हृदयद्रावक…! अंगावर दगड पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ
Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सीना नदीच्या काठावर मित्रांसोबत खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलाच्या अंगावर दगड पडल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारात सोमवारी (दि. १२) दुपारी घडली. सार्थक नवनाथ गोलवड (वय ४ वर्ष, रा. शिरढोण, ता. नगर) असे मृत बालकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, सार्थक गोलवड हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शिरढोण गावामध्ये सीना नदीच्या काठावर खेळत असताना त्याच्या अंगावर दगड पडल्याने तो बेशुद्ध झाला. त्यास सुनील दरेकर यांनी दुपारी २.५०च्या सुमारास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांच्या अहवालावरून नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश लबडे करीत आहेत.
सासवड निबंधक कार्यालयात बनावट व्यक्तीद्वारे दस्त नोंदणी; चौकशीची मागणी
Newsworldmarathi Pune : सासवड येथील निबंधक कार्यालयात दस्त क्र. २५०१/२०२५ व २५०२/२०२५ हे बनावट व्यक्ती उभी करून नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी ब्रिगेडचे रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी संगनमत करून खोटे दस्त तयार केले असून, मूळ मालकाच्या नकळत बनावट व्यक्तीद्वारे दस्त नोंदणी केली आहे. अशा प्रकारे ‘वन डिस्ट्रिक्ट – वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा घेत पुण्यासह राज्यभरात फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. उदाहरणार्थ, भोर तालुक्यातील जमिनीचा दस्त तळेगाव ढमढेरे येथे नोंदवून मूळ मालकाची फसवणूक करण्यात आली.
या गैरप्रकारांमुळे नागरिकांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो. बोगस दस्त नोंदल्यावर मूळ मालकाला न्यायासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात लढावे लागते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. उप महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अंतर्गत चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. राज्यभरातील नोंदणी कार्यालयांची चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.– रोहन सुरवसे-पाटील अध्यक्ष, स्वाभिमानी ब्रिगेड संघटना
महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांचा उज्ज्वल निकाल; गुणवत्तेची परंपरा कायम
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. पुणे, कोळविहिरे, कोंढवा आणि बारामती येथील चारही शाखांचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचे परिश्रम अधोरेखित करणारा ठरला आहे.
अशोक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, टिळक रोड, पुणे या शाळेचा निकाल 93.33 टक्के लागला आहे.
या शाळेतील नाईक शौर्या पुष्कर हिने 97.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
गायकवाड आरव किशोर (90.80%) आणि देशपांडे विहान विशाल (90.20%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल मुख्याध्यापिका उर्मिला केशव भोसले यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
महर्षी वाल्मिक विद्यालय, कोळविहिरे या ग्रामीण भागातील शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थिनी मस्के नम्रता रोहिदास हिने 83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या यशामागे शाळेच्या शिक्षकवृंदासह मुख्याध्यापक अशोक चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे.
जडाबाई दुगड विद्यालय, कोंढवा या शाळेने 94.18 टक्के निकालाची नोंद करत उत्तम कामगिरी बजावली आहे.
मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेने हे यश संपादन केले.
शारदा निकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, बारामती या शाळेने 100 टक्के निकालाची नोंद केली असून विद्यार्थिनी खक्कल प्रतीक्षा महेश हिने 81.5 टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे.
मुख्याध्यापक खान शबान यांचे मार्गदर्शन शाळेच्या गुणवत्तापूर्ण यशामागे आहे.
या सर्व यशस्वी निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मोहनदादा जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे व प्रज्योत आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले.
संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे यांनी याप्रसंगी सांगितले, “निकाल ही केवळ शैक्षणिक टक्केवारी नव्हे, तर संस्थेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीचे प्रतीक आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.”
या यशस्वी निकालामुळे मंडळाच्या शाळा गुणवत्तेच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत असल्याचा विश्वास पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
चाटेच्या विद्यार्थ्यांचे यंदाही दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश : प्रा.फुलचंद चाटे
Newsworldmarathi Pune: फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश मिळाले आहे.महाराष्ट्रातील चाटे शिक्षण समुहाचा प्रत्येक विद्यार्थ्यी हा आजच्या दिवसाची वाट आतुरतेने बघत होता.कारण आत्मविश्वास सांगत होता.
चाटे म्हणजे यश आणि यश म्हणजे चाटे हे समीकरण साध्य करण्यासाठीच.आज दहावीचा निकाल लागल्यानंतर चाटे शिक्षण समुहाने काल सातारा रोड चाटे कोचिंग क्लासेस च्या शाखेवरती सत्कार समारंभ आयोजित केला होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे .प्रा.फुलचंद चाटे यांनी अभिनंदन केले, या वेली प्रा विजय बोबडे व ईतर उपस्थित होते.
