पहलगामचा तपास एनआयएच्या हाती, केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे एनआयए औपचारिकपणे या हल्ल्याचा तपास करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने हल्ला झाल्यापासून पहलगाममध्ये तळ ठोकला आहे. आता केंद्र सरकारने अधिकृतपणे संपूर्ण तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून या हल्ल्याशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती, केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून सखोल तपास सुरू आहे. पहलगमामधील हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी येथील सुरक्षेची जबाबदारी प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एनआयए लवकरच या हल्ल्याच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करेल. हल्ल्याचा कट कोणी व कुठे रचला? यामध्ये सहभागी दहशतवादी संघटना, त्यांची भूमिका, स्लीपर सेलचा संभाव्य धोका याविषयीचा तपास करून लवकरच गृह मंत्रालयाला अहवाल सादर करेल.
हल्ल्याचे गांभीर्य ओळखून घेतला निर्णय
एनआयएने या प्रकरणाशी संबंधित प्राथमिक माहिती गोळा केली आहे. जेणेकरून त्यांना त्यांचा तपास राष्ट्रीय पातळीवर पुढे नेता येईल. सुरुवातील जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु, हल्ल्याचे गांभीर्य, नागरिकांची सुरक्षितता, मोठा दहशतवादी कट व आगामी धोके लक्षात घेता गृह मंत्रालयाने या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. पहलगामधील हा हल्ला भारतातील सुरक्षा यंत्रणांपुढील मोठे आव्हान आहे. संरक्षण यंत्रणा व गुप्तचर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन येथे घुसून पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक मारले गेले. या हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे या हल्ल्याचा तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे हे संरक्षण यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. तसेच तपास यंत्रणांना त्यांची कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश; २७ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले सोने मिळाले परत
Newsworldmarathi Mumbai: पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात विविध गुन्ह्यांची यशस्वी उकल करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवला आहे. आता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल २७ वर्षांपूर्वी जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘मुद्देमाल निर्गती मोहिमे’ अंतर्गत १९९७ मध्ये जप्त केलेले १७.५० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मूळ मालक विनोदकुमार जीव लाल शहा (रा. दादर, मुंबई) यांना परत मिळाले.
धीरज विनोदकुमार शहा व विनोदकुमार जीव लाल शहा यांनी मुद्देमाल परत मिळवण्यासाठी करण्यात आलेले अर्ज, संबंधित व्यक्तींचे निधन आणि न्यायालयीन प्रक्रिया अशा विविध टप्प्यांमुळे प्रकरण रखडले होते. २०१७ मध्ये निर्गतीचे आदेश झाले असतानाही संबंधित व्यक्तींना त्याची माहिती नव्हती.
सहा. पोलीस आयुक्त संजय ऐनुपरे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे व त्यांच्या पथकातील मपोहवा ज्योती दुधाने व मपोकॉ सुशिला सवार यांनी अथक परिश्रम घेऊन मुंबईतून विनोदकुमार यांचा शोध घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अखेर त्यांच्याकडे हा मौल्यवान मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
आपले वाडवडिलांचे पिढीजात दागिने परत मिळाल्याने विनोदकुमार जीव लाल शहा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांनी संपूर्ण पोलीस विभागाचे मनापासून आभार मानले.
महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करणार; केंद्राकडून 10 लाख घरांना मान्यता? मुख्यमंत्र्यांची माहिती
Newsworldmarathi Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील यशदा येथे ‘ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे’, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
तसेच, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना म्हणाले की, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील. 12,500 कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आरोग्य क्षेत्रात राज्याची मोठी गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस
आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी 5 वर्षांमध्ये आपल्याला नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक 5 किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. ‘लखपती दीदी’सारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
Newsworldmarathi Pune :जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांचा मृत्यू झाला होता. गनबोटे आणि जगदाळे या दोन्ही पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून, आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धीर दिला.
याप्रसंगी गनबोटे यांच्या कोंढवा येथील गंगानगरच्या घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी
मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. या वेळी गनबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेऊन दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतला. दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभगनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. गनबोटे आणि जगदाळे दोघे जिवलग मित्र होते.
हिंदुंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान; आशिष शेलार यांची टीका
Newsworldmarathi Mumbai : संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, न्यायालयाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदुंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, अशी टीका शनिवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली.
पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहाराविरोधात भारतीय जनता पक्षाच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठचे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मीरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता आदी उपस्थित होते. प. बंगालमध्ये हिंदुंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजप बंगाली प्रकोष्ठच्या वतीने या वेळी करण्यात आली.
या वेळी अॅड. शेलार म्हणाले की, ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निघृण अत्याचाराविरोधात भाजप उभी आहे. आतंकवादाला धर्म नसतो असे म्हणतात, पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात ? असा सवाल त्यांनी केला. प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून, तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुर्शिदाबाद घटना अत्यंत निंदनीय आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदुंना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी शनिवारी भाजप बंगाली प्रकोष्ठच्या वतीने आंदोलनावेळी करण्यात आली.
खळबळजनक…! अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडक
Newsworldmarathi Mumbai : मुंबईच्या नेरूळमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गरोदर राहिलेली पीडित मुलगी प्रसूत झाली आहे. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात बलात्कारासह पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. यामुळे अल्पवयीन मुलाचे पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. गतऑगस्ट महिन्यामध्ये अल्पवयीन मुलगा पीडितेच्या घरी गेला होता. त्यावेळी घरामध्ये पीडित मुलगी एकटी असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केले.
त्यानंतरदेखील या अल्पवयीन मुलाने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली, मात्र याबाबतची माहिती पीडित मुलीने आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवली होती. चार दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखत होते. त्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यामुळे कुटुंबीयांकडून पीडित मुलीला सोलापूर येथील आपल्या मूळगावी नेण्यात आले.
