पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

0
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आता नवल किशोर राम यांच्या हाती जाणार आहेत. राज्य सरकारने त्यांची अधिकृत नियुक्ती केली असून, ते ३१ मे रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. नवल किशोर राम हे 2003 बॅचचे आयएएस अधिकारी असून, याआधी ते पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनात प्रभावी निर्णयक्षमता दाखवत पुण्यातील विविध शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नुकतेच राम हे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. तिथून त्यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महापालिका ही राज्यातील एक महत्त्वाची महापालिका असून, येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तपदावर येणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका फारच निर्णायक ठरणार आहे. नवल किशोर राम यांच्या प्रशासनातील अनुभवामुळे पुण्यातील शासकीय आणि नागरी कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ट्रक चालकाला पीएसआयची मारहाण; ११२ हेल्प लाईनवर कॉल करणाऱ्यालाच पोलिसांनी चोपलं

Newsworldmarathi sambhajinagar : पोलिसांनी हेल्प लाईन तातडीने मदत मिळवण्यासाठी दिली आहे, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हेल्प लाईनवर फोन करुन मदत मागणाऱ्या एका व्यक्तीलाच पोलिस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमधील ही १८ मे रोजी घडलेली घटना आहे. जालन्याहून पुण्याला माल वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाचा चारचाकी गाडीने पाठलाग केला आणि धक्का लागल्याचं सांगत नुकसान भरपाईची मागणी केली. भयभीत झालेल्या ट्रक चालकाने पोलिसांच्या मदतीसाठी ११२ आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क केला असता पोलिसांनी दोन्ही गाड्या पोलिस स्टेशनला नेल्या आणि त्यानंतर जे घडलं ते मदत मागणाऱ्या ट्रक चालकाला मदतीऐवजी संकटात टाकणारं होतं. १८ मे रोजी गोरक्ष मिसाळ हे ट्रक चालक जालन्याहून पुण्याला अवजड माल घेऊन जात होते. रस्त्याने रात्री साडे ११ च्या सुमारास एका चारचाकी गाडीला त्यांची अवजड मालाची वाहतूक करणारी गाडी घासली आणि त्यानंतर ट्रक अडवली गेली. चार चाकी गाडीमध्ये चार ते पाच जण होते आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी करत शिवीगाळही करण्यात आली. गोरक्ष मिसाळ यांनी मारहाणीच्या भीतीपोटी ११२ या संपर्क क्रमांकावर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं. पण पोलिसांनी मदत करण्याऐवजी भलतंच केलं. पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय रेशिम कोळेकर यांनी नुकसान भरपाई दे अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली. गोरक्ष मिसाळ यांनी विनंती केली की साहेब मी तुम्हाला मदत मागितली आहे आणि उलट माझ्यावरच गुन्हा का दाखल करताय. संबंधित गाडीचे नुकसान झाले असेल तर ती नुकसान भरपाई देण्याची माझी तयारी आहे आणि इन्शुरन्स कंपनीकडून ही भरपाई दिली जाईल याची हमी मी स्वतः घेतो. मात्र तू जास्त बोलतोय असं म्हणत गोरक्ष मिसाळ यांना मारहाण करण्यात आली, शिवाय ते दारु पिलेले आहेत, असा आरोपही संबंधीत पोलीस उपनिरीक्षकाने केला. चालकाने मारहाण झाल्यानंतर घाटी रुग्णालय गाठलं आणि अल्कोहोल चाचणी करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांच्या परवानगीशिवाय आम्ही दारु प्यायला आहात की नाही हे तपासू शकत नाही, असं स्पष्टीकरण डॉक्टरांकडून करण्यात आलं. मदत मागितल्यानंतर अडचणीत सापडलेल्या गोरक्ष मिसाळ यांनी आता या प्रकरणाची थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. गोरक्ष मिसाळ यांच्याविरोधात चारचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने तक्रार केली असून मिसाळ यांनी घाटीमध्ये मारहाणीनंतर उपचार घेतले आहेत. दारु प्यायल्याची चाचणी करण्यासाठी आजही माझी तयारी आहे, मात्र संबंधित पोलीस उपनिरीक्षकावरती कारवाई करावी आणि पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावं, अशी विनंती तक्रार अर्जाद्वारे संबंधित ट्रक चालकाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय गोरक्ष मिसाळ यांची ट्रकही गेल्या तीन दिवसांपासून अडवून ठेवण्यात आली आहे. ही ओव्हरलोडची केस असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र ओव्हरलोडवर कारवाई करण्याचा अधिकार मोटर वाहन कायद्यानुसार संबंधित प्रादेशिक परिवनह अधिकाऱ्याकडे आहे. काटा केल्यानंतर वाहनावर ओव्हरलोडची कारवाई केली जाते. मात्र पोलिसांनी अवैधपणे गाडी अडवून मौल्यवान मालाचं नुकसान केलं जात असल्याचा आरोप चालकाने केलाय.

