मगराज राठी यांना ‘बिझनेस आयकॉन’ पुरस्कार

0
Newsworldmarathi Pune: महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ, तसेच फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संचालक मगराज राठी यांना ‘बिझनेस आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आयोजित व्यापारी दिन सन्मान समारंभात देण्यात आला. या वेळी संघाचे सचिन निवंगूने, नवनाथ सोमसे, दत्तात्रेय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मगराज राठी हे गेल्या अनेक वर्षांपासून बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून, महेश नागरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वित्तीय सेवा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्कार स्वीकारल्यानंतर राठी यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे कार्य हे सर्वसामान्य व्यापाऱ्यांना बळ देणारे असून, ते अत्यंत प्रभावीपणे पार पडत असल्याचे सांगितले. तसेच, आगामी काळात राजस्थानी समाज संघ आणि महेश नागरी मल्टीस्टेट यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांना संघाचे असेच पाठबळ मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Rupali Chakankar : चाकणकरांच्या अडचणी वाढणार? कार्यकर्त्यांकडून धमक्या, महिला आयोग अन् मुख्यमंत्र्यांना पत्र

0
Newsworldmarathi Pune: Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चौफेर टीका होत असतानाच, आता आता, संगिता भालेराव यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी, भालेराव यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय व पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवती सेल च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी ही धमकी दिल्याचं संगिता भालेराव यांनी तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगिता भालेराव यांनी आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी त्यांना फोन करून धमकी दिली. भालेराव यांनी फेसबुकवर महिला आयोगाच्या नेतृत्वावर टीका करणारी पोस्ट केल्यानंतर, गाडे यांनी त्यांना अनेक वेळा फोन करून धमकावले आणि शिवीगाळ केली, असा दावा भालेराव यांनी केला आहे. या प्रकरणाची ऑडिओ क्लिपही त्यांनी तक्रारीसोबत सादर केली आहे. या प्रकरणामुळे रूपाली चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातही चाकणकर यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यपद्धतीवर आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे, तर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घटनांमुळे चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पुणेकर अनुभवणार ‘नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’

0
Newsworldmarathi pune : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची सर्व देशवासियांना माहिती व्हावी, यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा कार्यक्रम कोथरूडमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर (नि.) यांची प्रकट मुलाखत होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिनांक ६ आणि ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आपल्या अचाट सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवत, दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले. अन् दहशतवादाला मातीत मिळविण्याची भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर मिळाले. तसेच, यामुळे भारतीय सैन्य दलाच्या अचाट आणि अचंबित करणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्विततेची माहिती सर्वांना व्हावी; यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार डॉ . उदय निरगुडकर संवाद साधणार आहेत. दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ६.०० ते ८.३० वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रमहोणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Vaishnavi Hagawane death : ‘सुनाही घडवू शकतात इतिहास’; वैष्णवी हगवणेच्या दीराची पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांचा संताप

0
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून, तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुशील हगवणेची एक जुनी सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया’ असे आवाहन केले होते. सुशील हगवणेने २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही पोस्ट केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. सुशीलने त्यांच्यासाठी प्रचार करताना ‘सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात’ असे लिहिले होते. मात्र, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्या मंडळींवर छळाचे आरोप झाले असून, सुशील हगवणेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी सुशीलच्या जुन्या पोस्टवर संताप व्यक्त केला आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. पोस्टमधील ‘सूनेला निवडून द्या’ या आवाहनाच्या विरोधात नेटकऱ्यांनी ‘तुमच्या घरातील सुनांना नीट सांभाळायचं आणि इज्जत द्यायचं कळत नाही, आणि इथे लोकांना ज्ञान शिकवतोस’ अशा कठोर शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणामुळे हगवणे कुटुंबीयांवर समाजातून रोष व्यक्त होत असून, सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ती पोस्ट चर्चेत? उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुशील हगवणे याने सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता. बारामतीत नणंद विरूध्द भावजय अशी लढत झाली होती. त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवरती पोस्ट केली होती. ‘यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया….सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया…. एक मत सुनेसाठी,’ अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती.

मोठी बातमी…! हगवणे प्रकरणात माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक

Newsworldmarathi Pimpri : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आरोपी राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे यांनी सात दिवस पोलिसांना गुंगारा दिला. त्यांना अटक केल्यानंतर आरोपी हगवणे यांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, अधिक तपासात त्यांना मदत केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी कर्नाटकच्या माजी ऊर्जामंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक केली आहे. प्रीतम वीरकुमार पाटील (वय-४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या माजी मंत्र्यांच्या मुलाचे नाव आहे. यासह मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव, राहुल दशरथ जाधव यांनादेखील अटक करण्यात आली आहे. प्रीतम याचे वडील वीरकुमार पाटील यांनी काँग्रेसमधून सलग २८ वर्षे आमदार होते. त्यांनी ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता. पोलिसांच्या तपासानुसार, या आरोपींनी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील विविध ठिकाणी लपवले, त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था केली आणि आर्थिक मदत पुरवली. विशेषतः, कर्नाटकातील एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे यांच्यासाठी करण्यात आलेले बुकिंग प्रीतम पाटील यांच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, वैष्णवी हगवणेच्या शरीरावर ३० जखमा आढळल्या असून त्यातील १५ ताज्या होत्या. या प्रकरणात वैष्णवीच्या पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना आधीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींच्या अटकेसाठी तपास सुरू ठेवला आहे. विशेषतः, निलेश चव्हाण या आरोपीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बीडमध्ये भीषण अपघात…! गाडी डिव्हायडरवर चढली, जीव वाचवायला उतरताच ट्रकने सहा जणांना चिरडलं

Newsworldmarathi Beed: बीडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पूल येथे अंगावर शहारे आणणारा अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरवर चढली, अन जीव वाचवत सगळे खाली उतरताच पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चिरडून जागीच सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बीडमधील गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर मध्यरात्री घडली आहे. या अपघातातील सहा जणांच्या मृत्यूने गेवराई गावावर शोककळा पसरली आहे. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तसेच एका गंभीर जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरला धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. म्हणजे असे म्हणता येईल, काळ आला होता,पण वेळ आली नव्हती. मात्र, त्यानंतर दुसऱ्यांदा पाठीमागून वेगाने ट्रक आली, तिने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. आणि संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला. दरम्यान, धडक इतकी जोरदार होती कि, त्यामध्ये एकाच वेळी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावेळी सहाजण दूरवर फेकले गेले. सहा जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते. अपघात झाल्यानंतर संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पहिल्यांदा झालेल्या अपघातामधून वाचले पण त्यानंतर मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. या अपघातामध्ये सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

राज्यातील केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा अनिवार्यच !

Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्र शासनाने एक नवीन परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला आहे. या निर्णयामुळे बँका, रेल्वे, विमा कंपन्या, टपाल, दूरध्वनी, गॅस, पेट्रोलियम, कर विभाग, मेट्रो, मोनो रेल आणि विमान प्रवास यांसारख्या सेवा पुरवणाऱ्या केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक झाला आहे. अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे या परिपत्रकानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना केंद्राच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर होत आहे की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी संबंधित कार्यालयांकडून स्वयंघोषणापत्र घेतले पाहिजे आणि ते कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार, इंग्रजी, हिंदीसोबत संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा वापरणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा असल्याने, केंद्राच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तक्रारींसाठी व्यवस्था जर कोणत्याही कार्यालयात मराठी भाषेचा वापर होत नसेल, तर नागरिक संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाकडे तक्रार करू शकतात. जर त्यावर कारवाई झाली नाही, तर राज्य विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे अपील करता येईल. स्थानिक प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठक धरणे आणि तालुका स्तरावर समन्वय अधिकारी नेमून, पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन करण्यात येईल. या बैठकींमध्ये केंद्र शासनाच्या कार्यालयातील प्रमुखांना आमंत्रित करून मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाईल. हा निर्णय राज्यातील नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी सेवा मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे

मोठी बातमी : वैष्णवी हगवणे हिच्या अंगावर मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे

Newsworldmarathi Pimpri: सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच तिला कुटुंबीयांकडून मारहाण झाली होती, अशी बाब पोस्टमॉर्टेम अहवालातून स्पष्ट झाली आहे. या आधारावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे वैष्णवी हगवणेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आला आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला हगवणे कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण 29 व्रण आहेत, त्यातील ५ ते ६ व्रण ताजे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे. पोलीस कोठडीत वाढ तसेच वैष्णवी हगवणेच्या अंगावर असलेले व्रण म्हणजेच तिला ज्या हत्याराने मारहाण केली त्या हत्यारांचा अद्याप तपास लागलेला नाही. ते हत्यार नेमके ठेवले कुठे आहेत? याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. यासाठीही पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. यावर न्यायालयाने पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी सुद्धा 28 तारखेपर्यंत आहे.

