अमली पदार्थ विरोधी लढा सर्वसमावेशक व्हावा : शारदा राऊत
Newaworldmarathi Pune: अमली पदार्थ राक्षस आता अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला असून हा शत्रू दिसत नसल्यामुळे तो जास्त घातक आणि गंभीर आहे. पूर्वी तरुण पिढीला लक्ष्य करणारा हा राक्षस आता शालेय पिढीला लक्ष करत आहे त्यामुळे या विरोधात लढण्यासाठी पोलीस, प्रशासन, प्रसार माध्यमे, स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्था, पालक ,शिक्षक, समुपदेशक, मित्रपरिवार या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून या लढायला आता व्यापक स्वरूप येण्यासाठी तो सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ,भोई प्रतिष्ठान आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांनी या दृष्टी ने समाजासमोर स्तुत्य आदर्श उभा केला आहे. महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स अशा वाटचालीत नेहमीच अग्रेसर राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स च्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत यांनी व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भोई प्रतिष्ठान पुणे , महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने से नो टू ड्रग्स अँड से येस टू लाइफ या अमली पदार्थ विरोधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .त्याच्या उद्घाटन प्रसंगी शारदा राऊत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की या प्रश्नावर लढण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे आणि या दृष्टीने ही कार्यशाळा पथदर्शी प्रकल्प ठरेल.
याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री अभिराम घड्याळ पाटील , भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई, जाधवर इन्स्टिट्यूट चे प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दुल जाधवर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड प्रताप परदेशी, जेष्ठ समुपदेशक डॉ. प्रिया निघोजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवारांच्या नातीचं, रेवती सुळेचं ठरलं लग्न !
Newaworldmarathi Pune:शरद पवार यांची नात, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं, रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. यामुळे पवार आणि सुळे कुटुंबात अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्यावर चहूकडून अभिनंदाचा वर्षाव होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीने, सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
राष्ट्ववादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचा विवाह निश्चित झाला आहे. सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मैत्रीणीने ही गुड न्यूज जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत लग्न ठरल्याची बातमी शेअर केली. रेवती आणि सारंग या दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत स्मृती यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांचही त्यांनी अभिनंदन केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारंग अरूण लखानी हे नागपूरचे आहेत, त्यामुळे रेवती सुळे या नागपूरच्या सूनबाई होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुळे व पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थी काँग्रेसच्या राज्य महासचिव पदी ॲड.कृष्णा साठे यांची निवड
Newaworldmarathi Pune : काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयुआय (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) अर्थात विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी ॲड.कृष्णा साठे यांची निवड करण्यात आली आहे. ॲड.साठे हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळीत सातत्याने आणि सक्रियपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षणाशी संबंधित प्रश्न, परीक्षा, फी वाढ, वसतिगृह, शिष्यवृत्ती, तसेच अन्य मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.
विद्यार्थी प्रश्नांवर अनेक आंदोलने केली व प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी एनएसयुआय पुणे शहर व जिल्हा महासचिव म्हणून जबाबदारी पाहिली आहे. तसेच, पालघर जिल्हा एनएसयुआय प्रभारी म्हणून त्यांनी संघटनात्मक बांधणी करत विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचे काम केले आहे. राज्य महासचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात एनएसयुआयच्या माध्यमातून तीव्र संघर्ष केला जाईल. काँग्रेस पक्षाची विचारधारा, संविधानिक मूल्ये, समता, न्याय व लोकशाहीचे विचार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ताकदीने व निष्ठेने काम करत राहीन.ॲड. कृष्णा साठे महासचिव, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआय
नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले; गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग
Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २५ (ब) मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी एक आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला असून, ही मानधनाची रक्कम ‘महापौर निधी’ला वर्ग करण्याबाबतचे पत्र देत, शहरातील गरजू रुग्णांच्या मदतीसाठी खर्च करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९ (अ) १ अंतर्गत निर्वाचित सभासदांना मिळणारे मानधन आपण स्वीकारणार नसल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. या मानधनाची रक्कम दरमहा ‘महापौर निधी’ मध्ये जमा करण्यात यावे आणि त्यातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.
आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले की, “राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. नगरसेवक पद हे या सेवेसाठी ताकद देणारे पद आहे. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचे मानधन घेणे मला पटत नाही. त्यांनी दिलेल्या या संधीच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून येणारे मानधन हे त्यांच्या सेवेसाठी खर्च व्हावे या भावनेतून मी हा निर्णय घेतला. अनेकदा गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. माझ्या मानधनाचा विनियोग अशा रुग्णांच्या सेवेसाठी झाल्यास त्याचे मला अधिक समाधान मिळेल.”