Vaishnavi Hagawane Suicide Case : तू फालतू, घाणेरडी…वैष्णवीची ऑडिओ क्लिप व्हायरल…

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. वैष्णवीने आत्महत्या केली, असा दावा केला जात असतानाच तिच्या कुटुंबीयांनी तिला आत्महत्या करायला लावण्यात आले नसून तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या ऑडिओमध्ये वैष्णवी म्हणते, “लग्न करून मी चूक केली. ताई म्हणाली की मी तुझी सगळीकडे बदनामी करते, जे केलं नाही तेही सगळ्यांना सांगते. शशांकसोबत तू कधी लॉयल नव्हती, असंही तिने मला सुनावलं. ताई मला ‘फालतू, घणेरडी’ अशा शब्दांत बोलली.” पुढे वैष्णवी सांगते, “मला मारताना दाजी बघत होते, आणि त्यांनीही माझ्यावर हात उचलला. त्यांनाही ते खरं वाटतंय. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे, असं मी पप्पांना सांगितलं. पप्पांनीही आपण यावर विचार करू, असं सांगितलं होतं.” या क्लिपमधून वैष्णवीवर सासरच्या मंडळींकडून झालेला मानसिक आणि शारीरिक छळ स्पष्ट होत असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून सुनियोजित खून आहे, असा त्यांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात शशांक हगवणे, त्याची आई लता आणि बहीण करिष्मा यांना अटक केली असून, राजेंद्र हगवणे व त्यांचा मुलगा सुशील सध्या फरार आहेत. पोलिस तपास सुरू असून, ऑडिओ क्लिपच्या सत्यतेचीही चौकशी केली जात आहे.

हुंड्यासाठी छळ, नवऱ्याकडून संशय आणि होत्याचं नव्हतं झालं, प्रेमविवाहाचा भयावह शेवट..

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागे आत्महत्या नसून खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेतल्याचे प्रथम सांगण्यात आले होते, मात्र तिच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमा आणि शवविच्छेदन अहवालामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. बी.जे. हॉस्पिटलच्या अहवालानुसार, वैष्णवीचा मृत्यू गळ्यावरील फासामुळे झाला असून, तिच्या शरीरावर धारदार वस्तूने मारहाण केल्याच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. याआधी २७ नोव्हेंबर २०२३ रोजीही वैष्णवीने छळाला कंटाळून विष घेण्याचा प्रयत्न केला होता. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे हे फरार आहेत. प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यात वैष्णवीने मैत्रिणीला सतत होणारा मानसिक छळ, चारित्र्यावरचे आरोप आणि हुंड्यासाठी होणारी मागणी याबाबत सांगितले आहे. शशांक हगवणे याने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपये मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पैसे न दिल्यामुळे वैष्णवीला धमकावण्यात आले आणि तिला माहेरी पाठवण्यात आले होते. काही दिवसांनंतर ती पुन्हा सासरी परतली, पण छळ कायम राहिला. अखेर १६ मे रोजी ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

चंद्रपूर हादरले…! पायी जाणाऱ्या तरुणीला लिफ्ट दिली, शेतात नेत केला सामूहिक अत्याचार

Newsworldmarathi chandrpur: महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. एकट्या महिला, मुलीला पाहून तिची छेड काढणे, तसेच तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने होत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशातच आता चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रस्त्याने पायी जात असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने चिमूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. प्रतीक साटोने (वय-२६) आणि विकी साटोने (वय-२९) तसेच अंकित काकडे (वय-३१) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, दरम्यान पीडित तरुणी ही आपल्या आजीच्या घरी पायी चालत जात होती. त्यावेळी तिच्या सोबत ओळख असलेल्या प्रतीक याने तिला दुचाकीवर बसवून घरी सोडण्याचे सांगत लिफ्ट दिली. मात्र, त्याने तिला घरी न सोडता थेट शेतात घेऊन गेला. अन १९ वर्षीय तरुणीवर तिघांनी मिळून शेतात नेऊन सामूहिकरीत्या बलात्कार केला. दोन साथीदारांना बोलावून घेत केला बलात्कार तरुणीला शेतात घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांना शेतात बोलावून घेतले. यात विकी साटोने आणि अंकित काकडे यांना बोलावून तिघांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. सदरची घटना एप्रिल महिन्यात घडली असून, बदनामीच्या भीतीने पीडितेने आतापर्यंत कोणालाही काही एक सांगितले नव्हते. अखेर महिनाभरानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दोघेजण अटक, तर एक फरार दरम्यान, तरुणीने अखेर धाडस करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी माहिती देत फिर्याद दाखल केली. यानंतर चिमूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून, अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास चिमूर पोलिस करत आहेत.

