छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू; अनेक जण जखमी

Newsworldmarathi Chhatisgad: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावरील सारागावजवळ एका वेगवान ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ९ महिला, २ मुली, एक किशोरी आणि ६ महिन्यांच्या एका निष्पाप बाळाचा समावेश आहे. अपघातानंतर लगेचच जखमींना डॉ. बी. आर. येथे नेण्यात आले. त्यांना आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल आणि खरसोरा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छठी समारंभातून परतत असताना अपघात झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलरमधील सर्व लोक चटौड गावातील रहिवासी पुनीत साहू यांचे नातेवाईक होते, जे एका नवजात बाळाच्या छठी समारंभात सहभागी होऊन परतत होते. यावेळी हा भयानक अपघात घडला. पोलिस अधीक्षक लाल उम्मेद सिंह यांनी अपघाताची पुष्टी केली आणि सांगितले की, ट्रक खूप वेगाने जात होता आणि टक्कर झाली तेव्हा वाहन नियंत्रणाबाहेर गेले. जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रायपूरचे जिल्हाधिकारी डॉ. गौरव सिंह आणि आमदार गुरु खुशवंत साहेब रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले. उपचारात कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन आमदारांनी दिले. प्रशासन पूर्णपणे सक्रिय आहे. या अपघातामुळे राज्यातील रस्ते सुरक्षेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये छत्तीसगडमध्ये १४,८५३ रस्ते अपघात झाले, ज्यात ६,७५२ लोकांचा मृत्यू झाला आणि १२,५७३ लोक जखमी झाले.

भारत-पाकिस्तान तणावानंतर IPL 2025 लवकरच पुन्हा सुरू होणार; १६ किंवा १७ मेपासून सामने

Newsworldmarathi Mumbai : भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 स्पर्धा लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलचे सामने एक आठवड्याकरता थांबवले होते. मात्र, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आता आयपीएल पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, IPL पुन्हा १६ किंवा १७ मेपासून सुरू होऊ शकते. उर्वरित सामने चार वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाण्याची शक्यता आहे. पुन्हा सुरू होणाऱ्या स्पर्धेतील पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझी, खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि आयोजक यांना आयपीएल पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. यानंतर सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना परत बोलावण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा स्थगित झाल्याने चाहत्यांमध्ये काहीशी निराशा होती. मात्र आता IPL पुन्हा सुरू होणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

इयत्ता 11 वीच्या प्रवेश शुल्कात कपात ; विद्यापीठाने 229 महाविद्यालयांवर कारवाई

Newsworldmarathi Mumbai : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून, आता सर्व विभागांमध्ये समानपणे केवळ 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी मुंबईसाठी 225 रुपये आणि इतर विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारले जात होते. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मात्र, नॅक मूल्यांकन व एनबीएसाठी आवश्यक पूर्तता तसेच महाविद्यालय विकास समिती (सीडीसी) स्थापन न केल्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 229 महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच या महाविद्यालयांवर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना वेळोवेळी परिपत्रके, सूचना आणि स्मरणपत्रे देऊनही पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईबाबत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला असून, संबंधित महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर [http://mu.ac.in](http://mu.ac.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकरी आर्थिक संकटात

0
Newsworldmarathi Nashik : अवकाळी पाऊस आणि गारपीटामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता कांद्याच्या दराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, काही बाजारांमध्ये कांद्याचा दर थेट 900 ते 1,100 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांदा 1,000 रुपये क्विंटलपर्यंत खाली आला आहे. देशांतर्गत आवक वाढल्याने आणि निर्यात घटल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानकडे होणारी निर्यात थांबवण्यात आली. त्याचबरोबर बांगलादेशात 30 टक्क्यांनी जास्त कांद्याचं उत्पादन झालं असून, तिकडील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यातही कमी झाली आहे. या सगळ्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारे दर घसरले असून, लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याला 1,151 रुपये, नाशिकमध्ये 900 रुपये, येवल्यात केवळ 851 रुपये, तर मनमाड व पिंपळगाव बसवंत बाजारात 1,100 रुपये दर नोंदवला गेला आहे. सध्या नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता या संस्थांकडून सुरू होणाऱ्या खरेदीकडे लागले आहे. कांद्याची आवक अधिक असून मागणी कमी असल्याने दर घसरणे सुरूच आहे.

राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

0
Newsworldmarathi Pune : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून आकाशात अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत. आता हवामान विभागाने (IMD) पुन्हा नवा इशारा दिला असून, पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक आहे. या भागांतील शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे काही भागात शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागावर समुद्रसपाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान बदलामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे या भागातही हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यातील विविध भागांमध्ये अचानक पावसाचे सत्र सुरू होऊ शकते. यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, गरज नसताना बाहेर पडू नये, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Ahilyanagr Crime : पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडीतील घटना; आरोपी ठाण्यात हजर

Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खुनाची घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निघृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी (दि. ९) पहाटे उघडकीस आली. राणी सतीश खेडकर (वय २९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती सतीश भास्कर खेडकर (वय ३३) याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती सतीश खेडकर याने घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नी राणीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार केले. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी सतीश खेडकर स्वतःहून पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खेडकर याला दोन मुले असून ते सात आणि पाच वर्षांची आहेत. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे व पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. मृत मुलीचे वडील सुखदेव आप्पाजी ढाकणे (रा. हसनापूर ता. शेवगाव) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात सतीश भास्कर खेडकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांत तालुक्यात महिलांच्या खुनांच्या दोन घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आमचे पंतप्रधान पळपुटे, मोदींचे नाव घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही; पाकचे खासदार संतापले

Newsworldmarathi Delhi: India Pakistan Tension | पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताकडून ठोस प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय सैन्याच्या कारवाईचे तीव्र पडसाद पाकच्या संसदेत उमटताना दिसत आहेत. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पळपुटे असून त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्याची हिंमत दाखवली नाही, अशा शब्दांत पाकच्या खासदाराने टीका केली आहे. भारताला प्रत्युत्तर देण्यात पाकचे सैन्य कमी पडत असल्यामुळे देशाचे खासदार पंतप्रधानांवर तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. पाकचे खासदार शाहिद अहमद खट्टक हे नॅशनल असेम्ब्लीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर तुटून पडले. भारताच्या आक्रमक कारवाईवर शाहबाज यांनी कोणतेही निवेदन दिले नाही, असं ते म्हणाले. मला टिपू सुलतान यांचे एक वक्तव्य आवडते. ज्यात एका लष्कराचा सरदार वाघ असेल व त्याच्या सोबतीला कोल्हे असतील तर तो वाघासारखा लढतो. पण जर वाघांच्या लष्कराचा सरदार हा कोल्हा असेल तर तो लढू शकत नाही. परिणामी युद्धात पराभव अटळ असतो, अशा शब्दांत खट्टक यांनी संताप व्यक्त केला. सध्या सीमेवर भारताविरुद्ध लढणारा आपला जवान पंतप्रधानांकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे. म्हणून पंतप्रधान राजकीयदृष्ट्या तेवढाच खमक्या असावा. शत्रूचा सामना करण्याची त्याच्यात ताकद असावी. मात्र, जेव्हा आपले पंतप्रधान शाहबाज शरीफ पळपुटेपणा दाखवत असतील. ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव उच्चारण्याची हिंमतही दाखवू शकत नाहीत. तर मग तुम्ही सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या जवानांना काय संदेश देत आहात ? असा जळजळीत सवाल खासदार खट्टक यांनी केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ७०१ कोटींचा आराखडा तयार

0
Newsworldmarathi Pune : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभर पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जागतिक दर्जाचे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ज्ञानपीठाच्या उभारणीबाबत माहिती दिली. या वेळी हभप शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणी पवार, पुरुषोत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, “ज्ञानपीठ उभारण्याचे कार्य आपल्या हातून घडत आहे, ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानही यातच असावे.” या भव्य प्रकल्पासाठी ७०१ कोटी रुपयांचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. या ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात पोहोचवण्याचा हेतू आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याची माहितीही दिली. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ३९ गावांचे सांडपाणी शुद्ध करून इंद्रायणी नदीत सोडले जाईल. यामुळे नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.

