संतापजनक…! मुलाचा वर्गात पहिला नंबर आणून देण्याच्या बहाण्याने महिला पालकावर शिक्षकांकडून बलात्कार

Newsworldmarathi Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. “तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल….!” असं आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मलकापूर शहरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून, वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्हीं आरोपी शिक्षकांना अटक केली आहे. समाधान इंगळे आणि अनिल थाटे अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, मलकापूर शहरातील नामांकित नूतन विद्यालयातील दोन शिक्षकांनी एका महिला पालकाला आपल्या जाळ्यात ओढत हे कृत्य केलं आहे. तुझ्या मुलाला आम्ही भरपूर मार्क्स देऊन नेहमीसाठी वर्गात पहिला नंबर आणून देऊ.., त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल…! असं म्हणत संधी साधून वारंवार बलात्कार केला आहे. दरम्यान, दोन्हीं आरोपीना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आमच्या मुलीला नंदवता येत नाही का? असं म्हणत जावयाला बेदम मारहाण

Newsworldmarathi Nagar: किरकोळ कारणावरून सासरच्या मंडळींनी चक्क जावयालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश बाजीराव ब्राम्हणे (वय-३१) यांनी सोनाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गणेश दिलीप गव्हाणे, सचिन दिलीप गव्हाणे, दिलीप महादू गव्हाणे (सर्व रा. हिंगणी दुमाला ता. श्रीगोंदा) राजू जाधव (रा. चेडगाव, ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ब्राम्हणे हे आपल्या घरी असताना त्या ठिकाणी आरोपी गणेश गव्हाणे, सचिन गव्हाणे, दिलीप गव्हाणे आणि राजू जाधव हे आले. आणि तुला आमच्या मुलीला नीट नांदविता येत नाही का? असा जाब विचारला. यावर फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना लोखंडी फायटर तसेच लोखंडी पाईपने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान वडील भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. आमच्या नादी लागला तर एकेकाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सोनाई पोलीस करत आहेत.

चितळे बंधूंची बाकरवडी आता ‘मिनी’ रूपात!

0
Newsworldmarathi Pune: आपल्या रुचकर आणि दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांच्या मनावर गेली ७५ वर्षे अधिराज्य गाजविणारे चितळे बंधू आपली जगप्रसिद्ध बाकरवडी आता नव्या ‘मिनी’ स्वरूपात घेऊन आले आहेत. चितळेंच्या या खमंग बाकरवडीचे हे नवे ‘मिनी’ रूप खवय्यांच्या विशेष पसंतीस देखील उतरत आहे. सध्या देशभरात आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचत असताना या क्रिकेट फिव्हरचे औचित्य साधत चितळे बंधूंनी ही ‘मिनी’ बाकरवडी सादर केली आहे. गेट मॅच रेडी विथ चितळे बाकरवडी म्हणजेच आयपीएल क्रिकेट सामन्याची तयारी चितळे बाकरवडी सोबतच असा संदेश देत सगळ्यांच्या आवडीची ही बाकरवडी नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिनी बाकरवाडीच्या साथीने क्रिकेटप्रेमींचा आयपीएल सामन्यांचा थरार अधिक रोमांचक होईल असा विश्वास व्यक्त करीत चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले, “आयपीएल दरम्यान क्रिकेट चाहते वेगवेगळ्या संघांमध्ये जरी विभागले गेले तरी खाद्यपदार्थ खऱ्या अर्थाने त्यांना एकत्र बांधून ठेवतात. आता चितळे बंधूंच्या या नव्या मिनी बाकरवडीसोबत आम्ही क्रिकेटरसिकांच्या रोजच्या क्रिकेट दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनणार आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.” आयपीएल ही भारतातील एक नावाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळेच आम्ही या क्रिकेट हंगामाच्या निमित्ताने मिनी बाकरवडी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या भविष्यात या नव्या उत्पादनामुळे आम्ही भारताच्या नव्या बाजारपेठांमध्ये निश्चितच विस्तार करू, याची आम्हाला खात्री आहे असे चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे यांनी सांगितले. चितळे बंधू सध्या ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत ते ‘स्नॅकिंग पार्टनर’ म्हणूनही जोडले गेले आहेत. अशातच ही मिनी बाकरवडी क्रिकेट रसिकांना चितळेंसोबत जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे.

डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये टॉप ५ शहरांमध्ये पुण्याचा समावेश : वर्ल्डलाईन इंडियाचा रिपोर्ट

