चंद्रकांत दादांनी वाचले ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’
Newsworld marathi : Pune पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित ‘शांतता! पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी आपापल्या ठिकाणी थांबून आवडीची पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला. विशेषतः गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी परिसरात या उपक्रमाची रंगत अधिक वाढली.
आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या उपक्रमात सहभागी होत आपला वेळ पुस्तक वाचनासाठी दिला. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे लिखित ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ हा चरित्रग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्यांनी काही पाने वाचून झाल्यावर प्रेरणादायी मानून संपूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी तो सोबत घेतला. शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाचे चंद्रकांत दादांनी कौतुक केले.
नारायण मूर्ती यांच्या हस्ते होणार अलोक काळे यांचा सन्मान
Newsworld Marathi Pune : जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार यावर्षी पुण्यातील मॅग्नस व्हेंचर्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक असलेले उद्योजक आलोक काळे यांना जाहीर झाला आहे.’सस्टेनेबिलिटी स्टार्ट-अप’ या विभागामध्ये काळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून येत्या २० डिसेंबर रोजी हॉटेल शेरेटन ग्रँड येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात पद्मविभूषण नारायण मूर्ती यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येईल. जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या या सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार समितीचे अध्यक्ष व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमसीसीआयएच्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, हनीवेलचे व्यवस्थापकीय संचालक आशिष गायकवाड, फाईव्ह एफचे अध्यक्ष गणेश नटराजन व जे पी श्रॉफ आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील.
बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असताना या क्षेत्राचा विकास अधिक शाश्वत करण्याबरोबरच शाश्वततेकडे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यासाठी आलोक काळे हे गेली दहा वर्ष संशोधन विकासात काम करीत आहेत, त्यांच्या याच प्रयत्नांचा सन्मान म्हणून त्यांना यावर्षीच्या सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
काळे यांनी जगातील सर्वात कमी कार्बन फूटप्रिंट असलेल्या आयजीबीसी ग्रीनप्रो आणि जीआरआयएचएने प्रमाणित केलेल्या पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी अथक परिश्रम केले असून लँडफिलमधून औद्योगिक कचरा वळविणे आणि बांधकाम उद्योगाचे नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नस व्हेंचर्सने मागील तीन वर्षांत आपल्या उद्योगात अनेक पटींनी वाढ केली असून कंपनीच्या वतीने शाश्वत अशी टाईल्स, स्टोन अडेझिव्ह, प्लास्टर, ब्लॉक ज्योंटिंग मोर्टर, ग्राऊट्स व स्क्रिड्स यांसारखी टिकाऊ उत्पादने देखील बाजारात आणण्यात आली आहेत. सध्या या उत्पादनांना पुण्यातील अग्रगण्य बांधकाम कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे महत्त्वाचे.
सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराबद्दल – २०२३ सालापासून जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने औद्योगिक विकास व पर्यावरण संवर्धन अशा दोन्हीचा समतोल साधत शाश्वत व नाविन्यपूर्ण प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. याशिवाय पर्यावरण-जागरूक अशा व्यावसायिक मॉडेलची गरज देखील अधोरेखित केली जाते.
खडकी शिक्षण संस्थेचा ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात सहभाग
Newsworld Pune : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने दिनांक 14 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित *पुस्तक महोत्सवा*त खडकी शिक्षण संस्थेने उत्साहाने सहभाग घेतला आहे.
यावेळी संस्थाध्यक्ष श्री. कृष्ण कुमार गोयल यांनी उपस्थित विद्यार्थ्यां, शिक्षकां, व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी “पुस्तकाचा ध्यास म्हणजे जीवनाचा विकास आहे,” असे सांगत वाचनाची महती विशद केली. प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासत आपल्या जीवनाला नवा आयाम द्यावा, असे ते म्हणाले.
प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात होणाऱ्या पुस्तक महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना या महोत्सवात सहभागी होऊन वाचन संस्कृतीचा आनंद लुटण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात खडकी शिक्षण संस्थेच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपला उत्साह व्यक्त केला.
पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीस चालना मिळणार असून, विद्यार्थी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेत अभिनव उपक्रम
Newsworld Pune : एका चांगल्या कामाची सुरुवात अनेक चांगल्या कामांची प्रेरणा ठरते अशाच एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात वाकड येथे विजू शेठ जगताप व विराज रेणुसे यांनी उभारलेल्या जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेमध्ये झाली. जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेमध्ये आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची सुरुवात संस्थेने केली.