ठाण्यात टेंभी नाक्यावर शिवसैनिकांना मारहाण, धारधार शस्त्राने केले वार

Newsworldmarathi Thane: शहरातील टेंभी नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आफ़्रिन आणि तिच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टेंभी नाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे हिंसक हल्ल्यात रूपांतर झाले. हल्लेखोरांनी शिवसैनिकांवर हाताने तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमा केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. टेंभी नाका या ठिकाणी किरकोळ वादातून दोन शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झाला आहे. संतोष यांच्या समवेत एका सैनिकांवर परिसरात राहणार्‍या आफ्रिन या महिलेने गुंडांना घेऊन हल्ला केला आहे. सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे याच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारला. त्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला आहे. आफ्रिन महिला आणि तिच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जखमी शिवसैनिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोरांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Marathwada Rains : मराठवाड्यात ‘मॉन्सूनपूर्व’ने दाणादाण, वीज पडून तिघांचा मृत्यू, फळपिकांचे मोठे नुकसान

Newsworldmarathi sambhajinagar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण याच अवकाळी पावसाचा फटका बसून काहील जणांना जीवही गमवावा लागला आहे. मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत पडणाऱ्या वळवाच्या पावसात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वादळीवाऱ्यासह पाऊस झाला आहे. यात विविध ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील हळद या गावी शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. उमेश उत्तम उंडाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर अंबाजोगाईजवळील मोरेवाडी येथील एका मंदिर परिसरातही वीज कोसळली. मात्र, या घटनेत जीवितहानी झाली नाही. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात चार ठिकाणी वीज पडून शेळ्या, म्हैस, गाय दगावली आहे. जालन्यात सलग पाच दिवसांपासून पाऊस पडत असून, भोकरदन तालुक्यात दोन तरुणांचा वीज पडून मृत्यू झाला. गणेश जाधव (वय ३२) आणि सचिन बावस्कर (वय २८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याच तालुक्यात रविवारीही दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. सलग पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगलीत खळबळ…! आर्थिक वादातून तरुणाची निर्घृण हत्या; तर आरोपीच्या आईची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Sangali: सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संशयिताच्या आईने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विमल शेजुळ असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. ही घटना सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे घडली आहे. या घटनेने सांगली हादरली आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकटोळी येथे एका तरुणाची पैशांच्या देवाण-घेवाणीतून हत्या केल्याची घटना घडली. . कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपी सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाने ही हत्या केली. दरम्यान, त्याच्या आईला मुलाच्या या भयानक कृत्यामुळे मोठा धक्का बसला. या तरुणाच्या आईने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. कवठेमंकाळ पोलिसांनी तरुणाच्या हत्येप्रकरणात आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली. आर्थिक वादातून ही घटना घडल्याची पोलीस तपासात माहिती समोर आली आहे. कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाची आरोपी सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. संशयित तरुण सुशांत शेजुळ याची आई विमल शेजुळ यांना आपल्या मुलाने हत्या केल्याची बातमी समजली. गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली. या हत्येची गावभर जोरदार चर्चा झाली. या दोन्ही घटनेची नोंद कवठेमंकाळ पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत, अटक केली आहे. कवठेमंकाळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

धोक्याची घंटा…! राज्यात कोरोना रुग्णांची सौम्य वाढ; पुण्यात १ तर मुंबईत ‘इतक्या’ रुग्णाची नोंद

Newsworldmarathi Pune: राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत आहे. २० मे रोजी एकूण १९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक १५ रुग्ण आढळले असून, पुण्यात १ आणि कोल्हापूरमध्ये ३ रुग्ण सापडले आहेत. यामुळे मे अखेरपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ६,०६६ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १०६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत १०१ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ६८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये ५२ रुग्ण सौम्य लक्षणांसह घरी उपचार घेत आहेत, तर १६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार सुरू असून बहुतेक रुग्ण सात दिवसांच्या कालावधीनंतर डिस्चार्ज होत आहेत. या कालावधीत राज्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. एका रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपोकैल्सिमिक सीझर होता, तर दुसऱ्याला कर्करोग होता. पुण्यात एका रुग्णाची नोंद पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 87 वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या वर्षातील पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे. पुण्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र कोणी घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

वेध मान्सूनचे… ! पुढील ५ दिवसांत मान्सूनचे केरळमध्ये आगमन; आयएमडीने शेअर केले अपडेट

Newsworldmarathi Mumbai : मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. नवी दिल्ली : मोसमी पाऊस पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये धकडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन झाले, तर २००९ सालानंतर भारतीय भूमीवर सर्वात अगोदर दाखल होणारा मान्सून ठरेल. २००९ साली मान्सूनचे आगमन २३ मे रोजी झाले होते. सामान्यतः केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जून रोजी होत असते. परंतु यंदा मान्सूनचा प्रवेश २७ मेपर्यंत होण्याची शक्यता अगोदरच व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात भारतीय हवामान विभागाने अद्ययावत माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये पोषक स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले. सामान्यतः मान्सूनचे १ जूनपर्यंत केरळमध्ये आगमन होते. पुढे ८ जूनपर्यंत मान्सूनकडून देश व्यापला जातो. नंतर १७ सप्टेंबरच्या जवळपास राजस्थानच्या मार्गाने त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि तो १५ ऑक्टोबरपर्यंत संपुष्टात येतो. तर २००९ सालानंतर यंदा प्रथमच मान्सून चार दिवस अगोदर केरळमध्ये धडकण्याचे भाकित हवामान विभागाने अगोदरच व्यक्त केले आहे.