देसाई कनिष्ठ महाविद्यालयात ‘जलसा’ सांस्कृतिक सप्ताह
Newsworldmarathi Pune : द पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरिभाई व्ही. देसाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘जलसा’ या सांस्कृतिक सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेशभाई शहा यांच्या शुभहस्ते या सांस्कृतिक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
या सांस्कृतिक सप्ताहांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचे अनावरण याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या मनोगतात कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक सप्ताहात जास्तीत जास्त सहभाग घेण्यास प्रेरित केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेशभाई शहा यांनी आपल्या संबोधनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करीत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. राजश्री पटवर्धन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख श्वेता परदेशी, पर्यवेक्षिका स्मिता तेंडुलकर, पर्यवेक्षिका डॉ. मंजू राकेश तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यलयातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. अपर्णा नरके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर जया शिंगोरे यांनी आभारप्रदर्शन केले.
प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणचा दणदणीत विजय
Newsworldmarathi Pune : प्रो कबड्डी लीगमध्ये यापूर्वीच आव्हान गमावलेल्या बंगळुरु बुल्स संघाला आणखी निस्तेज करताना एकामागून एक चार लोण देत पुणेरी पलटणने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ५६-१७ असा दणदणीत विजय मिळविला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांच्या चढायांना गौरव खत्री आणि अमन यांच्या बचावातील हाय फाईव्हची सुरेख साथ मिळाली. प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले.
बंगळुरु संघासाठी लीगमध्ये काहीच आव्हान उरलेले नाही. पण, त्यानंतरही त्यांच्या खेळाडूंनी सामन्यात खेळण्याची साधी मानसिकताही दाखवली नाही. तुलनेत पलटणच्या प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोख बजावली. पंकजने चढाईत ५, मोहित आणि आकाश शिंदेने ८ गुणांची कमाई केली. या तिघांच्या चढाया कमी पडल्या म्हणून की काय आर्यवर्धन नवलेने एक मिनिट शिल्लक असताना एका चढाईत पाच गुणांची कमाई केली. गौरवने ६ आणि अमनने ५ गुणांची कमाई करुन बचावाची बाजू समर्थपणे सांभाळली. सर्वोत्तम सांघिक खेळ हे पलटणच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले असले, तरी संपूर्ण सामन्यात बचाव भक्कम असूनही त्यांनी परदीप नरवालला शांत ठेवण्यात मिळविलेले यश महत्वाचे ठरले. बंगळुरु कडून परदीपने सात गुणांची कमाई केली.
पूर्वार्धात ढासळलेल्या बंगुळुर संघावरील आपली पकड अधिक घट्ट करताना पलटणने उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटाला बंगळुरु संघावर तिसरा लोण चढवला. यानंतर पलटणचा प्रत्येक चढाईला गुण, बचावात गुण हा वेग उत्तरार्धाच्या पहिल्या सत्रात कायम राहिला. बंगळुरु बुल्स संघ अक्षरशः निष्प्रभ झाला होता. पहिले सत्र संपताना बंगळुरुला आणखी एक लोण स्विकारावा लागला. तेव्हा पलटणने ४३-१२ अशी ३१ गुणांची मोठी आघाडी घेत उत्तरार्धाचे अखेरचे सत्र औपचारिक राहणार हे स्पष्ट केले. अखेरच्या पाच मिनिटांत पलटण संघाने राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी देत चार खेळाडू बदलले. याचा फायदा घेताना परदीप नरवालने अव्वल चढाई करत तीन गुणांची कमाई केली आणि हाच काय तो बंगळुरु संघासाठीचा सामन्यातील सर्वोत्तम क्षण ठरला. गुणांची कमाई कायम राखत पलटण संघाने दोन मिनिट शिल्लक असताना गुणांचे अर्धशतक साजरे केले. आर्यवर्धन नवलेने शानदार उडी घेत एकाच चढाईत पाच गुणांची कमाई करुन आधीच खचलेल्या बंगळुरुच्या जखमेवर मीठ चोळले.
आव्हान संपुष्टात आलेल्या बंगळुरु बुल्सविरुद्ध खेळताना पुणेरी पलटणच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले नाही. बंगुळुरुच्या एकाही खेळाडूची देहबोली आपण सामना खेळतोय अशी नव्हती. घरच्या मैदानावर अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या पलटण संघाने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांनी आपल्या चढाया चोख केल्या आणि अमन, गैरव खत्रीने बचावाची बाजू तेवढ्याच ताकदीने सांभाळली. पूर्वार्धातच दोन लोण चढवत पुणेरी पलटणने आपले वर्चस्व राखले. मध्यंतराचा २६-७ असा गुणफलक पुणेरी पलटणचे वर्चस्व आणि विजय निश्चित करणारा होता. पूर्वार्धाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरु संघाला केवळ एका गुणाची कमाई करता आली. एकाही आघाडीवर बंगळुरुचे खेळाडू प्रयत्न करताना दिसून आले नाहीत
माजी सैनिकांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
Newsworldmarathi Pune : सेवानिवृत्त फौजी 355 लोकांची 30 कोटी पेक्षा जास्त पैशांची फसवणूक एस. जी. ट्रेडिंग कंपनीने केली आहे. त्याबाबत कायदेशीर फिर्याद 3 ऑगस्ट 2024 रोजी मुंडवा पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.परंतु अजूनही न्याय मिळाला नसल्याने माजी सैनिक कुटुंबियासह आंदोलनास बसले आहेत.पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून त्या विरोधात सर्व सेवानिवृत्त माजी सैनिक लोक आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करीत न्याय मिळण्याची मागणी करीत आहेत.