या संस्थेमध्ये प्रथित यश जैन समाज बांधव एकत्र येऊन आदर्शवत असे काम करत आहेत स्वतः देशी गायींचे संगोपन करून त्याचे दूध सर्व रहिवाशांना देतात इथे राहणारे उच्चशिक्षित जैन बांधव पावसाचे पाणी साठवून ते फक्त पिण्यासाठी वापरतात रोज लागणारे दूध व भाजीपाला स्वतः पिकवतात आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी नव्याने आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचा शुभारंभ हे सुद्धा त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे चातुर्मासामध्ये विविध धार्मिक उपक्रम येथे चालू असतात व आपली संस्कृती जपण्याचे काम या संस्थेमध्ये पदाधिकारी करत असतात सोसायटीमध्ये मकराना दगडामध्ये भव्य दिव्य मंदिराचे काम सुद्धा सुरू आहे.
सगळ्यांना आदर्शवत वाटणारे काम या सोसायटीत एकोप्याने सुरू आहे अशाच प्रकारचे आदर्श गृह प्रकल्प भविष्यात उभे रहावेत ही काळाची गरज आहे .असे यावेळी डॉ.भाषा प्रभू पंकज महाराज गावडे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी माझ्यासह विजय शेठ जगताप, चंदूकाका सराफ चे प्रोप्रायटर अतुल शहा, शितल दोशी, विलासराव भंणगे, नेमीचंद सोळंकी, आयुर्वेदाचार्य मुके सर , डॉ. अभय जमदग्नी, चौगुले काका व सर्व पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राजक्ताने हातावर गोंदवले ‘या’ खास व्यक्तीचं नाव
Newsworld Mumbai : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे.प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलंय. हे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो. राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं. प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता.
पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा
Newsworld Pune : बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील होणार्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. गंज पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीमपासून हा मोर्चा निघाला. सुमारे ५०० ते ५५० हिंदू बंधू भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते.
बांगलादेश निर्माण झाल्यानंतर ठरलेल्या कराराप्रमाणे त्या देशातील धार्मिक स्थळे सुरक्षित राहून अल्पसंख्यांक नागरिक सुरक्षित राहतील, या अपेक्षेने हजारो हिंदू कुटुंबीय बांगलादेशमध्ये स्थिरावले. मात्र, या अपेक्षांचा भंग झाल्याचे सध्या दिसून येत आहे. अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली पुरातन मंदिरांची, मूर्तीची तोडफोड केली जाते.
हिंदू महिलांवर बलात्कार केले जात आहेत. तसेच त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून ठार मारण्यात येत आहे. हिंदूंच्या तसेच दलित बांधवांच्या मालमत्ता जमिनी अवैद्य मार्गाने बळकावून तसेच त्यांना बेघर केले जात आहे. त्याचप्रमाणे शत्रू संपत्ती अधिनियम बांगलादेशमध्ये कायदा आणला गेला असून तेथील मूळनिवासी हिंदूंना, हिंदू हे मुसलमान राष्ट्राचे शत्रू असल्याचे जाणीव करून कायद्याचा धाक दाखवून त्यांची जमिनी, घरे हडप केली जात आहे.
तसेच या कायद्यामुळे तेथील मुसलमान समाजाच्या मनात हिंदू बद्दल द्वेष भावना प्रबळ केली जात आहे. या कायद्यामुळे हिंदू नागरिकांचे नागरिकत्वाचे अधिकार देखील, शत्रू राष्ट्राचे लोक म्हणून जबरदस्तीने काढले जात आहे. मूलभूत सरकारी सुविधा योजना त्या ठिकाणच्या हिंदूंना नाकारण्यात येत आहे. बहुसंख्य मुसलमान समाजाने अत्याचार केल्यास कायद्याने त्या मुसलमान नागरिकांना शिक्षा दिली जात नसल्याने हिंदूंचे जगणे अवघड बनले आहे. हिंदूंच्या धार्मिक प्रथा, रितीरिवाज, सण,कार्य यांचे पालन करून दिले जात नाही.
तसे केल्यास त्यांचा सरकारी यंत्रणा त्याचप्रमाणे तेथील बहुसंख्य नागरिकांकडून अमानुष छळ होत आहे. त्यामुळे आता हिंदूंना त्याठिकाणी धर्मांतरण करणे अथवा पलायन करणे इतकेच मार्ग शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे या हिंदू बांधवांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ सर्व जगातील हिंदूंनी यापुढील काळात एकत्रित येण्याची गरज आहे आणि बांगलादेश मधील हिंदू बांधवांना वाचवणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
पुण्यात नात्याला काळीमा; नवजात बालकाला रस्त्यावर फेकले
Newsworld Pune : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरीत नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बालकाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.
काल रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ सिंहगड पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नवजात बालकाला त्वरित ससून रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सिंहगड पोलीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून बालकाच्या पालकांचा शोध घेत आहेत. या अमानवीय प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
‘अत्तर’ची आरोग्य चित्रपट महोत्सवात निवड
Newsworld Pune : द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत व रुहानी म्युझिक निर्मित आणि रामकुमार शेडगे दिग्दर्शित असलेल्या अत्तर लघुपटाला जगभरातील व देशभरातील गाजलेल्या लघुपट महोत्सवात आता पर्यंत अनेक नामंकने आणि पुरस्कार मिळाले असून पुण्यातील १३ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवात “अत्तर” लघुपटाची निवड झाली आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ‘अत्तर’ खूप महत्वाची भूमिका बजावत असते. ‘अत्तर’ जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. याच सुगंधी ‘अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे.
शनिवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.०० वा. लॉ, कॉलेज रोड येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे अत्तर लघुपट दाखवला जाणार असून या लघुपटातील कलाकार मीरा शेडगे, पुरुषोत्तम बाबर, रेवा बर्गे, विनय सोनवणे, रमेश साठे, सिराज कसबे तसेच निर्माते राजू लुल्ला, दिग्दर्शक रामकुमार शेडगे हे उपस्थित राहणार आहेत. तरी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
‘अर्धा वाटा’तून प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे एकत्र
Newsworld Pune : रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच शिर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम मराठी सिनेमा करत आहेत. सिनेमाच्या अनुषंगाने येणारा हा शब्द नेमका कशाबद्दल आहे, राजकारणाबद्दल, शिक्षणाबद्दल, समाजकारणाबद्द्ल की खेळाबद्दल आहे? की भावनेच्या संदर्भात आहे? याबद्दल अद्याप उलगडा झालेला नाही. हर्षद पाटील यांच्या ‘सी व्हेवज’ निर्मितीसंस्थे अंतर्गत राजू मेश्राम लिखित, दिग्दर्शित “अर्धा वाटा” या सिनेमातून मराठी सुपरस्टार प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. मुंबईत आणि आसपासच्या परिसरात या सिनेमाचे वेगात चित्रीकरण सुरु आहे.
‘पावर’, ‘झरी’, ‘लव्ह बेटिंग’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ सारख्या आशयघन चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले लेखक, दिग्दर्शक राजू मेश्राम “अर्धा वाटा” सिनेमाबद्दल सांगतात कि, हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे, या सिनेमातून आम्ही काही वेगळं सांगू पाहतोय, जसे की सिनेमाचे शीर्षक आहे, अर्धा वाटा, हा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नोंद घेणारा शब्द आहे, कुणाच्या सुखात तर कुणाच्या दुखात, कुणाच्या यशात तर कुणाच्या अपयशात कुणाचा तरी अर्धा वाटा असतोच असतो, मात्र या सिनेमात ‘अर्धा वाटा’ नेमका कोणत्या अर्थाने आहे हे जरा आम्ही गुलदस्त्यात ठेवलं आहे. नेमका कुणाचा आणि कशात अर्धा वाटा हे प्रत्यक्ष सिनेमात बघून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘धर्मवीर’ सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी सुपरस्टार प्रसाद ओक, यांना वेगळ्या भूमिकेत बघण्याची संधी या सिनेमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रसाद सिनेमाबद्दल सांगतात कि, सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी जेव्हा मला या सिनेमाची गोष्ट ऐकवली त्याच क्षणी मी सिनेमात काम करण्यास होकार दिला. मला त्यांच्या सिनेमाचा विषय खूप आवडला, सिनेमाचा विषय आम्ही मुद्दाम गुपित ठेवला आहे, भावबंधाचे विश्व उलगडणारा हा सिनेमा एक वेगळा अनुभव देऊन जाईल यात शंका नाही. या सिनेमातली माझी भूमिका कदाचित तुम्हाला चकित करू शकणारी ठरू शकेल, पण हे सर्व प्रेक्षकांनी सिनेमात बघावं अशी माझी इच्छा आहे.
मृण्मयी देशपांडे सांगते कि, एवढ्या वर्षात एकाच क्षेत्रात असूनही मी आणि प्रसाद एकत्र पडद्यावर काम केलेले नाही, त्यामुळे मी खूप खुश आहे कि, आम्ही दोघे एकत्र काम करतोय. माझ्यासाठी सुरवातीला ही थोडी आव्हानात्मक वाटत होती, पण सीनेमाची संपूर्ण कथा ऐकल्यावर माझा आत्मविश्वास वाढला, आजवर प्रेक्षकांनी मला अशा रुपात बघितले नाहीये. अशाप्रकारच्या आशयाचे सिनेमे मराठीत अवश्य यायला हवे, आणि आपण त्याचा अर्धा वाटा घेऊया या हेतूने मी ‘अर्धा वाटा’ सिनेमात काम करण्यास होकार दिला.
मराठीमध्ये भावनिक, संवेदनशील सिनेमांना प्रेक्षक नेहमीच प्राधान्य देतात, “अर्धा वाटा” सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवेल यात शंका नाही.
पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत बैठक
Newsworld Delhi : विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि ईव्हीएमच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत आपली मते मांडली. शरद पवार यांनी या चर्चेत ईव्हीएमच्या मुद्द्यावर अधिक चर्चा करून पक्षाची पुढील रणनीती ठरवण्याचे संकेत दिले आहेत.