0
Newsworldmarathi Pune: देशात होणाऱ्या डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये आकारमान (व्हॉल्यूम) आणि मूल्य (व्हॅल्यू) या दोन्ही बाबतीत पुणे शहराने सर्वोच्च पाच शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. डिजिटल पेमेंटच्या एकूण व्यवहारांमध्ये पुणे शहराचा वाटा ११ टक्के असून तो २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ८ टक्के होता. तसेच एकूण व्यवहार मूल्यामध्ये पुणे शहराचा वाटा १० टक्के असून त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के ची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पेमेंट सेवांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या वर्ल्डलाईन या कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ च्या सहामाहीत (जुलै-डिसेंबर २०२४) त्यांच्याद्वारे प्रक्रिया केलेल्या डिजिटल व्यवहारांचा नवीनतम अहवाल प्रकाशित केला. यामध्ये भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या पेमेंट इकोसिस्टममधील प्रमुख ट्रेंड मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. सर्वाधिक डिजिटल व्यवहार असलेल्या टॉप ५ शहरांमध्ये बेंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. वर्ल्डलाईन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नरसिंहन म्हणाले, “डिजिटल व्यवहारांच्या संदर्भात भारतातील पहिल्या पाच शहरांमध्ये पुण्याला स्थान मिळाल्यामुळे त्याचे डिजिटल योगदान उठून दिसत आहे. कॅशलेस अर्थव्यवस्थेला त्यांनी जलदपणे स्वीकारले आहे हे त्यातून प्रतिबिंबित होत आहे. शहरातील गतिमान डिजिटल व्यवस्थेवर या टप्प्यामुळे प्रकाश पडत असून तंत्रकुशल लोक, भरभराटीला येत असलेले फिनटेक (अर्थ-तंत्रज्ञान) वातावरण आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यांमुळे त्यांना चालना मिळत आहे. वर्ल्डलाईनमध्ये आम्ही व्यवसाय आणि ग्राहकांना दोन्ही सक्षम करणाऱ्या सुरक्षित, नाविन्यपूर्ण आणि समावेशक पेमेंट सोल्यूशन्सद्वारे या परिवर्तनाला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहोत.” प्रमुख ग्राहक ट्रेंड दुकानातील खरेदी बळकट राहिली आणि त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खालील व्यापारी श्रेणींचा समावेश होता : · किराणा दुकाने · रेस्टॉरंट्स · सेवा केंद्रे · कपड्यांची दुकाने · सरकारी सेवा · औषध दुकाने आणि रुग्णालये या श्रेणींचा एकूण इन-स्टोअर व्यवहारांमध्ये वाटा अंदाजे ६८ टक्के आणि एकूण मूल्यामध्ये ५३ टक्के होता. ऑनलाईन व्यवहारांना खालील गोष्टींनी चालना मिळाली : · ई-कॉमर्स · गेमिंग · उपयुक्तता बिलांची देयके · सरकारी सेवा · आर्थिक सेवा या वर्गांचा एकूण ऑनलाईन व्यवहारांमध्ये ८१ टक्के आणि मूल्यामध्ये ७४ टक्के वाटा होता

एकनाथ शिंदेनी लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा दिली; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत”; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका

काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला ( Pahalgam Terror Attack ) झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू भारतीयांची हत्या करण्यात आली. यात ६ महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश होता. तसेच, या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याकरता महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) स्वत: श्रीनगरला गेले आणि त्यांनी एका अतिरिक्त विमानातून महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना सुखरूप परत आणले. याबाबत माहिती देताना, शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. काय म्हणाले नरेश म्हस्के… माध्यमांना माहिती देत असताना म्हस्के म्हणाले होते की, “काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या लोकांपैकी काही लोक तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. ४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले, सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहिले. त्यांच्या खाण्याचे वांदे होते. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं, ते लोक पहिल्यांदा विमानात बसले.” म्हस्के यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला असून, त्यांच्यावर टीका केली जात आहे. रोहिणी खडसे यांची टीका… दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू आहे. सध्याची वेळ ही सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे. पण खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत.

मेंढरं वळणारा बिरदेव मोठा साहेब झाला..

0
Newsworldmarathi Team: नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली. बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची. प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेवला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेव ला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी UPSC अंतर्गत फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन सिलेक्ट झाले. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता. तो आज संपला. आज दुपारी युपीएससी चा निकाल आला. प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेव चे नाव शोधले. 551 व्या क्रमांकावर बिरदेव चे नाव दिसल्यावर बिरदेव ला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला. तू का मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेउन जातोय, बिरदेव उत्तरला. बिरदेव च्या वडिलांचे किडनी च्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले. पैशाची ओढाताण असल्याने बिरदेव ने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाच मित्र आशिष पाटील (IAS) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता. आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन ची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी complication झाले (बिरदेव च्या भाषेत ऑपरेशन बिघडले). तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. असा हा बिरदेव चा आय पी एस पर्यंतचा प्रवास. जाता जाता बिरदेव चा एक किस्सा सांगितला पाहिजे. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही.

कोंढावा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यलयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली तंबाखू मुक्त कार्यालय शपथ..

