‘हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन’; गोपीचंद पडळकरांचे विधान चर्चेत
Newsworldmarathi Nashik : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिकच्या सिडको परिसरात झालेल्या सभेत वादग्रस्त विधान करत दावा केला की, “सध्या हिंदू मुली म्हणजे केवळ मुले जन्माला घालण्याचे मशीन बनल्या आहेत”. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सभेदरम्यान पडळकर म्हणाले की, “मुस्लिम समाजात अनेक जाती असून ते आपसात लग्न करत नाहीत, मात्र आमच्या मुलींना फसवून धर्मांतर घडवून आणले जात आहे”. त्यांनी ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, आणि वक्फ बोर्ड यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्यातील मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली. तसेच प्रत्येक गावात ‘धर्म दल’ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
काश्मीर, लव्ह जिहाद, आणि ‘लँड जिहाद’चा उल्लेख
पडळकर पुढे म्हणाले की, “काश्मीरमध्ये अजूनही धर्म विचारून गोळ्या झाडल्या जात आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद सुरू आहे आणि या सगळ्यावर आता गंभीर विचार होणे आवश्यक आहे.” त्यांनी असा आरोप केला की, “मोकळी जागा दिसली की मशिद बांधली जाते, रेल्वे आणि मिलिटरीपेक्षा वक्फ बोर्डाकडे अधिक जागा आहे”.
संभाजी महाराजांबाबत ‘जिहादी’ आरोप
सभेत पडळकरांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीही वक्तव्य केले. त्यांनी काही लोकांनी महाराजांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आणि “जिहादी विचारसरणीच्या लोकांकडून संभाजी महाराजांना बदनाम केले जात आहे” असे ते म्हणाले. “बीड जिल्ह्यातील एका भागाला संभाजी महाराजांचे नाव लावून अपमान करण्यात आला आहे”, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे, नागपूर, पनवेलमध्ये उभारणार अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्क्स; राज्यात ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्र सरकार आणि एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स व होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स (ब्लॅकस्टोन ग्रुप) यांच्यामध्ये महाराष्ट्रातील 10 हून अधिक अत्याधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्कच्या विकासासंदर्भात मैलाचा दगड ठरणारा सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग सचिव आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे हा सामंजस्य करार करण्यात आला
या कराराअंतर्गत नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर आणि पनवेल या ठिकाणी 10 हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित केले जाणार आहेत. यासाठी 794.2 एकर जागेवर 1.85 कोटी चौ. फूट बांधकाम होणार असून, एकूण ₹5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार आहे. यामुळे 27,500+ थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील.
हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त व महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 शी सुसंगत असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भागीदारी औद्योगिक व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील परिवर्तनाचे पाऊल असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विजय शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर गुन्हा दाखल करण्याची गुलाबो गँगची मागणी
Newsworldmarathi Pune : भाजपचे मध्य प्रदेशमधील मंत्री विजय शहा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून गुलाबो गँगच्या महिलांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित मंत्र्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गुलाबो गँगच्या महिलांनी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री विजय शहा यांनी एका कार्यक्रमात भारताच्या शूर कन्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी अपमानास्पद आणि घाणेरडी टिप्पणी केली. “ती अतिरेक्यांची बहीण आहे” असे उद्गार त्यांनी काढल्याचा आरोप आहे. कुरेशी यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या भारतीय सेनेत सेवा बजावत असून, अलीकडील भारत-पाक संघर्षात कर्नल कुरेशी यांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
महिलांच्या मते, हे वक्तव्य केवळ कर्नल कुरेशी नव्हे, तर संपूर्ण देशातील महिलांचा आणि भारतीय सेनेचा अपमान करणारे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनासोबत त्यांनी संबंधित भाषणाची व्हिडिओ क्लिप असलेली पेन ड्राइव्हही सादर केली आहे. “हे भाषण सर्वच टीव्ही चॅनेल्सवर दाखवले जात असून, आम्ही तपासासाठी स्वतंत्रपणे क्लिपही दिली आहे,” असे निवेदनात नमूद आहे.
“आपण आमचे मायबाप सरकार आहात, आम्हाला न्याय द्याल,” असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला आहे.
संगीता तिवारी, सोनिया ओवाळ, शोभा पणीकर, सुनिता नेमूर, मनीषा गायकवाड, सीमा महाडिक, सुवर्णा माने, रजिया शेख आणि बेबी राऊत यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.
पित्याच्या आत्महत्येनंतरही हार न मानता दहावीमध्ये बाजी मारणाऱ्या दुर्गा आणि नियतीची प्रेरणादायक यशोगाथा
Newsworldmarathi Nanded: निझामाच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतरही कायम मागासलेल्या मराठवाड्यातील शेतकरी आजही कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकले आहेत. पाण्याचा अभाव, अल्पभूधारकता आणि वाढती शेतीची खर्चिकता यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. अशाच एका पार्श्वभूमीत जन्मलेल्या आणि वडिलांच्या आत्महत्येमुळे बालपणीच पितृछत्र हरवलेल्या दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या दोन मुलींनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवत क्रूर नियतीवर विजय मिळवला आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दूरवरच्या वाडीत राहणाऱ्या या मुलींनी वडिलांच्या आत्महत्येनंतर बालवयातच जगण्याशी झुंज सुरू केली. वडील गेल्यानंतर शिक्षण सोडाच, पण दोन वेळचे अन्न मिळवणेही कठीण झाले. आई अशिक्षित आणि मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणारी. अशा खडतर परिस्थितीतही दुर्गा आणि नियती यांनी हार मानली नाही.
