मिळते, कार्यकर्ता घडविला जातो. संघ स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री हा माझा प्रवास संघसंस्कार आणि भारतीय जनता पार्टीतील शिदोरीवर घडला आहे, याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मागे वळून पाहताना माझ्या डोळ्यांसमोर तीस वर्षांचा पट उभा राहतो. सामान्य बूथ कार्यकर्त्यापासून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. बूथप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, पुणे शहर संघटन सरचिटणीस, प्रदेश सरचिटणीस अशा असंख्य जबाबदाऱ्या येत गेल्या आणि मी त्या निभावत गेलो. राजकीय क्षेत्रातील वाटचाल अनेक चढ-उतार घेऊन चालावी लागते. अनेकदा निराशा येते. अशा वेळी याच पक्षातील नेतृत्वाने पाठीवर प्रेमाचा हात फिरविला. मनामध्ये पुन्हा नवा आशावाद पेरला. त्यातूनच आज मी येथपर्यंत पोचलो आहे, हा माझा ठाम विश्वास आहे. माझ्या आयुष्यात मला पक्षात नेत्यांच्या रूपात पालकच लाभले. त्यांनी माझे बोट धरून राजकीय बाराखडी माझ्याकडून गिरवून घेतली. माझ्यातील नेतृत्वगुण विकसित होतील, यादृष्टीने सतत वाव दिला. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी माझ्यातील कार्यकर्त्याचा नेता बनण्याच्या प्रक्रियेला आकार दिला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नितीनजी गडकरी, स्वर्गीय गिरीशजी बापट, अनिलराव शिरोळे, रावसाहेब पाटील दानवे, चंद्रकांत(दादा) पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या व अशा अनेक नेत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. मार्ग अधिकाधिक सुकर करीत नेला. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदरणीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमितभाई शहा यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळण्याइतपत मजल मारू शकलो. आदरणीय मोदीजी आणि अमित शहाजी यांच्यासोबत काम करतानाही आंतरिक जिव्हाळा आणि कार्यकर्ता परिपूर्ण होण्यासाठीचा त्यांचा दृष्टिकोन मी सतत अनुभवतो आहे. खासदारकीचे वर्ष पूर्ण होत असताना माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे माझे सर्व सहकारी, पक्षातील मित्र, माझ्यासाठी निरपेक्ष भावनेने काम करणारे सर्व सवंगडी यांचा उल्लेख करावाच लागेल. त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. राजकीय जीवनात सर्वाधिक ताण येतो तो कुटुंबातील सदस्यांवर. गेल्या वर्षभरात मी त्यांच्या वाट्याला काही तासच आलो असेन, परंतु त्यांनी मला समजून घेतले. माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद, माझी पत्नी मोनिका, कन्या, बंधू, कुटुंबातील अन्य सदस्य यांची भक्कम साथ यांमुळेच मी पूर्णपणे झोकून देत काम करू शकलो. या सर्वांविषयी मी कृतज्ञ आहे. मी महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष असताना तुम्हा सर्व पुणेकरांचा मला भरघोस पाठिंबा लाभला. तोच अनुभव मी या वर्षभरातही घेतो आहे. याआधी जशी तुम्हाला सोबत घेत काम करण्याची माझी भूमिका होती, त्यात आजही काहीही बदल झालेला नाही. तुमची सोबत आणि साथ हेच माझे भांडवल आहे. देशपातळीवर मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असतानाही तुमचे मजबूत पाठबळ माझ्यात अधिक आत्मविश्वास भरते आहे. पुणेकरांच्या प्रत्येक मताचे मोल मी जाणतो. आपण दिलेले मत सार्थ करण्यासाठी माझा निरंतर प्रयत्न राहील, हा विश्वास या निमित्ताने देतो. समाजव्यापी परमेशाचे, कोटी कोटी रूपे घडते दर्शन, याचा अनुभव मी गेले वर्षभर देशभर फिरत असताना घेतो आहे. या देशाची महती आणि सामर्थ्याची अनुभूती घेतो आहे. देशासाठी आणि पुण्यासाठी काम करण्याचा माझा निश्चय अधिकाधिक दृढ होतो आहे. असेही ते म्हणाले…

प्रेमराज भाऊ गदादे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

0
Newsworldmarathi Pune: पर्वती पायथा परिसरातील शिवाजी गदादे पाटील यांचे सुपुत्र प्रेमराज गदादे पाटील यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रेमराज यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमस्थळी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली आणि प्रेमराज यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. प्रेमराज आणि प्रिया गदादे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांच्या मार्गदर्शन शिबिरांसारख्या उपक्रमांतून समाजसेवेचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या समाजकार्याच्या बळावर आपण येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज असून, जनतेच्या विश्वासाने पुढे जाण्याचा निर्धार असल्याचे प्रेमराज यांनी स्पष्ट केले. वाढदिवसाच्या निमित्ताने झालेले हे सभासदांचे आणि समर्थकांचे संमेलन एकप्रकारे त्यांच्या राजकीय भवितव्याची नांदी ठरले असून, या सोहळ्याने परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे.

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट

Newsworldmarathi Mumbai : भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान आज झालेल्या चर्चेवेळी केलं. जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक,सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती पार पाडण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणयात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक आयोजित करण्यात येईल. धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांना दिली. यावेळी मियावाकी उद्याने, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जायका, एस.टी.पी., पूर नियंत्रण अशा विविध प्रश्नांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. पुढील काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक चांगले होईल आणि भारत-जपान मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी व्यक्त केला.