Sharad Pawar: शरद पवारांची तब्येत बिघडली बारामती वरून रुबी हॉल येथे हलवले
Newaworldmarathi Pune: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या तब्येतीबाबतची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे बारामतीतील आपल्या ‘गोविंद बाग’ या निवासस्थानातून पुणे शहराच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून डॉक्टरांकडून तपासणीनंतरच पुढील स्थिती स्पष्ट होणार आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना राज्यभरातील नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
भाजपची मोठी खेळी, पुण्याच्या महापौरपदी महिला चेहरा, तर RPI आठवले गटाला दिले महत्त्वाचे पद
Newaworldmarathi Pune: पुणे महापालिकेत भाजपने मास्टरस्ट्रोक खेळत महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड केली आहे. आरपीआयला महत्त्वाचे पद देऊन भाजपने आगामी निवडणुकीसाठी सामाजिक समतोल कसा साधला, याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सर्वांचेच लक्ष महापौर कोण होणार याकडे लागले होते. पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. भाजपच्या मंजुषा दीपक नागपुरे यांची पुण्याच्या नव्या महापौर म्हणून वर्णी लागली. तर आरपीआयचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारला. विरोधी पक्षांनी शेवटच्या क्षणी आपले अर्ज मागे घेतल्याने ही प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
पुणे महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने मंजुषा नागपुरे यांची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात होती. मात्र, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) उपमहापौर पद देऊन भाजपने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु सत्ताधारी बाकांवरील संख्याबळ आणि बिनविरोधची परंपरा कायम राखण्याच्या आवाहनानंतर विरोधकांनी माघार घेतली.
सोशल मीडियावर गाजणाऱ्या सरपंच निर्मला नवले यांचा पंचायत समिती निवडणुकीत पराभव; भाजपच्या मनीषा पाचंगे यांचा दणदणीत विजय
Newaworldmarathi Pune: कारेगावच्या सरपंच आणि सोशल मीडियावर मोठी ओळख असलेल्या निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळालेल्या निर्मला नवले यांच्यासमोर भाजपने मनीषा पाचंगे यांना मैदानात उतरवले होते. या थरारक लढतीत भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी २७०० मतांनी विजय मिळवत निर्मला नवले यांचा पराभव केला आहे.
निर्मला नवले या कारेगावच्या सरपंच म्हणून कार्यरत असून, सोशल मीडियावर त्या प्रचंड सक्रिय आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमांवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडिओंमुळे आणि थेट जनतेशी संवाद साधण्याच्या शैलीमुळे त्या राज्यभर चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा होईल, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती.
मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांनी वेगळा कौल दिला. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन केला. मतमोजणीनंतर मनीषा पाचंगे यांनी २७०० मतांची स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला.
या निकालामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक यातील फरक पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. तसेच हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेससाठीही धक्का मानला जात आहे. कारेगाव परिसरात या निकालाची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी स्थानिक राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यभूषण नितीन रावजीभाई देसाई यांचे निधन
Newsworldmarathi Pune: अपार व्यावसायिक यश मिळवूनही समाजाशी नाळ घट्ट ठेवणारे पुण्यभूषण नितीन रावजी देसाई यांचे ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, मुलगी शितल, निशा, रिमा, जावई राजन, जय, तसेच नातवंडे असा परिवार आहे.
उद्योगविश्वात यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने पुण्याच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. व्यावसायिक यश ही अंतिम मंजिल नसून समाजाच्या उन्नतीसाठी ते साधन ठरले पाहिजे, हा विचार त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कृतीतून जपला.
१ नोव्हेंबर १९४३ रोजी पुण्यात जन्मलेल्या नितीन देसाई यांचे बालपण कसबा पेठेतील वाडा आणि चाळसंस्कृतीत गेले. आरसीएम गुजराती हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुढे गुजरातमधील करमसद येथील अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून सिव्हिल आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेत उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही मातृभूमीच्या ओढीने त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
भारतात परतल्यानंतर वडिलोपार्जित देसाई बिडी उद्योगाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी ब्रँडिंग, मार्केटिंग आणि उत्पादन व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थानसह देशभरात व्यवसाय विस्तारला. पुढे देसाई ब्रदर्स समूहाच्या माध्यमातून पारंपरिक लोणच्यांच्या उद्योगात गुणवत्ता, चव आणि विश्वासाचा ठसा उमटवला. तसेच अॅक्काफार्म केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून केमिकल उद्योगात भारतासह अमेरिकेतही व्यावसायिक भरारी घेतली.
