मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात थेट तुमच्या एसएमएसला उत्तर
Newsworldmarathi Team: नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात पाठवलेल्या एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा अन्य डिजिटल माध्यमांवरील संदेशांची स्वतः मुख्यमंत्री दखल घेत असून, अनेक प्रकरणांमध्ये थेट उत्तर दिले जात असल्याचे समोर आले आहे. या उपक्रमामुळे राज्यातील नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे.
नागरिकांकडून आलेल्या संदेशांवर केवळ दखलच घेतली जात नाही, तर संबंधित खात्यांना तात्काळ सूचना देऊन कारवाईचे आदेश दिले जात आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, महसूल, पोलिस यांसारख्या विविध विषयांवरील तक्रारींवर जलदगतीने हालचाली सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यावर त्वरित निर्णय घेणे, हा प्रशासनाचा विश्वास वाढवणारा बदल मानला जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य नागरिकांना थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून थेट प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासकीय यंत्रणेतही अधिक जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. एकूणच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा उपक्रम प्रशासनात सकारात्मक बदल घडवणारा ठरत असून, लोकशाही व्यवस्थेला अधिक बळ देणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
२६ वर्षांचा सहवास संपला; प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याने पुण्यात राजकीय चर्चा
Newsworldmarathi Pune: महापालिकेतील सत्ताकारण स्थानिक नेत्यांकडेच असावे, अशी भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या २६ वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांच्या या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, “दोन्ही गट एकत्र येणार असतील तर मी पक्षात राहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका प्रशांत जगताप यांनी आधीच मांडली होती. अखेर त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत राजीनामा दिला. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांना राष्ट्रवादीच्या दोन वरिष्ठ नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची चर्चा आहे. केवळ नाराजी व्यक्त केल्यामुळे एका अनुभवी स्थानिक नेत्याला डावलले गेले, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नेमके काय साध्य केले, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नेतृत्व नाराज होऊन बाहेर पडल्याने पक्ष संघटनेवर आणि आगामी महापालिका राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुगलचे हे प्रॉडक्ट तुम्हाला माहित आहेत?
Newaworldmarathi Team: तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे विविध प्रॉडक्ट्स आणि त्यांची माहिती आज सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी सहज उपलब्ध आहे. इंटरनेटच्या माध्यमातून गुगलने जगभरातील लोकांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि वेगवान केले आहे. सर्च इंजिन म्हणून ओळख मिळवलेल्या गुगलने कालांतराने अनेक उपयुक्त प्रॉडक्ट्स आणि सेवा विकसित केल्या आहेत.
गुगल सर्च, जीमेल, गुगल मॅप्स, यूट्यूब, गुगल ड्राइव्ह, गुगल फोटोस, गुगल कॅलेंडर यांसारखी प्रॉडक्ट्स आज कोट्यवधी लोक नियमितपणे वापरत आहेत. याशिवाय अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, गुगल क्रोम ब्राउझर, गुगल पे, गुगल मीट आणि गुगल क्लाउड यांसारख्या सेवा देखील महत्त्वाच्या ठरत आहेत. प्रत्येक प्रॉडक्टबाबत सविस्तर माहिती गुगलच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
गुगल आपल्या प्रॉडक्ट्समध्ये वेळोवेळी अपडेट्स आणि नवीन फिचर्स जोडत असते. वापरकर्त्यांची सुरक्षितता, गोपनीयता आणि सोयीसुविधा यावर कंपनी विशेष भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून गुगल अधिक स्मार्ट सेवा देत आहे.
आज शिक्षण, व्यवसाय, प्रवास, मनोरंजन आणि आर्थिक व्यवहार अशा विविध क्षेत्रांत गुगलची प्रॉडक्ट्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे गुगलच्या प्रॉडक्ट्सची माहिती जाणून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.
Google चे प्रमुख प्रॉडक्ट्स खालीलप्रमाणे आहेत
1) Google Search – इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी
2) Gmail – ई-मेल सेवा
3) Google Maps – नकाशे, दिशादर्शन, ट्रॅफिक माहिती
4) YouTube – व्हिडिओ पाहणे व अपलोड करणे
5) Google Chrome – वेब ब्राऊझर
6) Android – मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम
7) Google Drive – क्लाऊड स्टोरेज
8) Google Docs / Sheets / Slides – डॉक्युमेंट, एक्सेल, प्रेझेंटेशन
9) Google Photos – फोटो व व्हिडिओ स्टोरेज
10) Google Meet – व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
11) Google Pay (GPay) – डिजिटल पेमेंट
12) Google Assistant – व्हॉईस असिस्टंट
13) Google Play Store – अॅप्स, गेम्स, मूव्हीज
विकासकामांसाठी भीमाशंकर मंदिर तीन महिने दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
Newsworldmarathi Pune: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यासाठी मंदिर तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील भाविकांचे लक्ष वेधले गेले असून यासंदर्भात प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या कामांचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे. ही कामे सुरळीत व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी मंदिर काही कालावधीसाठी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे बैठकीत मांडण्यात आले.