पाकिस्तान नरमला; अखेर भारत-पाक युद्धाला पूर्णविराम

Newsworldmarathi Delhi : गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिल्यानंतर भारत सरकारनेही यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मिस्री यांनी स्पष्ट केलं की, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सीमारेषेवर मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये गोळीबार आणि हवाई हल्ल्यांची मालिका सुरू झाली होती. सीमारेषेवर सतत गोळीबार सुरु असतानाच, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही भागांत नागरिकांना स्थलांतरही करावं लागलं. युद्धजन्य परिस्थितीने आणखी गंभीर रूप धरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय शक्तींनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर दोन्ही देशांमध्ये शांततेचा मार्ग निवडण्यात आला आहे. शस्त्रसंधीच्या घोषणेमुळे आता सीमारेषेवर आणि दोन्ही देशांमध्ये सामान्य स्थिती परतण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

मोठा निर्णय…! वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षेचा आढावा

Newsworldmarathi Mumbai: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत मुख्यमंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. दरम्यान, राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री यांनी दिलेले काही प्रमुख निर्देश पुढीलप्रमाणे: मॉकड्रिल आणि वॉर रूम्स: प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉकड्रिल आयोजित करा. यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करा. ब्लॅकआऊट तयारी: हॉस्पिटलसोबत समन्वय ठेवून ब्लॅकआऊटवेळी आवश्यक ती सेवा सुरू राहील, याची व्यवस्था करा. गडद रंगाचे पडदे/काचा वापरून बाह्य प्रकाश पूर्णपणे रोखा. जनजागृती आणि माहिती: ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, याचे व्हिडीओ विद्यार्थ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण मोहीम राबवा. युनियन वॉर बुक आणि प्रशिक्षण: केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचा सखोल अभ्यास करा आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना याची माहिती द्या. सायबर देखरेख आणि कारवाई: पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियावर नजर ठेवावी. पाकिस्तानसमर्थक अथवा देशद्रोही पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. आपत्कालीन निधी: प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन खर्चासाठी निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. महत्वाचे प्रस्ताव एका तासात मंजूर केले जातील. महापालिका आणि सोसायट्यांचा समावेश: MMR परिसरातील सर्व महापालिकांची बैठक घेऊन त्यांना ब्लॅकआऊटसंदर्भात जागरूक करा. सोसायट्यांनाही सहभागी करा. सुरक्षा यंत्रणांची अधिक दक्षता: पोलिसांनी गस्त वाढवावी, कोंबिंग ऑपरेशन्स तीव्र करावीत. देशविरोधी कारवायांवर कठोर नजर ठेवा. सैनिकी हालचालींचे चित्रिकरण प्रतिबंधित: सैनिकी हालचालींचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करणे गुन्हा असून अशा प्रकरणांवर तात्काळ गुन्हे दाखल करा. सागरी सुरक्षा उपाय: गरजेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेऊन सागरी सुरक्षा बळकट करा. अधिकृत माहिती वितरण: नागरिकांपर्यंत अचूक, वेळेवर आणि प्रामाणिक माहिती पोहोचवण्यासाठी शासनाने माध्यम व्यवस्था उभारावी. सायबर ऑडिट: विद्युत, पाणीपुरवठा यांसारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन तात्काळ सायबर ऑडिट करून घ्या. संघटनांमधील समन्वय: मुंबईतील लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख तसेच कोस्टगार्ड यांना पुढील बैठकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द : राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, बृहन्‍मुंबई महापालिका आयुक्त, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रधान सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.