सुदैवाने, पुण्यातील *भोई प्रतिष्ठान* या संस्थेच्या *पुण्यजागर* प्रकल्पांतर्गत त्यांना आधार मिळाला. सुमारे नऊ वर्षांपूर्वी या दोघींना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रतिष्ठानने घेतली. दोघींनाही पुरंदर तालुक्यातील वीर येथील *अस्तित्व गुरुकुल* या निवासी शाळेत दाखल करण्यात आले.
आज या दोघींनी त्या संधीचे सोने केले आहे. दुर्गाने दहावीत ८६.४० टक्के तर नियतीने ७७ टक्के गुण मिळवत आपल्या संघर्षाचे यशात रूपांतर केले आहे. या यशाबद्दल त्यांनी भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई यांचे आणि शेतात मोलमजुरी करून पोषण करणाऱ्या आपल्या मातांचे आभार मानले आहेत.
भोई प्रतिष्ठानने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ विद्यार्थ्यांना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. दुर्गा आणि नियती यांची यशोगाथा केवळ प्रेरणादायी नाही, तर समाजातील अशा अनेक दुर्लक्षित मुलांसाठी आशेचा किरणही ठरते.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘तूफानातील दिवे’ कार्यक्रमाने पुणेकर मंत्रमुग्ध
Newsworldmarathi Pune: सुप्रसिद्ध लोकगायक डॉ. गणेश चंदनशिवे आणि अजय देहाडेंच्या उत्तुंग आणि पहाडी आवाजात प्रस्तुत झालेल्या एकाहून एक सरस अशा बुद्ध-भीमगीतांमुळे बुद्धपौर्णिनेमित्ताने आयोजित धम्म संध्या कार्यक्रमात उपस्थित उपासक-उपासिका यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे, परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून दीपक म्हस्के यांच्या संकल्पनेतून या धम्मसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.
सांगीतिकदृष्ट्या अत्यंत दर्जेदार असा हा धम्मसंध्या कार्यक्रम तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जनरल जोशी गेट येथील तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहारात ‘धम्मसंध्या’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु पराग काळकर, डॉ. विजय खरे, जितेंद्र पानपाटील, सत्यम गाडे यांच्यासह पुण्यातील बुद्धविहारांचे प्रमुख, तसेच राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, अधिकारी, तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धपौर्णिमेनिमित्ताने विहाराला आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती.
या वेळी डॉ. गणेश चंदनशिवे आणि अजय देहाडे यांनी उजाड रानी किमया केलीस मोठी, भीमा तुज प्रणाम कोटी-कोटी, गौतम बुद्धांचा संदेश सांगू चला रं, हे भीमराया रामजी तनया, द्यावी मज मती तव गुण गाया, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गल्लीन वाटन, भीम मोत्यांचा हार गं माय, भीम नंगी तलवार गं माय काळजावर कोरल नाव भिमा कोरगाव, पत्रात लिहिते रमा माझी चिंता न करता शिका, गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भिम का कमाल, अशी एकाहून एक सुरस गीते आपल्या सुमधूर कंठातून सादर केली. त्यांना तेव्हढीच तोलामोलाची साथसंगत वाद्यवृंदांनी केली. सर्व गाण्यांना उपस्थित रसिकांनी हात उंचावून व टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली.
यावेळी बोलताना डॉ. गणेश चांदनशीवे म्हणाले, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, कलावंत यांना व्यासपीठ देण्याचे काम परशुराम वाडेकर यांनी केले आहे. धम्म पहाट, धम्म संध्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सम्यक साहित्य संमेलन, संविधान दौड, संविधान सन्मान संमेलन अशा विविध उपक्रमातून वाडेकर करत असलेले कार्य कौतुकास्पद आणि आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाणारे आहे.
कार्यक्रमात उपस्थित सर्व अतिथी व उपासक-उपासिकांना प्रसाद म्हणून खीर वाटप करण्यात आली. अत्यंत सुरेल अशा गायनाने ही धम्मसंध्या उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेचा एक नवा उत्साह व आनंद देऊन गेली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव दीपक म्हस्के यांनी केले.
पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास : धीरज घाटे
Newsworldmarathi Pune: लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे मध्ये ६ आमदार निवडून देत पुण्यात भारतीय जनता पक्षाचे ५.५०लक्ष सदस्य नोंदणी करत भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला.
आज भारतीय जनता पार्टी च्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली या मध्ये घाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.
यावर बोलताना घाटे पुढे म्हणाले की,’ पक्षाने परत संधी देऊन जो विश्वास दाखवला तो सार्थ करून पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे या निवडी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण , केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे आभार घाटे यांनी मानले.
महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का; दीपक मानकरांचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मंगळवारी (१३ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सादर केला असून, आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
दीपक मानकर यांच्यासह रौनक जैन आणि शंतनू कुकडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या तपासानुसार, रेड हाऊस फाउंडेशनच्या बँक खात्यातून १.१८ कोटी रुपये दीपक मानकर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा पुरावा सापडला आहे. तसेच त्यांनी सादर केलेले जमिनीच्या विक्रीचे दस्तऐवज बनावट असल्याचे उघड झाले आहे.
शंतनू कुकडे, हे पक्षाचे माजी पदाधिकारी आहेत, ते सध्या बलात्कार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.
दीपक मानकर यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, “महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. पक्षावर अनावश्यक बदनामी येत असून, म्हणून मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे.” दरम्यान, पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी हा राजीनामा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी अडचण ठरू शकतो.
महाराष्ट्र हादरला…! प्रियसी नर्सला कोयत्याने संपवले, अन् रक्ताने माखलेल्या अंगाने प्रियकराने घेतला गळफास
Newsworldmarathi Parali: शहरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. कोयत्याने सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या केली, त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगाने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सुधारगड तालुक्यातील परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेखर दुधाणे व पौर्णिमा अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर शेखर दुधाणे आणि त्याची प्रेयसी पौर्णिमा यांच्यातील प्रेमसंबंध गावात सर्वश्रुत होते.परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये पौर्णिमा ही नर्स म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेखर नर्सिंग होममध्ये पोहोचला. त्याने पौर्णिमावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने रक्ताने माखलेल्या अंगाने तिथेच गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हि घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पंचनामा
करून पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांकडून कोयता आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शेखर याने प्रियसीची हत्या का केली? त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
अमानुष छळ…! आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईच्या मृत्यूनंतर पाच वर्षांची गतिमंद रिहाना वडिलांच्या अमानुष वागणुकीची शिकार झाली होती. बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात तिच्या व्यसनी बापाने तिला जनावरांच्या गोठ्यात तिच्या पायाला दोरी बांधून डांबून ठेवले होते. तसेच तिला अक्षरश: केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन तिचा अमानुष छळ केला.
वडिलांच्या अमानुष वागणुकीने जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून दत्तक घेण्याचा खूप प्रयत्न केला. सहा महिन्यांनंतर, सोमवारी रिहानाचा दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती गेवराईची रहिवाशी होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली होती. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे मोठ्या प्रमाणात हालहाल केले. जन्मदात्या पित्यानेच रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नव्हती. ती बोलूही शकत नव्हती.
दरम्यान, पैठणच्या हिना नामक महिलेला हे कृत्य समजले. हिना माहेरी गेलेली असताना तिला रिहानाचा सतत रडण्याचा आवाज येत असे. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर रिहाना तिला दिसली. रिहानाची अशी अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. तिने तिच्या वडिलांकडे रिहानाचा ताबा मागितला. निर्दयी बापाने बॉण्डवर लिहून देत, रिहानाला हिनाकडे सुपुर्द केले.
अचानक झालेल्या बदलामुळे, रिहानाचे वागणे बदलले…
हिनाच्या घरी आल्यानंतर माणसांमध्ये आलेल्या रिहानाच्या वागण्यात मोठा बदल घडला आहे. अधिक हिंस्त्र झालेली होती. इतरांना मारहाण करून, सतत आदळआपट करू लागली होती. त्यामुळे हिना यांनी हज हाऊसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडले. त्यावेळी खालिद यांनी तिच्यावर योग्य ते उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना संपर्क केला. तसेच मिरधे यांच्यासह अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव, सरिता कुंडारे, अंबिका दारुंटे, प्रियंका भिवसने, पूजा जाधव, मनीषा बनसोडे परळकर यांनी आश्रमात धाव घेत तिला ताब्यात घेतले.
दरम्यान, उपचार समुपदेशनानंतर रिहानाच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. ती थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे, पोलिसांनी सांगितले. महिला-बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांच्या सहकार्याने रिहानाची भारतीय सेवा केंद्र येथे राहण्याची व्यवस्था करून पुनर्वसन केले आहे.
न्यायमूर्ती बी. आर. गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश
Newsworldmarathi Delhi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. बी. आर. गवई म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यायमूर्ती गवई यांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी अधिकृत मंजुरी दिली होती.
न्यायमूर्ती गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीनंतर झाली. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ रोजी संपला. त्यानंतर १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई यांनी नव्या पदाची सूत्रे हाती घेतली.
त्यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असून तो १४ मे २०२५ पासून २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती गवई हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये दिलेल्या निर्णयांमुळे ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीने न्यायव्यवस्थेत सामाजिक समावेशाचे प्रतिकात्मक महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
न्यायमूर्ती गवई हे महाराष्ट्रातील असून त्यांच्या सरन्यायाधीश पदावर झालेल्या नियुक्तीचे विविध स्तरांवरून स्वागत होत आहे. न्यायव्यवस्थेतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ देशाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