या संदर्भात झालेल्या बैठकीचा सविस्तर अहवाल तसेच भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मंजुरीनंतर आणि आदेश निर्गमित झाल्यानंतरच मंदिर बंद करण्याची अधिकृत घोषणा केली जाईल. प्रशासनाकडून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मंदिर बंद असताना विकासकामे जलदगतीने पूर्ण करून भाविकांसाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
दरम्यान, मंदिर बंद करण्याबाबतचा अंतिम आदेश कधी जारी होणार, तसेच बंद कालावधीची अचूक तारीख काय असेल, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांना विद्यार्जन बरोबरच कलागुणांना वाव देणे गरजेचे – पोलिस अधीक्षक तानाजी चिखले
Newsworldmarathi Pune: पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात संत तुकाराम इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांचा ‘२०२५-२६’ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘भारतीय सांस्कृतिक वारसा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
या स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड हायवे सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक श्री.तानाजी चिखले, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. फुलचंद चाटे, सौ. वैशाली चाटे, प्राचार्य गौरव राऊत, सुवर्णा कुलकर्णी यांच्यासह शाळेचा सर्व शिक्षक कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
श्री.तानाजी चिखले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कष्ट आणि शिस्ती महत्वाची असून विद्यार्थी दशेत लागलेली शिस्त ही आयुष्यभरासाठी फायदेशीर होत असते. स्पर्धेचे युग असून वेळेचे नियोजन महत्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराने जिंकली एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवले. यामध्ये प्रामुख्याने ‘आम्ही मावळे होणार’ या सादरीकरणातून शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यात आला.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे भरतनाट्यम नृत्य सादर करण्यात आले. यासोबतच विविध देशभक्तीपर गीते आणि नृत्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला.
पालकांचा उदंड प्रतिसाद
हा सोहळा पाहण्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृहात पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. “द रिअल वे टू द रॉयल सक्सेस” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला
तांदळाच्या नवीन हंगामामध्ये आंबेमोहोरांचे भाव तेजीत
Newaworldmarathi Pune: पुणेकरांचा विशेष पसंतीचा आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन हंगामाच्या सुरुवातीला यावर्षी सुद्धा 25 ते 30 टक्क्याहून वाढून घाऊक बाजारात 12000 ते 14000 प्रतिक्विंटल सुरुवात झाली आहे.गेल्या दोन वर्षात आंबेमोहोर तांदळामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली,भाव वाढीचे प्रमुख कारण नॉन बासमती मध्ये निर्यात व उत्पादन कमी.
महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहर तांदळांपैकी 80 टक्के तांदूळ मध्यप्रदेश मधून तर उर्वरित 20 टक्के तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो.यावर्षी सुद्धा या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे,त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी सुरुवातीलाच आंबेमोहर तांदळाची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो,हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो.विशेषता पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे.वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर,इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळांपैकी आंबेमोहोर चांगली मागणी आहे.त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचा दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते.महाराष्ट्रात कामशेत भोर या भागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते काही वर्षांपूर्वी आंबेमोहोर सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते परंतु हा तांदूळ पिकवणाऱ्या पुणे,मावळ,भोर, कामशेत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनीला चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या.
हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले म्हणून आंबेमोहर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे.तसेच आंबेमोहोर तांदळाच्या भाव वाढीमुळे पुणेकरांचा मावळ इंद्रायणी या तांदळाची मागणी वाढत आहे.
यावर्षी देशातील तांदळाचे उत्पादन 1250 लाख टन एवढे आले आहे त्यामुळे आंबेमोहोर शिवाय बासमती, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळाचे दर वर्षभर स्थिर राहतील.
नवीन हंगामातील तांदळाची आवक आज रोजी आली आणि त्याची विधीसर पूजा करून विक्रीस सुरुवात झाली.
अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शाह यांनी दिली.
घाऊक बाजारात नवीन तांदळाचे दर प्रतिक्विंटल
बासमती 12000 ते 13000
इंद्रायणी 6000 ते 7000
सुरती कोलम 6000 ते 7000
घाऊक बाजारात आंबेमोहोर तांदळाचे मागील तीन वर्षातील प्रतिक्विंटल दर
2023-2024 7000 ते 8000
2024-2025 8000 ते 9000
2025-2026 12000 ते 14000
पुण्यात मोठी राजकीय घडामोड; प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाला राजीनामा, राष्ट्रवादी एकत्रीकरणाला विरोध ठरला कारण?
Newaworldmarathi Pune: पुणे शहरातील राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, या एकत्रीकरणास प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट विरोध दर्शविला होता. याच भूमिकेचा फटका त्यांना बसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, पुणे शहराध्यक्ष असतानाही या समितीतून प्रशांत जगताप यांना वगळण्यात आल्याने असंतोष वाढल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप पुढे काय भूमिका घेणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.
कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या पाचव्या भव्य चित्रप्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील कला चळवळीला चालना देणाऱ्या कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित पाचव्या भव्य चित्रप्रदर्शनाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दिनांक २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे चित्रप्रदर्शन बालगंधर्व कला दालन, पुणे येथे भरविण्यात आले असून दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार आदरणीय प्रमोद कांबळे, आदरणीय रामकृष्ण कांबळे आणि मा. घनश्याम देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्यास कला क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनात संस्थेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विषयांवरील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. या चित्रांमधून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, रंगांचा समतोल आणि सृजनशील दृष्टी स्पष्टपणे जाणवते. निसर्ग, मानवी भावना, सामाजिक प्रश्न तसेच अमूर्त कलेचे विविध पैलू विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे चित्ररूपात सादर केले आहेत. उपस्थित कला प्रेमींनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे भरभरून कौतुक केले.
यावेळी कलारंजन आर्ट इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. पूनम पोटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कलेच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलाविषयक जाणिवा अधिक समृद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे चित्रप्रदर्शन नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत असून पुणेकर कला रसिकांकडून या उपक्रमाला विशेष दाद मिळत आहे.
भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल; पुणेकरांची भीमथडीत खरेदीची लयलूट
Newsworldmarathi Pune: अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भीमथडीच्या आजच्या 3 ऱ्या दिवशीही पुणेकरांचे पाय भीमथडीकडे वळले. ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी हाताने बनविलेले विविध पदार्थ खरेदी करताना पुणेकर दिसत होते. त्यामध्ये उन्हाळी पदार्थ, चिया सिड्स, गवतीचहा, पुदिना व आले पावडर, विविध मसाले, गावरान तूप, विवध प्रकारची लोणची, सिद्धटेकच्या प्रसिद्ध चमड्याच्या वस्तू आदी वस्तू खरेदी करताना पुणेकर दिसत आहेत. कर्जत–जामखेड विधानसभा मतदारसंघातील महिलांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनामुळे विविध महिला बचत गटांनी आपली उत्पादने सादर केली आहेत.
यामध्ये खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, कापड, कंदी पेढे, लाकडी बैलगाडी, काठवट , पोळपाट, बेलने, अगरबत्ती, धूप, खारमुरे , गुडीशेव, गावरान गाईचे तूप, हस्तकला वस्तू, शेतीपूरक व स्थानिक उत्पादनांचा समावेश आहे. त्याच बरोबर मटन थाळी, चिकन थाळी, काळा मसाला मधील चिकन, बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, उंबरहंडी, असे विविध खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत. हीच बाब ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करत आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवतआहे.
आज बचत गटातील महिला लाखो रुपयात आर्थिक उलाढाल करून दाखवत आहेत. भीमथडी उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळाले असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
महिलांचा हा पुढाकार भविष्यातील उद्योजकतेसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
जास्तीत जास्त पुणेकरांनी भिमथडीला भेट द्यावी असें आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे www.bhimthadijatra.com या वेबसाईटवर पुढील 3 दिवसाचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.
नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ उपाय; श्रीनाथ भिमाले यांची सेवाभावी कार्यशैली
Newsworldmarathi Pune: प्रभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास ती तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणे हेच माझे ध्येय आहे, असे ठाम मत पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा माजी सभागृहनेते, पुणे महानगरपालिका श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी व्यक्त केले आहे. प्रभागातील कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही व्यक्तीला समस्या भेडसावत असल्यास माझ्या कार्यकर्ता कार्यालयातून तात्काळ संबंधित ठिकाणी कार्यकर्ता पाठवला जातो आणि त्या नागरिकाची अडचण सोडवली जाते, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
श्रीनाथ भिमाले हे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून संघटन बांधणी, लोकसंपर्क आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यात त्यांचा विशेष अनुभव आहे. पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते म्हणून काम करताना त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
प्रभागातील नागरिकांसाठी कार्यकर्ता कार्यालय हे केवळ कार्यालय न राहता एक मदत केंद्र म्हणून कार्यरत आहे. लहान-मोठ्या तक्रारी असोत किंवा तातडीच्या समस्या, प्रत्येक बाबीवर तत्परतेने दखल घेतली जाते. या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये श्रीनाथ भिमाले यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
लोकसभा समन्वयक प्रभारी या नात्यानेही त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. कार्यकर्त्यांना बळ देणे, युवकांना जोडणे आणि जनतेशी थेट संवाद साधणे, या माध्यमातून त्यांनी प्रभावी नेतृत्वाची ओळख निर्माण केली आहे.
“जनतेच्या प्रश्नांसाठी माझे दार नेहमी खुले आहे. नागरिकांच्या सेवेसाठीच माझे राजकारण आहे,” अशी भूमिका श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केली असून त्यांच्या या कार्यशैलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