त्यानंतर पीडित मुलगी प्रसूत झाली. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मुलगा हा नातेवाईकच असल्याचे समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पंढरपूर शहर पोलिसांनी सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी नेरूळ पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
Mumbai Crime : शरीरसंबंधासाठी अल्पवयीन मुलीची हत्या; मृतदेह फेकला डोंगरात
Newsworldmarathi Mumbai : मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिरवणे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शरीरसंबंधासाठी १२ वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बेपत्ता मुलीचा मृतदेह गुरुवारी उशिरा एमआयडीसीतील डोंगराळ भागात सापडला. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तपास करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक अल्पवयीन मुलगी शिरवणे एमआयडीसीतील एकाच भागात राहण्यास आहेत. त्यामुळे या दोघांची चांगली ओळख होती. अल्पवयीन मुलाने डोंगराळ भागात मुलीकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, नकार दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर झालेल्या भांडणात मुलाने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.
त्यानंतर त्याने मुलीचा मोबाईल सोबत घेऊन त्या ठिकाणावरून पळ काढला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीवरून तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला होता. या शोधमोहिमेदरम्यान रात्री मोबाईल परत देण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अल्पवयीन मुलाने हत्या केलेल्या मुलीचा मोबाईल रस्त्यावर भेटल्याचे सांगून तिच्या कुटुंबीयांना रात्री आणून दिला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मुलीच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला. या तपासात मुलगा खोटी माहिती देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
‘वेळ आलीय एकत्र येण्याची… ‘ ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक पोस्ट; उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना साद…
Newsworldmarathi Mumbai : मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक यासाठी तयार आहेत, अशी समाजमाध्यमावर पोस्ट करत ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला पुन्हा एकदा साद घातली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची जोरात सुरू झालेली चर्चा ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्यामुळे काहीशी थंडावलेली दिसत होती. मात्र, ही पोस्ट करत शिवसेनेने (ठाकरे) पुन्हा एकदा हवा भरल्याचे दिसत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या समाजमाध्यमावरील अधिकृत अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या फोटोसह शेअर केलेल्या या फोटोमध्ये ‘वेळ आलीय, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी,’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार शिवसैनिकांचा (ठाकरे) असल्याचे सांगणाऱ्या या पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीसाठी निमंत्रण दिले असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. असे असले तरी एकत्र येण्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे आमच्यातील भांडण आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. ते बाजूला ठेवून एकत्र राहणे ही फार काही कठीण गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या कल्याणाच्या मार्गात माझा अहंकार आडवा येऊ देणार नाही. परंतु हा विषय माझ्या एकट्याच्या इच्छेचा नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील तत्काळ त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज ठाकरे यांचा प्रस्ताव स्वीकारताना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास सहमती दर्शवली होती. माझे कधीही मतभेद नव्हते. तरीही मी सर्व वाद बाजूला ठेवत एकत्र येण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं होत. त्यानंतर शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Ajit Pawar News : परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकला चुना; नेमकं काय घडलं? घ्या जाणून
Newsworldmarathi Parbhani : ‘एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र राज्य किसान सभा, युवक काँग्रेस आणि भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी जाताना त्यांच्या ताफ्यावर चुना फेकल्याची घटना घडली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. पवार यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व पीक विमा घोटाळ्यात सहभागींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी चुना फेक आंदोलन करण्यात आले.
पोखर्णी नृसिंह येथे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री पवार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी येत होते. तेव्हा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत युवक काँग्रेसचे अमोल जाधव, किसान सभेचे शिवाजी कदम, काँग्रेसचे रोहिदास बोबडे, सीपीआयचे शेख अब्दुल, स्वराज्य इंडियाचे गोविंद गिरी, यांना ताब्यात घेतले.
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच महाराष्ट्राच्या मतदारांना चुना लावला आहे. वास्तविक पाहता पीक विमा कंपन्यांनी मागील पाच वर्षांत ५० हजार कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात दररोज पाच ते सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अर्थ मंत्रालयाने सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात करून राज्यातील मागासवर्गीय समुदायाला चुना लावला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
Mumbai Crime : वाढदिवशीच मुलीची हत्या करून आईची आत्महत्या; घटनेने परिसरात खळबळ
Newsworldmarathi Mumbai : तळोजा फेस- १ मध्ये विवाहितेने आपल्या ४ वर्षीय मुलीची उशीच्या सहाय्याने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसिक तणावामुळे आलेल्या नैराश्यातून विवाहितेने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेतील मुलीचा गुरुवारी वाढदिवस होता. तळोजातील मृत विवाहितेचे नाव सोनम अभिषेक केणी वय-३०) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनम, पती अभिषेक केणी व मुलीसोबत पेठाली गावात राहत होती. सोनम गुरुवारी दुपारी जेवण केल्यानंतर बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेली होती. मुलीच्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी अभिषेक दुपारी बाहेर गेला होता. याच कालावधीत सोनमने आपल्या मुलीची उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर तिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी सोनमच्या पतीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. मात्र, ती फोन उचलत नसल्याने त्याने घरी धाव घेतली. त्यानंतर त्याने बंद असलेले बेडरुम उघडून पाहणी केली असता, सोनम गळफास घेतलेल्या स्थितीत, तर मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यामुळे त्याने तत्काळ दोघांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना दाखलपूर्व मृत घोषित केले.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी सोनम गरोदर असताना, तिच्या मुलीचा जन्मताच मृत्यू झाला होता. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली आली होती. तसेच तिच्यावर उपचारसुद्धा सुरू होते. मात्र, मानसिक तणाव वाढल्याने गुरुवारी दुपारी तिने नैराश्यातून मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सोनमने हे कृत्य करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली असून, त्यात तिने मला माफ करा, असा मजकूर लिहून ठेवला आहे.