Sinhagad Fort : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी…! सिंहगड किल्ला ५ जूनपासून पुन्हा खुला; पर्यटकांसाठी सज्ज

0
Newsworldmarathi Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सिंहगड किल्ला ५ जून २०२५ पासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, किल्ल्यावर चालवण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे २९ मेपासून किल्ला बंद करण्यात आला होता. या मोहिमेअंतर्गत, वन विभाग, महसूल विभाग, पुरातत्त्व विभाग, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त कारवाईत १४१ अनधिकृत स्टॉल्स आणि काही आरसीसी बांधकामे हटवण्यात आली आहेत . अतिक्रमण हटवण्यासाठी किल्ल्याच्या दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे यंत्रसामग्रीचा वापर शक्य नसल्याने सर्व बांधकामे हाताने पाडण्यात आली . या कारवाईमुळे किल्ल्याचा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा जपण्यास मदत होणार आहे. ५ जूनपासून किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असला तरी, पर्यटकांनी नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. १ जूनपासून किल्ल्यावर प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. विशेषतः, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांसाठी डिपॉझिट प्रणाली लागू करण्यात आली आहे. पर्यटकांनी प्लास्टिक बाटल्या घेऊन आल्यास त्यावर डिपॉझिट भरावे लागेल आणि बाटल्या परत केल्यावर डिपॉझिट परत दिले जाईल. सिंहगड किल्ला हा पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून, त्याच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे, तसेच ट्रेकिंगसाठीही मार्ग आहेत. ट्रेकिंग मार्ग सुमारे २.७ किमी लांब असून, यामध्ये सुमारे ६०० मीटर उंची वाढ होते. पर्यटकांनी किल्ल्यावर भेट देताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jalindar Supekar : सुरेश धसांच्या ३०० कोटींच्या आरोपांनी खळबळ; सुपेकर-कराड कनेक्शन समोर?

Newsworldmarathi Mumbai: : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांनी तुरुंगातील आरोपींकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुपेकर-कराड कनेक्शन अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, सुपेकर यांचा बीड येथील वाल्मिक कराडशी व्यावसायिक संबंध आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून, त्याच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दमानिया यांनी यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. चौकशीत काय समोर येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गृह विभागाकडे असलेल्या ६०० प्रकरणांपैकी ३०० प्रकरणांचा अहवाल तयार झाला असून, उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अंजली दमानिया यांनी सांगितले की, “या चौकशीतून अनेक बाबी समोर येतील. तुरुंगातील भ्रष्टाचार आणि पैशाच्या मागणीची प्रकरणे उघडकीस येणे आवश्यक आहे.” यामुळे सुपेकर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. जालिंदर सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते. सुरेश धस यांनी सुद्धा आता सुपेकर यांनी 300 कोटींची मागणी होती असा आरोप केला आहे. यामुळे यावर आता अनेक खुलासे होतील. गन लायसन्स प्रकरणातही सुपेकर यांनी पैशाची मागणी केली होती. पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही आरोप जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खाले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही याची चौकशी लावली आहे. 600 प्रकरणे अशी आहेत ज्यात पैसे खाल्ले गेले आहेत. यापैकी 300 प्रकरणाचा अहवाल गृह विभागासमोर आला आहे. त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. अनेक प्रकरणे बाकी आहेत. यातून आता अनेक खुलासे होतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

अंबरनाथमध्ये खळबळ…! राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

Newsworldmarathi Mumbai: शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इम्रान खान असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या बाहेर घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथमध्ये राहणारी एक महिला तिच्या कामानिमित्त नगरपालिकेत गेली होती. त्यावेळी तिथे इम्रान खान याने त्याच्या कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने एका महिलेचा विनयभंग केला. तसेच चलती है क्या? कितना लेगी? यासारख्या शब्दांचा वापर यावेळी केला आहे. एवढेच नाय तर त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला,नको तिथे हात लावला. असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी इम्रान खान यांच्याकडून याबाबत अध्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी मनसेची पूर्वतयारी जोरात; शहर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

0
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ ची तयारी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुणे शहरासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून निवडणुकीसंदर्भातील प्राथमिक आढावा घेण्यात आल्याची माहिती मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली. पुणे शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला भक्कम पर्याय म्हणून उभं करायचं असून, त्यासाठी संघटनात्मक पातळीवर तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. बैठकीत शहरातील प्रभागनिहाय परिस्थिती, स्थानिक समस्या, मनसेच्या सध्याच्या जनाधाराचा आढावा तसेच प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणेबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरातील प्रत्येक विभागात पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी योजना आखण्यात आल्या. स्थानिक कार्यकर्त्यांशी अधिक समन्वय साधणे, प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करणे आणि मनसेची धोरणं व कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मनसेने यापूर्वीही पुण्यात आपली दमदार उपस्थिती दाखवली असून, येत्या निवडणुकीत शहरातील अधिक जागांवर प्रभावी लढत देण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही बैठक पक्षासाठी रणनीतीदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, येत्या काही आठवड्यांत अजून काही महत्त्वाच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.