मार्च 2026 पूर्वी संपूर्ण देश नक्षलमुक्त करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडच्या शंखनाद सभेतून ग्वाही

Newsworldmarathi Nanded : ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईतून भारताने आपली क्षमता आणि ताकद जगासमोर सिद्ध केली असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा मोदी सरकारने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जगाला दिला आहे. आता देशातील नक्षलवाद्यांचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात येत असून 31 मार्च 2026 या तारखेपूर्वी या देशाच्या भूमिवरून नक्षलवादाचा नायनाट झालेला असेल, या संकल्पाचा पुनरुच्चार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी नांदेड येथील प्रचंड शंखनाद सभेत बोलताना केला. गेल्या 22 एप्रिलला पहलगाममध्ये पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांची भ्याड हत्या केली, तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धूळ चारण्याचा इशारा दिला होता. 10 वर्षांपूर्वीची काँग्रेसची सत्ता संपली आहे, आता मोदी सरकार आहे, याचा पाकिस्तानला विसार पडला. पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानात घुसून शेकडो पाकिस्तानी अतिरेक्यांना ठार करून केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला एक संदेश दिला गेला आहे. भारताच्या जनतेवर, सीमेवर हल्ला झाला तर ‘गोली का जवाब गोले से दिया जायेगा’, हा संदेश देऊन 7 मे रोजी 22 मिनिटांत अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय सेनेने केले. 8 मे रोजी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले केले, पण आपल्या सक्षम सुरक्षा व्यवस्थेने एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन भारताच्या भूमीवर घुसू न देता हवेतच त्यांची वासलात लावली. 9 तारखेला पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम आणि हवाई तळांवर हल्ले करून आमच्या सेनेने त्यांची पूर्णपणे वाताहत केली, आणि आमच्या माताभगिनींच्या कपाळावरचे ‘सिंदूर’ स्वस्त नाही, याची जाणीव जगाला करून दिली. हा नवा भारत असून विकसित आणि बलवान भारताकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही होणार नाही, हे मोदी सरकारने सिद्ध करून दाखविले. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, व्यापार आणि दहशतवादही एकत्र चालणार नाही, हे मोदी यांनी बजावले आहे. यापुढे अशी आगळीक केलीच तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मोदी यांनी दिला आहे. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते जगाच्या वेगवेगळ्या देशांत जात असताना, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या एका नेत्याने गळे काढण्यास सुरुवात केली, पण जर बाळासाहेब असते, तर ऑपरेशन सिंदूर च्या यशस्वी कारवाईबद्दल त्यांनी मोदीजींना मिठी मारली असती, अशा शब्दांत श्री. शाह यांनी ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा नामोल्लेखही न करता टीका केली. या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळात त्यांच्या पक्षाचेही प्रतिनिधी आहेत, पण उद्धव सेना त्याची वरात म्हणून संभावना करते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात शाह यांनी फडणवीस सरकारने मराठवाड्यात सुरू केलेल्या पाणी योजनांचा संपूर्ण तपशील मांडला. ठाकरे सरकारने त्यामध्ये अडथळे आणले, पण आता पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकारने या सर्व प्रकल्पांना गती दिली असून मराठवाड्याच्या प्रत्येक घरात, शेतात पाणी पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जुनी मागणी असतानाही शरद पवार यांच्यासारख्या दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याने काहीच केले नाही, ते काम मोदीजींनी केले, असे ते म्हणाले. येत्या काही वर्षांत शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि सावरकरांची ही महाराष्ट्र भूमी विकसित भारताच्या निर्मितीत अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व खा. अशोक चव्हाण, आदी नेत्यांचीही या विशाल सभेत भाषणे झाली. ऑपरेशन सिंदूर कारवाईतून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेनादलाने केलेल्या कारवाईतून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर या सभेच्या माध्यमातून संपूर्ण भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पराक्रमी भारतीय सेनादलांचे अभिनंदन करण्यासाठी सरकारसोबत उभा आहे, अशी ग्वाही प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

सावरकरांची खोली राहणार दर्शनासाठी खुली

0
Newsworldmarathi Pune: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील खोली त्यांच्या जयंती निमित्त येत्या बुधवारी (28 मे) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी खुली राहणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात 1902 ते 1905 या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकरांनी वास्तव्य केले होते. ते वसतिगृह क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 17 मध्ये राहत असत. ही खोली त्यांच्या क्रांतिकारी विचारांची आणि उपक्रमांची साक्षीदार आहे. या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे दोन गणवेश, त्यांच्या वापरातील वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. या खोलीत सावरकरांनी अनेक महत्त्वाच्या क्रांतिकारी उपक्रमांची योजना केली. त्यात विदेशी वस्त्रांची होळी, स्वदेशी चळवळीची सुरुवात आणि ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना यांचा समावेश आहे. या खोलीतूनच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी काव्ये रचली. 1905 साली विदेशी वस्त्रांची होळी केल्याच्या घटनेनंतर, तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकले आणि दंड आकारला. या घटनेनंतर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ वृत्तपत्रात ‘हे आमचे गुरु नव्हे’ या शीर्षकाखाली लेख लिहून निषेध व्यक्त केला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन करून ठेवले आहे. सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ही खोली नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली केली जाते. ही खोली सावरकरांच्या क्रांतिकारी प्रवासाची साक्ष देणारी असून, आजही ती प्रेरणास्थान म्हणून ओळखली जाते.