0
Newsworldmarathi Pune: राज्य सरकारच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा अंतर्गत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात तंबाखू मुक्त कार्यालय शपथ विधी आणि “वाचाल तर वाचाल” उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांचे आयोजन कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा संदर्भ देत, वाचनाचे महत्त्व आणि मोबाईल युगात वाचनाची गरज यावर सहायक आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर, दुपारी ३ वाजता डॉ. दत्ता कोहिनकर लिखित “सुखी जीवनाचा पासवर्ड” या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्त कार्यालय करण्याची शपथही घेतली. या कार्यक्रमास उप अभियंता राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, अधीक्षक श्री. जीवन मराळे, उप अधीक्षक मोनिष बधे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील 3 हजार मेंढपाळांच्या बँक खात्यात ७ कोटी जमा; काय आहे योजना? घ्या जाणून…

0
Newsworldmarathi Mumbai: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील 3054 मेंढपाळांना सन 2024-25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 7.33 कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मेंढ्यांच्या चराईकरिता राज्यातील मेंढपाळांना अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यामुळे मेंढपाळांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत्र निर्माण झाला आहे आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागला असल्याची भावना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मेंढीपालन व्यवसाय हा पूर्णपणे स्थलांतरित पद्धतीने केला जातो. पावसाळी हंगामामध्ये मेंढपाळ त्यांच्या मूळ गावी परत आल्यानंतर पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यांना चराईकरिता क्षेत्र उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे चाऱ्याअभावी मेंढ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांची उत्पादकता कमी होऊन मेंढपाळ कुटुंबाचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे राज्यामधील मेंढपाळ कुटुंबाना माहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढ्यांसाठी चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी चराई अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन विभाग व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत राबविली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्यामध्ये या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून लॉटरी पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे त्यांची निवड यादी तयार करण्यात आलेली होती. जिल्हा व तालुकानिहाय धनगर व तत्सम मेंढपाळांची संख्या विचारात घेऊन जिल्हा व तालुकानिहाय लक्षांक देण्यात आले होते. त्यामधून पात्र मेंढपाळ कुटुंबाना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रति माह ६ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये चराई अनुदान देण्यात आले, असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शितलकुमार मुकणे यांनी दिली आहे. चराई अनुदान मिळाल्यामुळे मेंढपाळ कुटुंबाना त्यांच्या मेंढ्याकरिता चारा उपलब्ध झाल्याने मेंढ्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊन मेंढपाळाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडत आहे. या योजनेद्वारे राज्यामधील ३०५४ लाभार्थीना रु. ७.३३ कोटी अनुदान थेट लाभधारक हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ रामास्वामी एन. यांनी पाठपुरावा केला.

पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ‘मिशन मोड’वर

0
Newsworldmartahi Pune: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेत असून शुक्रवारी २३२ प्रवाशांसाठी विशेष विमानाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. इंडिगो कंपनीचे हे विमान शुक्रवारी दुपारी श्रीनगरवरून महाराष्ट्राकडे झेपावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या ४८ तासांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून विशेष विमानांची व्यवस्था करत आहे. गुरुवारी मोहोळ यांच्या प्रयत्नातून १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले असून आज शुक्रवारी २३२ प्रवासी महाराष्ट्राकडे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रवाशांना परतण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली असून राज्य सरकार या विमानांचा खर्च करणार आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले ‘महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना आणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून जम्मू ते श्रीनगर हा रस्ता बंद असल्याने काही पर्यटक जम्मू येथे अडकलेले आहेत. शिवाय रेल्वेने गेलेल्या प्रवाशांनाही रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा फटका बसला असून महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना श्रीनगरमार्गे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे अजूनही जम्मू-काश्मीरच्या विविध भागातून फोन कॉल्स येत असून त्यांची व्यवस्था केली जात आहे. पुतणीचे लग्न काही तासांवर; मंत्री मोहोळ मात्र वॉररुममध्येच ! केंद्रीय मंत्री मोहोळ यांची पुतणी अश्विनी हिचा आज (शुक्रवार) विवाह असून गेले काही दिवसापासून मोहोळ कुटुंबियांकडून याची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र असे असले तरी गेल्या तीन दिवसांपासून मोहोळ स्वतः वॉररूममध्येच व्यस्त आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांचे येणारे फोन, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क आणि आवश्यक ती मदत करणे यातच मोहोळ स्वतः व्यस्त आहेत. त्यामुळे एकीकडे मोहोळ कुटुंब ‘लग्नघर’ असताना स्वतः मात्र महाराष्ट्रातील नागरिकांना काश्मीरमधून परत आणण्याच्या ‘मिशन’ वरच असल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील शाळांची माहिती आता एका क्लिकवर; सरकारचा मोठा निर्णय

0
Newsworldmarathi Mumbai: राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना छायाचित्रांसह संबंधित माहिती येत्या ३० एप्रिलपर्यंत अॅपवर नोंदवणे बंधनकारक केले आहे. शिवाय संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी नोंदवलेला मोबाइल क्रमांक टाकून या अॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर शाळेची युडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. शाळेचे जीआयएस करून शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करावे लागतील. हा अर्ज भरताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो, माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘महास्कूल जीआयएस’ अॅप विकसित शाळांचे ठिकाण, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध सोयीसुविधांची माहिती मिळवण्यासाठी राज्य शासनाने सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘महास्कूल जीआयएस’ हे अॅप विकसित केले आहे. या अॅपमध्ये शाळेचे नाव, संपूर्ण इमारत, किचन शेड, स्वच्छतागृहाची सुविधा, पाण्याची सुविधा यांचे फोटो अपलोड करून माहिती भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. ही माहिती शैक्षणिक सुधारणा, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि संसाधनांचे वितरण यासाठी महत्त्वाची ठरेल.या जिओ टॅगिंग प्रक्रियेमुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.