दुपारी एक वा.निकाल पाहिल्यानंतर चाटेच्या प्रत्येक पालकांच्या चेहर्यावरील स्मितहास्य हेच सांगत होते कि चाटेचा पॅटर्न सक्सेसफुल झाल्यामुळेच आपल्या पाल्याचा निकाल उत्तम लागला आणि स्वप्नाची सुरूवात छान झाली.आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी एस.एस.सी बोर्ड चे उपस्थित गुणवंत विद्यार्थी पर्नवी कुलकर्णी 99.60% तेजस्वी सावंत 98.40% जाधव श्लोक 98.00% यदित काळे 97.80% बर्नवाला त्वीषा 97.80 अनुज तांबे 97.80 शिंदे दुर्वेश मुक्ता देशमुख 97.00% 96.40% दिक्षीत इशान 96.40% फाटक जाई 96.40% तनिष नलगे 95.80 मृनाली गावडे 95.80% सिध्दी तळे 95.60% पियुषा नाईक 95.60% व सी.बी.एस.ई बोर्ड मधून सृष्टी वाडकर 95.08% गार्गी घुटे 94.60% सावरदा ठाकरे 94.40% आयुष इंगळे 94.00% पुजा भोसले 93.60% अनिल कोल्हे 93.40% प्रज्वल जाधव 93.40% ओंकार सोनाकुल 93.00% सिंग सजल 92.80% अहिरराव इशान 92.40% बांगल पृथ्वीराज 92.40% तांबे ॠतुपर्ण 91.20% ताजवे सई 91.20% यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांना अभिनंदन करून दहावी नंतर पुढे काय? याबद्दलही मार्गदर्शन केले.आजचे हे सक्सेस हे एक/दोन दिवसांचे नसून नववी पासूनच शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत आहे व तुमच्यासारख्या पालकांनी दिलेली प्रेरणा आहे.त्यामुळे चाटे पॅटर्न आज फलित ठरला आहे.आजच्या निकालावरती न थांबता लगेच पुढचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अकरावी/बारावी नंतर च्या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला सर्वानी तयारीला लागणे गरजेचे आहे.
कारण दहावीच्या परीक्षेपेक्षा जेईई नीट सीईटी अशा उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धेत्मक परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो.अकरावी व बारावी साठी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घराजवळील आणि ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाते अशाठिकाणी अकरावी सायन्स चा प्रवेश घेणे गरजेचे आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणतात म्हणून नव्हे तर आपल्या आवडीनुसार विषय व दिशा ठरवा.प्रत्येकाला जीवनाच्या प्रवासात पुढे जायचे असेल तर आपण काय करणार आहोत हे अगोदर निश्चित केले पाहीजे.त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखा स्वत: मधील गुण ओळखा सकारात्मक विचार करा.स्वप्न साकार करण्यावर भर द्या वेळ कोणासाठी थांबत नाही.
त्यासाठी परीक्षेच्या काही दिवस अगोदर अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच दोन वर्ष अभ्यास करा प्रत्येक दिवस आपला आहे असं समजून तयारीला लागा यश तुमचेच आहे कारण तुमच्यासोबत चाटे शिक्षण समूह आहे चाटे शिक्षण समूह आहे.राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा व त्याचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि अकरावी बारावी सह जेईई नीट सीईटी एनडीए यासारख्या परीक्षेनंतर देशातील नामांकित संस्था आयआयटी एनआयटी बीआयटी व्हीआयटी आयआयएससी आयआयएसईआर एनआयएसईआर याबाबत ही पालकांना मौलिक मार्गदर्शन केले.चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे सर यांनी फोनद्वारे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
आजच्या सत्कार समारंभ प्रसंगी सातारा रोड बालाजी नगर शाखेवरती पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा.विजय बोबडे सर, प्राचार्य नवनीत राजपाल ,रणजीत जगताप , नामदेव माने शाखा व्यवस्थापक रत्नाकर सोनवणे श्री अनंतराव इंगळे विष्णु पालवे, प्रविण जावळे प्रा.सचिन ढाकणे, महेश ढबाले, गणेश ढाकणे, प्रा.प्रशांत जाधव इतर पुण्यातील सर्व शाखा व्यवस्थापक व आदी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
‘ना सिंदूर बचेगा.. ना सिंदूर लगानेवाली बचेगी’; राणा दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी
Newsworldmarathi Mumbai: ना सिंदूर बचेगा.. ना सिंदूर लगानेवाली बचेगी, हमारे पास तुम्हारी पल पल की जानकारी है, तुम्हे और पुरे हिंदुस्तानको जल्द खतम कर देंगे.. अशा शबदात अज्ञातांनी अमरावती बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
रविवारी मध्यरात्री उशिरा राणा दाम्पत्याला हे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स करण्यात आले असून याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राणा दाम्पत्याचा स्वीय सहाय्यक संदीप ससे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान राणा दाम्पत्याच्या अज्ञातांनी ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हे कॉल्स पाकिस्तानातील वेगवेगळ्या नंबरवरून आल्याची माहिती आहे.