सदर केस बाबत आम्ही सर्व फिर्यादी यांनी वारंवार आर्थिक गुन्हे शाखा पुणे अधिकाऱ्यांना भेटून आमची सर्व हकीकत त्यांच्यासमोर मांडली आहे. एकूण 353 लोक या केस मध्ये फिर्यादी असून सर्वांच्या जाब जवाब झालेले आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी शुभांगी मोहिते, निकिता शितोळे, सौरभ गजरे, गंगाधर मुळे, मुख्य आरोपी सुरेश गाडीवडार, सौ. किरण दलाल अमर शेलार, संकल्प चव्हाण, संजय सिंग, सुभाष गाडीवडर व इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखा यांनी आज रोजी पर्यंत कोणतीही विचारपूस किंवा तपास केले नाही व यापैकी कोणत्याही आरोपींना आज रोजी पर्यंत ताब्यात सुद्धा घेतले नाही अशी खात्रीलायक माहिती आमच्यापर्यंत आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी यांना आज रोजी पर्यंत का ताब्यात घेतले गेले नाही व वरील सर्व संघटित गुन्हेगारांना का मोकळा सोडले गेले आरोपींना अटक करून न्यायालय पुढे सादर करण्यासाठी का विलंब लावला जात आहे. याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे सदर केसचे इन्वेस्टीगेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आम्हाला समाधानकारक उत्तर दिले जात नाही.
आम्ही सर्व देशाची सेवा करून फौज मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रायव्हेट फंडाच्या मिळालेल्या पैशाची पूर्णपणे एस. जी. ट्रेडिंग कंपनी कडे गुंतवणूक केली होती. सदर कंपनीने आमची मोठी फसवणूक केल्यामुळे आम्ही सर्व गुंतवणूकदार यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही सर्वांनी पुणे पोलिसांकडून केली होती मात्र ते पूर्ण होत नसल्याचे आज रोजी आम्हाला दिसून येत आहे. दिलेल्या फिर्यादनुसार सर्व आरोपींना अटक न केल्यामुळे पुणे पोलिसावर आमचा संशय वाढत आहे.
एस.जी. ट्रेडिंग कंपनीचे मालक व सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांन त्वरित अटक करून न्यायालय पुढे सादर करावा संबंधित सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदार यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
यावेळी पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार, माजी सैनिक देवेंदू कुमार माईति, सौ अलका शिंदे माजी सैनिक यांची पत्नी, लालसिंग बिजनोई, निकम कमलाकर, सौ मुक्ता चव्हाण, महेश बागडे, रजनीकांत मोरे, इत्यादी माजी सैनिक पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
नागपूरकरांना हुडहुडी
Newsworldmarathi Nagpur : नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत जाऊन, हिवाळ्याचं अस्सल रूप दिसत आहे.
कडाक्याच्या झोंबणाऱ्या थंडीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पडू लागला आहे. सकाळी आणि संध्याकाळी शालेय विद्यार्थी आणि कामगार गरम कपडे घालून घरातून बाहेर पडत आहेत. याशिवाय, दिवसभरातही नागरिकांना गरम कपडे घालूनच बाहेर पडावं लागत आहे. यामुळे दुकानं, शाळा, ऑफिस आणि इतर ठिकाणी थंडीमुळे सामान्य जनजीवन थोडं कठीण झालं आहे.
नागपूरमध्ये थंडीचा प्रभाव आता स्पष्टपणे दिसून येत आहे. वाऱ्यांचा प्रभाव असा आहे की, शहरातील तापमान १० अंशांच्या खाली गेलं आहे. गुरुवारी, किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेले. त्यामुळे, नागपूर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड शहर ठरलं आहे. या थंडीत सूर्य उगवल्यानंतरही लोकांना घराबाहेर पडणं कठीण होऊन गेलं आहे. लोक दिवसाही गरम कपडे घालून बाहेर पडत आहेत, हे याचे प्रमाण आहे.
देवा भाऊच्या बालेकिल्ल्यात उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार
Newsworldmarathi Nagpur महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ( देवाभाऊ) च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी चार वाजता नागपूर या ठिकाणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यानंतर मुंबईच्या ऐवजी आता शपथविधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर या ठिकाणी पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार निवडून आले. 132 उमेदवारांसह भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडील तीनही घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. दरम्यान राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे. दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे विशेष म्हणजे यावेळी गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे सरकारकडे अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे यावेळी त्यांना या खात्यावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था झाली आहे, मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यांचे ढाचे तयार आहेत, उद्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली की बंगल्यांवर नेमप्लेट लावण्यात येईल. निवास समितीची आजंच बैठक झाली, या बैठकीमध्ये मंत्र्यांसाठी बंगले तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे.
