Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांचा पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांना दणका; थेट कारवाई करण्याचे दिले आदेश

Newsworldmarathi Nagapur : Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज योजना सुरु केली. पात्र शेतकऱ्यांनी याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. जे शेतकरी घेतलेल्या पीककर्जाची वेळेत परतफेड करु शकले नाहीत त्यांनी ओटीएस समझोता अंतर्गत कर्जाची रक्कम फेडली. ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करुनही ज्या बँकांनी त्यांना पीककर्ज दिले नाही त्या बॅकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. आशिष देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, प्रभारी पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, माजी आमदार सुधीर पारवे, अग्रणी बँक व्यवस्थापक मोहित गेडाम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर पीक कर्जाबाबत कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्याला उपविभागीय दंडाधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापक यांनीही वेळोवेळी बँक व्यवस्थापकांना बोलावून रितसर आढावा घेतला पाहिजे. संबंधित बँका निर्देश देऊनही जर ऐकत नसतील तर त्यांच्याविरुध्द गुन्हे का दाखल करु नयेत, असा संतप्त सवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

स्वारगेट प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय; आता लालपरीसह सर्व बस ‘स्मार्ट’; चालकावर ‘एआय’ कॅमेराचे लक्ष

0
Newsworldmarathi Pune: भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बससेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’ घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये ए. आय. तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी.पी.एस. तंत्रज्ञान, एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अॅनालाइज यंत्रणा याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टीम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून, या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील. स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार असून, प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरदेखील या कॅमेराचा ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक व परिसरामध्ये ‘पार्किंग’ मध्ये उभ्या असलेल्या बसेसदेखील पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. महत्त्वाच्या माहितीसाठी एल.ई.डी. टीव्ही नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एल.ई.डी. टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती बरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडींबाबत ‘अपडेट’ राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूसदेखील जाहिरात प्रसिद्धीकरिता एल.ई.डी पॅनल लावण्यात येणार आहेत. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे. फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा सध्या तापमानवाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार असून, बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तत्काळ विझवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.

विनोदी कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे आज (ता.१६) सकाळी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गिरी महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रभरात शोककळा पसरली आहे, विशेषतः वारकरी संप्रदायातील अनुयायांमध्ये. गिरी महाराज हे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील रहिवासी होते. त्यांच्या कीर्तनशैलीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ते एक अत्यंत प्रसिद्ध कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते. त्यांच्या कीर्तनांमध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक विषयांप्रमाणेच सामाजिक मुद्द्यांवरही प्रगल्भ विचार मांडले जात होते. गिरी महाराजांनी आपल्या विनोदी आणि हलक्या-फुलक्या शैलीत केलेले कीर्तन सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या कीर्तनांमध्ये एक अनोखी गोष्ट होती, ती म्हणजे त्यात विनोदाचा, सामाजिक संदेशाचा आणि अध्यात्मिक विचारांचा सुंदर मिलाफ. गिरी महाराजांच्या कीर्तनामुळे श्रोत्यांना हसत-हसत जीवनातील गंभीर गोष्टी विचारण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या भाषणांमध्ये सामाजिक असमानता, पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या समस्यांपासून ते सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर तोडगा कसा काढावा, यावर त्यांनी नेहमीच भाष्य केले. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे गिरी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने केवळ कीर्तन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे, तर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे योगदान आणि विचार मोलाचे मानले आहेत.

नालेसफाईतील हलगर्जीपणावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा कडक इशारा!