आमदार रवी राणा यांना, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगानेवाली बचेगी, हमारे पास तुम्हारी पलपल की जानकारी हैं, तुम्हे और पुरे हिंदुस्तानको जल्द खतम कर देंगे, तुम्हारी माँ है हम उसको खाते हैं, थोडे दिन में ही धमाका बजने वाला है, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
माजी खासदार नवनीत राणा यांना ‘ना सिंदूर बचेगा ना तू सिंदूर लगानेवाली बचेगी, हमारे पास तुम्हारी और तुम्हारे खानदान की पुरी जानकारी है, बहुत जल्दी हिंदू शेरनी दिखेगी नहीं, तुझे बहोत जल्द खतम कर देंगे, हिंदू शेरनी कुछ दिनों की मेहमान हैं, अशी धमकी दिली.
अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
Newsworldmarathi Amritsar: पंजाबमधील अमृतसरमधील मजिठा भागात विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ६ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मजिठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अमृतसर पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाई सुरू आहे.
ही घटना सोमवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. रविवारी संध्याकाळी त्याच ठिकाणाहून दारू खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोमवारी सकाळीच काही मद्यपींचा मृत्यू झाला, परंतु हे नंतर कळविण्यात आले.
बनावट दारू पिण्यामुळे अनेक लोकांच्या मृत्यूबद्दल उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या, “येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. काही लोकांनी विषारी दारू पिली आहे. आम्हाला रात्रीपासून माहिती मिळत होती. आमचे वैद्यकीय पथक लोकांची तपासणी करत आहे.
ज्यांनी दारू पिली आहे त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. अशा घटना ५ गावांमध्ये उघडकीस आल्या आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला आहे, ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”, असं उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट
Newsworldmarathi Pune: बुद्धम् शरणम् गच्छामि…., साऱ्या विश्वाला बुद्ध हवा…, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले.. , साऱ्या विश्वाला बुद्ध हवा… अशा बुद्ध – धम्म गीतांनी आणि राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून बुद्ध – कबीर अन् तुकोबांच्या विचारांचा जागर करत बुद्ध पौर्णिमेची धम्म पहाट मंगलमय वातावरणात रंगली.
जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने ‘धम्मपहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे संपन्न झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, श्रामणेर, भंते यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पाठणाने धम्मपहाट कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहाटेच्या हलक्याशा गारव्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांनी वारकरी आणि बुद्ध विचारांचे नाते उलगडले. वारकरी समाजाचा पाया तथागत गौतम बुद्धाच्या विचारातच असल्याचे सांगताना त्यांनी जगदगुरु संत तुकारांच्या अभंगाचा बुद्ध तत्वज्ञानाशी असलेला संबंध आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांना सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला न्याय आणि समतेचा संदेश देणारे बुद्ध तत्वज्ञान व वारकरी संप्रदायातील संताच्या विचारातून आल्याचेही वाबळे महाराजांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात “बोलो जय भीम….., सरे रात काळी ……., भारत भू के क्रांती सूर्य को प्रणाम.., भीमरायाने किमया ही केली.., माझी आजी म्हणायची..” अशा एकाहून एक सरस बुद्ध – भीम गीतांचे सादरीकरण सा.रे.ग.म.प. फेम प्रसिद्ध पार्श्वगायक कुणाल वराळे, सा.रे.ग.म. फेम अनुष्का शिकतोडे, पार्श्वगायिका स्वप्नजा इंगोले, गायक संविधान खरात, गायक स्वप्निल जाधव आणि त्यांच्या वाद्यवृंदाने सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
धम्म पहाट कार्यक्रमाबद्दल बोलताना आयोजक परशुराम वाडेकर म्हणाले, यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 20 वे वर्षे आहे. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. त्याप्रमाणे पुणे शहारातही आम्ही धम्मपहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करीत आहोत. बुद्ध पौर्णिमेच्या काही तास आधी भारत – पाकिस्तान मधील युद्धबंदी चा निर्णय म्हणजे जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा हाच संदेश देणार आहे.