उद्योगाबरोबरच सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहिला. सह्याद्री हॉस्पिटलचे को-प्रमोटर म्हणून आरोग्य क्षेत्रात योगदान, सोसायटी फॉर फिजिकली हॅण्डीकॅपच्या माध्यमातून दिव्यांग व मुकबधिरांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्य, तसेच एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलद्वारे लाखो गरजू रुग्णांना विनामूल्य नेत्रशस्त्रक्रियांची सुविधा देऊन त्यांनी लाखो रुग्णांना मोफत दृष्टी देण्याचे त्यांचे कार्य व्यवस्थात्मक आणि दीर्घकालीन होते. यासोबतच वनराई, जनसेवा फाउंडेशन, दिशा संस्था, धायरी व पानशेत येथील वृद्धाश्रम, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. ते पूना क्लब आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष होते.
श्री पूना गुजराती बंधू समाज व दि पूना गुजराती केळवणी मंडळ यांच्या अध्यक्षपदी राहून शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच PGKM स्कूल आणि जयराज स्पोर्ट कॉन्व्हेंशन सेंटर हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधी देशातील मोठे प्रकल्प पूर्ण झाले. तसेच विविध राष्ट्रीय व सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित झालेले नितीन देसाई उद्योगातून समाजनिर्मितीकडे जाणाऱ्या मूल्याधिष्ठित उद्योजकतेचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांना दिशा देत राहतील.
उद्योगातून समाजासाठी देणगी नव्हे, तर कर्तव्य म्हणून काम करणारे नितीन देसाई हे मूल्याधिष्ठित उद्योजकत्वाचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार, कार्य आणि सामाजिक बांधिलकी पुढील पिढ्यांना निश्चितच दिशा देत राहतील.
बनावट बांधकाम परवानग्याद्वारे शासनाची फसवणूक; वारजे पोलीस सात गुन्हा दाखल
Newaworldmarathi Pune: बनावट कमेन्समेंट प्रमाणपत्र, कम्प्लिशन प्रमाणपत्र आणि मंजूर बांधकाम आराखड्यांच्या आधारे दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामीराज डेव्हलपर्सचे भागीदार संदिप दामोदर कडू (वय ३८, रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), साईनाथ वासुदेव सपकाळ (वय ३७, रा. तृप्ती गार्डन, आनंदनगर, सिंहगड रोड), महेश महाबळेश्वर नाईक (वय २५), रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), आश्रफ खलील शेख (वय २५, रा. हर्ष पॅलेस, आनंदनगर, सिंहगड रोड), संदेश राजू आवळे (वय ३४), प्रियंका संदेश आवळे (वय २९, रा. स्वामीराज बी, वडगाव धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३३६(३), ३४०(२), ३१८ (४), ३ (५) तसेच नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १३, पुणे शहर कार्यालयाचे अधिकारी व्ही. डी. कासेवाड (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० डिसेंबर २०२४ रोजी घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्त क्र. २३७८१/२०२४ नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना फिर्यादी कासेवाड यांना जोडलेल्या पूरक कागदपत्रांबाबत संशय आला. संबंधित दस्तासोबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे कमेन्समेंट प्रमाणपत्र व मंजूर बांधकाम आराखडा जोडण्यात आला होता.
या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ती पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. २) यांच्याकडे पाठविण्यात आली. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी उपअभियंता कार्यालयाकडून त्यांना पत्र प्राप्त झाले.
या पत्रानुसार, धायरी येथील सर्व्हे नं. १०५, हिस्सा ५/१ या ठिकाणी नमूद बांधकामास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महाशिवरात्रीला भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी बंद राहणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती
Newsworldmarathi Pune:
सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभकाळात नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या प्रमाणावर भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. साधारणपणे दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येतील, असा अंदाज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे.
या आराखड्यानुसार कुंभमेळा २०२७ दरम्यान गर्दी व्यवस्थापन व भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध पायाभूत विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश व निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कुंभमेळ्याच्या काळात अपेक्षित प्रचंड गर्दी लक्षात घेता सध्याचा जुना सभामंडप अपुरा पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडप उभारण्यात येत आहे. तसेच पायरी मार्गाचे कामही सुरू आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर दगड, बांधकाम साहित्य व अवजड यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. कामांचे स्वरूप, भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची संख्या लक्षात घेता बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
पूर्वी भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्याच्या बांधकामाचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षिततेचा सखोल आढावा घेतल्यानंतर महाशिवरात्री कालावधीतही मंदिर खुले ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भीमाशंकर हा अतिवृष्टीचा भाग असल्याने जून ते सप्टेंबरदरम्यान बांधकाम करणे कठीण होते, त्यामुळे उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींचा विचार करून दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