0
Newsworldmarathi Pune: मागील काही वर्षात शहरात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले असून कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देत मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार किंवा अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही सूचना केली असल्याची माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. बैठकीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याचे सूचना मनपाला दिल्या आहे. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल. नालेसफाईचे यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहे. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे. मोहोळ म्हणाले, पुण्यात आधी ११७ क्रॉनिक स्पॉट होते. त्यानंतर २२ गावे समाविष्ट झाल्यावर आता ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ११७ स्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. त्याजागी नालेसफाई झाली असून उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील. इतर जे ३९ स्पॉट कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्याठिकाणी तात्पुरते उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे हाल होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मनपाला दिल्या आहे. ‘सन २०१९ मध्ये आंबील ओढा येथे पूर येऊन मोठी आपत्ती आली होती. त्यानंतर उपाययोजना काम करून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात आल्याने परत काही अडचण आली नाही. पुण्यात नगरसेवक नसले तरी मनपात आमदार, खासदार लक्ष्य देत असून समन्वयाने काम करण्याचे ठरले आहे. पुण्यात मान्सूनपूर्व कामाचा वॉर्ड निहाय रिपोर्ट करून त्याचा एकत्रित अहवाल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रत्येक जागी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यास देखील सांगितली आहे.जे नेमून दिलेली कामे करत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मनपाने अतिक्रमण बाबत कडक कारवाई करावी. आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा देखील घेतला गेला आहे. पुणे शहरासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे तो मनपाला मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. महायुती म्हणून निवडणुकीची तयारी… आगामी मनपा निवडणूक ही महायुती म्हणून लढणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महायुती म्हणून आम्ही लढणार असून त्यादृष्टीने निवडणुक तयारी सुरू केली आहे. गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारीचे वाटप केले जाईल, असे देखील यावेळी मोहोळ यांनी सांगितले.

चार दिवसांवर लग्न… आणि अचानक मृत्यू! लग्नघरी नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Ahmadnagar: ‘जो आवडतो देवाला तोच आवडे सर्वांना’, हे वाक्य सत्य ठरवत सुषमा श्रीमंत जाधव या बीएससी पदवीधर नववधूच्या आयुष्याला नियतीने करुण पूर्णविराम दिला. येत्या २० मे रोजी तिचा विवाह साजरा होणार होता. साखरपुडा नुकताच पार पडला होता आणि घरात लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती. मात्र मंगळवारी (१४ मे) दुपारी १ वाजता घरातील साफसफाईदरम्यान सुषमा कुलरच्या पिनशी संपर्कात आली आणि तिला जोरदार विद्युत शॉक बसला. तिथेच तिचा मृत्यू झाला. घरातील आनंद एका क्षणात शोकात बदलला. गावात हंबरडा फुटला आणि सुषमाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुषमा ही हिप्पळगाव येथील जाधव कुटुंबातील ज्येष्ठ कन्या होती. वडील श्रीमंत आणि आई चंद्रकला यांनी कष्ट करून तिला शिकवले. सुषमाचे स्वप्न मोठ्या पदावर जाण्याचे होते. पण तिचे लग्न नात्यातीलच सुनील सूर्यवंशी (रा. येलदरा, ता. जळकोट) यांच्यासोबत निश्चित झाले होते. दुर्दैवाने हळदीऐवजी तिच्या देहावर अंत्यसंस्काराचे फुले वाहण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता शोकमग्न वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला

0
Newsworldmarathi Pune : विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी चांगल्या योजना राबविल्यास राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच पुढे म्हणाले, आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ, असे स्पष्ट करीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १२० दिवसांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. सरकार आवश्यक ते सहकार्य करेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. विकासाची प्रक्रिया नागरिकरणाभोवती फिरते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या चार गोष्टींसाठी नागरिक शहराकडे आकर्षित होतात. असे असताना विकासासोबत वाढत्या शहरीकरणाचा योग्यरितीने विचार न केल्याने शहर विकासाचे योग्य धोरण करण्यात आले नाही आणि त्यामुळे शहरातील समस्या निर्माण झाल्या. राज्यात ६ कोटी लोक ४५० शहरात राहतात. ही शहरे सुंदर करता आली तर ५० टक्के जनतेचे जीवनमान उंचावता येईल, असंही फडणवीस म्हणाले.

मी शब्दाचा पक्का, एखाद्याला खासदार करतो, तर कुणाला पाडायचं म्हटलं तर पाडतोच : अजित पवार