धम्म पहाट कार्यक्रमाची सांगता पाहेलगाम हल्ल्या तील मृतांना आणि त्यानंतर पाकच्या गोळीबारात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आणि राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन दीपक म्हस्के यांचे होते.
राज्यात दहावीचा निकाल ९४.१० टक्के; मागील वर्षाच्या तुलनेत १.७१ टक्क्यांची घट
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदाचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १.७१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षीचा निकाल ९५.८१ टक्के होता. यंदा एकूण १५ लाख 6० हजार 15४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ६८ हजार 58२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाने सर्वाधिक ९९.०२ टक्के निकालाची टक्केवारी नोंदवली आहे, तर नागपूर विभाग सर्वात खालोठा म्हणजेच ९२.४९ टक्के निकालासह अंतिम स्थानी आहे.
यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. मुलींचा निकाल ९५.५४ टक्के, तर मुलांचा निकाल ९९.७४ टक्के इतका आहे. राज्यभरातून ५८२९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, २८ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित केल्या जातील.
निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
पुण्यात व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या; स्वतःवर चाकूने केले वार
Newsworldmarathi Pune : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने चाकूने भोसकून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक ताणतणाव तसेच नैराश्याच्या गर्तेत सापडल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या तरुणावर गेल्या वर्षभरापासून उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी पहाटेच्या सुमारास वानवडीतील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात (एएफएमसी) ही घटना घडली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावरून पालकांना यासंदर्भात माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय-२०, रा. भाग्यनगर, बीड, मूळ रा. भोपाळ) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मूळचा बीडचा रहिवासी असून तो मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी तो गेल्या आठवड्यात पुण्यात आला होता. वानवडीतील लष्करी महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी पहाटे एएफएमसीच्या वसतिगृहातील प्रसाधनगृहात त्याने स्वतःवर चाकूने वार करून घेत आत्महत्या केली. उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर त्याबाबतची माहितीचे स्टेटस ठेवले होते. गेल्या वर्षभरापासून तो नैराश्यात होता. त्याच्यावर मानसोपचार सुरू होते, अशी माहिती त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी दिली. वानवडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
परळीतील बौद्ध कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींची शासकीय सेवेत भरती; घरकाम करणाऱ्या आईचे स्वप्न झाले साकार
Newsworldmarathi Parali: परळी शहरातील शिवाजीनगर भागातील एक सामान्य बौद्ध कुटुंब – पण मोठ्या जिद्दीचे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या तीन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी शासकीय नोकरी मिळवून संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोठ्या कष्टाने त्यांचे शिक्षण घडवणाऱ्या त्यांच्या आईवडिलांनी आज खऱ्या अर्थाने समाधानाचा श्वास घेतला आहे.
कदम कुटुंबातील मनिषा विजय कदम या ४० वर्षीय महिलेला चार अपत्यं आहेत. वंशाला दिवा पाहिजे या सामाजिक मानसिकतेमुळे तीन मुलींनंतर मुलगा झाल्यानंतर घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली. नवऱ्याच्या उत्पन्नाची तुटवडा असल्यामुळे मुलींचं शिक्षण थांबू नये म्हणून मनिषाताईंनी औष्णीक वीजनिर्मिती केंद्र वसाहतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरी धुणी, भांडी आणि स्वयंपाकाचं काम करत आपल्या मुलींचं शिक्षण सुरू ठेवलं. अवघ्या 10 बाय 25 फुटाच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबात शिकण्याची जिद्द मात्र मोठी होती.
मोठी मुलगी दिक्षा हिने दहावीत उत्तम गुण मिळवल्यानंतर तिला आयटीआय आणि इंजिनिअरिंगपर्यंत शिकवलं गेलं. ती सध्या मुंबई मेट्रोत 2019 पासून कार्यरत आहे. सोनाली आणि समिक्षा या दोघींचं प्राथमिक शिक्षण परळीत झालं. त्यानंतर त्यांना लातूर जिल्ह्यातील बावची येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेत दाखल करण्यात आलं. तिथं त्यांनी मेहनत घेऊन आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केला.
या तिन्ही बहिणींनी महापारेषण विभागात नुकत्याच झालेल्या भरतीत भाग घेतला होता. त्या भरतीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला असून, त्यामध्ये दिक्षाची निवड टेक्निशियन-२ व विद्युत सहायक पदासाठी, तर सोनाली व समिक्षा यांची निवड विद्युत सहायक पदासाठी झाली आहे.
शिक्षणासाठी आईने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याने मनिषा कदम यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. दिक्षा ही बावची येथील आश्रमशाळेत शिकली होती, तर सोनाली व समिक्षा या शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या यशामुळे त्यांच्या शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