अबब! पुणे ते नागपूर विमानाचे चाळीस हजारी उड्डाण
Newsworldmarathi Pune : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर या ठिकाणी होत असल्याने अनेक जण आपल्या लाडक्या नेत्याला मंत्री होताना पाहण्यासाठी विमानाने जाणे पसंत करत आहेत. पुणे नागपूर दर अचानक चाळीस हजार रुपयावर पोहोचल्याने अनेक जण आपल्या नेत्याला शुभचिंतन करण्यासाठी समृद्धीचे मार्गाने जाणे पसंत करत आहेत.
शुक्रवारी दुपारी नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची बातमी आल्यानंतर अचानक या विमानाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे.
दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे.
भक्तिमय वातावरणात श्री सूर्यमुखी गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न
Newsworldmarathi Pune : दत्तजयंती निमित्त भवानी पेठ टिंबर मार्केट, पुणे येथे 1999 मध्ये बांधलेले श्री सूर्यमुखी गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण करण्यात आले. याप्रसंगी भगवान गुरुदेव दत्त, श्रीराम, भगवान हनुमान आणि शनि भगवान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंडित अरुण शास्त्री यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि सर्व धार्मिक विधी पार पडले.
जीर्णोद्धारासाठी उद्योगपती पुनित बालन, मा. नगरसेवक दीपक मानकर, आणि मा. पवन बन्सल यांचे सहकार्य लाभले. स्वर्गीय इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ उद्योगपती पुनित बालन यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी विशेष मदत केली.
याप्रसंगी पुणे पोलीस सहआयुक्त मा. रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, मा. राज जैन राणावत, मा. महाराज मानकर, मा. वीरेंद्र किराड, मा. अभय छाजेड, मा. जया किराड, मा. सदानंद शेट्टी, आणि मा. सुजाता शेट्टी उपस्थित होते.
हे मंदिर श्री गुरुदेव दत्त फाउंडेशन आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशन यांच्या सौजन्याने उभारण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा : नाना पटोले
Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं आहे. मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करा, मला पदावरून मुक्त करा असे पत्रच नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याची इच्छा ही महाराष्ट्रातील काँग्रेससाठी महत्त्वाची घटना मानली जात आहे. या घटनेमुळे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे नियोजन यावर प्रकाश पडतो.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, ज्यामुळे काँग्रेसवर टीका झाली.
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून चार वर्षांत पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे पुस्तक महोत्सवात होणार विश्वविक्रम : राजेश पांडे
Newsworldmarathi Pune : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आज शनिवारपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवात एकूण पाच विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यातीलच दुसरा विश्वविक्रम आज शनिवारी १४ डिसेंबर रोजी करण्यात येईल. अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक आणि परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुरीश्र्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने गिनेज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे.
‘एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ अशा विषयाला अनुसरून हा विश्वविक्रम होणार आहे. हा विश्वविक्रम दुपारी बारा वाजता करण्याला सुरुवात होईल. साधारण चार वाजताच्या सुमारास पूर्ण होईल. गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रशासनाने यंदा ही नवीन श्रेणी खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे सदस्य मिलिंद वेर्लेकर यांनी केले आहे.
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर
Newsworldmarathi Pune : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार २०२४-२५ शुक्रवार ( दि १३ डिसेंबर) जाहीर करण्यात आले. यंदा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सोलापूर येथील गौतम ट्रेडर्सचे संचालक वस्तीमलजी तखतमलजी संकलेचा, जिल्हास्तरीय पुरस्कार राजगुरुनगरचे संगम कलेक्शनचे संचालक विजयकुमारजी मोतीलालजी भन्साळी, तर पुणे शहरासाठी रामकृष्ण ऑईल मिलचे संचालक आनंदजी श्रवणकुमारजी पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच चेंबरच्या सभासदांमधून दिल्या जाणारे पुरस्कार पुरणचंद अॅन्ड सन्स्चे संचालक सतीश पुरणचंदजी गुप्ता , तर युवा व्यापारी पुरस्कार मे. आर. बीज ड्रायफ्रूट्सचे संचालक राजीव भिमराजजी बाठिया यांना जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार संजय ऐलवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे तिसावे वर्ष असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटर, “क्रोम बॅक्वेट”कोंढवा, पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरत ( गुजरात) चे राज्यसभा खासदार गोविंदजी ढोलकिया भूषविणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ललित गांधी (राज्यमंत्री दर्जा, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष) आणि सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजीक कार्याकर्तेप्रकाश धोका उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी शुक्रवारी चेंबर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रविण चोरबेले, नवीन गोयल, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, संदीप शहा तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