0
Newsworldmarathi Pune : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी इंदापूर तालुक्यातील अकोले गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. ”मी शब्दाचा पक्का आहे, एखाद्याला सांगितलं की खासदार करतो तर करतोच. मी एखाद्याला सांगितलं की याचा काटा काढतो, तर त्याचा काटा काढतोच. एखाद्याला सांगितलं की याला पाडतो, तर त्याला पाडतोच…” असं अजित पवार यांनी म्हटले. इंदापूर तालुक्यातील प्रलंबित पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावणारच, मी शब्दाचा पक्का आहे. लोकसभेला, विधानसभेला कुणी कुठले काम केले हे न बघता 53 गावातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला, असं अजित पवार यावेळी म्हणाले. छत्रपती सहकारी साखर कारखाना हा शरद पवार साहेबांनी तसेच घोलप,जाचक यांनी उत्तम चालवला. आम्ही राज्यातील अनेक कारखाने उभे केले. काही बिनविरोध देखील केलेले आहेत. छत्रपतीसाठी देखील बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. इंदापूर तालुक्यातील कारखान्यांपेक्षा तुलनात्मक जादा दर छत्रपती कारखाना देतो, असंही यावेळी सांगितलं मला तर अमित शहा नावाने ओळखतात बारामतीत बोलताना म्हणाले, विरोधक सांगतात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी माझी ओळख आहे. मात्र, मला तर अमित शहा नावाने ओळखतात. तुम्हाला ओळखतात का? असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला. पुढे म्हणाले, तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाहीत. बाप जाद्यांनी एवढं गडगंज करून ठेवलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही. आणि तुम्ही २२ हजार सभासदांचा संसार करायला निघालात, असा जोरदार प्रहार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर लगावला आहे.

Shirdi Crime : शिर्डीत गुजरातच्या व्यापाऱ्याचं सव्वातीन कोटींच्या सोन्याची चोरी; ड्रायव्हरनेच मारला डल्ला; नेमका काय घडलं?

Newsworldmarathi Shirdi : शिर्डीत सराफ व्यापाऱ्यांना सोने देण्यासाठी आलेल्या गुजरातमधील व्यापाऱ्याचे सव्वातीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करून त्याचाच मोटारचालक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारची (दि. १३) रात्री ते बुधवारीच्या (दि. १४) मध्यरात्रीपर्यंतच्या काळात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सुरेशकुमार भूरसिंह राजपुरोहित (रा. चोटन बारमेर, राजस्थान) याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विजयसिह वरूनानी खिली (वय ३५, रा. अहवाल घुमटी, ता. आमिर गह, जि बनासकांटा, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयसिह वरूनानी खिली हे सराफ व्यापारी सोन्याचे दागिने येथील व्यापाऱ्यांना देण्यासाठी आपल्या अन्य सहका-यांसोबत मोटारीतून शिर्डीत आले होते. परिसरातील सराफ व्यापाऱ्यांना दागदागिन्यांचे वितरण करून, ते येथील आंबा गल्लीतील हॉटेल सुनीतामधील रूम नंबर २०१मध्ये मुकामी थांबले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनाचा चालक सुरेशकुमार भूरसिंह राजपुरोहित बॅगेत ठेवलेले साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने व रोख चार लाख रुपये आणि काही चेक घेऊन पसार झाला. त्यात अंदाने तीन कोटी २६ लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे विजयसिह यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आरोपीला त्याला लक्करात लवकर जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दागिने लंपास करणारा आरोपी आपल्या वाहनावर चालक म्हणून पाच महिन्यांपासून कामाला होता, असे व्यापारी विजयसिंह यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता; सरकारला प्रभाग रचनेचे आदेश

Newsworldmarathi Mumbai: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित महत्त्वाचे आदेश बुधवारी राज्य सरकारला दिले आहेत. आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे की, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतींसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना व गट-गणांची नवी रचना तातडीने सुरू करावी. या निर्देशामुळे राज्यभरातील निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाल्याचे दिसून येत असून, “निवडणुका कोणत्याही क्षणी लागणार?” असा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. आयोगाच्या आदेशानुसार, सरकारने सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या प्रभाग रचनेसाठी तत्काळ प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे. विशेषतः महापालिका, नगर परिषद व पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता या प्रलंबित निवडणुकांची तयारी सुरू करण्यास आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. याआधी ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला होता की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात. या आदेशानंतर आयोगाने हालचाल वेगवान करत निवडणुकीसाठी लागणारी प्रशासकीय तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. राज्यभरातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादाचा बीमोड; भारतीय लष्कराच्या शौर्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा सलाम

Newsworldmarathi Mumbai: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे तिरंगा रॅली पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचे प्रत्यूत्तर भारताने दिले आहे. रॅलीच्या प्रांरभी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली रॅली गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली. समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थितांनी शहिद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले आणि टिळक स्मारकास अभिवादन केले. या रॅलीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, यांच्यासह मुंबईतील आमदार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.